DNA मराठी

Ahilyanagar

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये संरक्षण साहित्य निर्मिती उद्योगास शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील शेती महामंडळाची ४ हजार २०० एकर जागा दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प या तीन महत्वपूर्ण उद्योगांसाठी मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी डीआरडीओला ( संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) १५०० एकर, सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १२०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टीरीज लिमिटेडला १५०० एकर अशी ४२०० एकर जागा देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 49 वर्षांच्या करारावर देणार जमीन या संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरारावर (लीजवर) देण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले असून, तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण या संस्थांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २,३०० एकर आणि अन्य १,६०० एकर अशी एकूण ३,९०० एकर अकारी पड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे उपसमितीने स्पष्ट केले.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये संरक्षण साहित्य निर्मिती उद्योगास शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन Read More »

img 20260622 wa0001

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर शहरातील पाथर्डी रोडवरील महेशनगर परिसरातील हॉटेल शौर्य येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर धोत्रे व त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयेश पाटोळे व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याच संशयित आरोपी आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपधीक्षक दिलीप टिपरसे, एपीआय तेजश्री थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी जयेश पाटोळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी Read More »

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली

Ahilyanagar News : यावर्षी पावसाला होणार उशीर आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी पिण्याचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानी सांगितले की, धरण क्षेत्र व अन्य उदभव क्षेत्रातून पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर वेळापत्रकानुसार गावात जाणार आहेत. त्यांच्यासाठीच्या पाण्याच्या उद्भव परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकले जाणार नाही. तेथील पाणी पुरवठा योजनेत किंवा गावच्या लोकसंख्येनुसार दोन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. या टाक्यांना कॉक बसवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल व ते वायाही जाणार नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी चारा सध्या मुबलक असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच सहा दिवसात येईल व त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही विखे यांनी सांगितले.

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली Read More »

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर

Ashadhi Wari Palkhi : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्ती महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज व श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्याबरोबरच अन्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे पुरवणे तसेच जलरोधक मंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनास सादरही करण्यात आला होता. राज्यातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. “आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

img 20260605 wa0010

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला

Burudgaon Garbage Depot : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोवरील सौरऊर्जा प्रकल्पाला बसला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सुमारे ५०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महापौर ज्योती गाडे यांनी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेत तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.या पाहणीवेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर, इंजिनिअर गणेश गाडळकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांनी कचरा डेपो परिसरातील सोलर प्रकल्पाची पाहणी करताना नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापौर गाडे म्हणाल्या की, वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अशा प्रकल्पांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारण्यात याव्यात आणि त्या शेडवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा विचार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात प्रकल्पांचे नुकसान कमी होईल आणि वीज निर्मिती अखंडित सुरू राहील. त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सौरऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून अशा प्रकल्पांचे संरक्षण आणि देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. नुकसानग्रस्त सोलर प्लांटची तातडीने दुरुस्ती करून वीज निर्मिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सोलर प्रकल्पाच्या पाहणीनंतर महापौरांनी कचरा डेपो परिसरातील विविध प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. यामध्ये खत निर्मिती प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प, लिचेट प्रक्रिया प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांची माहिती घेण्यात आली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला Read More »

vivek kolhe

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा

Vivek Kolhe :  माझा स्वभाव सकारात्मक राजकारण करण्याचा आहे. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ कशी मोठी करता येईल, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर किती संयम ठेवायचा यालाही एक मर्यादा असते. लक्षात ठेवा, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’,” अशा अत्यंत कडक शब्दांत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी विरोधकांना आणि पर्यायाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. राहाता शहरात आयोजित एका सत्कार समारंभादरम्यान सभेत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे हे बोलत होते. सर्वपक्षीय उपस्थिती आणि वाढती ताकद या सभेला मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती यावेळी होती या सर्वपक्षीय प्रेमाचा उल्लेख करत विवेक कोल्हे म्हणाले की, “अनेक टीका-टिप्पण्या आणि क्रॉस फायरिंग झाली, पण आज मला केवळ टीका करायची नाही. हा जो वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हीच माझी खरी ताकद आहे ‘गणेश’ कारखान्यावरून विरोधकांना टोला शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ‘गणेश’ कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “दोन-तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांसमोर जा आणि मते मागा. पण, आता अशा पद्धतीने कायदेशीर अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका,” अशी नम्र विनंती त्यांनी केली. तसेच जर विरोधक ऐकणार नसतील, तर संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी लावला छातीवर बिल्ला: आपल्या आमदारकीचा उल्लेख करताना कोल्हे म्हणाले, “मला आमदारकी रूपी जो सातबारा मिळाला आहे, तो बिल्ला खुद्द मुख्यमंत्री यांनीच माझ्या छातीवर लावला आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. या सातबाऱ्याच्या पोटहिश्श्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेच आहात असे कोल्हे म्हणाले. आधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यापुरते मर्यादित असलो, तरी आता आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ हे आहे. यामध्ये राहता आणि लोणी परिसर आवर्जून येतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. कामासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जाण्याची आपली तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक जर कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर मी भाऊ आणि सहकारी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज

Nilesh Lanke : जिल्ह्याच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’साठी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे २५ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्याच्या पहिल्या सरकारी मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी ४४८ पदांची निर्मितीही मंजूर केली आहे. जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी खासदार डॉ. निलेश लंके गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. दिल्ली ते मुंबई विविध स्तरांवर बैठका घेऊन त्यांनी जिल्ह्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासमोरही त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती मांडत मेडिकल कॉलेजची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्य शासनाने प्रकल्पाला गती देत आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयासाठी सुरुवातीला नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्व निकषांचा विचार करून कापूरवाडी येथील २५ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सुविधा असलेले मेडिकल कॉलेज, संलग्न रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह आणि संशोधन सुविधा उभारल्या जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचे तात्पुरते कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून चालविण्यात येणार आहे. तसेच पुढील सात वर्षांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज Read More »

anil rathod

Anil Rathod : मोठी बातमी! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत नेते अनिल राठोडसह सर्व निर्दोष

Anil Rathod : नगरच्या केडगावमध्ये २०१८ मध्ये दोघा शिवसैनिकांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता मोठा निकाल आला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. नेमकं प्रकरण काय? एप्रिल २०१८ मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०८ लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली, त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते. या कारवाईनंतर अनिल राठोड यांनी म्हटले होते केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती. शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पुढे २०२० मध्ये करोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले. न्यायालयात खटला सुरु होता. त्याचा निकाल आता आला असून सर्वांची सुटका झाली आहे.

Anil Rathod : मोठी बातमी! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत नेते अनिल राठोडसह सर्व निर्दोष Read More »

Ahilyanagar News : पाथर्डी प्रकरण, न्यायासाठी महिलाचे महिनोनमहिने पोलीस ठाण्यात चक्करा पण…

Ahilyanagar News : पाथर्डी पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावर घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही ती संपूर्ण यंत्रणेच्या संवेदनाहीनतेवर उभा राहिलेला कठोर प्रश्न आहे. न्याय मागण्यासाठी एका पीडित महिलेला महिनोनमहिने पोलीस ठाण्याचे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात, हीच बाब मुळात लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे. त्यातही गँगरेपसारख्या गंभीर आरोपाची तक्रार नोंदवून घेण्यात झालेला विलंब आणि अखेर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलीस ठाण्यात आरोपींकडून दबाव टाकला जाणे, हे अधिक धक्कादायक आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या ठिकाणीच पीडितेला असुरक्षित वाटावे, इतकी परिस्थिती भयावह झाली असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? एका महिलेने आणि तिच्या मुलाने स्वतःवर पेट्रोल ओतण्याइतकी निराशा अनुभवली, याचा अर्थ व्यवस्थेने त्यांना पूर्णतः अपयशी ठरवले आहे. त्या झटापटीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू केवळ अपघात म्हणून नोंदवून चालणार नाही तो व्यवस्थेच्या ढिसाळपणाचा आणि निष्क्रियतेचा परिणाम आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील कथित बेजबाबदार कारभार. पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, अवैध धंदे, कथित कलेक्शन आणि राजकीय पाठबळाच्या आरोपांनी परिस्थिती अधिक गंभीर बनते. जर खरोखरच काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची “कलेक्शन टीम” कार्यरत असेल, तर ती केवळ एका ठाण्याची समस्या नाही ती संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर आघात करणारी बाब आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसणे किंवा फुटेज उपलब्ध न होणे हा देखील गंभीर मुद्दा आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हे पारदर्शकतेचे प्रतीक असायला हवे. मात्र, महत्त्वाच्या केबिनमध्येच सीसीटीव्ही नसतील, तर संशय अधिक गडद होतो. विशेषतः अशा घटनेनंतर, पुरावे उपलब्ध नसणे ही बाब अधिक चिंताजनक ठरते. आज प्रश्न केवळ एका गुन्ह्याचा नाही; प्रश्न आहे न्यायप्रक्रियेवरील विश्वासाचा. पीडित महिलेला वेळेत न्याय मिळाला असता, तक्रार तत्काळ नोंदवली गेली असती आणि आरोपींना संरक्षण देण्याचा आभास निर्माण झाला नसता, तर कदाचित एका व्यक्तीचा जीव गेला नसता. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची केवळ चौकशी करून थांबता कामा नये. पाथर्डी पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कारभाराचे स्वतंत्र आणि निष्पक्ष ऑडिट झाले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजेत. कारण, जीव गेल्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि नंतर होणाऱ्या चौकशा या मृत व्यक्तीला परत आणू शकत नाहीत; पण वेळेत घेतलेली जबाबदारी भविष्यातील अशा दुर्घटना रोखू शकते.

Ahilyanagar News : पाथर्डी प्रकरण, न्यायासाठी महिलाचे महिनोनमहिने पोलीस ठाण्यात चक्करा पण… Read More »