DNA मराठी

ऑटोमोबाईल

nilesh lanke

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा

Nilesh Lanke: पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा १७ जून पासून सुरू होत आहे. या रेल्वे सेवेचा शुभारंभ पुणे येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचवेळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी याबाबत खासदार नीलेश लंके यांना पत्राद्वारे माहिती दिली असून, मध्य रेल्वेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. पुणे–साईनगर शिर्डी या थेट रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शैक्षणिक कारणांसाठी ये-जा करणारे विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे संपर्क अधिक सक्षम झाल्याने या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवे परिमाण प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पुण्याशी अधिक प्रभावी रेल्वे संपर्क उपलब्ध व्हावा तसेच धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार व्हावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी या मार्गावरील रेल्वे सेवेची आवश्यकता अधोरेखित केली होती. याशिवाय संसदेतील चर्चांपासून ते रेल्वे समित्यांच्या बैठका, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चासत्रे आणि रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनांमधून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन रेल्वे सेवा, प्रवासी सुविधांमध्ये वाढ आणि तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी सातत्याने मांडली होती. या सर्व प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रवाशांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या रेल्वे सेवेचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा Read More »

rbi

Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, मुंबईतील ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध

Reserve Bank of India : बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि सतत खालावणारी आर्थिक स्थिती यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. मध्यवर्ती बँकेने मुंबईस्थित ‘मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक’वर सहा महिन्यांसाठी अनेक कडक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने जारी केलेले हे आदेश शुक्रवारी कामकाजाच्या वेळेनंतर लागू झाले. या कारवाईनंतर, खातेदारांना पैसे काढण्यावर विशिष्ट मर्यादा घालण्यात आली आहे. खातेदारांवर थेट परिणाम रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा थेट परिणाम बँकेच्या ठेवीदारांवर होणार आहे. आरबीआयच्या नवीन आदेशानुसार, खातेदार आता त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यातून जास्तीत जास्त १ लाख रुपये काढू शकतात. १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे ज्या ग्राहकांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांना त्यांचे हप्ते (EMI) भरण्याची मुभा देण्यात आली आहे. नवीन कर्ज आणि गुंतवणुकीवर पूर्ण बंदी आरबीआयने स्पष्ट केले आहे की, सहा महिन्यांच्या या निर्बंधांच्या कालावधीत मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर विविध अटी लागू असतील. बँकेचे व्यवस्थापन आता नवीन ग्राहकांना कर्ज किंवा आगाऊ रक्कम (advances) देऊ शकत नाही, तसेच विद्यमान कर्जांचे नूतनीकरणही करू शकत नाही. याव्यतिरिक्त, बँकेला नवीन क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास, नवीन दायित्वे (liabilities) निर्माण करण्यास किंवा बाजारातून निधी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत बँक नवीन मुदत ठेवी (FDs) किंवा इतर ठेवी स्वीकारू शकत नाही. **परवाना रद्द नाही; परिस्थितीवर लक्ष** मध्यवर्ती बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, या निर्बंधांकडे बँकिंग परवाना रद्द करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहू नये. आरबीआयने सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती आणि तरलता (liquidity) सुधारण्यासाठी ते बँकेचे मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहेत. ठेवीदारांचे हित जपण्यासाठी आणि बँकेच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांच्या अधीन राहून आपले बँकिंग कामकाज सुरू ठेवेल.

Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, मुंबईतील ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध Read More »

Pratap Sarnaik: परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

Pratap Sarnaik: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून आज अखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Pratap Sarnaik: परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक Read More »

chhatrapati sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : वडापावच्या दुकानाला भीषण आग; 5 लाखांचे साहित्य खाक

Chhatrapati Sambhajinagar : शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या जुबली पार्क परिसरात बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. येथील एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानाला अचानक आग लागली. आगीदरम्यान दुकानातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र तसेच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील मौल्यवान साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती अशोक खांडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा छत्रपती संभाजीनगर यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar : वडापावच्या दुकानाला भीषण आग; 5 लाखांचे साहित्य खाक Read More »

census 2026

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय

Census 2026 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३० दिवसांसाठी नियोजित असलेले जनगणनेचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून महानगरपालिकेने कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. या यशाबाबत आयुक्त डांगे म्हणाले, “नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या मोहिमेच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने स्वतःसाठी वेळेची उद्दिष्टे निश्चित करून शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. त्यामुळे जनगणना मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक गती मिळाली. मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्यात आल्या. तसेच दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील टप्प्यांचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण मोहिमेत सातत्य, वेग आणि अचूकता कायम राखणे शक्य झाले.” अतिरिक्त आयुक्त मुतकेकर यांनी सांगितले की, जनजागृती आणि संवादावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी विविध नावीन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर चित्रफिती, दैनंदिन ग्राफिक संदेश, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स तसेच विविध समाजमाध्यमांद्वारे नागरिक, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला. अचूक माहिती संकलन, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रभावी जनजागृती आणि संघभावनेच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ही कामगिरी भविष्यातील प्रशासकीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून जनगणना कार्यात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक आणि सहायक पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय Read More »

navale bridge

Navale Bridge : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू 4 जण गंभीर जखमी…

Navale Bridge : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. सीमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाच्या उतारावरून येत असताना सीमेंट ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण आणि ब्रेक निकामी होण्यामागील तांत्रिक बाबींचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नवले पुलावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Navale Bridge : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू 4 जण गंभीर जखमी… Read More »

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »

img 20260604 wa0017

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा

Neet Exam: देशात एखादा घोटाळा उघडकीस आला, पेपरफुटी झाली, तरुण बेरोजगार राहिले किंवा शेतकरी संकटात सापडला की सोशल मीडियावर आणि चौकाचौकांत एकच सूर उमटतो “सरकार काय करत आहे?” प्रश्न योग्य आहे. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ज्यांना आपण मतदान करून निवडून दिले, त्यांना आपण कधी जाब विचारला आहे का? लोकशाहीत सत्ता आकाशातून पडत नाही. ती मतपेटीतून जन्माला येते. प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंच हा जनतेच्या मतांवर निवडून येतो. त्यामुळे समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ व्यवस्थेला दोष देणे पुरेसे नाही; त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेल्या लोकांना उत्तर मागणेही तितकेच आवश्यक आहे. आज लाखो तरुण पेपरफुटीच्या घटनांमुळे हवालदिल झाले आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा रद्द होतात. भरती प्रक्रिया रखडतात. शेतकरी उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आहे. हमीभाव, सिंचन आणि बाजारपेठेच्या प्रश्नांनी तो त्रस्त आहे. या प्रश्नांवर निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिल्यानंतर किती वेळा त्यांचा हिशेब मागितला? लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मतदाराचा सक्रिय सहभाग मतदानाच्या दिवशी संपतो. निवडणूक आली की विकास, रोजगार, शिक्षण आणि शेती यावर चर्चा होते; निवडणूक संपली की नागरिक पुन्हा प्रेक्षक बनतो. याच निष्क्रियतेतून उत्तरदायित्व हरवते. लोकशाही मजबूत करण्याचा एकच मार्ग आहे प्रतिनिधींना सतत प्रश्न विचारणे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली का? त्यांनी विधानसभेत किंवा संसदेत आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला का? आपल्या मतदारसंघासाठी निधी आणला का? या प्रश्नांची उत्तरे मागितली गेली तरच राजकारणाची दिशा बदलेल. कारण लोकशाहीत सत्ता ही जनतेची असते. सरकार बदलते, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात; पण मतदाराची जबाबदारी बदलत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या घोटाळ्यावर संताप व्यक्त करताना एक प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा ज्यांना मी मतदान दिले, त्यांच्याकडे मी कधी जाब मागितला आहे का? लोकशाही केवळ मतदानाचा अधिकार देत नाही; ती प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि जबाबदारीही देते. आणि कदाचित, याच जबाबदारीच्या जाणीवेतून अधिक उत्तरदायी राजकारणाची सुरुवात होऊ शकते.

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र

Rais Shaikh : राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा आदी १२ मागण्या समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी १९७८ क्रमांकांच्या लक्षवेधी सूचनेच्या कार्यवाहीबाबत सोमवारी मुस्लीम आमदारांची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुस्लीम आमदारांची बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, या विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील ३६ आणि जिल्हा कार्यालयातील ८५ नवी पदे अद्याप भरलेली नाहीत. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे कामकाज अद्याप सुरळीत झालेले नाही. भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र काम प्रत्यक्ष सुरु नाही. तसेच लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरु करण्याची गरज आहे. आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. उर्दू साहित्य अकादमीच्या अधिक्षक व कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिलेले नसून या कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब प्रलंबित आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक -आर्थिक सर्वेक्षण करण्याच्या दिलेल्या कामाचा चार वर्षे कार्यारंभ दिलेला नाही. या सर्व प्रलंबित बाबी मुस्लीम समाजाच्या विकासासाशी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले. १ जून रोजी आमदार शेख यांचा वाढदिवस असल्याने पूर्वनियोजित कार्याक्रमामुळे आपण या बैठकीस हजर राहू शकत नाही. दिवगंत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला. त्यांची अपुरी राहिलेली या विभागाची कामे आपण मार्गी लावावीत, अशी विनंती आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र Read More »