DNA मराठी

ताज्या बातम्या

cheque book

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक

Cheque Book : चेकचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चेकबुकच्या स्वरूपात महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. 1 जानेवारी 2027 पासून अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकबुकचा वापर महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांनी 31 डिसेंबर 2026 पूर्वी आपल्या बँकेकडून नवीन चेकबुक घेण्याची तयारी करावी. काही बँकांनी यासंदर्भात ग्राहकांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे. जुन्या चेकबुकचे काय होणार? सध्या वापरात असलेल्या काही जुन्या चेकबुकमध्ये चेक क्रमांक आणि संबंधित माहिती प्रामुख्याने अंकांच्या स्वरूपात असते. नव्या पद्धतीमध्ये चेकशी संबंधित ओळख क्रमांकात अक्षरे आणि अंकांचा म्हणजेच अल्फा-न्यूमेरिक कोडचा वापर केला जाणार आहे. Mintच्या वृत्तानुसार, 31 डिसेंबर 2026 नंतर जुन्या स्वरूपातील चेकच्या स्वीकाराबाबत बँकांकडून निर्बंध लागू होऊ शकतात. विशेषतः काही बँकांनी 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकचा वापर करण्याबाबत ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मोठ्या रकमेचा चेक देणाऱ्या ग्राहकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आपल्या बँकेकडून नियमांची खात्री करून घेणे योग्य ठरेल. अल्फा-न्यूमेरिक कोड म्हणजे काय? अल्फा-न्यूमेरिक म्हणजे अक्षरे आणि अंक यांचे मिश्रण. पारंपरिक चेकवरील क्रमांकाच्या तुलनेत नव्या स्वरूपातील कोडमुळे चेकची ओळख आणि त्याची प्रक्रिया अधिक सुसंगत पद्धतीने करता येण्यास मदत होणार आहे. या बदलामागे चेक व्यवहार अधिक सुरक्षित करणे आणि बनावट चेक किंवा चेकमध्ये छेडछाड करण्याच्या घटना कमी करणे हा उद्देश असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. नव्या चेकमध्ये वॉटरमार्क, UV मध्ये दिसणारी सुरक्षा वैशिष्ट्ये आणि मायक्रो-प्रिंटिंगसारख्या सुरक्षाव्यवस्थांचाही वापर केला जात आहे. बँक ग्राहकांनी काय करावे? ज्यांच्या खात्यातून नियमितपणे चेकद्वारे मोठे व्यवहार होतात, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर, जमीन, व्यवसाय, कर्जाची परतफेड, विमा, शैक्षणिक शुल्क किंवा इतर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पुढील काही महिन्यांत चेक देणार असाल, तर जुनी चेकबुक वापरण्यापूर्वी आपल्या बँकेकडून तिची वैधता तपासावी. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या मोबाइल बँकिंग अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा शाखेच्या माध्यमातून नवीन चेकबुकची सुविधा उपलब्ध आहे का, हे तपासावे. काही बँका नवीन चेकबुक आपोआप जारी करत आहेत, तर काही ठिकाणी ग्राहकांना स्वतंत्रपणे मागणी करावी लागू शकते. चेकबुक बदलण्यामागे सुरक्षा महत्त्वाची डिजिटल पेमेंट, UPI आणि नेट बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये आजही चेकचा वापर केला जातो. त्यामुळे चेकमध्ये बनावटपणा, फेरफार किंवा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचा धोका कायम आहे. नव्या चेकमध्ये अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर केल्याने चेकची तपासणी आणि प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यास मदत होऊ शकते. RBIच्या ग्राहक सेवा मार्गदर्शक तत्त्वांमध्येही चेकच्या व्यवहारात स्वाक्षरीची पडताळणी, चेकबुक जारी करण्यावर नियंत्रण आणि कोऱ्या चेकच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. Positive Pay System चाही संबंध चेक व्यवहारातील फसवणूक कमी करण्यासाठी Positive Pay System (PPS) ही यंत्रणा वापरली जाते. यात मोठ्या रकमेच्या चेकची महत्त्वाची माहिती ग्राहकाकडून आधी बँकेला दिली जाते आणि चेक सादर झाल्यानंतर त्या माहितीची पडताळणी केली जाते. नव्या चेकबुकमधील सुरक्षा वैशिष्ट्ये आणि डिजिटल प्रक्रियांमुळे चेक क्लिअरिंग अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र Positive Pay ची अंमलबजावणी, मर्यादा आणि अनिवार्यता बँकेनुसार वेगळी असू शकते; त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या स्वतंत्र सूचनांकडे लक्ष द्यावे. मोठा व्यवहार करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी समजा एखाद्या ग्राहकाने जुनी चेकबुक वापरून 1 लाख, 2 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक दिला आणि संबंधित बँकेने त्या जुन्या स्वरूपातील चेकवर निर्बंध लागू केले असतील, तर पेमेंटमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरखरेदी, व्यवसायातील देयके, कर्जाचे हप्ते किंवा इतर मोठ्या व्यवहारांसाठी चेक वापरणाऱ्यांनी आधीच नवीन चेकबुक घेणे सुरक्षित ठरेल. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत लक्षात घेऊन ग्राहकांनी नवीन चेकबुकची मागणी वेळेत करणे चांगले. बँकेकडून चेकबुक मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत गर्दी किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास व्यवहार रखडण्याची शक्यता टाळता येईल.

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक Read More »

mitchell starc

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार

Mitchell Starc : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने धुमाकूळ घातला. मॅके येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात स्टार्कने अवघ्या 12 धावा देत 6 विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 64 धावांत आटोपला. पहिल्याच चेंडूवर विकेट ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय स्टार्कने अगदी सुरुवातीपासूनच सार्थ ठरवला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर स्टार्कने शादमान इस्लामला बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर तांझिद हसन, कर्णधार नजमुल हुसैन शांतो, मोमिनुल हक आणि लिटन दास यांनाही त्याने माघारी पाठवले. त्यामुळे बांगलादेशची अवस्था अवघ्या 12 धावांत 5 बाद अशी झाली. स्टार्कच्या या सुरुवातीच्या स्पेलमध्ये वेग, स्विंग आणि मॅकेच्या खेळपट्टीवर मिळणारा अतिरिक्त उंचावलेला उसळीचा फायदा यांचा उत्तम मेळ पाहायला मिळाला. बांगलादेशच्या फलंदाजांना पुढे खेळायचे की मागे राहायचे, याचा अंदाजच घेता आला नाही. 22 चेंडूंत पाच विकेटचा पराक्रम स्टार्कच्या सुरुवातीच्या स्पेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने फक्त 22 चेंडूंमध्ये पाच विकेट्स पूर्ण केल्या. पहिल्या सत्रातच त्याने बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजीची कंबर मोडली. लंचपर्यंत बांगलादेशची अवस्था 35 धावा आणि 6 विकेट अशी झाली होती. यानंतर कर्णधार पॅट कमिन्सनेही आपली भूमिका बजावत मुशफिकुर रहीमला 5 धावांवर बाद केले. मेहदी हसन मिराज आणि हसन महमूद यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर त्यांनाही फार काळ टिकता आले नाही. स्टार्कने पूर्ण केला ‘सिक्सर’ बांगलादेशचे शेवटचे फलंदाज काही काळ क्रीजवर टिकले. शोरिफुल इस्लामने 14 धावा करत संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र स्टार्क पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि शोरिफुलचा झेल यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीकडे देत त्याने बांगलादेशचा डाव संपवला. स्टार्कची गोलंदाजी अशी राहिली 10 षटके, 12 धावा आणि 6 विकेट्स. डार्विनमधील पहिल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी विजय होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मालिकेत क्लीन स्वीप टाळण्याचे मोठे दडपण होते. मात्र मॅकेच्या खेळपट्टीवर परिस्थिती वेगळी होती. येथे चेंडूला डार्विनच्या तुलनेत अधिक उसळी आणि सीम मूव्हमेंट मिळत होती. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे कठीण गेले. सामन्याच्या थेट वृत्तानुसार, मॅकेमध्ये मिळणारी अतिरिक्त उसळी डार्विनपेक्षा लक्षणीय अधिक होती. ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात खराब बांगलादेशला 64 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला फलंदाजीतही सुरुवातीला धक्के बसले. मॅट रेनशॉ 8 धावांवर बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेडने 22 धावा केल्यानंतर शोरिफुल इस्लामच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. त्यानंतर मार्नस लॅबुशेनही 4 धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 50 धावा अशी होती. म्हणजेच ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या पहिल्या डावापेक्षा 14 धावांनी मागे होता. स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरण्याची जबाबदारी घेतली आहे.

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालय परिसरातील एसएसपीएमएसच्या मैदानावर दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी पोलिसांकडून काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शुक्रवारी रात्री सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्काच्या मुद्द्यावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर घोषणाबाजी आणि गोंधळात झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक अथवा चित्रे लावू नयेत, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मैदानाच्या परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संघटनांमधील ताजा वाद आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला अपेक्षित असलेली मोठी गर्दी पाहता, पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने Read More »

crime

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. हडपसरमधील शेवाळेवाडी येथील पी. एस. व्हिला परिसरात राहणाऱ्या धनाजी टोणे यांच्यावर पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भलिंग तपासणी करून पत्नीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, १९ मे २०१९ रोजी जतमध्ये धनाजी टोणे आणि संबंधित महिलेचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. २०२० मध्ये महिला पहिल्यांदा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तिच्या अंगावर बसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी टोणे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे आलेला रागही आणि पत्नीवर काढला. धनाजी यांनी पत्नीचे डोके फरशीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर धनाजी टोणे यांची पुण्यात बदली झाली. मार्च २०२५ मध्ये त्यांची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. मात्र, यावेळीही तिचा छळ सुरू राहिला. १३ मे रोजी धनाजी टोणे आणि त्यांच्या आईने महिलेला एका गावातील शेतातील घरात नेले. तेथे तिची कथितरित्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करण्यात आली. १९ मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवरही यासाठी दबाव टाकण्यात आला. महिलेच्या वडिलांनी गर्भपातास विरोध केल्यानंतर धनाजी टोणे यांनी पोलिस अधिकारी असल्याचा धाक दाखवत धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर २३ मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर ती कशीतरी माहेरी पोहोचली. पतीकडून होणारा छळ थांबत नसल्याने महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तिने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत. दरम्यान, आपल्याविरोधात पोलिस कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर धनाजी टोणे यांनी तातडीने सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं Read More »

img 20260821 wa0007

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त

Tukaram Munde : अन्न व औषधी प्रशासनात तुकाराम मुंढे यांची एन्ट्री झाल्यानंतर दूध, पनीर सह खाद्य पदार्थांमधील भेसळ चव्हाटायवर आली. या विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू असताना आता पोलिसांनी देखील अन्न व औषधी प्रशासनासह आष्टीत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या 72 गोण्या जप्त केल्या आहेत. आष्टी ते जामगाव रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी दुधात भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 72 गोण्या व्हे पावडर आणि बोलेरो पिकअप जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांना ही बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. जामखेड भागातून पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून दुधात भेसळ करण्यासाठी लागणाऱ्या पावडरची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे व त्यांच्या पथकाने आष्टी-जामखेड रस्त्यावरील एका लॉन्ससमोर सापळा रचला. संशयित बोलेरो पिकअप थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात 25 किलो वजनाच्या 47 गोण्या आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वीच 25 गोण्या आष्टी येथील हर्षद हॉटेलसमोर कैलास हंबडे यांच्याकडे ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तेथूनही 25 गोण्या जप्त केल्या. व्हे पावडर ही दुधाचे वजन (प्रमाण) वाढवण्यासाठी वापरली जाणारी स्वस्त दुग्धजन्य पावडर आहे. दुधाची गुणवत्ता चाचणी करण्यासाठीही तिचा वापर होतो. दुधापासून जेव्हा चीज किंवा पनीर बनवले जाते, तेव्हा उरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन करून व्हे पावडर तयार केली जाते. व्हे पावडर टाकल्यामुळे दुधातील फॅट न बदलता SNF चे प्रमाण वाढते. त्यामुळे भेसळयुक्त दूधही शासकीय चाचणीत ‘पास’ होते. 25 किलो वजनाच्या 47 गोण्या लक्ष्मण गोपाळघरे (चालक, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), हरिदास एकनाथ गोपाळघरे (गाडी व मालाचा मालक, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), कैलास हंबडे (माल खरेदीदार, रा. आष्टी) या तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक शरद भुतेकर करत आहेत.

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त Read More »

raju shetti

Raju Shetti : साखरेच्या दरवाढीमागे 20 ते 22 हजार कोटींच्या काळाबाजाराचा संशय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetti : देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ ही नैसर्गिक नसून नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. साखरेच्या दरवाढीच्या आड सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. साखरेचा पुरेसा साठा असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा अपेक्षित फायदा मिळत नसल्याचा दावा शेट्टी यांनी केला. त्यामुळे साखरेच्या साठ्याची आणि दरवाढीमागील व्यवहारांची केंद्र व राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. साखर उद्योगातील कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या कथित संगनमताची चौकशी झाल्यास मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होऊ शकतो, असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरात साखर 65 ते 70 रुपये किलो मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे.

Raju Shetti : साखरेच्या दरवाढीमागे 20 ते 22 हजार कोटींच्या काळाबाजाराचा संशय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप Read More »

sajjan kumar

Sajjan Kumar : सिख दंगली प्रकरणातील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन

Sajjan Kumar : 1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना तिहार तुरुंगातून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सज्जन कुमार हे दिल्लीतील बाह्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिले होते. 1984 च्या दंगलीनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 रोजी पाच शीखांच्या हत्या आणि गुरुद्वारा जाळल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले आणि त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 1984 च्या दंगलीदरम्यान जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांना पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये जनकपुरी आणि विकासपुरी येथील दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध पुरावे संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. सज्जन कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीवर 1984 च्या दंगलीतील आरोप आणि त्यानंतरच्या न्यायालयीन कारवाईची कायम छाया राहिली. 2018 मध्ये दोषी ठरल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Sajjan Kumar : सिख दंगली प्रकरणातील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन Read More »

sanjay raut

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस 

Sanjay Raut on PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जुन्नर अत्याचार प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण असून, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात सरकारची भूमिका काय, असा सवाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला काही वाटत नाही का? याबद्दल तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही का?” असा सवाल करत राऊत यांनी फडणवीस यांच्यावर ‘फेल्युअर मुख्यमंत्री’ अशी टीका केली. पोलिसांनीही या प्रकरणात हात वर केल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे सेनेचे स्वीकृत नगरसेवक साहिल देविदास चौघुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचा दावा राऊत यांनी केला. संबंधित मुलगी न्यायासाठी विविध ठिकाणी जाऊन थकली असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांना रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत चार-चार तास बसवून ठेवतात आणि प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करत राऊत यांनी पोलिसांना थेट आव्हान दिले. “नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण मार्गी लावावे, नाहीतर मी हे प्रकरण मार्गी लावेन,” असे ते म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदे या प्रकरणात कोणाला वाचवत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून वरून दबाव येत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भाष्य टाळले सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावर टीका मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावरही राऊत यांनी टीका केली. पंतप्रधानांचा दौरा कठीण असताना मंत्र्यांनी खात्याचे काम सोडून विद्यापीठात जाण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. “विद्यापीठात जाण्यापेक्षा महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये या मंत्र्यांनी जावे,” असे राऊत म्हणाले. भाजपसोबत आता जनरेशन झेड येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करू द्या, असे म्हणत त्यांनी या दौऱ्याची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदींवरही निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसावरूनही राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत,” असे ते म्हणाले. 17 सप्टेंबरनंतर मोदींना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगत राऊत यांनी मोदी आणि शाह यांच्यावरही टीका केली. मोदींच्या वाढदिवशी समर्थकांनी उत्सव साजरा करावा; त्यानंतरच्या राजकीय घडामोडी पाहा, असे ते म्हणाले. चंपत राय यांच्यावरूनही टीका चंपत राय यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना राऊत यांनी महाराष्ट्रातही ‘चंपत राय’ असल्याचे म्हटले. बलात्काराच्या आरोपींना ज्याप्रमाणे क्लीनचिट दिली जाते, त्याचप्रमाणे चंपत राय यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पुण्यात शनिवारी मोरगाव येथे रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस  Read More »

rohit pawar

Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा

Rohit Pawar : कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयांची कामे अंतिम टप्प्यात आली असून इथे मंजूर केलेली पदे तातडीने भरावीत आणि या उपजिल्हा रुग्णालयांचे लोकार्पण करावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. तसेच मिरजगाव येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी वाढीव निधी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याची मागणीही त्यांनी केली. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये कर्जत येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे तर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून तेथेही १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी आणली आणि त्यासाठी भरीव निधीही आणला. सध्या या दोन्हीही उपजिल्हा रुग्णालयांची कामे जवळपास पूर्णत्त्वास गेली आहेत. तसेच मिरजगाव येथेही ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले आणि याचेही काम जवळपासून ७५ टक्के पूर्ण झाले आहे. कर्जत आणि जामखेड येथील उपजिल्हा रुग्णालयांसाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जून २०२६ मध्ये आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी तसेच इतर आवश्यक पदे मंजूर करून आणली आणि याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. काल त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन याबाबत त्यांचे आभार मानले. या दोन्ही ठिकाणी मंजूर झालेल्या पदांची अद्याप भरती झालेली नाही, ती भरती करुन दोन्ही उपजिल्हा रुग्णालये नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी मंत्री आबिटकर यांच्याकडे केली. दरम्यान, मिरजगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीची आवश्यकता असल्याचेही रोहित पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, तसेच मिरजगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कर्जत, जामखेड आणि मिरजगाव या तीनही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये उभी करण्यामागचा उद्देश केवळ इमारती बांधणे नसून, मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या उभारणीपासून निधी, मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधांपर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा करून ही आरोग्य केंद्रे पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी

Satyajeet Tambe : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने समाजमन हादरले आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत दोषी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या समाजात इतक्या राक्षसी प्रवृत्तीचे नराधम वावरत आहेत आणि आपल्या मुलींवर सातत्याने अत्याचारांची टांगती तलवार आहे, ही बाब केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणूनही धक्का देणारी आहे, अशी भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. पिंपळवंडीतील या चिमुकलीने किती यातना भोगल्या असतील आणि तिचे आई-वडील सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असतील, याची कल्पनाही करवत नाही. एका निष्पाप मुलीचा अशा पद्धतीने अंत होणे ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक बाब आहे, असे तांबे म्हणाले. अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषी नराधमास कठोर शिक्षा मिळावी, अशी शासनाकडे माझी आग्रहाची मागणी आहे, असे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.

Satyajeet Tambe : पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी Read More »