DNA मराठी

हायलाईट

india uae energy deal

India UAE Energy Deal: भारत आणि UAE ‘महा-करार’; आता, देशात कायम राहणार 3 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा

India UAE Energy Deal: जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असताना भारताने संयुक्त अरब अमिराती सोबत मोठा करार केला आहे. अबुधाबीच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी एका ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब केले आहे. हा करार संकटकाळात भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी ठरणार आहे. काय आहे हा 3 कोटी बॅरल्सचा करार? या करारानुसार, UAE ची सरकारी मालकीची तेल कंपनी असलेल्या ‘ADNOC’ कडून भारताच्या ‘सामरिक पेट्रोलियम साठ्यांमध्ये’ (Strategic Petroleum Reserves – SPR) साठवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे प्रमाण वाढवून 3 कोटी बॅरल्सपर्यंत नेले जाईल. भारताने आपल्या सुरक्षित साठवणूक सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी भारताने UAE सोबत हातमिळवणी केली आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे जर तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला, तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताकडे देशांतर्गतच पुरेसा तेलाचा साठा उपलब्ध असेल. हा करार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा ओमान आणि इराण यांच्या दरम्यान स्थित असलेल्या आणि जगातील तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’मध्ये (Strait of Hormuz) तणाव शिगेला पोहोचला आहे. जहाजांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे भारत आणि UAE या दोन्ही देशांनी ठामपणे नमूद केले आहे. जागतिक तेलाच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी, या सागरी मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला आहे. वायू पुरवठ्यावरही चर्चा ऊर्जा क्षेत्रातील ही भागीदारी केवळ कच्च्या तेलापुरतीच मर्यादित नाही. ‘इंडियन ऑइल’ आणि ‘ADNOC’ यांच्या दरम्यान ‘द्रवरूप पेट्रोलियम वायू’च्या (LPG) पुरवठ्यासाठी एका नवीन दीर्घकालीन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, भारत आता देशांतर्गत ‘सामरिक वायू साठे’ (Strategic Gas Reserves) उभारण्याच्या प्रकल्पावर सक्रियपणे काम करत आहे. या प्रकल्पासाठी UAE कडून भारताला तांत्रिक सहाय्य पुरवले जाईल. भविष्यात ‘द्रवरूप नैसर्गिक वायू’चा (LNG) पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा अबाधित राखण्याच्या दृष्टीने, UAE हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे. जागतिक तेलाच्या किमती 100 डॉलर्सचा टप्पा ओलांडून गगनाला भिडत असताना आणि भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असताना, हा ऐतिहासिक करार भारताला महत्त्वपूर्ण आर्थिक स्थैर्य आणि लवचिकता प्रदान करेल.

India UAE Energy Deal: भारत आणि UAE ‘महा-करार’; आता, देशात कायम राहणार 3 कोटी बॅरल्स कच्च्या तेलाचा साठा Read More »

ipo

Upcoming IPOs : 18 मे रोजी 4 नवीन IPOs गुंतवणुकीसाठी येणार; जाणून घ्या सर्व तपशील

Upcoming IPOs : गेल्या काही महिन्यांत, शेअर बाजारात IPOs बाबत प्रचंड उत्साह दिसून आला आहे. लहान किरकोळ गुंतवणूकदारांपासून ते मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपर्यंत, प्रत्येकजण प्रत्येक नवीन सार्वजनिक इश्यूवर (public issue) बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी आठवडा देखील IPO बाजारासाठी अत्यंत व्यस्त असणार आहे. १८ मे पासून सुरू होणाऱ्या या नवीन आठवड्यात, देशभरात चार नवीन IPOs गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. याव्यतिरिक्त, पुढील आठवड्यात दोन कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध (listed) होणार आहेत. पुढील आठवड्यात कोणते IPOs खुले होत आहेत आणि कोणत्या कंपन्यांचे लिस्टिंग गुंतवणूकदारांच्या रडारवर असेल, यावर एक नजर टाकूया. पुढील आठवड्यात येणारे IPO NFP Sampoorna Foods IPO (सुरुवात: १८ मे) या आठवड्याची सुरुवात याच IPO ने होणार आहे. या इश्यूद्वारे, कंपनीचे बाजारातून अंदाजे ₹२४.५३ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट आहे; यासाठी ती ४५ लाख नवीन शेअर्स जारी करेल. किंमत (Price Band): प्रति शेअर ₹५२ ते ₹५५ असा निश्चित करण्यात आला आहे. लॉट (Lot Size): हा एक SME IPO असल्याने, याच्या लॉटमध्ये २,००० शेअर्सचा समावेश आहे. याचा अर्थ किमान एका लॉटसाठी तुम्हाला किमान १,१०,००० ची गुंतवणूक करावी लागेल.हा IPO २० मे रोजी बंद होईल शेअर्सचे वाटप (allotment) : २१ मे रोजी निश्चित होण्याची अपेक्षा आहे आणि NSE SME प्लॅटफॉर्मवर या कंपनीचे लिस्टिंग २५ मे रोजी होण्याची शक्यता आहे. Teamtech Formwork Solutions IPO (सुरुवात: १९ मे) ही कंपनी ₹५०.१५ कोटी उभारण्याच्या उद्देशाने बाजारात प्रवेश करत आहे; या अंतर्गत ८० लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. किंमत (Price Band): प्रति शेअर ₹६१ ते ₹६३ असा निश्चित करण्यात आला आहे. लॉट (Lot Size): याच्या लॉटमध्ये देखील २,००० शेअर्सचा समावेश आहे. हा इश्यू २१ मे रोजी बंद होईल. त्यानंतर, २२ मे रोजी शेअर्सचे वाटप (Allotment) केले जाईल आणि अशी अपेक्षा आहे की, ही कंपनी देखील २६ मे रोजी NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध (Listed) होईल. Harikanta Overseas IPO हा IPO बुधवार, २० मे रोजी खुला होईल आणि २२ मे रोजी बंद होईल. कंपनी बाजारातून ₹२५.६३ कोटी उभारण्याची योजना आखत आहे, ज्यासाठी ती २७ लाख नवीन शेअर्स जारी करेल. किंमत (Price Band): ₹९१ ते ₹९६ प्रति शेअर. लॉट आकार (Lot Size): लॉटचा आकार १,२०० शेअर्स इतका निश्चित करण्यात आला आहे.IPO बंद झाल्यानंतर, ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप झाले आहे, त्यांना २५ मे रोजी त्यांच्या वाटपाची स्थिती (Allotment Status) समजेल तसेच हे शेअर्स २७ मे रोजी BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची (Debut) शक्यता आहे. Vegorama Punjabi Angithi IPO (सुरुवात: २० मे) एका नामांकित रेस्टॉरंट साखळीशी संबंधित असलेला आणि ₹३८.३८ कोटी मूल्याचा हा सार्वजनिक इश्यू देखील २० मे रोजी खुला होणार आहे. या IPO मध्ये ₹३०.७० कोटी मूल्याचे ४० लाख नवीन शेअर्स जारी केले जातील; यासोबतच, प्रवर्तक (Promoters) ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) द्वारे ₹७.६८ कोटी मूल्याचे १० लाख शेअर्स विकतील. किंमत (Price Band): ₹७३ ते ₹७७ प्रति शेअर. लॉट आकार (Lot Size): या इश्यूसाठी लॉटचा आकार १,६०० शेअर्स इतका आहे.हा इश्यू २२ मे रोजी बंद होईल. २५ मे रोजी शेअर्सचे वाटप निश्चित झाल्यानंतर, २७ मे रोजी हे शेअर्स BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. नवीन IPOs च्या आगमनासोबतच, अलीकडच्या काळात आलेल्या IPOs मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे भवितव्य देखील पुढच्या आठवड्यात स्पष्ट होईल. मंगळवार, १९ मे रोजी बाजारात दोन नवीन शेअर्सचे लिस्टिंग (नोंदणी) होण्याचे नियोजित आहे: RFBL Flexi Pack: RFBL Flexi Pack चे शेअर्स १९ मे रोजी NSE SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. या कंपनीचा IPO ₹३५.३३ कोटी मूल्याचा होता आणि त्याला गुंतवणूकदारांकडून २१.४८ पट सबस्क्रिप्शन मिळाले. Goldline Pharmaceutical: Goldline Pharmaceutical चे शेअर्स देखील १९ मे रोजी BSE SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तो ८४०.७४ पट सबस्क्राईब झाला आहे.१८ मे पासून सुरू होणारा हा आठवडा IPO बाजारासाठी अत्यंत गजबजलेला असण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणतेही ‘मेनबोर्ड’ IPO नियोजित नसले तरी, SME क्षेत्रातील गुंतवणूकदारांना अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. आता बाजाराचे लक्ष या IPO ना गुंतवणूकदारांकडून मिळणारा प्रतिसाद आणि लिस्टिंगच्या दिवशी या कंपन्यांची कामगिरी कशी राहते, हे पाहण्यावर केंद्रित होईल.

Upcoming IPOs : 18 मे रोजी 4 नवीन IPOs गुंतवणुकीसाठी येणार; जाणून घ्या सर्व तपशील Read More »

img 20260515 wa0014

Parner News : पारनेरचा वाळूधंदा, हप्तेखोरी, प्रशासनाची मौनसंमती आणि ‘ती’ लाला गाडी…

Parner News : पारनेर तालुक्यात अवैध वाळूउपसा, बिनधास्त वसुली आणि स्थानिक पातळीवरील ‘हप्ते संस्कृती’ यांचा उघडपणे सुरू असलेला खेळ आता सामान्य नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. दिवसा ढवळ्या नंबर नसलेल्या तथाकथित ‘लाला गाड्या’, त्यामध्ये फिरणारे चार-पाच जण आणि प्रत्येक ठिकाणी सुरू असलेली उघड वसुली ही केवळ अफवा नाही तर नागरिकांच्या रोजच्या अनुभवाचा भाग बनली आहे. प्रश्न केवळ अवैध वाळूउपशाचा नाही प्रश्न आहे तो प्रशासनाच्या भूमिकेचा. इतक्या उघडपणे धंदे सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नाही, असे म्हणणे म्हणजे जनतेच्या बुद्धीची थट्टा ठरेल. नदीपात्रातून वाळू उपसली जाते, वाहतूक होते, वसुलीचे जाळे रात्रंदिवस कार्यरत असते, आणि तरीही कारवाईचा मागमूस दिसत नाही. यातून मौनसंमतीचा संशय अधिक गडद होतो. स्थानिकांमध्ये एकच चर्चा ऐकू येते फक्त साहेब आणि पाच दादा जोरात. ही चर्चा जर जनमानसात इतकी ठळक असेल, तर प्रशासनाने ती गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. काही मोजक्या लोकांच्या छत्रछायेखाली अवैध धंदे फोफावत असतील, तर तो लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे. शासनाची भीती संपून ‘व्यवस्था’ ही काहींच्या ताब्यात गेल्याची भावना निर्माण होणे, हे अधिक चिंताजनक आहे. हप्त्याची रक्कम वाढल्याच्या तक्रारीही आता उघडपणे पुढे येत आहेत. म्हणजेच अवैध धंद्याचा विस्तार इतका वाढला आहे की त्याचे आर्थिक गणितही बदलले आहे. सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, वाहनचालक सर्वच या व्यवस्थेच्या छायेत जगत आहेत. कायद्याचे राज्य कुठे आहे, हा प्रश्न ते विचारत आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, या सर्वामुळे प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे. नागरिकांना न्याय मिळेल, तक्रार केल्यास दखल घेतली जाईल, ही भावना नष्ट होत असेल तर लोकशाहीचा पाया कमकुवत होतो. पारनेरमध्ये आज गरज आहे ती दिखाऊ कारवाईची नाही, तर मूळावर घाव घालणाऱ्या कठोर निर्णयांची. अवैध वाळूउपसा, बेकायदेशीर वसुली, नंबर नसलेल्या गाड्या, आणि त्यामागील राजकीय-प्रशासकीय संरक्षण याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. जबाबदार कोण, याची नावे समोर आली पाहिजेत. जनतेचा संयम हा प्रशासनासाठी परवाना नसतो. तो संपला, तर रस्त्यावरचा संताप अनिवार्य ठरतो. पारनेरमध्ये आज तोच टप्पा जवळ येताना दिसतो आहे. शासनाने अजूनही डोळेझाक केली, तर प्रश्न केवळ वाळूचा राहणार नाही, तो विश्वासघाताचा ठरेल.

Parner News : पारनेरचा वाळूधंदा, हप्तेखोरी, प्रशासनाची मौनसंमती आणि ‘ती’ लाला गाडी… Read More »

onion farmers

Onion Farmers : कांद्याचे दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांचा नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Onion Farmers : कांदा पिकवूनही हातात काहीच राहत नाही, मग जगायचं कसं? असा आक्रोश करत कांदा उत्पादक शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. कांद्याच्या भावात झालेल्या अभूतपूर्व घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, निर्यातबंदी तात्काळ उठवावी तसेच बाजार समित्यांमधील दलाली आणि शोषण बंद करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कष्ट आमचे, नफा व्यापाऱ्यांचा आणि तोटा शेतकऱ्यांचा, ही व्यवस्था आता चालणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरकांद्या सह रस्त्यावर ठिय्या मांडत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. अनेक शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा मांडताना दिसून आले. यंदा उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढत असताना दुसरीकडे बाजारात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दलालांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी शासनावर गंभीर आरोप करत बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि दलालांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप केला. तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रवींद्र राजदेव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू असून परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष दिले नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कांद्याच्या दरघटीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता रस्त्यावर उतरला असून, शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Onion Farmers : कांद्याचे दर कोसळले; संतप्त शेतकऱ्यांचा नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको Read More »

hsrp number plate

HSRP Number Plate : मोठी बातमी! 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य

HSRP Number Plate : राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून घ्यावी.” वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ वेळ (Appointment) निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरनाईक पुढे म्हणाले की, “ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क (Compounding Fees) आकारण्यात येईल.” वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

HSRP Number Plate : मोठी बातमी! 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य Read More »

neet exam

Neet Exam : नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन; एकाला अटक

Neet Exam: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे राहुरी तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या महाडुक सेंटर (माहेगाव) येथपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात येथील बीए एम एस शिक्षण घेतलेल्या धनंजय निवृत्ती लोखंडे यांस सीबीआयच्या तपास पथकाने राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतल्याने राहुरीमध्ये खळबळ उडाली आहे.  नाशिक येथील शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तो फरार होता. धनंजय याने दोन वर्षापूर्वी आपले वैद्यकीय शिक्षण कर्नाटक येथील मंगरूळ येथे पूर्ण केले. गेल्या चार वर्षापासून तो पुणे येथील वाघोली येथे वास्तव्यास असून त्याने येथे प्रॅक्टीस देखील करत असल्याचे सांगण्यात येते. मेडिकल ॲडमिशन कॉन्सिनिलिंगचे देखील तो काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील एका शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून काम करतात. सीबीआयने नाशिक येथून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जबाबातून धनंजय याचे नाव समोर आल्याने त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. याबाबत कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, धनंजय असे कृत्य करू शकत नसल्याचे माध्यमांना नंतर त्यांनी सांगितले. नीट प्रकरणाचे मोठे रॅकेट यामधून बाहेर येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत असून सीबीआय आता काय तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Neet Exam : नीट पेपर फुटी प्रकरणात अहिल्यानगर कनेक्शन; एकाला अटक Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र

Ashok Kharat Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. ३ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करीत आहे. तसेच ३ गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलीस करीत आहेत. २ गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास SIT चे मार्फतीने करणेबाबत आदेश केल्यामुळे २० मार्च पासून या व इतर १०, अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास SIT करीत आहे. या विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून २ पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून ३ पोलीस निरीक्षक, ३ सहा. पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक व ६ पोलीस अंमलदार असे एकूण २४ पोलिसांचे पथक कार्यरत आहे. SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे. तसेच अशोक खरात याने साक्षीदारांविरूद्ध खोटा खंडणीचा १ गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याने फिर्यादीवर दबाव टाकून साक्षीदाराविरूद्ध १ गुन्हा दाखल केला होता, असे २ गुन्हे आहेत. उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास संबंधीत घटक करत आहेत. अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व ८ गुन्हे व फसवणुकीचा १ गुन्हा SIT तपास करीत आहे. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे व पीडितांकडे केलेल्या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती व कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रूद्राक्ष, पुजा, विधी आदी माध्यमातून त्यांचेकडून पैसे उकळत होता, तसेच महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये, हात चलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत होता, याबाबत आरोपी विरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक पुरावा असे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्या अनुशंगाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. महिलांशी संबंधीत गुन्ह्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषोरापपत्र दाखल करणे आवश्यक असते. अशोक खरात विरोधात लैंगीक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला. त्या नंतर आठवडा भरात इतर सात गुन्हे दाखल आहेत. आज रोजी एकुण लैंगिक अत्याचारांचे गुन्ह्यांपैकी अशोक खरात विरोधातील एकूण २ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरीत गुन्ह्यांचे देखील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येतील. SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडीओच्या १३ हजार १७५ लिंक्स SIT च्या सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने SIT ने काढून टाकल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारे ४५१ अकाऊंट देखील कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहेत. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी आतापर्यंत २ गुन्हे दाखल केले गेले आहेत. गुन्हयातील आरोपी अशोककुमार एकनाथ खरात हा एकूण ४९ दिवस वेगवेगळ्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाचे कस्टडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. सध्या तो इतर ठिकाणच्या गुन्ह्यात अटक आहे. आज पावेतो दाखल गुन्हयांचे तपासामध्ये प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असले तरीही वरील गुन्ह्यांचा तपास पुढे सुरूच राहणार असुन अधिकचे पुरावे प्राप्त होताच ते न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रासह दाखल करण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र Read More »

img 20260514 wa0003

NEET Paper Leak Case : ‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा

NEET Paper Leak Case : देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीट पेपरफुटी प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.” त्या पुढे म्हणाल्या की, “‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात यावी. या प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपाशी संबंधित लोकांकडून चालवली जात असून, बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात लढा देऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.” झीनत शबरीन यांनी पुढे आरोप केला की, “ज्या NTA महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ ची ‘NEET’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना भाजप सरकारकडून बक्षीस म्हणून मोठी पदे दिली जात आहेत.” या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, प्रसन्न रांदिवे, आशिष सरोज, अल्तमेश कुरेशी, राहुल पेडणेकर, राज तुरेराव, सचिन, बृजमोहन यादव, सोहेब, मझहर आणि अबुतालिब यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

NEET Paper Leak Case : ‘NEET’ पेपरफुटीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करा Read More »

rbi

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलन साठ्यात 37.8 अब्ज डॉलर्सची घट; अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Foreign Exchange Reserves : अमेरिका – इराण युद्धाचा फटका आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसताना दिसतोय. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 104 च्या वर गेल्याने देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. यातच देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या आकडेवारीने देशाच्या चिंतेत वाढ केली आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मे 2026 पर्यंत भारताच्या परकीय चलन साठ्यात सुमारे 37.8 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. अवघ्या दोन महिन्यात इतकी मोठी घट झाल्याने देशात आता महागाई नियंत्रित करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात पुन्हा एकदा परकीय चलन साठा चर्चेचा विषय बनला आहे. एक वर्षासाठी सोन्याची खरेदी करणे टाळावे, परदेश प्रवास पुढे ढकलावे आणि इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन देशातील नागरिकांना पंतप्रधान मोदींकडून हैदराबाद येथे आयोजित सभेत बोलताना करण्यात आले होते. परकीय चलन साठा म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे डॉलर, सोने आणि इतर विदेशी चलनांचा साठा. भारतात या साठ्याचे व्यवस्थानप आरबीआयकडून करण्यात येते. परकीय चलन साठा आयात खर्च, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटाच्या काळात खूप महत्त्वाचा मानला जातो. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या भारताचा परकीय चलन साठा 690.69 अब्ज डॉलर इतका असून हा साठा फेब्रुवारी 2026 मध्ये 728.49 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांत जवळपास 37.8 अब्ज डॉलरची घट झाली असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय. तज्ज्ञांच्या मते, रुपयाला आधार देण्यासाठी RBI कडून डॉलर विक्री करण्यात आली. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, परदेशी गुंतवणूक बाहेर जाणे आणि जागतिक तणाव यामुळे डॉलरची मागणी वाढली. त्याचा थेट परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावर झाला. भारत परकीय चलन कसे मिळवतो? भारत निर्यातीद्वारे, परकीय गुंतवणुकीद्वारे (FDI/FPI) आणि परदेशातून येणाऱ्या पैशांद्वारे परकीय चलन मिळवतो. जेव्हा भारत इतर देशांना वस्तूंची विक्री करतो, तेव्हा त्याला परकीय चलनाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. याव्यतिरिक्त, जेव्हा परदेशात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशी असलेल्या कुटुंबाला पैसे पाठवतात, तेव्हा परदेशातून येणारा हा पैसा (रेमिटन्स) देशासाठी परकीय चलनाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत ठरतो. या सर्व स्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या परकीय चलनाचा समावेश देशाच्या अधिकृत परकीय चलन साठ्यामध्ये करून, त्याचे व्यवस्थापन RBI द्वारे केले जाते. आरबीआयच्या सहामाही ‘राखीव निधी व्यवस्थापन अहवालानुसार’, मार्च 2026 च्या अखेरीस भारताचा परकीय चलन साठा 691.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. सुमारे 11 महिन्यांच्या आयात खर्चाची (import bills) पूर्तता करण्यासाठी हा साठा पुरेसा मानला जातो. या अहवालानुसार, भारताच्या राखीव साठ्यामध्ये सोन्याचा वाटाही वाढला आहे. मार्च 2026 पर्यंत, देशाच्या एकूण परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचे प्रमाण 16.7 टक्क्यांपर्यंत वाढले तर सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 13.92 टक्के होते. मार्च 2026 च्या स्थितीनुसार, भारताकडे एकूण 880.52 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, ज्यापैकी सुमारे 680.05 मेट्रिक टन सोने देशांतर्गत (भारतातच) साठवून ठेवण्यात आले आहे. आरबीआय आणि इतर जागतिक संस्थांच्या अंदाजानुसार, मे 2026 च्या सुमारास भारताचा परकीय चलन साठा $700 अब्ज डॉलर्सच्या वर असणे अपेक्षित होते मात्र भारताला अपेक्षित साठा गाठता आला नाही. अपेक्षित साठा गाठता आल्या नसल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलन साठ्यात 37.8 अब्ज डॉलर्सची घट; अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? Read More »

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे. विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा नैसर्गिक शेतीचा अवलंब करा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया Read More »