DNA मराठी

हायलाईट

img 20260630 wa0003

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला. आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी 9 ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. २९ जून रोजी समृद्धी महामार्गावर नियोजित जनआंदोलन प्रशासनाच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. पावसाळी परिस्थिती, स्थानिक प्रशासनावरील वाढलेला ताण तसेच आगामी कुंभमेळ्याच्या तयारीची कामे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी लढा थांबलेला नसून केवळ पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहभागातून संगमनेर, अकोले, सिन्नर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण आणि परिसरातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ९ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “हा संघर्ष केवळ नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठी नाही, तर संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या हक्कांसाठी आहे. क्रांती दिनाच्या साक्षीने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या लढ्याला बळ द्यावे,” असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. पुढील २–३ दिवसांत संयुक्त बैठक नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी जनआंदोलन करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, त्याबाबत सर्व संबंधितांची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुढील २–३ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाचे स्वरूप, नियोजन आणि पुढील कृती आराखड्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Satyajeet Tambe : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी 9 ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे Read More »

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अंतर्गत पातळीवर दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. माहितीनुसार, काही पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे करत आहे तर काही नेते सत्ताधारी एनडीएत सहभागी होण्याच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे आणि निधी मिळवताना अडचणी येत असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याबाबत पक्षात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होत असल्याने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचाही पर्याय विचारात घेतला जावा. त्यामुळे पक्षात दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आमदार पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, भविष्यात पक्षाची राजकीय दिशा काय असेल आणि या मतभेदांवर शरद पवार कोणता निर्णय घेतील, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घडामोडींबाबत विविध सूत्रांच्या आधारे चर्चा सुरू असून संबंधित पक्षाकडून अंतिम अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार Read More »

siya goyal

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, कारण काय?

Siya Goyal : व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रेमी चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 3 जुलै 2026 पर्यंत वाढ केली आहे. पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणात पुढील तपासासाठी आणि ठोस पुरावे गोळा करण्यासाठी न्यायालयाकडे कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागण्यासाठी न्यायालयासमोर खालील प्रमुख कारणे सादर केली होती: केतनचा फाडलेला पासपोर्ट शोधणे तपासात समोर आले आहे की, सिया गोयलने केतन अग्रवालचा पासपोर्ट त्याच्या बॅगेतून चोरला आणि मुंबईला जात असताना खोपोलीजवळील एका फूड मॉलमध्ये तो फाडून फ्लश करून टाकला. सियाला केतनसोबत प्री-वेडिंग शूटसाठी बाली (इंडोनेशिया) येथे जायचे नव्हते, म्हणूनच तिने हे कृत्य केले. या पासपोर्टचे अवशेष आणि पुरावे गोळा करणे पोलिसांना आवश्यक आहे. डिलीट केलेला डिजिटल डेटा आणि चॅट्स रिकव्हर करणे गुन्ह्याचा कट रचण्यासाठी सिया आणि चेतनने एकमेकांशी संवाद साधला होता. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत, परंतु गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया डेटा डिलीट करण्यात आला आहे. हा फॉरेन्सिक डेटा परत मिळवून (Data Recovery) त्याआधारे आरोपींची चौकशी करायची आहे. ‘क्राइम सीन री-क्रेएशन’ पोलिसांनी यापूर्वी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन ‘क्राइम सीन री-क्रिएट’ केला होता. मात्र, तिचा प्रेमी चेतन चौधरी याच्यासोबत ही प्रक्रिया करणे अद्याप बाकी आहे. चेतनने गुन्ह्यापूर्वी लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केली होती आणि हत्येची तालीम (Rehearsal) केली होती. तो कोणत्या ठिकाणी थांबला होता, हे शोधायचे आहे. चेतन चौधरीची ‘गेट एनालिसिस’ चाचणी या गुन्ह्यात एक अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा म्हणून पोलीस चेतन चौधरीची ‘गेट एनालिसिस’ (चालण्याची पद्धत विश्लेषित करण्याची फॉरेन्सिक चाचणी) करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती चेतनच आहे हे सिद्ध करण्यासाठी एआय (AI) टूल्सच्या मदतीने त्याच्या चालण्याच्या पद्धतीची पडताळणी केली जाणार आहे. दोघांची समोरासमोर चौकशी आणि इतर संशयितांचा शोध सिया आणि चेतन या दोघांनी मिळूनच हा संपूर्ण कट रचला की यामागे आणखी कोणाचे डोके होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, नवीन साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि त्यांना आरोपींसमोर उभे करून चौकशी करणे यासाठी पोलिसांना वेळ हवा होता. प्रकरण काय? 18 जून रोजी पुणे येथील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, परंतु पोलिसांच्या तांत्रिक तपासात आणि सीसीटीव्हीच्या आधारे समोर आले की, मंगेतर सिया गोयल हिने तिचा प्रेमी चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. सियाला तिच्या कुटुंबाचा सामना करण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले, असा धक्कादायक खुलासाही तपासात झाला आहे.

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, कारण काय? Read More »

anna hazare

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही

Anna Hazare: माहिच्या अधिकार कायद्याच्या नियमांतील दुरूस्तीच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आता विविध संघटनांकडून नैतिक जबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मात्र, अधिकृतपणे संपर्क करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आज सरकारला आंदोलनासंबंधी स्मरणपत्र पाठविले आहे. या कायद्याच्या नियमांत सरकारने अलीकडेच बदल केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना माहिती मिळविणे अवघड जाणार आहे, असे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिला आहे. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. मात्र, आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर हजारे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे उपोषण करण्यावर ठाम राहिले. त्यानंतर सरकारकडून कोणीही अधिकृतपणे चर्चेसाठी आले नाही. तर दुसऱ्या बाजूला विविध सामाजिक संघटनांनी हजारे यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रश्न सुटल्याशिवाय आता माघार नाही, अशा निर्धार व्यक्त करीत या संघटनांनी आंदोलनासाठी नैतिक दबाव निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर आता हजारे यांनी सरकारला पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, मी 22 जून 2026 रोजी आपणास सविस्तर पत्र देऊन महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायद्यातील अनेक तरतुदी नागरिकांच्या माहितीच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या असल्याचे सविस्तर निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये शासनाने या नियमांचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येवून भेट घेतली. त्यावेळेस आमच्यामध्ये अडीच तास माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश, नागरिकांच्या अडचणी आणि नवीन नियमांमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली. त्यांनी कोणताही कायदा अथवा नियमावली करण्याचे अधिकार शासनाकडे असल्याने आपल्या भावना आम्ही शासनास कळवितो, पुढील निर्णय शासन घेईल असे सांगितले होते. त्यामुळे सरकारने 12 जून 2026 रोजी लागू केलेली नियमावली रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुन्हा एकदा हा कायदा वाचविण्यासाठी प्राणपणास लावून उपोषण सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की. महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील नागरिकविरोधी व कायद्याच्या मूळ तत्त्वांना बाधा आणणाऱ्या सर्व तरतुदी तात्काळ स्थगित करून रद्द करण्यात याव्यात. माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, माहिती आयुक्त, वकील, पत्रकार आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करून नव्याने नियम तयार करण्यात यावेत. माहितीचा अधिकार अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा राहील याची शासनाने हमी द्यावी, अन्य़था ठरल्याप्रमाणे आंदोलन केले जाईल.

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही Read More »

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार

Ahilyanagar Bus Accident: शेंडी-पोखर्डी परिसरातील घटना लग्न समारंभाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याची घटना अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. खरवंडी येथील लग्न समारंभ आटोपून पुण्यातील स्वारगेटकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा शेंडी-पोखर्डी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास सुरू असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. लग्न समारंभाचा आनंद एका क्षणात भीती आणि गोंधळात बदलला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता का, की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ जखमी प्रवाशांना तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महामार्गावर अपघातानंतर तत्काळ मदत आणि आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर

Nilesh Lanke: अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू असे स्पष्ट केले. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही राजकारणात संपर्क आणि संवाद कायम सुरू असतो, असे सांगताना भोर म्हणाले की, सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात. काही जण शेवटपर्यंत ठाम भूमिका घेतात, तर काहींच्या राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू असतात. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही. हीच सध्याची राजकीय वास्तवता आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितले खासदार निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक पक्षात आले तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत करू खासदार निलेश लंके यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लंके हे पूर्वीपासून शिवसेनेशी जोडलेले असून त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने संबंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संपर्क कधीच तुटत नसतात.शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना भोर म्हणाले, शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचे आम्ही शंभर टक्के स्वागत करू. मग ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून असोत, काँग्रेसमधून असोत किंवा इतर कोणत्याही पक्षातून असोत. आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, कारण ते सर्व आमचीच माणसे आहेत.संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात खासदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर Read More »

vivek kolhe

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली

Sujay Vikhe: अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे हे देखील इच्छुक होते मात्र त्यांनी त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार मनाचे असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो अशा शब्दात विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले. अहिल्यानगर शहरातील सहकार सभागृह येथे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी कोल्हे यांना विलंब झाला यावेळी त्यांनी नगर मनमाडच्या रस्त्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर एकच सभागृहात अशा पिकला. यावेळी बोलताना विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच मला विधानपरिषदेवरती संधी मिळाली. आज जिल्ह्याला 19 आमदार मिळाले असल्याने आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढलेले आहेत. आज आजूबाजूक जवळ पुणे, नाशिक आणि संभाजीनगर हे जिल्हे विकसित झाले आहे. आज भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या आईला नगर जिल्ह्याला देखील आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे असं कोल्हे म्हणाले. आमचे सहकारी जिल्ह्याचे माजी खासदार सुजय विखे कार्यक्रमाला नाही आहे मात्र मी माध्यमांमध्ये ऐकले की त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो असे यावेळी कोल्हे म्हणाले. लोकशाहीमध्ये प्रत्येक पद त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पद असेल अगदी पंतप्रधान पद असेल हे प्रत्येक पद हे महत्त्वाचे आहे यामुळे प्रत्येकाने त्या पदाचा सन्मान हा केला पाहिजे ठेवला गेला पाहिजे कारण आपण ज्या पदासाठी उभे राहतो त्या पदाची दुसऱ्याला देखील आकांक्षा असते, अपेक्षा असते असे सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केल्याने यांचा रोख नेमका कोणावर होता याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली Read More »

img 20260625 wa0011

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी

Sanjay Raut : उबाठा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. चिथावणीखोर भाषणाने राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. खासदार राऊतांवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी महिला सेनेच्या नेत्यांनी दिला. शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली. राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला. राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी Read More »

mla amit gorkhe

MLA Amit Gorkhe : विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

MLA Amit Gorkhe : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत कठोर कारवाई व महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. आमदार गोरखे यांनी सभागृहात या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, मिथेनॉल पुरवठा साखळीचा संपूर्ण तपास आणि राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यांच्या या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या लिखित उत्तरामध्ये तपासाची सद्यस्थिती, दोषींवरील कारवाई तसेच भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फडणवीस यांच्या लिखित उत्तरानुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून विषारी दारू निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याशिवाय विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या सर्व २२ कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून एकूण १ कोटी १० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. पीडित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी शासनाने ही मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लिखित उत्तरात राज्यभर अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले असून तालुकास्तरीय दारूबंदी समित्यांचे पुनर्गठन, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाया आणि मिथेनॉलच्या वाहतुकीवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याबाबत शासनाने ठोस पावले उचलल्याचे नमूद केले आहे. यावेळी आमदार गोरखे म्हणाले, “विषारी दारूमुळे २२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे. मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मी सभागृहात ठाम भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत लिखित उत्तराद्वारे कठोर कारवाई व मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली असून शासनाने घेतलेले निर्णय पीडित कुटुंबांसाठी दिलासादायक आहेत.”

MLA Amit Gorkhe : विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व 22 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखांची मदत Read More »