DNA मराठी

शेती

farmers

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे समर्थन करताना, “कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र, शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांवरील ५० हजार रुपयांची अट हटवण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून परिस्थितीची गरज म्हणून ती करावी लागते. “आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सावकारांकडे जाण्याची वेळ येऊ नये, हे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार ते पूर्ण केले आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, तरीही सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सरकारच्या वीज सवलतीचाही उल्लेख केला. “कर्जमाफीव्यतिरिक्त सरकार दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपयांची वीजमाफी देते. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बँकांची बैठक घेऊन आणि संपूर्ण माहितीचा अभ्यास करूनच ही योजना आखण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबत ३६ लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “ही योजना ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे,” असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीतील आमदारांनी कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ही अट काढल्यास सरकारवर ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी माहिती देण्यात आली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा एक लाख रुपये केल्यास सुमारे दोन लाख शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “व्यापक हिताचा विचार करून सरकारने अखेर ५० हजार रुपयांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, २०२६-२७ संदर्भातील अटही वगळण्यात येणार आहे,” असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली Read More »

rain

Maharashtra Rain Alert: नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील वाढता विसर्ग आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या तसेच धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये विसर्ग सुरू असून आज दुपारी १२ वाजता भीमा नदीच्या दौंड पुलावरून ८५ हजार ७८४ क्युसेक, तर गोदावरी नदीपात्रात नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५ हजार २४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा व गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी तसेच प्रवरा व मुळा नदीकाठावरील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मेघगर्जना, वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली अथवा जाहिरात फलकांच्या परिसरात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये तसेच विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल, टॉवर्स, ध्वजांचे खांब, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, ट्रान्सफॉर्मर तसेच अधांतरी लटकणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत, डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे आणि जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवावा. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढे व नाल्यांतील पाणीपातळी वाढत असल्यास प्रवाहापासून दूर राहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुलांवर किंवा बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि घाट रस्त्याने प्रवास टाळावा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

Maharashtra Rain Alert: नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट Read More »

rain

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्थानिक प्रशासन, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा Read More »

agriculture department

Agriculture Department: खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; 113 परवान्यांवर कारवाई, 7 गुन्हे दाखल

Agriculture Department : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले असून, २७७ केंद्रांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणीनंतर १६ खत विक्री परवाने निलंबित आणि २ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ३ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ६४ परवाने निलंबित आणि ४ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी वापर टाळण्यासाठी विभागात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या आहेत. कृषि विभागातर्फे खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जेजुरकर यांनी दिला आहे. अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातूनच खत खरेदी करावे आणि काही तक्रार आल्यास नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कारवाईच्या वेळी पुणे अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी निलेश गढरी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.

Agriculture Department: खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; 113 परवान्यांवर कारवाई, 7 गुन्हे दाखल Read More »

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली

Ahilyanagar News : यावर्षी पावसाला होणार उशीर आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी पिण्याचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानी सांगितले की, धरण क्षेत्र व अन्य उदभव क्षेत्रातून पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर वेळापत्रकानुसार गावात जाणार आहेत. त्यांच्यासाठीच्या पाण्याच्या उद्भव परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकले जाणार नाही. तेथील पाणी पुरवठा योजनेत किंवा गावच्या लोकसंख्येनुसार दोन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. या टाक्यांना कॉक बसवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल व ते वायाही जाणार नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी चारा सध्या मुबलक असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच सहा दिवसात येईल व त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही विखे यांनी सांगितले.

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली Read More »

fb img 1781585362460

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

El Nino : ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एल-निनो’चा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच कृषी, जलसंपदा, महापालिका व महसूल विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी तात्काळ भरारी पथके नियुक्त करावीत. कालवे व बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा त्वरित बंद करावा. आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका, नगरपालिकांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांनी विद्यमान पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असे त्यांनी सांगितले. कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक किफायतशीर व पाणी बचतीचे ठरत असेल, तर त्या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करावी, असे निर्देशही आशिया यांनी बैठकीत दिले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. उतारावर आडवी पेरणी करण्याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र खतांचा काळाबाजार, लिकिंग तर होत नाही ना याची कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करावी. खत व बियाणे पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि ‘डिजिटल पीक पाहणी’ मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे, गाळ काढण्याची कामे व इतर पाणी साठवण क्षमतेत वाढ करणारी कामे जलद गतीने पूर्ण करावीत, जेणेकरून उपलब्ध पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा निर्माण करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी सांगितले.

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया Read More »

Maharashtra Onion Price: सरकारी कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा होण्याची शक्यता

Maharashtra Onion Price: येणाऱ्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी सरकार खरेदी करत असलेल्या कांदा खरेदीत पुन्हा मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे म्हणून सरकारने कांदा खरेदीची पद्धत बदलावी किंवा कांदा खरेदीच रद्द करावी असे निवेदन, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र शासनाला पाठवले आहे. सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, ते नियंत्रित करण्यासाठी सरकारने मूल्य स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत नाशिक जिल्ह्यात दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १५८०/- रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. खरेदीत होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी थेट बाजार समितीत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ८ जून पासून कांदा खरेदीस सुरुवात झाली आहे मात्र प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नाही असे चित्र आहे. सरकारने कांदा खरेदी बाजार समितीतच व्हावी असा निर्णय घेतला असला तरी नाफेड किंवा खरेदी करणारी एजन्सी फक्त बाजार समितीत आपले खरेदी केंद्र सुरू करेल, प्रत्यक्ष लिलावात भाग घेणार नाही. नोंदणी केलेले शेतकरी त्या गाळ्यावर आपला माल घालतील नंतर त्या कांद्याची छाटणी व प्रतवारी करून नाफेडच्या निकषात बसणारा कांदा स्वीकारला जाईल व नाकारलेला कांदा शेतकऱ्याने परत घेऊन जायचा आहे. स्वीकारलेल्या कांद्याला जास्तीत जास्त १५८०/- रु क्विंटल प्रमाणे दर देण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया अत्यंत किचकट आहे, त्यापेक्षा नाफेडने थेट लिलावात बोली बोलून कांदा खरेदी करावा व नंतर शेतकऱ्याची नोंदणी करून प्रतवारी करावी आणि शेतकऱ्याला पेमेंट करावे. ही सर्व प्रक्रिय सी सी टी व्ही च्या निगरणित व्हावी. सध्याच्या खरेदी प्रक्रियेत मोठा घोटाळा होऊ शकतो. मंगळवार दिनांक ९ जून रोजी केंद्रीय वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कांद्याच्या साठ्याची माहिती घेतली असता ४५.२६ टन कांदा साठा असल्याचे सांगण्यात आले मात्र त्या दिवशी कुठेही, कोणत्याही बाजार समितीत कांदा खरेदी झालेली नव्हती मग हा कांदा आला कोठून? घोटाळा करण्यात सराईत असलेले व्यापारी, स्वस्तात खरेदी केलेला कांदा नफेडला १५८० रु दराने सरकारला देण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेडसाठी खरेदी केलेल्या कांद्याची माहिती व वखार महामंडळाकडे जमा झालेल्या साठ्याची माहिती प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खरेदी करणारी संस्था व नाफेड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, प्रत्येक बाजार समितीत, सहकार निबंधक कार्यालय, महसूल विभाग, कृषी विभाग, पणन विभागाचे व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित ठेवले जाणार आहेत. शासनाला या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च करावा लागणार आहे. इतके करून ही घोटाळा होणारच आहे. ज्या गुणवत्तेचा कांदा नफेडला अपेक्षित आहे त्या कांद्याला आताच १५८०/रू पेक्षा जास्त दर मिळत आहे. खरी गरज आहे ती कमी गुणवत्तेच्या कांद्याला दर देण्याची. ते जर सरकार करू शकत असेल तर सरकारने कांदा खरेदी करावी अन्यथा सरकारी कांदा खरेदी बंद करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे केली आहे.

Maharashtra Onion Price: सरकारी कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा होण्याची शक्यता Read More »

Mansoon Alert : किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Mansoon Alert : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे : • आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये • विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे

Mansoon Alert : किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी Read More »

dilip walse patil

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil :राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना जाहीर चर्चेचे खुले आमंत्रण दिले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, सुधारणांसाठी आंदोलकांशी चर्चा करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलन संपवून आंदोलक आपल्याकडे आले, तर त्यांचे आदरातिथ्य करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये योग्य त्या सुधारणा नक्कीच करता येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अगदी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले, तरीही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तिथे येण्यास आपण तयार असल्याचे सांगत, या प्रयत्नांमध्ये आपला कोणताही स्वार्थ नसून शेतकऱ्यांचे हित हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या अडचणींवर केंद्र पातळीवरून वेगाने हालचाली सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान आणि पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल आणि स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी कांदा प्रश्ना संदर्भातील सद्यस्थिती आणि दाहकता केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले असून, येत्या पुढील १० दिवसांत या संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. या आश्वासनाच्या अनुषंगाने आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असून, या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. या आगामी भेटीदरम्यान, वळसे पाटील हे शरद पवार यांना दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीतील सविस्तर चर्चेची माहिती देणार असून, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार साहेबांनी देखील त्यांच्या पातळीवर केंद्र सरकारकडे वजन वापरावे आणि हा विषय लावून धरावा, अशी विनंती ते या भेटीत करणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला देत दिलीप वळसे पाटील यांनी आगामी काळातील नैसर्गिक व आर्थिक आव्हानांकडेही लक्ष वेधले. येत्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची संभाव्यता कमी असून साधारणतः ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकरी बांधवांनी ऊस, कांदा किंवा इतर नगदी पिकांचे नियोजन करताना या सर्व हवामान बदलांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या जागतिक युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, जेव्हा जेव्हा देशात आर्थिक मंदी येते, तेव्हा कृषी क्षेत्रच देशाच्या आर्थिक विकासाला खरा हातभार लावून देशाला सावरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी बोलताना, शेतकरी राजा स्वतः परिस्थिती जाणत असल्याने त्याला सल्ला देण्याची गरज नाही, परंतु शेतकरी हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे सांगत आंदोलकांनी सकारात्मक चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील Read More »

rain alert

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’

Ahilyanagar Weather Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जून पर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे. मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा व कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वादळी वारा, पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या वा नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यात, नदीच्या वा कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये व धोकादायक ठिकाणी स्वतःचे छायाचित्र काढू नये. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ Read More »