DNA मराठी

ताज्या बातम्या

rain

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू

Pune Rain Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विविध भागांत अडकलेल्या तब्बल 4 हजार 568 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उद्याही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. शाळांना सुट्टी जाहीर परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉईंट ही पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने देहू आणि आळंदी येथून वारकऱ्यांनी प्रवास टाळून थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केले.

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू Read More »

tridha choudhury

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा

Tridha Choudhury : अभिनेता बॉबी देओलच्या गाजलेल्या ‘आश्रम’ वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. या मालिकेतील बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांमुळे तिच्या प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि अखेर ब्रेकअप झाल्याचे तिने सांगितले आहे. एका मुलाखतीत त्रिधाने सांगितले की, ‘आश्रम’मधील भूमिका तिच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. मात्र, मालिकेतील इंटिमेट दृश्यांमुळे तिचा तत्कालीन प्रियकर अस्वस्थ झाला. अभिनय आणि वास्तव यातला फरक तो स्वीकारू शकला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले आणि नात्यात तणाव वाढत गेला. त्रिधा म्हणाली की, त्या काळात तिला स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण करण्यात आली. मात्र आता ती त्या कठीण काळातून पूर्णपणे बाहेर पडली असून, मागे वळून पाहताना त्या निर्णयाबद्दल कोणतीही खंत वाटत नाही. अभिनय हा तिचा व्यवसाय असून, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाला तिने अधिक महत्त्व दिल्याचेही तिने स्पष्ट केले. प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये त्रिधाने ‘बबिता’ची भूमिका साकारली होती. बॉबी देओलसोबतच्या तिच्या काही बोल्ड दृश्यांची त्या काळात मोठी चर्चा झाली होती. या भूमिकेमुळे त्रिधाला देशभरात मोठी ओळख मिळाली असून, ‘आश्रम’च्या पुढील पर्वाचीही प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा Read More »

team india

Asia Cup 2027 वर संकट; भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार?

Asia Cup 2027 : 2027 च्या आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, ही स्पर्धा बांगलादेशात आयोजित करण्याचा प्रस्ताव असून, भारताच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याच्या राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ बांगलादेशात खेळण्यासाठी जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही वृत्तांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) स्पर्धेबाबत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अंतिम निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, असे म्हटले आहे. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) किंवा BCCI यांनी भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या प्रामुख्याने माध्यमांतील अहवालांवर आधारित आहेत. याआधीही भारत-पाकिस्तान संबंधांमुळे आशिया चषकाचे आयोजन आणि सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 2027 च्या स्पर्धेबाबतही अंतिम निर्णय राजनैतिक परिस्थिती आणि ACC च्या भूमिकेनुसार घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Asia Cup 2027 वर संकट; भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार? Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे, पर्यटनस्थळे किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने संभाव्य पूर आणि दरडग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

siya goyal

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Siya Goyal : लोहगड किल्ल्यावरून ढकलून २५ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेत २० वर्षीय सिया गोयल आणि २२ वर्षीय चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून ढकलून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. केतन आणि सिया यांचा विवाह याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सांकेतिक शब्द आणि संकेतांचा वापर आढळून आल्याने त्या संभाषणांचा अर्थ उलगडण्यासाठी तसेच तपास पुढे नेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, बचाव पक्षाने या मागणीला विरोध करत, तपासासाठी पोलिसांना यापूर्वीच पुरेसा कालावधी मिळाल्याने पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १ ते ३ जुलैदरम्यान ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल ३६० बावधन, पुणे यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित Read More »

railway

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्‍यासाठी राज्‍यसरकार सकारात्‍मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली. पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्‍हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या मार्गाबाबत सविस्‍तर चर्चा केली. माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील, आ.डॉ.किरण लहामटे, आ.सरोज अहिरे, आ.अमोल खताळ, आ.शरद सोनवणे, आ.बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते. शिष्‍टमंडळाने पुणे-नाशिक रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्‍यानगर या जिल्‍ह्यांच्‍या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्‍यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता करण्‍यात आल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली. या रेल्‍वे मार्गाबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असून, यासाठी निधीचीही तरतुद केलेली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्‍याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्‍पाची तांत्रिक अचुकता व कालबध्‍द अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍यासाठी तज्‍ज्ञांची उच्‍च्‍स्‍तरीय समिती स्‍थापन करुन, याबाबतचा अहवाल मागविण्‍यात येईल. समितीकडून येणा-या अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत आपण स्‍वत: पाठपुरावा करु अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्‍टमंडळाला दिली. राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपुर्ण बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्‍दारे करण्यात आली. यावेळी आ.प्राजक्त तनपुरे, आ.विठ्ठलराव लंघे पाटील व आ. अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही Read More »

Gold Price Today: सोनं आणखी स्वस्त, चांदी मात्र महागली; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारात देखील दिसून येत आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मोठी घसरण झाल्यानंतर शुक्रवारीही सोन्याचे दर कमी झाले. मात्र, याउलट चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. बाजारातील माहितीनुसार, 10 ग्रॅम सोन्याच्या दरात सुमारे 1,368 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा सरासरी भाव आता सुमारे 1.46 लाख रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात प्रति किलो सुमारे 3 हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली असून तिचा भाव 2.32 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नसराईचा हंगाम संपल्याने सोन्याची मागणी कमी झाली आहे. तसेच अनेकजण जुने सोने विकत असल्याने बाजारात पुरवठा वाढला असून त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. त्यामुळे सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

Gold Price Today: सोनं आणखी स्वस्त, चांदी मात्र महागली; जाणून घ्या नवीन दर Read More »

marathi actresshigh profile sex racket case

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Marathi Actress: गिरगावातील हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेट प्रकरणात आता नवीन खुलासा झाल्याने एकच खळबळ उडाली आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गिरगावातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. तर या प्रकरणातील प्रमुख संशयित मेकअप आर्टिस्टला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. व्यवहार निश्चित झाल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी मेकअप आर्टिस्टने मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करून महिलांना या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून, दुसरी अभिनेत्री हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, रॅकेटचे इतर सदस्य, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका याचाही तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

student

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

MHT-CET : एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.ई., बी.टेक. तसेच पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अधिकृत सुरुवात केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ३ जुलै ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची ऑनलाइन पुष्टी (Confirmation) करण्याची संधी असेल. विद्यार्थी ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करू शकतात. प्रवेश प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. १५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै दरम्यान हरकती नोंदवता येतील. सर्व हरकतींची छाननी झाल्यानंतर २० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पर्याय नोंदणी (Option Form) आणि सीट वाटपाच्या पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर होईल. यंदा प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कागदपत्र पडताळणीची सुविधा शनिवार आणि रविवारही सुरू ठेवण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विद्यार्थी स्क्रुटिनी केंद्रात जाऊन किंवा निवडलेल्या पद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. दरम्यान, यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले गुण सुधारण्याची संधी मिळवली. आता प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि पडताळणीची प्रक्रिया शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी Read More »