DNA मराठी

Maharashtra

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

jcb

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त

Jalgaon News : जळगावमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एमडी ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित ड्रग माफिया रईस हसन देशमुख याच्या अवैध घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. जळगावच्या इतिहासात अमली पदार्थ तस्कराविरोधात झालेली ही पहिलीच बुलडोझर कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात आरोपींकडून कार, दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले होते. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला रईस हसन देशमुख सध्या पोलीस कोठडीत असून, तपासादरम्यान त्याने एमआयडीसी परिसरात नियमांचे उल्लंघन करून अवैध दुकान आणि घर उभारल्याचे निष्पन्न झाले.यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि जिल्हा पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत आरोपीचे अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने आरोपीचे दुकान आणि घर जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर प्रशासकीय आणि आर्थिक कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत असल्याची माहिती पंकज गोसावी, उपायुक्त महानगरपालिका, जळगाव यांनी दिली.

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त Read More »

img 20260607 wa0006

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई

Salman Dolare : खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल असलेला सलमान डोलारे गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सलमान डोलारे लपून बसल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कल्याण क्राईम ब्रँच युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून तपासणी केली असता, सलमान डोलारे घरातील कपाटात लपलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा सुरू केल्यानंतर परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि इमारतीखाली नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कल्याण परिसरात खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनेक अनधिकृत इमारती उभारल्याचा आरोप आहे. युसुफ हाइट्स, मरियम टॉवरसह अनेक प्रकल्पांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. याशिवाय या इमारतींशी संबंधित फाईल चोरी प्रकरणी महापालिकेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचाही तपास सुरू आहे. सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच तसेच विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून करण्यात येत आहे. तपासादरम्यान केवळ सलमान डोलारेच नव्हे, तर त्याचे काही सहकारी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही अधिकारी देखील चौकशीच्या कक्षेत असल्याची चर्चा असून, सलमान डोलारेच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. आता या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई Read More »

img 20260607 wa0080

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातून ७ जून रोजी जेरबंद केले. तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन जवळील अरणगाव हद्दीत ही घटना घडली होती. या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजी विठ्ठल मोहिते (वय ५२), राजू रामदास मोहिते (वय ३६, दोघे रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड) अक्षय रामदास मोहिते (वय २७, रा. मालठा ता.हातगाव, जि.नांदेड), छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ) व दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा.दगडवाडी, ता.हातगाव, जि.नांदेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी (ता.किनवट, जि. नांदेड) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ झेंडीगुळा लोणी येथील आरोपींच्या घरी छापा टाकुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे कब्जातून १६ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विप्ट कार, बनवाट सोन्याची नाणी, कोयता असा एकुण २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड Read More »

img 20260605 wa0009

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास

Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील खांबे गावात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ४) सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात “तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत अपेक्षित विकास झाला नाही. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत तालुक्यात विविध विकासकामांना गती देण्यात आली असून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. खांबे गावाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, विठ्ठल दातीर, बाबासाहेब दातीर, रामेश्वर शिंदे, दिगंबर दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, प्रेमराज बुधे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते… पुंजा जोशी, सुखदेव भतांबरे, रावसाहेब भांड, बाबूराव कापडी, बारकू पेकारी, बाबा एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, सुभाष केदार, राजू शेंडगे, बाळासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, ठकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्वर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विकासाच्या जोरावर शिवसेनेची ताकद वाढणार केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना वेग मिळत आहे. खांबे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा साकूर पठार भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणारा ठरेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत या भागात शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल,” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. चाळीस वर्षांत न झालेला विकास दीड वर्षांत… खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नव्हता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षांत साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच या विकासकामांचे लोकार्पण आणि गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास Read More »

img 20260604 wa0018

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

Pune Crime: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२, धंदा-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे:गोरख संभाजी सोनवणे(वय ३२ वर्षे – पती)संभाजी लक्ष्मण सोनवणे(वय ६२ वर्षे – सासरा), अलका संभाजी सोनवणे(वय ५५ वर्षे – सासू) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांना ‘विरा’ (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण व मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि “पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका” अशी तंबी दिली. नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली. त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता, पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि “हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा”असा अमानुष पवित्रा घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला. फ्लॅटसाठी 3 लाख आणि ‘अधिक मासात’ सोन्याच्या अंगठीची मागणी एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्याने तेजस्विनीकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. मे २०२६ मध्ये ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र,”आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,”असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली. २ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही.” त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन Read More »

img 20260604 wa0017

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा

Neet Exam: देशात एखादा घोटाळा उघडकीस आला, पेपरफुटी झाली, तरुण बेरोजगार राहिले किंवा शेतकरी संकटात सापडला की सोशल मीडियावर आणि चौकाचौकांत एकच सूर उमटतो “सरकार काय करत आहे?” प्रश्न योग्य आहे. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ज्यांना आपण मतदान करून निवडून दिले, त्यांना आपण कधी जाब विचारला आहे का? लोकशाहीत सत्ता आकाशातून पडत नाही. ती मतपेटीतून जन्माला येते. प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंच हा जनतेच्या मतांवर निवडून येतो. त्यामुळे समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ व्यवस्थेला दोष देणे पुरेसे नाही; त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेल्या लोकांना उत्तर मागणेही तितकेच आवश्यक आहे. आज लाखो तरुण पेपरफुटीच्या घटनांमुळे हवालदिल झाले आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा रद्द होतात. भरती प्रक्रिया रखडतात. शेतकरी उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आहे. हमीभाव, सिंचन आणि बाजारपेठेच्या प्रश्नांनी तो त्रस्त आहे. या प्रश्नांवर निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिल्यानंतर किती वेळा त्यांचा हिशेब मागितला? लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मतदाराचा सक्रिय सहभाग मतदानाच्या दिवशी संपतो. निवडणूक आली की विकास, रोजगार, शिक्षण आणि शेती यावर चर्चा होते; निवडणूक संपली की नागरिक पुन्हा प्रेक्षक बनतो. याच निष्क्रियतेतून उत्तरदायित्व हरवते. लोकशाही मजबूत करण्याचा एकच मार्ग आहे प्रतिनिधींना सतत प्रश्न विचारणे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली का? त्यांनी विधानसभेत किंवा संसदेत आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला का? आपल्या मतदारसंघासाठी निधी आणला का? या प्रश्नांची उत्तरे मागितली गेली तरच राजकारणाची दिशा बदलेल. कारण लोकशाहीत सत्ता ही जनतेची असते. सरकार बदलते, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात; पण मतदाराची जबाबदारी बदलत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या घोटाळ्यावर संताप व्यक्त करताना एक प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा ज्यांना मी मतदान दिले, त्यांच्याकडे मी कधी जाब मागितला आहे का? लोकशाही केवळ मतदानाचा अधिकार देत नाही; ती प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि जबाबदारीही देते. आणि कदाचित, याच जबाबदारीच्या जाणीवेतून अधिक उत्तरदायी राजकारणाची सुरुवात होऊ शकते.

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा Read More »

Vikhe Patil

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

election

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल

Pathardi News : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ संचालक पदांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस अगोदरपर्यंत २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संचालक मंडळात नव्याने प्रवेश करण्यासाठी प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे. आहे. १९ व्यक्तींनी २५ अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (२ जून) अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस अखेर आलेले अर्ज व त्यानंतर अंतिम छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २७ जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आज (मंगळवारी) असल्याने उमेदवारी अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल Read More »

img 20260602 wa0015

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

Live Movie: काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्यांनी ‘लाईव्ह’बाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. ‘लाईव्ह’ या शीर्षकावरून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना येत नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ चित्रपटाची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. वास्तवाला मनोरंजनाची जोड देत ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीतप्रधान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ‘लाईव्ह’ चित्रपटाची संपूर्ण टिम खूप मेहनत घेत असल्याचेही राय यांनी सांगितले. दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार महालिंग कंठाळे यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख कला दिग्दर्शकाची बाजू सांभाळत आहेत.

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू… Read More »