DNA मराठी

आरोग्य

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित

Tukaram Munde: अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ.अ. भोईटे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला. संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार या दूध संकलन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही भोईटे यांनी केले आहे.

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित Read More »

tukaram munde

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून जोरदार कारवाया सुरू केल्या आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यातच नगर शहरात देखील मुंढे हे एक्शन मॉडमध्ये दिसून आले आहे. शहरातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हॉटेलवर कारवाई करत थेट हॉटेलच्या परवाना निलंबित करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने अस्वच्छतेचा ठपका ठेवत नगर पुणे रस्त्यावरील प्रसिद्ध ‘हॉटेल संगम’ आणि ‘हॉटेल सत्कार’ या हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. शहरात सध्या अन्न सुरक्षा मोहिमेअंर्तगत विविध आस्थापनांची तपासणी सुरू असून, या हॉटेल्समध्ये अत्यंत अस्वच्छता आढळल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने ही कायदेशीर कारवाई केली आहे. आयुक्त मुंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून राज्यभरात अवैध गुटखा, दूध भेसळ आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेवर कारवाईचा धडाका लावला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील इतर हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द Read More »

rain

Maharashtra Rain Alert: नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील वाढता विसर्ग आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या तसेच धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये विसर्ग सुरू असून आज दुपारी १२ वाजता भीमा नदीच्या दौंड पुलावरून ८५ हजार ७८४ क्युसेक, तर गोदावरी नदीपात्रात नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५ हजार २४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा व गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी तसेच प्रवरा व मुळा नदीकाठावरील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मेघगर्जना, वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली अथवा जाहिरात फलकांच्या परिसरात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये तसेच विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल, टॉवर्स, ध्वजांचे खांब, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, ट्रान्सफॉर्मर तसेच अधांतरी लटकणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत, डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे आणि जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवावा. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढे व नाल्यांतील पाणीपातळी वाढत असल्यास प्रवाहापासून दूर राहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुलांवर किंवा बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि घाट रस्त्याने प्रवास टाळावा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

Maharashtra Rain Alert: नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट Read More »

rain

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू

Pune Rain Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विविध भागांत अडकलेल्या तब्बल 4 हजार 568 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उद्याही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. शाळांना सुट्टी जाहीर परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉईंट ही पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने देहू आणि आळंदी येथून वारकऱ्यांनी प्रवास टाळून थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केले.

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे, पर्यटनस्थळे किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने संभाव्य पूर आणि दरडग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १ ते ३ जुलैदरम्यान ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल ३६० बावधन, पुणे यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित Read More »

rain

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्थानिक प्रशासन, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा Read More »

fb img 1781585362460

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

El Nino : ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एल-निनो’चा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच कृषी, जलसंपदा, महापालिका व महसूल विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी तात्काळ भरारी पथके नियुक्त करावीत. कालवे व बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा त्वरित बंद करावा. आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका, नगरपालिकांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांनी विद्यमान पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असे त्यांनी सांगितले. कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक किफायतशीर व पाणी बचतीचे ठरत असेल, तर त्या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करावी, असे निर्देशही आशिया यांनी बैठकीत दिले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. उतारावर आडवी पेरणी करण्याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र खतांचा काळाबाजार, लिकिंग तर होत नाही ना याची कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करावी. खत व बियाणे पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि ‘डिजिटल पीक पाहणी’ मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे, गाळ काढण्याची कामे व इतर पाणी साठवण क्षमतेत वाढ करणारी कामे जलद गतीने पूर्ण करावीत, जेणेकरून उपलब्ध पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा निर्माण करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी सांगितले.

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया Read More »

img 20260605 wa0011

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला

Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला Read More »