DNA मराठी

ट्रेंडिंग

Rules Change: देशात आजपासूनआर्थिक नियमांमध्ये बदल; आयकर, तत्काळ तिकीट, बँकिंग सेवांवर होणार परिणाम

Rules Change: आजपासून (1 ऑगस्ट 2026) सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेतील बदल, बँकांच्या सेवा शुल्कातील सुधारणा आणि क्रेडिट कार्ड नियमांमुळे नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आयकर रिटर्नची अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. मुदतीत रिटर्न न भरल्यास लागू नियमांनुसार दंड भरावा लागू शकतो. तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये बदल रेल्वेच्या तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रियेत काही ठिकाणी टोकन-आधारित व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास आणि तिकीट वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बँक आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल काही बँकांनी क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स, सेवा शुल्क, विलंब शुल्क तसेच एसएमएस अलर्ट शुल्कामध्ये बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अद्ययावत अटी व शुल्काची माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एलपीजी दर आणि अन्य बदल दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणे एलपीजी सिलिंडरच्या दरांचा आढावाही घेण्यात आला आहे. तसेच काही आर्थिक आणि बँकिंग प्रक्रियांमध्येही बदल लागू झाले असून त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. या बदलांमुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार, कर भरणा आणि बँकिंग सेवा वापरताना नव्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक खबरदारी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Rules Change: देशात आजपासूनआर्थिक नियमांमध्ये बदल; आयकर, तत्काळ तिकीट, बँकिंग सेवांवर होणार परिणाम Read More »

dhanjay mumde

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना मंत्रिपदावर भाष्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. धनंजय मुंडे म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो नागरिकांना मोठा आधार दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने संकटाचा सामना केला, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नाईक कुटुंबावर जगदंबेचा आशीर्वाद असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांच्या राजकीय वाटचालीचाही गौरव केला. स्वतःच्या राजकीय आयुष्याचा उल्लेख करताना धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्दांत खंत व्यक्त केली. “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही. आम्हा दोघांपैकी एकाला मात्र घरी बसावं लागलं,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि स्वतःचे समाजाशी असलेले नाते अतूट असल्याचे सांगितले. “मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता है, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत Read More »

amol khatal

Amol Khatal : काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा

Amol Khatal : निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी आमदार अमोल खताळे यांच्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याचिका दाखल केली आहे दरम्यान खताळ यांची याची का न्यायालयाने फेटाळले आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून विजय आपलाच होईल तसेच काहींना पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले अशा शब्दात आमदार खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना आमदार म्हणाले मला न्यायपालिकेवरती विश्वास आहे. संगमनेरच्या जनतेचा व माझा विजय होईल याबाबत मला खात्री आहे. न्यायालयाने केवळ याचिका सुनावण्यासाठी स्वीकारली मात्र काही जणांना स्वप्न पडायला लागले की आपण मुख्यमंत्री होऊ आम्ही आमदार होऊ असे शब्दात खताळ यांनी काँग्रेसचे नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला तसेच पुढे बोलताना खताळ म्हणाले 40 वर्षे तुम्हाला सत्ता मिळाली मात्र तुमचा पराभव अवघ्या 42 वर्षाच्या तरुणाने केला. संगमनेर चा तसे मतदारसंघाचा विकास हा माझ्या माध्यमातून केला जाईल असा आश्वासन यावेळी खताळ यांनी उपस्थितांना दिले नेमक प्रकरण काय? संगमनेर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार खताळ यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. नीलकमल नावाची भागीदारी संस्था असून, त्याचा 54 हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता. ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आल्याची तक्रार आहे. यावर यांनी या फर्मचे आपण भागीदार नसून, ती विसर्जित झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, थोरात यांच्या वकिलांनी जीएसटी संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी सादर करत ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणी खताळ यांनी थोरात यांची याचिका सुरुवातीलाच रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथेही त्यांना दिलासा न मिळता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

Amol Khatal : काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा Read More »

rishikesh shete

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर

Ram Shinde : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्ह्यातील नेतेमंडळींची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. नुकतेच त्यांनी माजी खासदार यशववंतराव गडाख यांची भेट घेतली मात्र त्यांच्या याच कृतीमुळे भाजपमधील काही निष्ठावंत नाराज झालेले आहे. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका अशा शब्दात भाजपचे युवानेते ऋषिकेश शेटे यांनी शिंदे यांच्या भेटीचा खरपूस शब्दात समाचार घेतला. माननीय राम शिंदे साहेब सप्रेम नमस्कार माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका. शंकर यशवंतराव गडाख या माणसाने नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याना उबाठा काळात मंत्री असताना भयानक त्रास दिला , गोळीबार केले, भाजप ला सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेत तळे फोडले, पाण्याच्या पाइपलाइन फोडल्या, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे साधन असलेले ऊस पेटून दिले , ऊसाच्या खोडक्या केल्या, खोट्या एट्रोसिटी दाखल केल्या,कलम ३०७ दाखल करून शेतकरी जेल मध्ये पाठवले व त्यांचे प्रपंच संपवले. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी ज्याने भाजप चे असंख्य कार्यकर्त्याला त्रास दिला, तुमची अशी गळाभेट घेणे कार्यकर्त्यांना आवडलेले नाही त्यांची तुमच्यावर प्रचंड नाराजी आहे. शिंगणापूर देवस्थान मध्ये हजारो कोटी भ्रष्टाचार कुणामुळे झाला खरे कारणीभूत तुम्ही आणि बाळासाहेब मुरकुटे आहात तुम्ही पालकमंत्री असताना शिंगणापूर देवस्थान गडाखांना सेटलमेंट करून दिल ते कसे दिले हे जनतेला सांगायला लाऊ नका त्याचे सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत आणि तुम्ही कितीही यांना भेटले तरी हे मतदान तुम्हाला करणार नाही हे लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला मतदान करण्याच्या बोलीवर तुमच्या कडून काहीतरी पाप धुण्याची बोली करणार . शंकर गडाख ह्या व्यक्तीस भाजप मधे घेण्याचा प्रयत्न करू नये .एक लक्षात ठेवा तुम्ही विधानसभेला पराभूत होणे सोपे नव्हते परंतु तुम्ही शनी देवस्थान 2017 – 18 ल सेटलमेंट करून विकले म्हणून तुम्हाला शनी ने उत्तर दिले. गडाखांच्या आयुष्यात सर्व संकट येते त्याला कारण देखील शनिवार आणि शनि देवाचा कोप आहे हा तुम्ही तुमच्यावर घेऊ नका आणि हे सगळं बोलून मला त्रास होणार असेल तर संघर्ष आमच्या रक्तात आहे कारण मी खानदानी भाजपा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षासाठी आणि आमचे रक्त सांडले आहे. मात्र तुमच्या अशा सेटलमेंट वृत्तीमुळे, तुमच्या विरोधात भाजप कार्यकर्ते एकवटतील हे लक्षात घ्या अशा शब्दात ऋषिकेश शेटे यांनी आपला राग व्यक्त केला.

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये

Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती. मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे. अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये Read More »

sispe scam

SISPE Scam : सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

SISPE Scam : सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात असलेला राहुल श्यामराव काळोखे याला अखेर इंटरपोलच्या मदतीने फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला भारतात आणण्यात आले असून, मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. तपासादरम्यान राहुल काळोखे याच्याविरोधात जानेवारी महिन्यात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसमुळे जगभरातील 196 देशांच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्याचा शोध घेण्यासाठी अधिकृत माहिती पाठविण्यात आली. त्यानंतर तो फिजीमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय समन्वयानंतर राहुल काळोखे याला भारतात आणण्यात आले. आज दुपारी मुंबई विमानतळावर त्याच्यावर अधिकृतपणे अटकेची कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्याला संबंधित तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, इतर आरोपींची भूमिका आणि घोटाळ्याचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी त्याची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधत आवश्यक स्तरावर पत्रव्यवहार करून तपास प्रक्रियेला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यानंतर विविध तपास यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी झाले, त्यातून आरोपीचा माग काढून त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इमिग्रेशन विभाग आणि इंटरपोल या सर्व संस्थांनी परस्पर समन्वय साधत काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाणघेवाण, कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणांचा समन्वय यामुळे आरोपीला भारतात आणणे शक्य झाले. राहुल काळोखेच्या अटकेनंतर सिस्पे घोटाळ्यातील तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे आर्थिक फटका बसलेल्या हजारो पीडितांना न्याय मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आणि संभाव्य नवीन खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

SISPE Scam : सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात? Read More »

ajinkya rahane

Ajinkya Rahane : मोठी बातमी! अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Ajinkya Rahane : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावनिक संदेश आणि व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. रहाणेच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका यशस्वी आणि संयमी फलंदाजाच्या प्रवासाचा शेवट झाला आहे. रहाणे यांनी भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिनिधित्व केले. विशेषतः परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिले. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. ही कामगिरी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षणांपैकी एक मानली जाते. शांत स्वभाव, संयमी फलंदाजी आणि संकटसमयी संघाची जबाबदारी उचलण्याची क्षमता यामुळे रहाणे यांना भारतीय क्रिकेटमध्ये विशेष स्थान मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शतके आणि अर्धशतके झळकावत मधल्या फळीत भारताचा भक्कम आधारस्तंभ म्हणून भूमिका बजावली. निवृत्ती जाहीर करताना रहाणे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रहाणे यांनी देशांतर्गत क्रिकेट किंवा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे आगामी हंगामात ते देशांतर्गत क्रिकेट आणि IPL मध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कायम आहे. रहाणे यांच्या निवृत्तीनंतर क्रिकेटविश्वातील अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंनी त्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये शांत, शिस्तबद्ध आणि संघहिताला प्राधान्य देणारा खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणे यांची कायम आठवण राहील.

Ajinkya Rahane : मोठी बातमी! अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती Read More »

Income Sources : फक्त पगारावर अवलंबून राहू नका! ‘या’ चार मार्गांनी तयार करा अतिरिक्त उत्पन्न

Income Sources : देशात वाढती महागाई, बदलती आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता केवळ मासिक पगारावर अवलंबून राहणे आता अनेकांना पुरेसे ठरत नाही. नोकरी असली तरी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण केल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. यामुळे आकस्मिक खर्च भागवणे, बचत वाढवणे आणि भविष्यासाठी भक्कम आर्थिक नियोजन करणे सोपे होते. आर्थिक तज्ज्ञही उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्रोत असावेत, असा सल्ला देतात. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास कालांतराने चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, गुंतवणुकीपूर्वी जोखीम समजून घेणे आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. भाडे उत्पन्नाचा पर्याय घर, फ्लॅट, दुकान किंवा इतर मालमत्ता असल्यास ती भाड्याने देऊन दरमहा नियमित उत्पन्न मिळवता येते. मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन केल्यास हा उत्पन्नाचा स्थिर आणि विश्वासार्ह स्रोत ठरू शकतो. फ्रीलान्सिंग आणि ऑनलाइन काम डिजिटल युगात नोकरीसोबतच अतिरिक्त कमाई करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. लेखन, ग्राफिक डिझाइन, व्हिडिओ एडिटिंग, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन क्लास, कंटेंट क्रिएशन किंवा सोशल मीडिया व्यवस्थापन यांसारख्या कौशल्यांच्या माध्यमातून घरी बसूनही उत्पन्न मिळवता येते. आपल्या वेळेनुसार हे काम करता येत असल्याने अनेक जण हा पर्याय स्वीकारत आहेत. लहान व्यवसाय सुरू करा घरगुती उद्योग, ऑनलाइन व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री, हस्तकला, कपड्यांचा व्यवसाय किंवा इतर छोट्या उद्योगातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. सुरुवातीला कमी भांडवलात व्यवसाय सुरू करून अनुभव आणि ग्राहकसंख्या वाढल्यानंतर त्याचा विस्तार करता येतो. आर्थिक सुरक्षिततेसाठी ठरू शकते फायदेशीर एका उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहिल्यास नोकरी गमावणे किंवा उत्पन्न कमी होणे यासारख्या परिस्थितीत आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, उत्पन्नाचे अनेक स्रोत असल्यास अशा संकटांचा परिणाम कमी होतो. अतिरिक्त कमाईमुळे बचत वाढवणे, गुंतवणूक करणे आणि निवृत्तीनंतरची आर्थिक तयारी करणेही सोपे होते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाने आपल्या कौशल्यांचा, वेळेचा आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आर्थिक स्वावलंबन वाढते आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे अधिक सहजपणे पूर्ण करता येतात.

Income Sources : फक्त पगारावर अवलंबून राहू नका! ‘या’ चार मार्गांनी तयार करा अतिरिक्त उत्पन्न Read More »

income tax

Income Tax : टॅक्स लागत नसला तरी ITR भरा; फायदे जाणून व्हाल थक्क

Income Tax : अनेक करदात्यांना असे वाटते की, उत्पन्नावर कोणताही आयकर लागत नसेल तर आयकर विवरणपत्र (Income Tax Return-ITR) दाखल करण्याची गरज नाही. मात्र, आर्थिक नियोजन आणि भविष्यातील विविध व्यवहारांच्या दृष्टीने ITR दाखल करणे फायदेशीर ठरू शकते. कर देय नसतानाही नियमितपणे ITR भरल्यास अनेक महत्त्वाचे लाभ मिळू शकतात. ITR हा व्यक्तीच्या उत्पन्नाचा अधिकृत दस्तऐवज मानला जातो. गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना बहुतांश बँका मागील दोन ते तीन वर्षांचे ITR मागतात. नियमित ITR दाखल केल्यास कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी व्हिसा अर्ज करताना अनेक देश अर्जदाराकडून आर्थिक स्थैर्याचा पुरावा म्हणून ITR ची प्रत मागतात. त्यामुळे वेळेवर ITR दाखल करणाऱ्या व्यक्तींना व्हिसा प्रक्रियेतही फायदा होतो. अनेक कर्मचाऱ्यांच्या किंवा गुंतवणूकदारांच्या उत्पन्नातून स्रोतावर कर (TDS) कापला जातो. प्रत्यक्षात कर देय नसल्यास किंवा कमी कर लागू होत असल्यास ITR भरल्यानंतरच अतिरिक्त कापलेला कर परतावा (Refund) म्हणून मिळू शकतो. त्यामुळे रिफंड मिळवण्यासाठी ITR दाखल करणे आवश्यक असते. याशिवाय, आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठीही ITR उपयुक्त ठरतो. व्यवसाय सुरू करणे, मोठी आर्थिक गुंतवणूक करणे किंवा काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही ITR महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. तज्ज्ञांच्या मते, जरी कर भरण्याची जबाबदारी नसली तरी पात्रता असल्यास दरवर्षी ITR दाखल करणे ही चांगली आर्थिक सवय आहे. त्यामुळे भविष्यातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचण येत नाही. म्हणूनच, कर देय नसला तरी ITR दाखल करण्याचा विचार करणे प्रत्येक करदात्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Income Tax : टॅक्स लागत नसला तरी ITR भरा; फायदे जाणून व्हाल थक्क Read More »

rohit pawar

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on NEET Exam : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. गुजरातमध्ये पुनर्परीक्षेचाही पेपर फुटल्याचा दावा त्यांनी केला असून, या संदर्भातील काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. रोहित पवार म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना थांबण्याऐवजी वाढत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पवार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन केले. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप Read More »