DNA मराठी

DNA Marathi News

sugar

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता?

Sugar Prices: साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होऊ लागला आहे. चहा, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढीची झळ थेट ग्राहकांना बसत आहे. अशा परिस्थितीत ऊसाशिवाय इतर कोणत्या स्रोतांपासून साखर किंवा गोड पदार्थ तयार होऊ शकतात, याकडेही लक्ष वेधले जात आहे. ऊस हा जगातील साखरेचा प्रमुख स्रोत असला, तरी शुगर बीटपासूनही मोठ्या प्रमाणावर साखर तयार केली जाते. युरोप आणि अमेरिकेत बीटपासून साखर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. बीटपासून तयार होणाऱ्या रिफाइंड साखरेतील सुक्रोजचे प्रमाण ऊसाच्या साखरेच्या जवळपास असल्याने चव आणि वापराच्या दृष्टीने दोन्हीमध्ये फारसा फरक जाणवत नाही. याशिवाय गोड ज्वारीपासूनही गोड सिरप तयार केला जातो. या ज्वारीच्या देठात असलेल्या गोड रसापासून सिरप तयार करता येतो. काही प्रक्रियांच्या माध्यमातून त्यापासून साखरेचे दाणेही तयार करता येतात. मात्र, भारतात या पद्धतीने होणारे उत्पादन ऊसाच्या तुलनेत अत्यल्प आहे. खजूर हा देखील गोड पदार्थांचा एक स्रोत आहे. खजुरापासून डेट शुगर आणि डेट सिरप तयार केले जातात. नैसर्गिक गोडवा असल्याने त्यांचा विविध खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो. मात्र, उत्पादन मर्यादित असल्याने हे पदार्थ सामान्य साखरेपेक्षा महाग असतात. नारळाच्या फुलांच्या रसापासून कोकोनट शुगर तयार केली जाते. रस आटवून तयार होणाऱ्या या साखरेचा रंग किंचित तपकिरी असून त्याला कॅरॅमलसारखी चव असते. मात्र, किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य साखरेचा स्वस्त पर्याय ठरत नाही. तसेच ताडाच्या रसापासून पाम शुगर तयार केली जाते. भारतातील काही भागांसह आशियातील अनेक देशांमध्ये तिचा पारंपरिक वापर आहे. ही साखर ऊसाच्या साखरेपेक्षा महाग असली तरी कोकोनट शुगरच्या तुलनेत तुलनेने स्वस्त पडते. मका आणि कसावा यांच्यापासूनही गोड पदार्थ तयार केले जातात. मक्यातील स्टार्चवर प्रक्रिया करून ग्लुकोज सिरप आणि हाय-फ्रक्टोज कॉर्न सिरप तयार केला जातो. बिस्किटे, सॉफ्ट ड्रिंक्स आणि विविध पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये या स्वीटनर्सचा वापर केला जातो. कसावा किंवा टॅपिओकामधील स्टार्चवर प्रक्रिया करूनही ग्लुकोज आणि इतर स्वीटनर्स तयार करता येतात. दरम्यान, मेपलच्या झाडाच्या रसापासून तयार होणारा मेपल सिरप हा देखील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील थंड प्रदेशात त्याचे उत्पादन होते. मात्र, किंमत अधिक असल्याने भारतीय घरांमध्ये तो नियमित वापरासाठी साखरेचा व्यवहार्य पर्याय नाही.

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता? Read More »

sunil tingre

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र

Sunil Tingre : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष असले, तरी पुणे महापालिकेतील राजकारणात दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विकासनिधी देताना अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समान निधी मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी थेट शून्य करण्यात आल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, भविष्यातही पक्षाच्या इतर नगरसेवकांचा निधी रोखला जाण्याची चर्चा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पुणे महापालिकेतील या वादाची ठिणगी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीसाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडल्यानंतर पडली. या प्रस्तावाला सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बालवडकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता राष्ट्रवादीकडून भाजपच्या महापालिकेतील कारभाराबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी महायुतीचा धर्म आणि पुणे शहराच्या विकासाचा विचार करून पक्षाने अनेक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतल्याचे टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतही राष्ट्रवादीने सहकार्य केले होते. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकासनिधी आणि विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अंदाजपत्रकात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपेक्षित निधी मिळाला नसल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे. तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली की, राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून परिस्थितीची माहिती दिल्याचेही टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याचेही टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. विमाननगर येथील ‘भारत मंडपम’च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्यसभेत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे स्थानिक राजकीय मतभेदांचा परिणाम सामान्य नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये, अशी भूमिका सुनील टिंगरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समान व न्याय्य विकासनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुनील टिंगरे यांच्या या पत्रामुळे पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि दोन्ही मित्रपक्षांमधील हा वाद कसा मिटवतात, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार

Nilesh Lanke : सत्ता आपल्या हातात आहे किंवा नाही, यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सत्ता नसतानाही पिंपळगाव रोठा येथे अशोक घुले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची आपली भूमिका आहे. राजकारणात स्पर्धा करायची असेल तर ती विकासाची करा; विरोधकांना अडचणीत आणणे, पोलिसांवर दबाव आणणे किंवा खोटे गुन्हे दाखल करणे, अशा राजकारणाला आपण कधीही महत्त्व दिले नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो आणि सत्याचा विजय अंतिम असतो, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.           पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर होते. यावेळी लंके यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी जोडलेले राजकारण आणि तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विरोधकांवर नाव न घेता जोरदार शरसंधान साधले.           अशोक घुले हे प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व आहे. सत्ता आपली नसतानाही त्यांनी गावातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी न्याय देणार आहे, असे लंके यांनी सांगितले. आपल्या गटातील सर्वच सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्याचे सांगत लंके म्हणाले, सत्तेचा फायदा लोकांना करून देता आला पाहिजे. सत्ता ही जनतेच्या विकासासाठी असते. सत्तेचा उपयोग विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी किंवा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी करण्यापेक्षा गावांचा विकास, नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे.  सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर मैदानात येण्याचे आव्हान दिले. “माझे नेहमी सांगणे असते की स्पर्धा करा; पण स्पर्धा कशाची करा, तर विकासाची स्पर्धा करा. कोणत्या गावात किती विकासकामे झाली, किती निधी आणला आणि जनतेच्या किती समस्या सोडवल्या, यावर स्पर्धा झाली पाहिजे. मात्र सध्याच्या राजकारणामध्ये समोरच्याला कसे अडचणीत आणता येईल, कसे खिंडीत पकडता येईल आणि खोटे गुन्हे कसे दाखल करता येतील, याचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. सध्या सत्तेचा वापर कुठे चालू आहे, तर पोलिसांवर दबाव आणायचा, खोटे गुन्हे दाखल करायचे. अशा गोष्टींना मी कधीही महत्त्व दिले नाही. मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. शेवटी सत्याचा विजय होतो आणि सत्याचा विजय अंतिम असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. नीलेश लंके यांचे तालुक्याकडे लक्ष नाही, असे काही जण म्हणत असल्याचा उल्लेख करत त्यांनी जिल्हा बँकेच्या ठरावाच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट झाल्याचे सांगितले. जिल्हा बँकेच्या निवडणुका आता जाहीर होत असून कोणतीही बाह्यशक्ती अथवा आंतरशक्ती समोर आली तरी आपण पुरून उरणार असल्याचा दावा त्यांनी केला. बँकेच्या निवडणुका आता जाहीर होत आहेत. आता कोणी कितीही काही करू द्या. निलेश लंके जिल्हा बँकेत जात असतो. कोणतीही बाह्यशक्ती येऊ द्या किंवा आंतरशक्ती येऊ द्या. तुम्ही कितीही अंत पाहण्याचा प्रयत्न करा; परंतु तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार आहे. तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या; परंतु तुमचा राजकारणात शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे खंडेरायाच्या चरणी सांगतो,” असे आक्रमक विधान त्यांनी केले. माझ्या तालुक्यात येऊन दररोज आढावा बैठका घ्या किंवा पत्रकार परिषद घ्या, त्याने फरक पडत नाही, असे सांगत लंके यांनी विरोधकांवर टीका केली. “तुम्ही आढावा बैठका घेता आणि त्यामध्ये माझ्यावर टीका करता. राजकारणासाठी माझ्या विरोधात महिलांना पुढे करता. एआय फोटो तयार करता. मात्र तुमच्या विरोधात माझी कुठेही दंड थोपटण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले. तालुक्यातीलच काही लोकांना पुढे करून विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने कोणी दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. काचेच्या घरात राहणारे मी दुसऱ्याच्या घरावर कधीही दगड मारायचा नाही. मात्र जनतेच्या विकासाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्याला विरोध करण्याची आपली तयारी आहे, असे लंके यांनी सांगितले.  तालुक्यात येणाऱ्या बाह्यशक्तींना रोखण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, हा तालुका पुरोगामी विचारांचा तालुका आहे. तालुक्यात येत असलेल्या बाह्यशक्तींना रोखण्याचे काम आपण केले पाहिजे. येथील राजकारण स्थानिक जनतेच्या प्रश्नांभोवती आणि विकासाच्या मुद्द्यांभोवतीच झाले पाहिजे. सत्ता असो अथवा नसो, जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. विकासकामांमुळे पिंपळगाव रोठा आणि श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार Read More »

breakfast tips

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा

Breakfast Tips : दिवसाची सुरुवात आपण कशा पद्धतीने करतो, याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या आहारावर आणि ऊर्जेवर होऊ शकतो. अनेक जण सकाळचा नाश्ता टाळतात किंवा उठल्यानंतर लगेच चहा-बिस्किटांवर भागवतात. मात्र शरीराला दिवसाच्या सुरुवातीलाच योग्य पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी महागडे ड्रायफ्रूट किंवा महागडी हेल्थ फूड उत्पादने घेण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होणारे आणि तुलनेने स्वस्त पदार्थही सकाळच्या आहाराचा चांगला भाग ठरू शकतात. पौष्टिक आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचे स्रोत यांचा समावेश केल्याने पचनक्रिया आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. फायबरयुक्त पदार्थ आहाराचा महत्त्वाचा भाग मानले जातात. भिजवलेले शेंगदाणे ठरू शकतात स्वस्त पर्याय शेंगदाणे हा सर्वसामान्यांच्या घरात सहज मिळणारा आणि तुलनेने स्वस्त पदार्थ आहे. त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स आढळतात. त्यामुळे सकाळच्या आहारात मर्यादित प्रमाणात शेंगदाण्यांचा समावेश केल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. काही जण शेंगदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खातात. भिजवलेले शेंगदाणे खाण्याची ही पद्धत अनेक घरांमध्ये पारंपरिक आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. शेंगदाणे खाल्ल्यानंतर गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याचे सेवन कमी करणे किंवा टाळणे योग्य ठरू शकते. शेंगदाण्याची अॅलर्जी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. केळी : सहज उपलब्ध आणि पटकन खाता येणारे फळ केळी हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्ससह पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात केळ्याचा समावेश करणे हा सोपा पर्याय ठरू शकतो. विशेषतः सकाळी वेळ कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी एक फळ खाणे हा जड नाश्त्यापेक्षा सोपा पर्याय असू शकतो. मात्र फक्त केळे खाऊन पूर्ण नाश्ता झाल्याचे मानणे योग्य नाही. अधिक संतुलित आहारासाठी केळ्यासोबत दूध, दही, शेंगदाणे किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करता येतो. फळे खाण्यासाठी ठरावीक एकच वेळ असते किंवा ती फक्त रिकाम्या पोटीच खाल्ली पाहिजेत, असा ठोस वैज्ञानिक नियम नाही. व्यक्तीच्या आहारपद्धती आणि आरोग्याच्या गरजेनुसार फळांचे सेवन करता येते. भिजवलेल्या मनुका : गोड चवीसोबत फायबर मनुका हा आणखी एक सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि काही प्रमाणात फायबर तसेच विविध सूक्ष्म पोषक घटक असतात. काही लोक रात्री मनुका पाण्यात भिजवून सकाळी खातात. भिजवलेल्या मनुकांचा समावेश संतुलित आहाराचा एक भाग म्हणून करता येतो. मात्र मनुका नैसर्गिकरीत्या गोड असल्याने त्याचे प्रमाणही लक्षात घेणे गरजेचे आहे. विशेषतः रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारातील एकूण कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन आहार ठरवावा. सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? रात्रभराच्या उपवासानंतर सकाळचा आहार शरीराला ऊर्जा आणि पोषक घटक देण्याचे काम करतो. मात्र नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा संतुलित समावेश असणे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, फक्त चहा आणि बिस्किटांऐवजी पोहे, उपमा, अंडी, दही, फळे, कडधान्ये किंवा शेंगदाणे यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. अशा आहारामुळे शरीराला विविध प्रकारचे पोषक घटक मिळतात. पचन सुधारण्यासाठी फक्त एक पदार्थ पुरेसा नाही सकाळी एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया पूर्णपणे सुधारते किंवा दिवसभर थकवा जाणवत नाही, असा दावा करणे योग्य नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण आहारपद्धती, पुरेसे पाणी, नियमित शारीरिक हालचाल आणि योग्य झोप यांनाही तितकेच महत्त्व आहे. फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य आहारात असणे पचनासाठी उपयुक्त ठरते. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणेही महत्त्वाचे आहे. सकाळी काय टाळावे? सकाळची सुरुवात अतिप्रमाणात साखर, तेलकट पदार्थ किंवा अत्यंत प्रक्रिया केलेल्या पदार्थांनी करण्याची सवय टाळणे चांगले. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ काही व्यक्तींमध्ये अॅसिडिटी, अपचन किंवा पोटफुगी वाढवू शकतात. त्याऐवजी घरच्या घरी तयार केलेला संतुलित नाश्ता घेणे अधिक योग्य ठरू शकते. नाश्ता किती आणि कोणता असावा हे व्यक्तीचे वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याच्या गरजांनुसार बदलते. दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गोष्टीही महत्त्वाच्या फक्त सकाळी एखादा पदार्थ खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकत नाही. त्यासाठी दिवसभर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे, वेळेवर जेवणे आणि दीर्घकाळ एकाच जागी बसून न राहता नियमित हालचाल करणे याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.यासोबतच रात्रीची पुरेशी आणि नियमित झोपही दिवसभरातील ऊर्जा आणि एकाग्रतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणाला विशेष काळजी घ्यावी? शेंगदाणे किंवा इतर पदार्थांची अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी ते पदार्थ खाणे टाळावे. तसेच मधुमेह, किडनीचे आजार, पचनाशी संबंधित दीर्घकालीन समस्या किंवा इतर वैद्यकीय स्थिती असल्यास आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा Read More »

Onion

Onion Price : साखरेनंतर प्याज महाग ; देशभरात दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले

Onion Price : आधी साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले असताना आता कांद्याच्या वाढत्या किमतीनेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेत दर जवळपास दुप्पट झाले आहेत. या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारपासून नाशिकहून दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटीकडे ‘कांदा एक्सप्रेस’ धावणार आहे. देशातील सरासरी दर 42 रुपये किलोवर उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार, देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर 42 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. हा दर मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 45 टक्क्यांनी जास्त, तर मागील महिन्याच्या तुलनेत जवळपास 19 टक्क्यांनी वाढलेला आहे. त्यामुळे कांदा खरेदी करताना ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. महानगरांमध्ये परिस्थिती काय? दिल्लीमध्ये कांद्याचा किरकोळ दर 65 रुपये किलोवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत दिल्लीमध्ये कांदा सुमारे 35 रुपये किलो दराने मिळत होता. म्हणजेच वर्षभरात दिल्लीतील कांद्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. चेन्नईमध्येही कांद्याचा दर 58 रुपये किलोवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी सुमारे 33 रुपये किलो होता. केरळ आणि आसाममधील काही भागांतही कांद्याचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाढत्या किमतींचा परिणाम विशेषतः शहरी ग्राहकांच्या घरगुती बजेटवर जाणवत आहे. सरकारने ‘कांदा एक्सप्रेस’ का सुरू केली? कांद्याच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा नाशिकमधून रेल्वेच्या माध्यमातून ज्या शहरांमध्ये दर अधिक आहेत, तेथे पोहोचवला जाणार आहे. या विशेष वाहतूक व्यवस्थेला ‘कांदा एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. नाशिकहून दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटी या शहरांकडे कांदा पाठवण्याची योजना आहे. या शहरांमध्ये कांद्याचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याने तेथे अतिरिक्त पुरवठा करून बाजारातील दबाव कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बफर स्टॉकमधील कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात सरकार बफर स्टॉकमधील संपूर्ण कांदा एकाच वेळी बाजारात आणणार नाही. बाजारातील परिस्थितीचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने पुरवठा वाढवला जाणार आहे. यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर माल बाजारात आणण्याऐवजी ज्या भागात दर अधिक आहेत, तेथे आवश्यकतेनुसार कांदा पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. कांद्याची साठेबाजी करून किंवा कृत्रिमरीत्या पुरवठा कमी करून दर वाढवण्याचा प्रयत्न होऊ नये, यावरही सरकार लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्रातील उत्पादन घटण्याचा परिणाम? कांद्याच्या दरवाढीमागे महाराष्ट्रातील खरीप कांद्याच्या उत्पादनात अपेक्षित घट हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक राज्यांपैकी एक असून नाशिक परिसर देशातील कांदा व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. बाजारातील अंदाजानुसार, यंदा महाराष्ट्रातील खरीप कांद्याचे उत्पादन सुमारे 5 ते 7 टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादनातील ही घट आणि विविध भागांतील पुरवठ्याची स्थिती याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मते आगामी काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी देशात कांद्याची उपलब्धता आहे. देशातील एकूण उत्पादनाबाबत मोठी चिंता नाही विशेष म्हणजे देशातील एकूण कांदा उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज नाही. कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2025-26 पीक वर्षात देशातील कांदा उत्पादन सुमारे 307 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन मागील पीक वर्षाच्या आसपासच आहे. म्हणजेच देशपातळीवर उत्पादनात मोठी घसरण नसली तरी राज्यनिहाय उत्पादन, बाजारातील आवक आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोल यामुळे काही भागांमध्ये दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. NAFED आणि NCCF कडून कांद्याची खरेदी केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी NAFED आणि National Cooperative Consumers’ Federation (NCCF) या संस्थांकडून कांद्याची खरेदी केली जाते. या संस्थांच्या माध्यमातून सरकार बाजारातील उपलब्धता वाढवण्यासाठी आणि भविष्यात दर वाढल्यास हस्तक्षेप करण्यासाठी कांद्याचा साठा तयार करते. सरकारने यंदा बफर स्टॉकसाठी कांद्याची खरेदी वाढवण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांकडून सरकारी खरेदी आकर्षक व्हावी यासाठी खरेदी दरातही अनेकदा वाढ करण्यात आली आहे. जुलैमध्ये सरकारने बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचा दर 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केला होता. या खरेदीचा उद्देश शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासोबतच सरकारकडे पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध ठेवणे हा आहे. कांदा स्वस्त होणार का? सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्यामुळे ज्या शहरांमध्ये दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तेथे पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा वाढल्यास बाजारातील तुटवडा कमी होऊन किरकोळ किमतीवर दबाव येऊ शकतो. मात्र, कांद्याच्या किमती लगेच मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. स्थानिक बाजारातील आवक, वाहतूक, साठवणूक, मागणी आणि पुढील उत्पादन यावर प्रत्यक्ष किरकोळ दर अवलंबून राहतील. दरम्यान, कांद्याबरोबरच साखरेच्या किमतीतही वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, खुल्या बाजारातील साखरेचा सरासरी किरकोळ भाव 62.5 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. एका महिन्यापूर्वी हा दर सुमारे 46 रुपये किलो होता. म्हणजेच महिनाभरात साखरेच्या दरात जवळपास 28.5 टक्के वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये साखरेचा दर सुमारे 65 रुपये, तर मुंबईत 69 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कांदा आणि साखर या दोन्ही महत्त्वाच्या स्वयंपाकघरातील वस्तू महागल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र वाढलेल्या दरांचा वेगळा अर्थ कांद्याच्या वाढत्या बाजारभावाचा ग्राहकांना फटका बसत असला, तरी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता निर्माण होते. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळणारा दर हा बाजारातील आवक, दर्जा, वाहतूक खर्च, व्यापारी मार्जिन आणि स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून असतो. सरकारने बफर स्टॉकसाठी खरेदीचा दर वाढवल्याने सरकारी खरेदीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे बाजारात उपलब्ध कांद्याचा साठा वाढवण्यास मदत होऊ शकते आणि भविष्यात दर वाढल्यास सरकारला हस्तक्षेप करणे सोपे जाईल. पुढील काळात दर कसे राहणार? कांद्याच्या दराबाबत पुढील काही आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. सरकारकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात किती प्रमाणात आणि कोणत्या भागात सोडला जातो, यावर किमतींवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. याशिवाय महाराष्ट्रासह प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमधील आवक वाढली, तर बाजारातील पुरवठा सुधारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक घट झाली किंवा वाहतूक व हवामानाशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या, तर दर पुन्हा वाढू शकतात.

Onion Price : साखरेनंतर प्याज महाग ; देशभरात दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले Read More »

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

cheque book

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक

Cheque Book : चेकचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चेकबुकच्या स्वरूपात महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. 1 जानेवारी 2027 पासून अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकबुकचा वापर महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांनी 31 डिसेंबर 2026 पूर्वी आपल्या बँकेकडून नवीन चेकबुक घेण्याची तयारी करावी. काही बँकांनी यासंदर्भात ग्राहकांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे. जुन्या चेकबुकचे काय होणार? सध्या वापरात असलेल्या काही जुन्या चेकबुकमध्ये चेक क्रमांक आणि संबंधित माहिती प्रामुख्याने अंकांच्या स्वरूपात असते. नव्या पद्धतीमध्ये चेकशी संबंधित ओळख क्रमांकात अक्षरे आणि अंकांचा म्हणजेच अल्फा-न्यूमेरिक कोडचा वापर केला जाणार आहे. Mintच्या वृत्तानुसार, 31 डिसेंबर 2026 नंतर जुन्या स्वरूपातील चेकच्या स्वीकाराबाबत बँकांकडून निर्बंध लागू होऊ शकतात. विशेषतः काही बँकांनी 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकचा वापर करण्याबाबत ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मोठ्या रकमेचा चेक देणाऱ्या ग्राहकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आपल्या बँकेकडून नियमांची खात्री करून घेणे योग्य ठरेल. अल्फा-न्यूमेरिक कोड म्हणजे काय? अल्फा-न्यूमेरिक म्हणजे अक्षरे आणि अंक यांचे मिश्रण. पारंपरिक चेकवरील क्रमांकाच्या तुलनेत नव्या स्वरूपातील कोडमुळे चेकची ओळख आणि त्याची प्रक्रिया अधिक सुसंगत पद्धतीने करता येण्यास मदत होणार आहे. या बदलामागे चेक व्यवहार अधिक सुरक्षित करणे आणि बनावट चेक किंवा चेकमध्ये छेडछाड करण्याच्या घटना कमी करणे हा उद्देश असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. नव्या चेकमध्ये वॉटरमार्क, UV मध्ये दिसणारी सुरक्षा वैशिष्ट्ये आणि मायक्रो-प्रिंटिंगसारख्या सुरक्षाव्यवस्थांचाही वापर केला जात आहे. बँक ग्राहकांनी काय करावे? ज्यांच्या खात्यातून नियमितपणे चेकद्वारे मोठे व्यवहार होतात, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर, जमीन, व्यवसाय, कर्जाची परतफेड, विमा, शैक्षणिक शुल्क किंवा इतर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पुढील काही महिन्यांत चेक देणार असाल, तर जुनी चेकबुक वापरण्यापूर्वी आपल्या बँकेकडून तिची वैधता तपासावी. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या मोबाइल बँकिंग अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा शाखेच्या माध्यमातून नवीन चेकबुकची सुविधा उपलब्ध आहे का, हे तपासावे. काही बँका नवीन चेकबुक आपोआप जारी करत आहेत, तर काही ठिकाणी ग्राहकांना स्वतंत्रपणे मागणी करावी लागू शकते. चेकबुक बदलण्यामागे सुरक्षा महत्त्वाची डिजिटल पेमेंट, UPI आणि नेट बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये आजही चेकचा वापर केला जातो. त्यामुळे चेकमध्ये बनावटपणा, फेरफार किंवा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचा धोका कायम आहे. नव्या चेकमध्ये अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर केल्याने चेकची तपासणी आणि प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यास मदत होऊ शकते. RBIच्या ग्राहक सेवा मार्गदर्शक तत्त्वांमध्येही चेकच्या व्यवहारात स्वाक्षरीची पडताळणी, चेकबुक जारी करण्यावर नियंत्रण आणि कोऱ्या चेकच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. Positive Pay System चाही संबंध चेक व्यवहारातील फसवणूक कमी करण्यासाठी Positive Pay System (PPS) ही यंत्रणा वापरली जाते. यात मोठ्या रकमेच्या चेकची महत्त्वाची माहिती ग्राहकाकडून आधी बँकेला दिली जाते आणि चेक सादर झाल्यानंतर त्या माहितीची पडताळणी केली जाते. नव्या चेकबुकमधील सुरक्षा वैशिष्ट्ये आणि डिजिटल प्रक्रियांमुळे चेक क्लिअरिंग अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र Positive Pay ची अंमलबजावणी, मर्यादा आणि अनिवार्यता बँकेनुसार वेगळी असू शकते; त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या स्वतंत्र सूचनांकडे लक्ष द्यावे. मोठा व्यवहार करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी समजा एखाद्या ग्राहकाने जुनी चेकबुक वापरून 1 लाख, 2 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक दिला आणि संबंधित बँकेने त्या जुन्या स्वरूपातील चेकवर निर्बंध लागू केले असतील, तर पेमेंटमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरखरेदी, व्यवसायातील देयके, कर्जाचे हप्ते किंवा इतर मोठ्या व्यवहारांसाठी चेक वापरणाऱ्यांनी आधीच नवीन चेकबुक घेणे सुरक्षित ठरेल. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत लक्षात घेऊन ग्राहकांनी नवीन चेकबुकची मागणी वेळेत करणे चांगले. बँकेकडून चेकबुक मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत गर्दी किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास व्यवहार रखडण्याची शक्यता टाळता येईल.

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक Read More »

mitchell starc

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार

Mitchell Starc : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने धुमाकूळ घातला. मॅके येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात स्टार्कने अवघ्या 12 धावा देत 6 विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 64 धावांत आटोपला. पहिल्याच चेंडूवर विकेट ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय स्टार्कने अगदी सुरुवातीपासूनच सार्थ ठरवला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर स्टार्कने शादमान इस्लामला बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर तांझिद हसन, कर्णधार नजमुल हुसैन शांतो, मोमिनुल हक आणि लिटन दास यांनाही त्याने माघारी पाठवले. त्यामुळे बांगलादेशची अवस्था अवघ्या 12 धावांत 5 बाद अशी झाली. स्टार्कच्या या सुरुवातीच्या स्पेलमध्ये वेग, स्विंग आणि मॅकेच्या खेळपट्टीवर मिळणारा अतिरिक्त उंचावलेला उसळीचा फायदा यांचा उत्तम मेळ पाहायला मिळाला. बांगलादेशच्या फलंदाजांना पुढे खेळायचे की मागे राहायचे, याचा अंदाजच घेता आला नाही. 22 चेंडूंत पाच विकेटचा पराक्रम स्टार्कच्या सुरुवातीच्या स्पेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने फक्त 22 चेंडूंमध्ये पाच विकेट्स पूर्ण केल्या. पहिल्या सत्रातच त्याने बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजीची कंबर मोडली. लंचपर्यंत बांगलादेशची अवस्था 35 धावा आणि 6 विकेट अशी झाली होती. यानंतर कर्णधार पॅट कमिन्सनेही आपली भूमिका बजावत मुशफिकुर रहीमला 5 धावांवर बाद केले. मेहदी हसन मिराज आणि हसन महमूद यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर त्यांनाही फार काळ टिकता आले नाही. स्टार्कने पूर्ण केला ‘सिक्सर’ बांगलादेशचे शेवटचे फलंदाज काही काळ क्रीजवर टिकले. शोरिफुल इस्लामने 14 धावा करत संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र स्टार्क पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि शोरिफुलचा झेल यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीकडे देत त्याने बांगलादेशचा डाव संपवला. स्टार्कची गोलंदाजी अशी राहिली 10 षटके, 12 धावा आणि 6 विकेट्स. डार्विनमधील पहिल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी विजय होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मालिकेत क्लीन स्वीप टाळण्याचे मोठे दडपण होते. मात्र मॅकेच्या खेळपट्टीवर परिस्थिती वेगळी होती. येथे चेंडूला डार्विनच्या तुलनेत अधिक उसळी आणि सीम मूव्हमेंट मिळत होती. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे कठीण गेले. सामन्याच्या थेट वृत्तानुसार, मॅकेमध्ये मिळणारी अतिरिक्त उसळी डार्विनपेक्षा लक्षणीय अधिक होती. ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात खराब बांगलादेशला 64 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला फलंदाजीतही सुरुवातीला धक्के बसले. मॅट रेनशॉ 8 धावांवर बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेडने 22 धावा केल्यानंतर शोरिफुल इस्लामच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. त्यानंतर मार्नस लॅबुशेनही 4 धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 50 धावा अशी होती. म्हणजेच ऑस्ट्रेलिया बांगलादेशच्या पहिल्या डावापेक्षा 14 धावांनी मागे होता. स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरून ग्रीन यांनी डाव सावरण्याची जबाबदारी घेतली आहे.

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार Read More »

crime

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. हडपसरमधील शेवाळेवाडी येथील पी. एस. व्हिला परिसरात राहणाऱ्या धनाजी टोणे यांच्यावर पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भलिंग तपासणी करून पत्नीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, १९ मे २०१९ रोजी जतमध्ये धनाजी टोणे आणि संबंधित महिलेचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. २०२० मध्ये महिला पहिल्यांदा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तिच्या अंगावर बसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी टोणे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे आलेला रागही आणि पत्नीवर काढला. धनाजी यांनी पत्नीचे डोके फरशीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर धनाजी टोणे यांची पुण्यात बदली झाली. मार्च २०२५ मध्ये त्यांची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. मात्र, यावेळीही तिचा छळ सुरू राहिला. १३ मे रोजी धनाजी टोणे आणि त्यांच्या आईने महिलेला एका गावातील शेतातील घरात नेले. तेथे तिची कथितरित्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करण्यात आली. १९ मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवरही यासाठी दबाव टाकण्यात आला. महिलेच्या वडिलांनी गर्भपातास विरोध केल्यानंतर धनाजी टोणे यांनी पोलिस अधिकारी असल्याचा धाक दाखवत धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर २३ मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर ती कशीतरी माहेरी पोहोचली. पतीकडून होणारा छळ थांबत नसल्याने महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तिने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत. दरम्यान, आपल्याविरोधात पोलिस कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर धनाजी टोणे यांनी तातडीने सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं Read More »

img 20260821 wa0007

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त

Tukaram Munde : अन्न व औषधी प्रशासनात तुकाराम मुंढे यांची एन्ट्री झाल्यानंतर दूध, पनीर सह खाद्य पदार्थांमधील भेसळ चव्हाटायवर आली. या विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू असताना आता पोलिसांनी देखील अन्न व औषधी प्रशासनासह आष्टीत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या 72 गोण्या जप्त केल्या आहेत. आष्टी ते जामगाव रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी दुधात भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 72 गोण्या व्हे पावडर आणि बोलेरो पिकअप जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांना ही बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. जामखेड भागातून पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून दुधात भेसळ करण्यासाठी लागणाऱ्या पावडरची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे व त्यांच्या पथकाने आष्टी-जामखेड रस्त्यावरील एका लॉन्ससमोर सापळा रचला. संशयित बोलेरो पिकअप थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात 25 किलो वजनाच्या 47 गोण्या आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वीच 25 गोण्या आष्टी येथील हर्षद हॉटेलसमोर कैलास हंबडे यांच्याकडे ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तेथूनही 25 गोण्या जप्त केल्या. व्हे पावडर ही दुधाचे वजन (प्रमाण) वाढवण्यासाठी वापरली जाणारी स्वस्त दुग्धजन्य पावडर आहे. दुधाची गुणवत्ता चाचणी करण्यासाठीही तिचा वापर होतो. दुधापासून जेव्हा चीज किंवा पनीर बनवले जाते, तेव्हा उरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन करून व्हे पावडर तयार केली जाते. व्हे पावडर टाकल्यामुळे दुधातील फॅट न बदलता SNF चे प्रमाण वाढते. त्यामुळे भेसळयुक्त दूधही शासकीय चाचणीत ‘पास’ होते. 25 किलो वजनाच्या 47 गोण्या लक्ष्मण गोपाळघरे (चालक, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), हरिदास एकनाथ गोपाळघरे (गाडी व मालाचा मालक, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), कैलास हंबडे (माल खरेदीदार, रा. आष्टी) या तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक शरद भुतेकर करत आहेत.

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त Read More »