Dnamarathi.com

JN.1 COVID Variant: केरळ नंतर आता राज्यात देखील कोरोनाचा नवीन सबवेरियंट JN1 ची एन्ट्री झाली आहे. यामुळे आता राज्यात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांनंतर मुंबईत कोरोनाचे दोन आकडी रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

ठाण्यात ओमिक्रॉन वेरियंट BA.2 म्हणजेच JN.1 ची लागण झालेला रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीची पावले उचलली जात आहेत. 

आरोग्य विभागाने नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक तेथे मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यासारख्या इतर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

JN1 मुळे होणारा संसर्ग अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना इन्फ्लूएन्झा आणि श्‍वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या सर्व रूग्णांचे सर्वेक्षण करून गरज भासल्यास कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचणी वाढवण्यास सांगितले आहे.

JN.1 कुठे संक्रमित झाला?

ओमिक्रॉन जेएन.1 ची लागण झालेला पहिला रुग्ण मंगळवारी ठाणे जिल्ह्यात आढळून आला. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, 19 वर्षांच्या मुलीला या नवीन वेरियंटची लागण झाली आहे. त्यांना काल दुपारी साडेचार वाजता ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तरुणी मुंब्रा परिसरात राहते.

खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात तीनशेहून अधिक जणांची तपासणी केली होती. त्यानंतर मंगळवारी 19 वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. JN.1 संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

6 महिन्यांनंतर सर्वाधिक प्रकरणे

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेएन.1 मुळे केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत केरळमध्ये कोविडचे 292 नवीन रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2041 वर पोहोचली आहे.

 मंगळवारी, 21 मे पासून देशभरात कोरोना संसर्गाची सर्वाधिक 614 प्रकरणे नोंदली गेली. यासह, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,311 वर पोहोचली आहे.

घाबरण्याची गरज नाही – केंद्र

कोविडच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज तयारीचा आढावा घेतला आणि राज्यांना सतर्क राहण्याचे आणि पाळत ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण घाबरून न जाता सावध राहण्याची गरज आहे. तयारीमध्ये कोणतीही हलगर्जीपणा नसावा. केंद्र सर्व प्रकारची मदत करेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *