Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्थानिक प्रशासन, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






