DNA मराठी

ट्रेंडिंग

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »

fb img 1781585362460

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

El Nino : ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एल-निनो’चा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच कृषी, जलसंपदा, महापालिका व महसूल विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी तात्काळ भरारी पथके नियुक्त करावीत. कालवे व बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा त्वरित बंद करावा. आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका, नगरपालिकांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांनी विद्यमान पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असे त्यांनी सांगितले. कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक किफायतशीर व पाणी बचतीचे ठरत असेल, तर त्या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करावी, असे निर्देशही आशिया यांनी बैठकीत दिले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. उतारावर आडवी पेरणी करण्याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र खतांचा काळाबाजार, लिकिंग तर होत नाही ना याची कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करावी. खत व बियाणे पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि ‘डिजिटल पीक पाहणी’ मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे, गाळ काढण्याची कामे व इतर पाणी साठवण क्षमतेत वाढ करणारी कामे जलद गतीने पूर्ण करावीत, जेणेकरून उपलब्ध पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा निर्माण करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी सांगितले.

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा

Nilesh Lanke: पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा १७ जून पासून सुरू होत आहे. या रेल्वे सेवेचा शुभारंभ पुणे येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचवेळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी याबाबत खासदार नीलेश लंके यांना पत्राद्वारे माहिती दिली असून, मध्य रेल्वेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. पुणे–साईनगर शिर्डी या थेट रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शैक्षणिक कारणांसाठी ये-जा करणारे विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे संपर्क अधिक सक्षम झाल्याने या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवे परिमाण प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पुण्याशी अधिक प्रभावी रेल्वे संपर्क उपलब्ध व्हावा तसेच धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार व्हावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी या मार्गावरील रेल्वे सेवेची आवश्यकता अधोरेखित केली होती. याशिवाय संसदेतील चर्चांपासून ते रेल्वे समित्यांच्या बैठका, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चासत्रे आणि रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनांमधून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन रेल्वे सेवा, प्रवासी सुविधांमध्ये वाढ आणि तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी सातत्याने मांडली होती. या सर्व प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रवाशांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या रेल्वे सेवेचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा Read More »

Pune News: पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला

Pune News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. प्रदेश नेतृत्वाने सात स्वीकृत नगरसदस्यांची यादी अंतिम केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आज (दि. १५ जून) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत (GB) या नियुक्त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून युवा चेहरा गिरीश देशमुख, माजी महापौर उषा संजोग वाघेरे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, रावेत येथील दीपक भोंडवे, माजी नगरसेविका विनया तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, भाजपची यादी अंतिम झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीचाही मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका सीमा सावळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि पक्षाचे प्रवक्ते फझल शेख यांच्या नावांचा प्रस्ताव प्रलंबित होता. गेल्या काही महिन्यांपासून स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय अनेकदा महासभेत तहकूब करण्यात आला होता. मात्र, भाजपकडील अंतर्गत चर्चा आणि प्रदेश नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानंतर आता या नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली असून उद्याच्या महासभेत सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या या प्रक्रियेमुळे आगामी राजकीय समीकरणांनाही वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pune News: पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला Read More »

rbi

Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, मुंबईतील ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध

Reserve Bank of India : बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि सतत खालावणारी आर्थिक स्थिती यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. मध्यवर्ती बँकेने मुंबईस्थित ‘मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक’वर सहा महिन्यांसाठी अनेक कडक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने जारी केलेले हे आदेश शुक्रवारी कामकाजाच्या वेळेनंतर लागू झाले. या कारवाईनंतर, खातेदारांना पैसे काढण्यावर विशिष्ट मर्यादा घालण्यात आली आहे. खातेदारांवर थेट परिणाम रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा थेट परिणाम बँकेच्या ठेवीदारांवर होणार आहे. आरबीआयच्या नवीन आदेशानुसार, खातेदार आता त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यातून जास्तीत जास्त १ लाख रुपये काढू शकतात. १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे ज्या ग्राहकांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांना त्यांचे हप्ते (EMI) भरण्याची मुभा देण्यात आली आहे. नवीन कर्ज आणि गुंतवणुकीवर पूर्ण बंदी आरबीआयने स्पष्ट केले आहे की, सहा महिन्यांच्या या निर्बंधांच्या कालावधीत मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर विविध अटी लागू असतील. बँकेचे व्यवस्थापन आता नवीन ग्राहकांना कर्ज किंवा आगाऊ रक्कम (advances) देऊ शकत नाही, तसेच विद्यमान कर्जांचे नूतनीकरणही करू शकत नाही. याव्यतिरिक्त, बँकेला नवीन क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास, नवीन दायित्वे (liabilities) निर्माण करण्यास किंवा बाजारातून निधी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत बँक नवीन मुदत ठेवी (FDs) किंवा इतर ठेवी स्वीकारू शकत नाही. **परवाना रद्द नाही; परिस्थितीवर लक्ष** मध्यवर्ती बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, या निर्बंधांकडे बँकिंग परवाना रद्द करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहू नये. आरबीआयने सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती आणि तरलता (liquidity) सुधारण्यासाठी ते बँकेचे मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहेत. ठेवीदारांचे हित जपण्यासाठी आणि बँकेच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांच्या अधीन राहून आपले बँकिंग कामकाज सुरू ठेवेल.

Reserve Bank of India : RBI ची मोठी कारवाई, मुंबईतील ‘या’ बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध Read More »

tukaram munde

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Shevgao Police: पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, यादव बेकरी समोर (वरवट बकाल रोड) रात्रीच्या सुमारास तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळ पर्यंत हि कारवाई सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री २२:१० वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किंता वसावे (अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक (क्र. MH-40-GT-2965) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला. यामध्ये बाजीराव गोल्ड पानमसाला: ५० पोते, मस्तानी तंबाखू ११ पोते, नजर १००० पानमसाला व N-05 प्रीमियम तंबाखू: एकूण ५० पोते, प्रीमियम नजर पोते, अशोक लेलँड ट्रूक असा एकूण जप्त मुद्देमाल: ७०,१३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सुरुर अहम्मद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) या ट्रक चालकला अटक करण्यात आली.तर M/S Shree Siddheshwar Tobacco Prod. PVT. LTD. (पांढुर्णा, छिंदवाडा, म.प्र.) चे मालक/भागीदार संचालक.या दोघांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त Read More »

img 20260614 wa0003

Ram Shinde: लेखी गहिवरल्या… जावई भारावले…

चौंडीचे धोंडे जेवण सभापती प्रा. शिंदेयांना देऊन गेले भरभरून कौतुक Ram Shinde : आई-वडील, भाऊ व जुन्या मैत्रिणी भेटल्याने लेकी खूष होत्या…यानिमित्ताने सर्वांशी सुख-दुःखाचा संवाद झाल्याने त्या गहिवरल्या तर, आख्या गावाने आपला सन्मान केल्याच्या आनंदाने जावई भारावले…ठिकाण होते- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी व निमित्त होते- अधिक मासानिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्याचे. एखाद्या गावाने गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवणाचा सोहळा आयोजित करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याने तिचे आयोजन करणारे सभापती प्रा. शिंदे राज्यभरातील 700 वर लेक-जावयांकडून कौतुक मिळवून गेले. आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय सोहळा ठरला असे गौरवोद्गारही व्यक्त करून गेले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती व अधिक मास यानिमित्त सभापती प्रा. शिंदे यांच्या पुढाकाराने चोंडी ग्रामस्थांनी लेक-जावयांचा सन्मान सोहळा आज रविवारी (14 जून) आयोजित केला होता. कर्जत-जामखेड व अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातून तसेच पुणे, बारामती, करमाळा, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून सर्व जाती धर्माचे लेक- जावई आले होते. 700 वर जावई, तेवढ्याच लेकी, त्यांची मुले-मुली व अन्य कुटुंबिय मिळून साडेतीन ते चार हजार जणांचे अनोखे गेट-टुगेदर या निमित्ताने रंगले. या सर्वांसाठी तब्बल 100 किलो पुरण, त्याच्या पोळ्या, पुरणाचा धोंडा, त्यावर साजूक तूप समवेत दूध गुळवणी, कटाची आमटी, भात, भजी, पापड, कुरडई असा जेवणाचा मेनू होता. गावातील महिलांनी यापैकी बहुतांश पुरणपोळ्या लाटल्या. तृप्तीचा ढेकर देत नंतर सर्वांनी आवर्जून प्रा. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. जंगी निघाली मिरवणूक या अनोख्या सोहळ्यासाठी आलेल्या जावयांना फेटा बांधून व त्यांच्या कपाळी गंधाक्षता लावून औक्षण करण्यात आले. सभापती प्रा. शिंदे यांच्या पत्नी व जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. आशाताई शिंदे यांच्यासह गावातील महिलांनी जावई मंडळींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांची अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या अहिल्येश्वर महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. वैजापूर येथील प्रसिद्ध चौऊश ब्रॉस बँड पथकाने सादर केलेल्या जुन्या-नव्या गाण्यांच्या मेजवानीत व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत लेकीबाळींच्या फुगड्या रंगल्या. ब्रँड पथकाद्वारे लाडाचा जावई आला सासरला, परदेशीया ये सच है पिया, नवरी नटली, राम जी की निकली सवारी, झिंग झिंग झिंगाट अशा गाण्यांसह शिवछत्रपतींचा पोवाडा व महाराष्ट्र गीतांचे सादरीकरण दाद मिळवून गेले. यावेळी काही जावयांनी आपल्या मंडळीला (पत्नी) उचलून घेत नृत्योत्सव रंगवला. महादेव मंदिर परिसरात व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक परिसरात सर्वांचे एकत्रित छायाचित्र घेतले गेले. यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग, रील, सेल्फी असे फोटोसेशनही रंगले. महिलांचे डोळे पाणावले यानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना अनेक महिलांचे डोळे पाणावले. आम्ही अहिल्यादेवींच्या माहेर गावच्या लेकी असल्याचे सासरी अभिमानाने सांगतो, तो आमचा अभिमान आज लाडका भाऊ रामभाऊ यांच्यामुळे द्विगुणीत झाला. जुन्या मैत्रिणी भेटल्या, त्यांच्याशी गप्पा झाल्या, अधिक मासानिमित्त आईला भेटून तिची ओटी भरता आली आणि गावाने आमच्या ह्यांचा (पती) केलेला सन्मान आमचा आनंद वाढवून गेला, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. लताबाई गावडे-देवकर, उषा लोखंडे, शार्दुल निंबाळकर, सुरेखा उबाळे व अन्य महिलांना बोलताना गहिवरून आले. जावई मंडळीही भारावून गेले होते. त्यांच्यावतीने भावना व्यक्त करताना नाना करंजुले म्हणाले, चौंडीचा दाजी म्हणून आमच्या गावात आम्हाला कौतुक मिळतेच. मात्र आज चौंडीने केलेला सन्मान आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. भावाचे कर्तव्य केले : प्रा. शिंदे यावेळी बोलताना सभापती प्रा. शिंदे यांनी गावच्या लेकींचा भाऊ असल्याच्या भावनेतून हा धोंडे सन्मान सोहळा केला असल्याचे सांगितले. गावच्या लेकींनी माहेर व सासरची नाती जपल्याचा आनंद आहे. दोन्ही कुटुंबे सांभाळताना चोंडीचा लौकिक वाढवला आहे. सभापती पदाच्या माध्यमातून सुमारे 5 हजार कोटीची अनेक विकास कामे करून चोंडीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले त्यांचे जन्मगाव चौंडी हे जगाच्या नकाशावर आगळेवेगळे गाव करण्याचा प्रयत्न आहे. गावच्या लेक-जावयांनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह नियमितपणे चोंडीला येऊन या गावच्या विकासात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या सोहळ्यास गावातील माजी सरपंच व मान्यवर मंडळी उपस्थित होते. अशोक देवकर, अभिमन्यू सोनवणे, पांडुरंग उबाळे, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब उदमले, शशिकांत देवकर, गुलाब शेख, रवींद्र जगदाळे, सतीश लहामटे, दत्ता शिंदे, शिवाजी देवकर आदींसह गावातील युवकांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. जावयांना पसंतीनुसार पॅन्ट शर्ट, पायजमा, धोतर व लेकींनाही पाच वार, सहा वार, नऊवार व काठ पदरी साड्या त्यांच्या पसंतीनुसार भेट म्हणून दिल्या गेल्या. बत्तासे व अनारसे समवेत तांब्याचे दीपदानही अधिक मासानिमित्त दिले गेले. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित हा वेगळा सोहळा संस्मरणीय ठरला. रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंड्याचे महत्त्व काय? सभापती प्रा. शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. लेक-जावयांना रोजगाराची गरज आहे, धोंडे जेवणाची नाही असे भाष्य त्यांनी केले होते. त्यावर प्रतिउत्तर देताना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचे महत्त्व काय समजणार अशा सूचक शब्दात त्यांनी खडसे यांच्यासह अन्य विरोधकांना टोला लगावला.

Ram Shinde: लेखी गहिवरल्या… जावई भारावले… Read More »

shashikant shinde

Shashikant Shinde : ‘राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण नाहीच’; शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या चर्चा

Shashikant Shinde : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तूणमूल काँग्रेस पराभव झाल्याने आता हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा दोघांनी देशातील राजकारणात सुरू झाली आहे. यासाठी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकारणात देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा देखील काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून पक्ष स्वतंत्रपणे आणि अधिक जोमाने पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “नुकताच पक्षाचा वर्धापन दिन पार पडला असून, आम्ही आगामी लढ्याची रणनीती आणि धोरणे निश्चित केली आहेत. असे असताना विलीनीकरणाच्या अफवा पसरवणे आश्चर्यकारक आहे.” ‘इंडिया’ आघाडीला बळकट करण्यासाठी आणि देशपातळीवर विरोधकांची मजबूत फळी उभारण्यासाठी स्वतः शरद पवार पुढाकार घेत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले असून, भविष्यात ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातूनच भाजपविरोधात एकत्र येऊन लढणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

Shashikant Shinde : ‘राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण नाहीच’; शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या चर्चा Read More »

omraje nimbalkar

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा

Omraje Nimbalkar : एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर च्या चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनीही नेमके कारण माहित नसल्याचे सांगितले. “काही काम असेल म्हणून ते आले नसतील. बैठक तर त्यांच्या कार्यालयातच होत आहे,” असे म्हणत दानवे यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान ही अनुपस्थिती घडल्याने राजकीय वर्तुळात तिची अधिक चर्चा रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा Read More »

Pratap Sarnaik: परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

Pratap Sarnaik: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून आज अखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Pratap Sarnaik: परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक Read More »