DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार

Ahilyanagar Bus Accident: शेंडी-पोखर्डी परिसरातील घटना लग्न समारंभाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याची घटना अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. खरवंडी येथील लग्न समारंभ आटोपून पुण्यातील स्वारगेटकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा शेंडी-पोखर्डी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास सुरू असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. लग्न समारंभाचा आनंद एका क्षणात भीती आणि गोंधळात बदलला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता का, की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ जखमी प्रवाशांना तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महामार्गावर अपघातानंतर तत्काळ मदत आणि आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर

Nilesh Lanke: अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू असे स्पष्ट केले. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही राजकारणात संपर्क आणि संवाद कायम सुरू असतो, असे सांगताना भोर म्हणाले की, सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात. काही जण शेवटपर्यंत ठाम भूमिका घेतात, तर काहींच्या राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू असतात. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही. हीच सध्याची राजकीय वास्तवता आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितले खासदार निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक पक्षात आले तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत करू खासदार निलेश लंके यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लंके हे पूर्वीपासून शिवसेनेशी जोडलेले असून त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने संबंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संपर्क कधीच तुटत नसतात.शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना भोर म्हणाले, शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचे आम्ही शंभर टक्के स्वागत करू. मग ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून असोत, काँग्रेसमधून असोत किंवा इतर कोणत्याही पक्षातून असोत. आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, कारण ते सर्व आमचीच माणसे आहेत.संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात खासदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर Read More »

vivek kolhe

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली

Sujay Vikhe: अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे हे देखील इच्छुक होते मात्र त्यांनी त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार मनाचे असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो अशा शब्दात विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले. अहिल्यानगर शहरातील सहकार सभागृह येथे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी कोल्हे यांना विलंब झाला यावेळी त्यांनी नगर मनमाडच्या रस्त्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर एकच सभागृहात अशा पिकला. यावेळी बोलताना विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच मला विधानपरिषदेवरती संधी मिळाली. आज जिल्ह्याला 19 आमदार मिळाले असल्याने आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढलेले आहेत. आज आजूबाजूक जवळ पुणे, नाशिक आणि संभाजीनगर हे जिल्हे विकसित झाले आहे. आज भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या आईला नगर जिल्ह्याला देखील आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे असं कोल्हे म्हणाले. आमचे सहकारी जिल्ह्याचे माजी खासदार सुजय विखे कार्यक्रमाला नाही आहे मात्र मी माध्यमांमध्ये ऐकले की त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो असे यावेळी कोल्हे म्हणाले. लोकशाहीमध्ये प्रत्येक पद त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पद असेल अगदी पंतप्रधान पद असेल हे प्रत्येक पद हे महत्त्वाचे आहे यामुळे प्रत्येकाने त्या पदाचा सन्मान हा केला पाहिजे ठेवला गेला पाहिजे कारण आपण ज्या पदासाठी उभे राहतो त्या पदाची दुसऱ्याला देखील आकांक्षा असते, अपेक्षा असते असे सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केल्याने यांचा रोख नेमका कोणावर होता याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली Read More »

img 20260625 wa0011

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी

Sanjay Raut : उबाठा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. चिथावणीखोर भाषणाने राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. खासदार राऊतांवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी महिला सेनेच्या नेत्यांनी दिला. शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली. राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला. राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी Read More »

mla amit gorkhe

MLA Amit Gorkhe : विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

MLA Amit Gorkhe : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत कठोर कारवाई व महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. आमदार गोरखे यांनी सभागृहात या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, मिथेनॉल पुरवठा साखळीचा संपूर्ण तपास आणि राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यांच्या या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या लिखित उत्तरामध्ये तपासाची सद्यस्थिती, दोषींवरील कारवाई तसेच भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फडणवीस यांच्या लिखित उत्तरानुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून विषारी दारू निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याशिवाय विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या सर्व २२ कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून एकूण १ कोटी १० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. पीडित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी शासनाने ही मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लिखित उत्तरात राज्यभर अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले असून तालुकास्तरीय दारूबंदी समित्यांचे पुनर्गठन, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाया आणि मिथेनॉलच्या वाहतुकीवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलल्याचे नमूद केले आहे. यावेळी आमदार गोरखे म्हणाले, “विषारी दारूमुळे २२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे. मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मी सभागृहात ठाम भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत लिखित उत्तराद्वारे कठोर कारवाई व मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली असून शासनाने घेतलेले निर्णय पीडित कुटुंबांसाठी दिलासादायक आहेत.”

MLA Amit Gorkhe : विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत Read More »

maharashtra epstein files

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

Maharashtra Epstein Files : प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामधील दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा समावेश आहे. दीपाली सय्यद या व्यक्तीरेखेला अचूक न्याय देऊ शकतील याची खात्री असल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींमधील एक अतिशय महत्त्वाचे प्रकरण जगासमोर आणणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या सिनेमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत Read More »

amol khatal

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा

Amol Khatal: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होत असलेल्या वीजखंडितीच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या लोडशेडिंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने हा प्रकार तातडीने बंद करून ग्रामीण भागाला अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे स्थानिक अधिकारी वरिष्ठ स्तरावरून वीज व्यवस्थापन (ईएलआर) लागू करण्याचे आदेश असल्याचे सांगत रात्री-अपरात्री तसेच सायंकाळच्या महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीजपुरवठा खंडित करत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांची तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज, लघुउद्योग, व्यावसायिक व्यवहार आणि कृषी क्षेत्रावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेला नियमित वीजपुरवठा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली सायंकाळची वीजखंडिती तात्काळ थांबविण्यात यावी आणि संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या स्पष्ट सूचना देऊन अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी ठाम मागणी आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा Read More »

chaitanya maharaj wadekar

Chaitanya Maharaj Wadekar : चैतन्य महाराज वाडेकर यांच्या भावाला बेदम मारहाण

Chaitanya Maharaj Wadekar : मावळ मधील माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे पदाधिकारी नितिन आण्णासाहेब मराठे आणि त्यांच्या परिवारातील ज्ञानेश्वर मराठे यांनी अनेकांना सोबत घेऊन चैतन्य महाराज वाडेकर यांच्या अपंग भावाला जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप अमोल वाडेकर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने अलॅाट केलेल्या वराळे गावातील एक एकर जागेचा ताबा , महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकृत कुलमुख्त्यारधारक अमोल वाडेकर यांचेकडे पोलीस बंदोबस्तात सोपवण्यात आला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून माजी जिल्हा परिषद सदस्य नितिन आण्णासाहेब मराठे व इतरांनी एका पायाने अपंग असलेल्या चैतन्य महाराजांचे भाऊ अमोल वाडेकर यांना जीवघेणी मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर बाब मावळचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या समोर देखील मांडण्यात आली होती. आमदार सुनिल शेळके यांनी कागदपत्रे तपासून मराठे परिवाराला संबंधित शासकीय कामात अडथळा न करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. तरीही संबंधितांनी खोटे आरोप करत शासकीय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे ताबा देऊनही आज मारहाण केली असल्याच वाडेकर यांचं म्हणणं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Chaitanya Maharaj Wadekar : चैतन्य महाराज वाडेकर यांच्या भावाला बेदम मारहाण Read More »

shivsena mp

Shivsena MP: ‘त्या’ 6 खासदारांना दिल्लीतही पोलीस संरक्षण

Shivsena MP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांना आता दिल्लीतही पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचा या खासदारांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवासस्थानांच्या परिसरात नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. पक्षांतरानंतर संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) या सहा खासदारांविरोधात महाराष्ट्रात आंदोलने सुरू झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली. त्यानुसार महाराष्ट्रात असताना त्यांना महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त होता. आता या खासदारांची दिल्लीतील सुरक्षा लक्षात घेता त्यांना दिल्ली पोलिसांचे संरक्षण पुरविण्यात आले आहे. निवासस्थानाच्या बाहेर नो एंट्रीचे फलक लावण्यात आले आहेत. खासदारांच्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडले जात नाही.

Shivsena MP: ‘त्या’ 6 खासदारांना दिल्लीतही पोलीस संरक्षण Read More »

ketan agarwal

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा

Ketan Agarwal : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पाय घसरल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा 18 जून रोजी मृत्यू झाला होता. तर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून होणाऱ्या पत्नीनेच (सिया गोयल) केतन अग्रवालची आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर टर्किंग करत असताना पाय घसरल्याने 350 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (B.N.S.S. 194) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सखोल चौकशी करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (B.N.S.) कलम 103 आणि 61(2) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमसंबंध अन् हत्या सिया गोयलचे प्रेमसंबंध चेतन चौधरीसोबत असल्याने तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. कटाचा भाग म्हणून सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे सिया आणि चेतनने केतनची हत्या केली. तर दुसऱ्याकडे या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी सिया गोयलच्या कुटुंबियांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. विशाल अग्रवाल यांनी सियाच्या प्रेमसंबंधाबाबत सर्वकाही माहिती असून देखील तिच्या कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावा केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा Read More »