DNA मराठी

ताज्या बातम्या

samarjit ghatge

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश

Samarjit Ghatge : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्यातील कागलचे प्रभावी नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या बुधवारी (8 एप्रिल) मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडेल. या संदर्भात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालया बाहेर घाटगे समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहे. समरजित घाटगे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला होता. मात्र, आता पुन्हा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार आहे. घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश Read More »

lalit modi

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा

Lalit Modi on BCCI : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘आयपीएलचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांचे असे म्हणणे आहे की, आयपीएलच्या कार्यपद्धतीतील एका विशिष्ट त्रुटीमुळे बीसीसीआयला (BCCI) दरवर्षी 1200 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. केवळ ही लीगच नव्हे, तर आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीलाही दरवर्षी तितक्याच रकमेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. ललित मोदी यांचा असा युक्तिवाद आहे की, बीसीसीआय या स्पर्धेसाठी सुरुवातीला निश्चित करण्यात आलेल्या स्वरूपाचे (format) पालन करण्यात अपयशी ठरत आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी, बीसीसीआयने पुन्हा एकदा पूर्णपणे ‘होम-अँड-अवे’ (home-and-away) स्वरूपाकडे वळावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रँचायझींचे मूल्यांकन (valuation) सुमारे 31,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, या गोष्टीबद्दल ललित मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ललित मोदी यांच्या मते, मूळ नियमानुसार प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाविरुद्ध दोनदा सामने खेळणे बंधनकारक होते. 2022 मध्ये या लीगचा विस्तार होऊन त्यात 10 संघांचा समावेश झाल्यानंतर, निश्चित केलेल्या रचनेनुसार लीग टप्प्यात 90 सामने खेळवले जाणे अपेक्षित होते; त्यानंतर चार बाद फेरीचे (knockout) सामने नियोजित होते. मात्र, ‘होम-अँड-अवे’ पद्धतीत बदल करून, आयपीएलने सामन्यांची संख्या कमी करत केवळ 74 सामन्यांचे वेळापत्रक कायम ठेवले आहे; ज्यामध्ये प्रत्येक संघ सात ‘होम’ (घरच्या मैदानावर) आणि सात ‘अवे’ (प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने खेळतो. ‘स्पोर्टस्टार’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “प्रत्येक सामन्यातून मिळणाऱ्या महसुलापैकी 50 टक्के वाटा बीसीसीआयला मिळतो, तर उर्वरित 50 टक्के वाटा संघांमध्ये विभागला जातो. परिणामी, संघांना आता 20 सामन्यांना मुकावे लागत आहे. त्यांनी भरलेल्या फ्रँचायझी शुल्काचा विचार करता, त्यांना ‘होम-अँड-अवे’ सामन्यांचा पूर्ण कोटा मिळणे सुनिश्चित करणे ही एक करारात्मक जबाबदारी (contractual obligation) आहे. या स्पर्धेचे खरे मूल्य हे ‘होम-अँड-अवे’ स्वरूपातच दडलेले आहे. जर क्रिकेटच्या वेळापत्रकात (calendar) पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर सरळसरळ संघांची संख्या वाढवू नका. ही गोष्ट अगदी साधी आणि सोपी आहे. आम्ही कधीच अशा पद्धतीचे समर्थन केले नव्हते. सर्वांनी खरोखरच या बदलाला संमती दिली होती का? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, त्यांनी तसे केले नव्हते.” त्यांनी पुढे नमूद केले: “ते ‘होम-अँड-अवे’ (घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने का खेळत नाहीत? यासाठी कदाचित काही सबबी असू शकतात; परंतु संबंधित संघांच्या दृष्टीने, हा एक करारान्वये प्राप्त झालेला अधिकार आणि त्याच वेळी एक व्यावसायिक व्यवहार देखील आहे.” सामन्यांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम फ्रँचायझी आणि लीग या दोघांच्याही मूल्यांकनावर (valuations) होतो, असे मोदी यांचे मानणे आहे. त्यांनी स्पष्ट केले, “जर आज ‘होम-अँड-अवे’ तत्त्वावर 94 सामने खेळले गेले असते आणि प्रत्येक सामन्यातून 118 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, तर केवळ प्रसारमाध्यम हक्कांचे (media rights) मूल्यच 2400 कोटी रुपयांनी अधिक झाले असते. याचा अर्थ असा की, बीसीसीआयला 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असता. या रकमेपैकी 1200 कोटी रुपये 10 संघांमध्ये वितरित केले गेले असते ज्यामुळे प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये मिळाले असते आणि परिणामी, या संघांचे मूल्यांकन आपोआपच वाढले असते.”

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा Read More »

fb img 1775543598086

Aditi Tatkare : ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Aditi Tatkare : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत निंदनीय घटनेतील पीडित मुलीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे आणि तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिचे वय लहान असून त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. डॉक्टर व प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीचे विशेष समुपदेशकाकडून समुपदेशन करण्यात आले असून, स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, या उपचारांचा कोणताही आर्थिक भार पीडितेच्या कुटुंबावर पडू दिला जाणार नाही. पीडितेस महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य तात्काळ देण्यात येईल. यासोबतच, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत तिच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत. घटनेच्या दिवसापासूनच आपण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिक आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. कुटुंबाकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या सांगाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. या सांत्वनपर भेटीदरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील तिची आई, मावशी व मामा उपस्थित होते. तसेच, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम हेही याप्रसंगी उपस्थित होते.

Aditi Tatkare : ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा Read More »

Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळीने नुकसान…तातडीने पंचनामे करा, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना

Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने व अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मौजे पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाथरे (बु.) येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप यांच्या शेताला भेट देऊन पालकमंत्र्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. वादळामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने ९ गायी दगावल्याच्या घटनेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीर दिला व प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दौऱ्यात तालुक्यातील विविध भागांतील नुकसानीची प्राथमिक माहिती सादर करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळीने नुकसान…तातडीने पंचनामे करा, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना Read More »

gopichand padalkar

Gopichand Padalkar : अंजनगाव पुतळा वादावरून गोपीचंद पडळकर भडकले

Gopichand Padalkar : सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत आंदोलकांवर जोरदार टीका केली आहे. रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिवाजी महाराज आमची अस्मिता असल्याचे स्पष्ट केले. पुतळ्याला विरोध नसला तरी ज्या ठिकाणी तो उभारला जात आहे, तेथे जातीयवाद आणि राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. खेलोबा देवस्थानाच्या आवारात पुतळा उभारणे सहन केले जाणार नाही, तो अन्यत्र उभारावा, तसेच पुतळा उभारण्याची जबाबदारी दिल्यास तो वाजतगाजत उभारून दाखवू, असेही पडळकर म्हणाले. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आंदोलकांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरल्याचेही समोर आले असून त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Gopichand Padalkar : अंजनगाव पुतळा वादावरून गोपीचंद पडळकर भडकले Read More »

bachchu kadu

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू अडचणीत; हत्येचा कट उघड, गुन्हा दाखल

Bachchu Kadu : अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्या तक्रारीनुसार माजी मंत्री बच्चू कडू व काही साथीदारांनी अभिजित तायडे यांचा अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे. तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथील निवासस्थानी हा कट आखण्याची चर्चा झाली होती. या संभाषणाचे गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदाराने मोबाईलमध्ये केले. पोलिसांनी रेकॉर्डिंगची तपासणी केली असता प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्यामुळे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्यासह इतरांवर भारतीय दंड संहिता कलम ५५, ५८, ६१ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विशाल आनंद,पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू अडचणीत; हत्येचा कट उघड, गुन्हा दाखल Read More »

rain alert

IMD Rain Alert: अहिल्यानगरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ व ‘यलो अलर्ट’; जाणून घ्या हवामान अपडेट

IMD Rain Alert : भारतीय हवामान विभाग यांनी निर्गमित केलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात ३ एप्रिल २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. तसेच ४ एप्रिल २०२६ रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली थांबू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये; विद्युतवाहक वस्तूंना स्पर्श टाळावा.मोकळी मैदाने, टॉवर्स, विद्युत खांब, धातूची कुंपणे, ट्रान्सफॉर्मर यांपासून दूर राहावे.जाहिरात फलक (होर्डिंग्ज) जवळ थांबू नये; कोसळण्याचा धोका संभवतो.मोकळ्या जागेत अडकले असल्यास गुडघ्यावर बसून डोके खाली झाकून घ्यावे व जमिनीशी कमी संपर्क ठेवावा. धरण, नदी, कालवे येथे पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घ्यावी; पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान टाळण्यासाठी शेतीमालाचे योग्य नियोजन करावे.बाजारात आणलेला किंवा साठवलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा. वादळ, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

IMD Rain Alert: अहिल्यानगरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ व ‘यलो अलर्ट’; जाणून घ्या हवामान अपडेट Read More »

kolhapur

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटी दारूविरोधी मोहिमेत शाहूवाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर्ले-बांबवडे रोडवर कापशी गावाजवळ सापळा रचून एका टाटा ट्रकला अडवले. या कारवाईत सुमारे 1 कोटी 64 लाख रुपयांचा गोवा बनावटी ‘सनकी’ ब्रँडचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकसह एकूण 1 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकचालक संतोष बंडू पेटकर याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत मध्यप्रदेशातील असीम अब्दुल्ला शेख याचा सहभाग उघड झाला. त्यानंतर शेखलाही अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, “मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.”

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त Read More »

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पडद्यामागे मोठे राजकीय नाट्य रंगले असून पक्षांतर्गत वादाचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरून पक्षात आता स्पष्टपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत संघर्षामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक खळबळजनक पत्र धाडले आहे. 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कोणताही अधिकृत पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी आग्रही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. घटनेतील बदलांमुळे अधिकारांच्या वाटपावरून हा वाद विकोपाला गेल्याचे समजते. या वादावर पडदा टाकण्यासाठी दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खुलाशानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समाधान झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पत्रावरून उद्भवलेला हा कायदेशीर आणि राजकीय तिढा सोडवण्यासाठी सध्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या आणि दिग्गज नेत्यांच्या तातडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दिल्लीत असून भाजप श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ऐन राजकीय धामधुमीत राष्ट्रवादीतील हा कलह नेमके कोणते वळण घेतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण Read More »