DNA मराठी

ताज्या बातम्या

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

pankaja munde

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं

Pankaja Munde : बीडच्या अंबाजोगाई येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा थेट तुरुंगातच असते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचं सांगताना, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. “ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने पंधरा पैसे कमवा… पण चुकीच्या मार्गाने शंभर रुपये कमवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा तुरुंगातच आहे,” असं त्या म्हणाल्या. तसेच, “मला चुकीची कामं सांगू नका… घरात पैसे कुठून येतात, याचा हिशोब ठेवा,” असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणातील कारस्थानांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे… माझ्या मनात पाप नाही, देवाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.” निवडणुकीतील पराभवाचं उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना सांगितलं की, राजकारणात पराभव होत असतो, पण चुकीचं वागणारे लोक नकाशावरून गायब होतात.

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं Read More »

img 20260330 wa0005

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता, एक व्यक्ती घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून १० गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटार मशीन तसेच पाच लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत आरोपी हा साद अन्वर खान (रा. मुकुंदनगर, सध्या फरार) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणताही परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांची धोकादायक पद्धतीने साठवणूक करून स्वतःचे व नागरिकांचे जीवित धोक्यात घालून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत Read More »

img 20260330 wa0006

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती

Siddharth Jadhav : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या उपक्रमांतर्गत शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी “हजार वेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाचे हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. या प्रदर्शनावेळी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपटाचे रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. हा चित्रपट हाऊसफुल ठरला असून प्रेक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दरमहा एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाविषयी हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट एक बहुचर्चित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका ग्रामीण भागातील माणसाच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कथा आहे. त्याच्यावर ‘शोले’ या चित्रपटाचा प्रभाव असून तो हा चित्रपट हजार वेळा पाहतो. सामाजिक, प्रेरणादायी आणि चित्रपटप्रेमीच्या भावविश्वावर आधारित अशी या चित्रपटाची मांडणी आहे.

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती Read More »

bhiwandi gas news

Bhivandi Gas News : भिवंडीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार रात्रभर एजन्सीबाहेर झोपून

Bhivandi Gas News : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा मोठा फटका भिवंडी शहरातील कामगार वर्गाला बसत आहे. भिवंडी हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ५ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीकडे दररोज केवळ ४० ते ५० सिलेंडर उपलब्ध होत असल्याने “जे लवकर येतील त्यांनाच सिलेंडर मिळेल” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगार मध्यरात्रीपासूनच रांगा लावत आहेत. सिलेंडरसाठी नंबर लावून अनेक कामगार एजन्सीबाहेरच झोपून रात्र काढत आहेत, जेणेकरून सकाळी त्यांना सिलेंडर मिळू शकेल. मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. गॅसअभावी जेवण बनवणे कठीण झाले असून रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी प्रशासनाकडे ५ किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.

Bhivandi Gas News : भिवंडीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; कामगार रात्रभर एजन्सीबाहेर झोपून Read More »

maharashtra government

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कारण काय?

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी रुबल प्रखेर अग्रवाल यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. रुबल प्रखेर अग्रवाल यापूर्वी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. तर नयना गुंडे महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या १. श्रीमती रुबल प्रखेर अग्रवाल (आयएएस:आरआर:२००८), व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून बदली झाली आहे. २. श्रीमती नयना गुंडे (आयएएस:एससीएस:२००८), महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून बदली झाली आहे. ३. श्रीमती श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:२००९), विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांची व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून बदली झाली आहे. ४. श्री अशोक काकडे (आयएएस:एससीएस:२०१०), जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून बदली झाली आहे. ५. श्री राहुल रेखवार (आयएएस:आरआर:२०११) यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. ६. श्री एम. देवेंद्र सिंग (आयएएस:आरआर:२०११) यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. ७. डॉ. मैनक घोष (आयएएस:आरआर:२०१९), जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ८. श्री प्रियंवदा म्हाड्डळकर (आयएएस:आरआर:२०२२) यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कारण काय? Read More »

police bharti

Police Bharti: मोठी दुर्घटना, पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू

Police Bharti: राज्यात सध्या कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणीसाठी आलेल्या पुरुषोत्तम बुरकुल या तरुणाचा धावताना मृत्यू झाला आहे. १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच हा तरुण कोसळला आणि त्याच्या मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हा कारागृह पोलीस भरतीसाठी पुण्यात आला होता. शनिवारी सकाळी साधारण साडेनऊ ते दहाच्या सुमारास त्याची १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. तीन फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, जेव्हा तो चौथ्या आणि शेवटच्या राऊंडला आला, तेव्हा अचानक त्याला प्रचंड दम लागला. धावताना अचानक छातीत कळ आल्याने किंवा थकवा जाणवल्याने तो मैदानातच कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला प्रथमोपचार देऊन रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, धावताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. मैदानावर उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांनी सांगितले की, सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुरुषोत्तम जेव्हा धावत होता, तेव्हा उन्हामुळे त्याला मोठ्या प्रमाणात थकवा आणि दम लागला असावा. उन्हात धावताना शरीर साथ न दिल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे . या प्रकरणात आता पुढील तपासात काय समोर येते आणि कोणावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Police Bharti: मोठी दुर्घटना, पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू Read More »

parth pawar

Parth Pawar : मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम

Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात खारगे समिती ने आपला ४,३९२ पानांचा विस्तृत अहवाल सादर केला असून राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले आहे . महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्थ पवार यांना थेट जबाबदार ठरवले नसले तरी, त्यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहारावर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम ठेवली आहे. खारगे समितीने स्पष्ट केले की, चौकशी प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाच्या बाबींवर (जमीन हस्तांतरण, मुद्रांक शुल्क, अनियमितता) केंद्रित होती. फौजदारी स्वरूपाच्या मुद्द्यांवर भाष्य करणे किंवा चौकशी करणे हे समितीच्या कार्यकक्षेत नव्हते. त्यामुळे समितीने कोणत्याही फौजदारी निष्कर्षापर्यंत जाणे टाळले आहे. मात्र महत्त्वाची टिप्पणी करताना स्पष्ट केले कि,या प्रकरणात आणखी कोणी सामील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यास, ते देखील घोटाळ्यास जबाबदार धरले जाणार आहे.त्यामुळे खासदार पार्थ पवार यांच्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार कायम आहे. समितीने फौजदारी जबाबदारी पूर्णपणे पुणे पोलिसांवर सोपवली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी (महार वतन)जमीन बाजारभावाने १,८०० कोटी रुपयांची असताना, मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीला अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये (२१ कोटी मुद्रांक शुल्क माफीसह) विकण्याचा प्रयत्न झाला होता. या कंपनीत पार्थ पवार यांचा ९९ टक्के हिस्सा असल्याचे समोर आले. समितीने या व्यवहाराला नियमबाह्य आणि बेकायदेशीर’ ठरवले असून, खरेदी दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली असून समितीने स्पष्ट नावे घेतली. शीतल तेजवाणी, अशोक गायकवाड व इतर २७१ कुळांच्या वतीने कुलमुखत्यारधारक. – दिग्विजय अमरसिंह पाटील – अमेडिया कंपनीकडून जमीन खरेदी करणारे (पार्थ पवार यांचे चुलत भाऊ/नातेवाईक). – रवींद्र तारू (सहाय्यक उपनिबंधक). – सूर्यकांत येवले (पूर्वीचे पुणे तहसीलदार).वरील चौघांवर दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्याविरुद्ध बडतर्फीची प्रक्रिया सुरू आहे. बोपोडी जमीन प्रकरणातही येवले यांनी असाच नियमबाह्य आदेश दिल्याचा उल्लेख अहवालात आहे. अमेडिया कंपनीने २१ कोटी मुद्रांक शुल्क भरण्याच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले आहे. समितीने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ही जमीन अद्याप शासकीय आहे. तिचा ताबा भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI) कडे आहे. सरकारने विहीत प्रक्रिया राबवून ही जमीन कायमस्वरूपी BSI ला देण्याची कारवाई दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे ठरवले आहे. विकास खारगे समितीने पार्थ पवार यांचा थेट उल्लेख करणं टाळला आहे. कारण व्यवहाराच्या दस्तऐवजांवर त्यांची स्वाक्षरी नव्हती. यामुळे विरोधकांकडून ‘क्लिन चीट’ दिल्याची टीका होत असली तरी, वास्तव वेगळे आहे. ९९ टक्के मालकी असलेल्या कंपनीच्या फायद्यात अप्रत्यक्षपणे त्यांचा संबंध येतो. समितीने फौजदारी जबाबदारी पोलिसांकडे ढकलून, सदर प्रकरणात ‘आणखी कोणी सामील आहे का’ याबाबत चौकशीचा मार्ग खुला ठेवला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत हा अहवाल सादर केला असून सरकारने तो स्वीकारला देखील आहे. मात्र आता पोलीस तपास किती सखोल आणि निष्पक्ष होईल? दिग्विजय पाटील यांच्या नंतर तपास पुढे सरकत पार्थ पवार यांच्यापर्यंत तो पोहोचेल का? मुंढवा प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सरकारी जमिनींच्या संरक्षणात यंत्रणेची उदासीनता आणि राजकीय-प्रशासकीय संबंधांचे जाळे उघड करते. सरकारी ‘महार वतन’ जमीन इतक्या स्वस्तात खासगी हाती कशी गेली, याचे उत्तर अद्याप पूर्णपणे मिळालेले नाही. पोलिस तपास, मुद्रांक अपीलाचा निर्णय आणि BSI ला जमीन हस्तांतरण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अहवाल केवळ प्रशासकीय अपयश दाखवतो की, त्यापलीकडे मोठ्या घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याची सुरुवात आहे का हे महत्वाचे असणार आहे.

Parth Pawar : मुंढवा जमीन प्रकरण; पार्थ पवारांवर पोलीस तपासाची टांगती तलवार कायम Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत

Chhagan Bhujbal : राज्यातील इंधनपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, पेट्रोलचा साठा 2,05,232 किलोलीटर, डिझेलचा साठा 4,67,603 किलोलीटर तर एलपीजीचा साठा 30,767 मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे. एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नियमितपणे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा होत आहे आणि पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून संबंधित विभागांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. याशिवाय, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे देखील पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक सक्षम झाला आहे. नागरिकांना आवाहन नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू नये. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच, इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा. कोणतीही शंका किंवा माहिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. शासनाचे इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासन इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून परिस्थिती प्रभावीपणे हाताळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत Read More »

Petrol Price: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Petrol Price : – समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल किंवा डिझेलची खुल्या स्वरूपात म्हणजेच प्लास्टिक बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री करू नये, अशी सक्त मनाई करण्यात आली आहे. यासोबतच प्रशासनाने सर्व पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे ठेवणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापक यांची राहील. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर ‘पेट्रोलियम नियम २००२’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ मधील तरतुदींनुसार दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याशिवाय, सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Petrol Price: अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Read More »