Ahilyanagar District Bank Election : जिल्हा बँकेची निवडणूक : सहकारापेक्षा ‘घोडेबाजार’च चर्चेत?
Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय वातावरणाने आधीच निवडणुकीचा रंग धारण केला आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुका पूर्वी विकास, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर लढल्या जात असत. आता मात्र त्यांचे स्वरूप सत्तेच्या अंकगणितात अडकत चालल्याची भावना निर्माण होत आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती “घोडेबाजार” आणि अंतर्गत राजकीय हालचालींची. पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांत विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संपर्क, गाठीभेटी आणि मोर्चेबांधणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या चर्चांची सत्यता संबंधितांनाच माहीत; मात्र अशा चर्चांनाही वाव मिळणे, हेच सहकार चळवळीसाठी चिंतेचे लक्षण आहे. भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याने समीकरणे बदलत आहेत. कर्जत-जामखेडच्या राजकारणापुरती मर्यादित असलेली त्यांची ताकद आता संपूर्ण जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात कसोटीला लागणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्रभाव कायम आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके हेही आपापल्या पातळीवर राजकीय मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र दिसते. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती भाजपमधील अंतर्गत राजकीय हालचालींविषयी. एकाच पक्षातील वेगवेगळे प्रभावकेंद्रे आपापले संख्याबळ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. ही स्पर्धा जर उघड संघर्षात बदलली, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत मतभेदच अनेकदा निर्णायक ठरतात, हा सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. सहकार संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्या शेतकरी, सभासद आणि ग्रामीण उद्योगांच्या विश्वासावर उभ्या आहेत. अशा संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर विचारांपेक्षा व्यवहार, तत्त्वांपेक्षा तडजोडी आणि सेवाभावापेक्षा घोडेबाजार चर्चेचा विषय ठरू लागला, तर सहकाराच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक कोण जिंकणार, यापेक्षा ती कशा पद्धतीने लढवली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. पारदर्शकता, लोकशाही आणि सभासदांचा विश्वास या तीन मूल्यांवरच सहकाराचे भविष्य टिकून राहणार आहे. अन्यथा प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता बदलेल पण सहकार मात्र हरत जाईल.









