DNA मराठी

Maharashtra

nepal floods

Nepal Floods : नेपाळमध्ये भीषण जलप्रलय; मृतांचा आकडा 469 वर, बचावकार्य तिसऱ्या दिवशीही सुरू

Nepal Floods : नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण अचानकच्या पुरामुळे (Flash Flood) मोठी जीवितहानी झाली आहे. या पुरात आतापर्यंत 469 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. पूरग्रस्त भागात तिसऱ्या दिवशीही लष्कर, पोलीस आणि बचाव पथकांकडून शोध व मदतकार्य सुरू आहे. हिमनदी कोसळल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात हिमनदी कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पाणी, बर्फ, चिखल आणि दगडांचा लोंढा नदीच्या प्रवाहात आला. या लोंढ्यामुळे भोतेकोशी आणि त्रिशूली नदीच्या परिसरात अचानक पूर आला. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले. काही ठिकाणी वीज प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक गावांचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये मोठी जीवितहानी नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेह आठ जिल्ह्यांतून सापडले आहेत. चितवन – 178 मृतदेह नवलपरासी पूर्व – 110 गोरखा – 44 नुवाकोट – 37 धादिंग – 33 तनहून – 28 नवलपरासी पश्चिम – 27 रसुवा – 12 या पुरामध्ये 1,545 जखमी किंवा अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 84 जणांवर काठमांडूमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हजारो सुरक्षा कर्मचारी बचावकार्यात बचावकार्य वेगाने करण्यासाठी नेपाळ सरकारने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले आहे. सुमारे 7,451 सुरक्षा कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. यामध्ये नेपाळ लष्कराचे 2,391 जवान आहेत. दुर्गम आणि रस्ते तुटलेल्या भागात पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. बचाव पथके नदीकाठ, चिखल आणि ढिगाऱ्यांमध्ये बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. काही ठिकाणी प्रशिक्षित कुत्र्यांचीही मदत घेतली जात आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता मृतांचा आकडा वाढत असतानाच अनेक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळ आणि तिबेटमधील बेपत्ता व्यक्तींची संख्या जवळपास 1,000 किंवा त्याहून अधिक असल्याचे विविध अहवालांत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटक, यात्रेकरू आणि परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. बचावकार्य पुढे सुरू राहिल्याने हे आकडे बदलण्याची शक्यता आहे. पुन्हा पुराचा धोका दरम्यान, या भागातील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड नदीच्या प्रवाहात जमा झाल्याने काही ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला आहे. त्यामुळे कृत्रिम तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली असून त्यातील पाण्याची पातळी वाढल्यास पुन्हा मोठा पूर येण्याचा धोका आहे. चीननेही तिबेटच्या भागात नव्या पुराचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांतील यंत्रणा सतर्क आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर या नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळच्या अनेक भागांतील दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे मदत पोहोचवणेही बचाव पथकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. नेपाळ सरकारने सध्या लोकांचे प्राण वाचवणे, बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे, जखमींवर उपचार करणे आणि प्रभावित कुटुंबांना तातडीची मदत देणे याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बचावकार्य सुरू असून मृतांचा आणि बेपत्ता नागरिकांचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Nepal Floods : नेपाळमध्ये भीषण जलप्रलय; मृतांचा आकडा 469 वर, बचावकार्य तिसऱ्या दिवशीही सुरू Read More »

Jayant Patil

Jayant Patil : निष्ठा महत्त्वाची; परिस्थिती बदलत असते’, जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक टोला

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असून राज्यातील मंत्रिमंडळात त्यांना स्थान देखील भेटणार असल्याची चर्चा जोराने सुरू आहे. तर आता या चर्चांवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लावला आहे. निष्ठा महत्त्वाची आहे. परिस्थिती बदलत असते अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, मी राजकारणात आलो त्यावेळी फार वेगाने होतो. माझ्या राजकारणाच्या सुरवातीला फार संघर्ष होता. मी त्यावेळी एक बॅग घेऊन आलो होतो. त्यावेळी दिलीप तात्या होते. उद्याचा सूर्य जयंत पाटील हायवे च्या सर्व भिंती रंगवल्या होत्या. त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो. मी ज्यावेळी पुस्तक लिहीन याच्या पेक्षा माझं पुस्तक चांगले असेल. सगळ्यांना घेऊन राजकारण करणे म्हणजे दीर्घकालीन राजकारण आणि म्हणून मी बेरजेचे राजकारण मी सुरू केले. मी राजकारणात आलो अनेक जणांची मन दुखावली. पण बापूच्या निष्ठाई मुले माझा बरोबर राहिले. मी फार चांगले काम केले म्हणून नाही. या सर्वांनी त्याग केला आहे. बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे. पण निष्ठा असायला हवी असं जयंत पाटील म्हणाले. भाजप प्रवेशावर काय म्हणाले जयंत पाटील? राजकारण फार महत्वाचे असते. निष्ठा महत्व, पण मागच्या काळात संपले आहे. पण याचे दिवस जात असतात. असे समजू नका. आपण ठाम असले तर परिस्थिती बदलते. निष्ठा बुडल्या सारखी वाटते. पण पूर आला की बुडून जाते पण परिस्थिती नुसार राहायचे असेल तर आम्ही तयार आहे उद्या सकाळी खासदार आणि आमदार.. पण निष्ठा महत्वाची आहे. बाळ कडू नी संघर्ष करण्याचं या ठिकाणाहून शिकवले आहे. कृष्ण काठच्या माणस आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही. कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आहे असं जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil : निष्ठा महत्त्वाची; परिस्थिती बदलत असते’, जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक टोला Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास निर्बंध घालण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येणार असल्यानेच सरकारने हे नवे नियम लागू केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मात्र, मागण्या प्रलंबित ठेवून आंदोलनाला परवानगी नाकारली, तरी आपला आंदोलनाचा निर्धार कायम राहील, असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुंबईतील आंदोलनांसाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपण कायद्याचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले. आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने परवानगी द्यावी; मात्र परवानगी दिली नाही तरी आंदोलनापासून माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी, जनतेनेआणि विशेषतः मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवले, पण आता त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्यामागे मराठा समाजाच्या संभाव्य आंदोलनाचीच भीती असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबईतील नागरिकांनी आंदोलनाच्या काळात काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तर मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा इशारा त्यांनी दिला. “मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं. यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही… आम्ही कायद्याचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ.” दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. या आंदोलनानंतर मुंबईतील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाने तयारीत राहावे, वाहनांना किक मारून मुंबईच्या दिशेने निघावे आणि आंदोलनात विजय मिळवूनच परत यायचे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दुसरीकडे, मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि आंदोलनांवरील निर्बंधांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा Read More »

sugar

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता?

Sugar Prices: साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम होऊ लागला आहे. चहा, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरवाढीची झळ थेट ग्राहकांना बसत आहे. अशा परिस्थितीत ऊसाशिवाय इतर कोणत्या स्रोतांपासून साखर किंवा गोड पदार्थ तयार होऊ शकतात, याकडेही लक्ष वेधले जात आहे. ऊस हा जगातील साखरेचा प्रमुख स्रोत असला, तरी शुगर बीटपासूनही मोठ्या प्रमाणावर साखर तयार केली जाते. युरोप आणि अमेरिकेत बीटपासून साखर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. बीटपासून तयार होणाऱ्या रिफाइंड साखरेतील सुक्रोजचे प्रमाण ऊसाच्या साखरेच्या जवळपास असल्याने चव आणि वापराच्या दृष्टीने दोन्हीमध्ये फारसा फरक जाणवत नाही. याशिवाय गोड ज्वारीपासूनही गोड सिरप तयार केला जातो. या ज्वारीच्या देठात असलेल्या गोड रसापासून सिरप तयार करता येतो. काही प्रक्रियांच्या माध्यमातून त्यापासून साखरेचे दाणेही तयार करता येतात. मात्र, भारतात या पद्धतीने होणारे उत्पादन ऊसाच्या तुलनेत अत्यल्प आहे. खजूर हा देखील गोड पदार्थांचा एक स्रोत आहे. खजुरापासून डेट शुगर आणि डेट सिरप तयार केले जातात. नैसर्गिक गोडवा असल्याने त्यांचा विविध खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो. मात्र, उत्पादन मर्यादित असल्याने हे पदार्थ सामान्य साखरेपेक्षा महाग असतात. नारळाच्या फुलांच्या रसापासून कोकोनट शुगर तयार केली जाते. रस आटवून तयार होणाऱ्या या साखरेचा रंग किंचित तपकिरी असून त्याला कॅरॅमलसारखी चव असते. मात्र, किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य साखरेचा स्वस्त पर्याय ठरत नाही. तसेच ताडाच्या रसापासून पाम शुगर तयार केली जाते. भारतातील काही भागांसह आशियातील अनेक देशांमध्ये तिचा पारंपरिक वापर आहे. ही साखर ऊसाच्या साखरेपेक्षा महाग असली तरी कोकोनट शुगरच्या तुलनेत तुलनेने स्वस्त पडते. मका आणि कसावा यांच्यापासूनही गोड पदार्थ तयार केले जातात. मक्यातील स्टार्चवर प्रक्रिया करून ग्लुकोज सिरप आणि हाय-फ्रक्टोज कॉर्न सिरप तयार केला जातो. बिस्किटे, सॉफ्ट ड्रिंक्स आणि विविध पॅकेज्ड खाद्यपदार्थांमध्ये या स्वीटनर्सचा वापर केला जातो. कसावा किंवा टॅपिओकामधील स्टार्चवर प्रक्रिया करूनही ग्लुकोज आणि इतर स्वीटनर्स तयार करता येतात. दरम्यान, मेपलच्या झाडाच्या रसापासून तयार होणारा मेपल सिरप हा देखील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील थंड प्रदेशात त्याचे उत्पादन होते. मात्र, किंमत अधिक असल्याने भारतीय घरांमध्ये तो नियमित वापरासाठी साखरेचा व्यवहार्य पर्याय नाही.

Sugar Prices: साखरेचे दर वाढले; ऊसाच्या साखरेला स्वस्त पर्याय कोणता? Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश

Rupali Chakankar : सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलशी संबंधित योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नाशिक येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टशी संबंधित अशोक खरात यांचा उल्लेख केला आहे. एका सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खरात यांच्याशी आपली पूर्वी भेट झाली होती, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. खरात याच्यावर पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर त्याच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. या फोटो-व्हिडिओच्या आधारे आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसह विविध डिजिटल माध्यमांवरून आपल्याविरोधात अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. तसेच काही पोस्ट आणि कमेंट्समध्ये शिवीगाळ, धमकी तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे आपली मानहानी झाली असून, सोशल मीडिया कमेंट्सच्या माध्यमातून लैंगिक स्वरूपाचा छळही करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित पोस्ट, व्हिडिओ, कमेंट्स आणि स्क्रीनशॉट्सचे पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट कोणी तयार केल्या, त्या कोणाकडून प्रसारित झाल्या आणि त्यामागे नेमकी भूमिका कोणाची होती, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार

Nilesh Lanke : सत्ता आपल्या हातात आहे किंवा नाही, यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सत्ता नसतानाही पिंपळगाव रोठा येथे अशोक घुले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची आपली भूमिका आहे. राजकारणात स्पर्धा करायची असेल तर ती विकासाची करा; विरोधकांना अडचणीत आणणे, पोलिसांवर दबाव आणणे किंवा खोटे गुन्हे दाखल करणे, अशा राजकारणाला आपण कधीही महत्त्व दिले नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो आणि सत्याचा विजय अंतिम असतो, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.           पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर होते. यावेळी लंके यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी जोडलेले राजकारण आणि तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विरोधकांवर नाव न घेता जोरदार शरसंधान साधले.           अशोक घुले हे प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व आहे. सत्ता आपली नसतानाही त्यांनी गावातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी न्याय देणार आहे, असे लंके यांनी सांगितले. आपल्या गटातील सर्वच सरपंचांनी आपापल्या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्याचे सांगत लंके म्हणाले, सत्तेचा फायदा लोकांना करून देता आला पाहिजे. सत्ता ही जनतेच्या विकासासाठी असते. सत्तेचा उपयोग विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी किंवा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी करण्यापेक्षा गावांचा विकास, नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे.  सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर मैदानात येण्याचे आव्हान दिले. “माझे नेहमी सांगणे असते की स्पर्धा करा; पण स्पर्धा कशाची करा, तर विकासाची स्पर्धा करा. कोणत्या गावात किती विकासकामे झाली, किती निधी आणला आणि जनतेच्या किती समस्या सोडवल्या, यावर स्पर्धा झाली पाहिजे. मात्र सध्याच्या राजकारणामध्ये समोरच्याला कसे अडचणीत आणता येईल, कसे खिंडीत पकडता येईल आणि खोटे गुन्हे कसे दाखल करता येतील, याचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. सध्या सत्तेचा वापर कुठे चालू आहे, तर पोलिसांवर दबाव आणायचा, खोटे गुन्हे दाखल करायचे. अशा गोष्टींना मी कधीही महत्त्व दिले नाही. मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. शेवटी सत्याचा विजय होतो आणि सत्याचा विजय अंतिम असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. नीलेश लंके यांचे तालुक्याकडे लक्ष नाही, असे काही जण म्हणत असल्याचा उल्लेख करत त्यांनी जिल्हा बँकेच्या ठरावाच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट झाल्याचे सांगितले. जिल्हा बँकेच्या निवडणुका आता जाहीर होत असून कोणतीही बाह्यशक्ती अथवा आंतरशक्ती समोर आली तरी आपण पुरून उरणार असल्याचा दावा त्यांनी केला. बँकेच्या निवडणुका आता जाहीर होत आहेत. आता कोणी कितीही काही करू द्या. निलेश लंके जिल्हा बँकेत जात असतो. कोणतीही बाह्यशक्ती येऊ द्या किंवा आंतरशक्ती येऊ द्या. तुम्ही कितीही अंत पाहण्याचा प्रयत्न करा; परंतु तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार आहे. तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या; परंतु तुमचा राजकारणात शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे खंडेरायाच्या चरणी सांगतो,” असे आक्रमक विधान त्यांनी केले. माझ्या तालुक्यात येऊन दररोज आढावा बैठका घ्या किंवा पत्रकार परिषद घ्या, त्याने फरक पडत नाही, असे सांगत लंके यांनी विरोधकांवर टीका केली. “तुम्ही आढावा बैठका घेता आणि त्यामध्ये माझ्यावर टीका करता. राजकारणासाठी माझ्या विरोधात महिलांना पुढे करता. एआय फोटो तयार करता. मात्र तुमच्या विरोधात माझी कुठेही दंड थोपटण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले. तालुक्यातीलच काही लोकांना पुढे करून विकासकामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण चुकीच्या पद्धतीने कोणी दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. काचेच्या घरात राहणारे मी दुसऱ्याच्या घरावर कधीही दगड मारायचा नाही. मात्र जनतेच्या विकासाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्याला विरोध करण्याची आपली तयारी आहे, असे लंके यांनी सांगितले.  तालुक्यात येणाऱ्या बाह्यशक्तींना रोखण्याची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, हा तालुका पुरोगामी विचारांचा तालुका आहे. तालुक्यात येत असलेल्या बाह्यशक्तींना रोखण्याचे काम आपण केले पाहिजे. येथील राजकारण स्थानिक जनतेच्या प्रश्नांभोवती आणि विकासाच्या मुद्द्यांभोवतीच झाले पाहिजे. सत्ता असो अथवा नसो, जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. विकासकामांमुळे पिंपळगाव रोठा आणि श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार Read More »

breakfast tips

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा

Breakfast Tips : दिवसाची सुरुवात आपण कशा पद्धतीने करतो, याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या आहारावर आणि ऊर्जेवर होऊ शकतो. अनेक जण सकाळचा नाश्ता टाळतात किंवा उठल्यानंतर लगेच चहा-बिस्किटांवर भागवतात. मात्र शरीराला दिवसाच्या सुरुवातीलाच योग्य पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी महागडे ड्रायफ्रूट किंवा महागडी हेल्थ फूड उत्पादने घेण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होणारे आणि तुलनेने स्वस्त पदार्थही सकाळच्या आहाराचा चांगला भाग ठरू शकतात. पौष्टिक आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचे स्रोत यांचा समावेश केल्याने पचनक्रिया आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. फायबरयुक्त पदार्थ आहाराचा महत्त्वाचा भाग मानले जातात. भिजवलेले शेंगदाणे ठरू शकतात स्वस्त पर्याय शेंगदाणे हा सर्वसामान्यांच्या घरात सहज मिळणारा आणि तुलनेने स्वस्त पदार्थ आहे. त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स आढळतात. त्यामुळे सकाळच्या आहारात मर्यादित प्रमाणात शेंगदाण्यांचा समावेश केल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. काही जण शेंगदाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खातात. भिजवलेले शेंगदाणे खाण्याची ही पद्धत अनेक घरांमध्ये पारंपरिक आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. शेंगदाणे खाल्ल्यानंतर गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याचे सेवन कमी करणे किंवा टाळणे योग्य ठरू शकते. शेंगदाण्याची अॅलर्जी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. केळी : सहज उपलब्ध आणि पटकन खाता येणारे फळ केळी हे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्ससह पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात केळ्याचा समावेश करणे हा सोपा पर्याय ठरू शकतो. विशेषतः सकाळी वेळ कमी असणाऱ्या व्यक्तींसाठी एक फळ खाणे हा जड नाश्त्यापेक्षा सोपा पर्याय असू शकतो. मात्र फक्त केळे खाऊन पूर्ण नाश्ता झाल्याचे मानणे योग्य नाही. अधिक संतुलित आहारासाठी केळ्यासोबत दूध, दही, शेंगदाणे किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करता येतो. फळे खाण्यासाठी ठरावीक एकच वेळ असते किंवा ती फक्त रिकाम्या पोटीच खाल्ली पाहिजेत, असा ठोस वैज्ञानिक नियम नाही. व्यक्तीच्या आहारपद्धती आणि आरोग्याच्या गरजेनुसार फळांचे सेवन करता येते. भिजवलेल्या मनुका : गोड चवीसोबत फायबर मनुका हा आणखी एक सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि काही प्रमाणात फायबर तसेच विविध सूक्ष्म पोषक घटक असतात. काही लोक रात्री मनुका पाण्यात भिजवून सकाळी खातात. भिजवलेल्या मनुकांचा समावेश संतुलित आहाराचा एक भाग म्हणून करता येतो. मात्र मनुका नैसर्गिकरीत्या गोड असल्याने त्याचे प्रमाणही लक्षात घेणे गरजेचे आहे. विशेषतः रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारातील एकूण कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन आहार ठरवावा. सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? रात्रभराच्या उपवासानंतर सकाळचा आहार शरीराला ऊर्जा आणि पोषक घटक देण्याचे काम करतो. मात्र नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा संतुलित समावेश असणे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, फक्त चहा आणि बिस्किटांऐवजी पोहे, उपमा, अंडी, दही, फळे, कडधान्ये किंवा शेंगदाणे यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. अशा आहारामुळे शरीराला विविध प्रकारचे पोषक घटक मिळतात. पचन सुधारण्यासाठी फक्त एक पदार्थ पुरेसा नाही सकाळी एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया पूर्णपणे सुधारते किंवा दिवसभर थकवा जाणवत नाही, असा दावा करणे योग्य नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण आहारपद्धती, पुरेसे पाणी, नियमित शारीरिक हालचाल आणि योग्य झोप यांनाही तितकेच महत्त्व आहे. फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य आहारात असणे पचनासाठी उपयुक्त ठरते. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणेही महत्त्वाचे आहे. सकाळी काय टाळावे? सकाळची सुरुवात अतिप्रमाणात साखर, तेलकट पदार्थ किंवा अत्यंत प्रक्रिया केलेल्या पदार्थांनी करण्याची सवय टाळणे चांगले. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ काही व्यक्तींमध्ये अॅसिडिटी, अपचन किंवा पोटफुगी वाढवू शकतात. त्याऐवजी घरच्या घरी तयार केलेला संतुलित नाश्ता घेणे अधिक योग्य ठरू शकते. नाश्ता किती आणि कोणता असावा हे व्यक्तीचे वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याच्या गरजांनुसार बदलते. दिवसभर उत्साही राहण्यासाठी या गोष्टीही महत्त्वाच्या फक्त सकाळी एखादा पदार्थ खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकत नाही. त्यासाठी दिवसभर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे, वेळेवर जेवणे आणि दीर्घकाळ एकाच जागी बसून न राहता नियमित हालचाल करणे याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.यासोबतच रात्रीची पुरेशी आणि नियमित झोपही दिवसभरातील ऊर्जा आणि एकाग्रतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणाला विशेष काळजी घ्यावी? शेंगदाणे किंवा इतर पदार्थांची अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी ते पदार्थ खाणे टाळावे. तसेच मधुमेह, किडनीचे आजार, पचनाशी संबंधित दीर्घकालीन समस्या किंवा इतर वैद्यकीय स्थिती असल्यास आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा Read More »

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

cheque book

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक

Cheque Book : चेकचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने चेकबुकच्या स्वरूपात महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. 1 जानेवारी 2027 पासून अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकबुकचा वापर महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांनी 31 डिसेंबर 2026 पूर्वी आपल्या बँकेकडून नवीन चेकबुक घेण्याची तयारी करावी. काही बँकांनी यासंदर्भात ग्राहकांना सूचना देण्यास सुरुवात केली आहे. जुन्या चेकबुकचे काय होणार? सध्या वापरात असलेल्या काही जुन्या चेकबुकमध्ये चेक क्रमांक आणि संबंधित माहिती प्रामुख्याने अंकांच्या स्वरूपात असते. नव्या पद्धतीमध्ये चेकशी संबंधित ओळख क्रमांकात अक्षरे आणि अंकांचा म्हणजेच अल्फा-न्यूमेरिक कोडचा वापर केला जाणार आहे. Mintच्या वृत्तानुसार, 31 डिसेंबर 2026 नंतर जुन्या स्वरूपातील चेकच्या स्वीकाराबाबत बँकांकडून निर्बंध लागू होऊ शकतात. विशेषतः काही बँकांनी 50 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी अल्फा-न्यूमेरिक कोड असलेल्या चेकचा वापर करण्याबाबत ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मोठ्या रकमेचा चेक देणाऱ्या ग्राहकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आपल्या बँकेकडून नियमांची खात्री करून घेणे योग्य ठरेल. अल्फा-न्यूमेरिक कोड म्हणजे काय? अल्फा-न्यूमेरिक म्हणजे अक्षरे आणि अंक यांचे मिश्रण. पारंपरिक चेकवरील क्रमांकाच्या तुलनेत नव्या स्वरूपातील कोडमुळे चेकची ओळख आणि त्याची प्रक्रिया अधिक सुसंगत पद्धतीने करता येण्यास मदत होणार आहे. या बदलामागे चेक व्यवहार अधिक सुरक्षित करणे आणि बनावट चेक किंवा चेकमध्ये छेडछाड करण्याच्या घटना कमी करणे हा उद्देश असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. नव्या चेकमध्ये वॉटरमार्क, UV मध्ये दिसणारी सुरक्षा वैशिष्ट्ये आणि मायक्रो-प्रिंटिंगसारख्या सुरक्षाव्यवस्थांचाही वापर केला जात आहे. बँक ग्राहकांनी काय करावे? ज्यांच्या खात्यातून नियमितपणे चेकद्वारे मोठे व्यवहार होतात, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर, जमीन, व्यवसाय, कर्जाची परतफेड, विमा, शैक्षणिक शुल्क किंवा इतर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पुढील काही महिन्यांत चेक देणार असाल, तर जुनी चेकबुक वापरण्यापूर्वी आपल्या बँकेकडून तिची वैधता तपासावी. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या मोबाइल बँकिंग अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा शाखेच्या माध्यमातून नवीन चेकबुकची सुविधा उपलब्ध आहे का, हे तपासावे. काही बँका नवीन चेकबुक आपोआप जारी करत आहेत, तर काही ठिकाणी ग्राहकांना स्वतंत्रपणे मागणी करावी लागू शकते. चेकबुक बदलण्यामागे सुरक्षा महत्त्वाची डिजिटल पेमेंट, UPI आणि नेट बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये आजही चेकचा वापर केला जातो. त्यामुळे चेकमध्ये बनावटपणा, फेरफार किंवा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचा धोका कायम आहे. नव्या चेकमध्ये अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर केल्याने चेकची तपासणी आणि प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यास मदत होऊ शकते. RBIच्या ग्राहक सेवा मार्गदर्शक तत्त्वांमध्येही चेकच्या व्यवहारात स्वाक्षरीची पडताळणी, चेकबुक जारी करण्यावर नियंत्रण आणि कोऱ्या चेकच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. Positive Pay System चाही संबंध चेक व्यवहारातील फसवणूक कमी करण्यासाठी Positive Pay System (PPS) ही यंत्रणा वापरली जाते. यात मोठ्या रकमेच्या चेकची महत्त्वाची माहिती ग्राहकाकडून आधी बँकेला दिली जाते आणि चेक सादर झाल्यानंतर त्या माहितीची पडताळणी केली जाते. नव्या चेकबुकमधील सुरक्षा वैशिष्ट्ये आणि डिजिटल प्रक्रियांमुळे चेक क्लिअरिंग अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र Positive Pay ची अंमलबजावणी, मर्यादा आणि अनिवार्यता बँकेनुसार वेगळी असू शकते; त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या स्वतंत्र सूचनांकडे लक्ष द्यावे. मोठा व्यवहार करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी समजा एखाद्या ग्राहकाने जुनी चेकबुक वापरून 1 लाख, 2 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक दिला आणि संबंधित बँकेने त्या जुन्या स्वरूपातील चेकवर निर्बंध लागू केले असतील, तर पेमेंटमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घरखरेदी, व्यवसायातील देयके, कर्जाचे हप्ते किंवा इतर मोठ्या व्यवहारांसाठी चेक वापरणाऱ्यांनी आधीच नवीन चेकबुक घेणे सुरक्षित ठरेल. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत लक्षात घेऊन ग्राहकांनी नवीन चेकबुकची मागणी वेळेत करणे चांगले. बँकेकडून चेकबुक मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत गर्दी किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास व्यवहार रखडण्याची शक्यता टाळता येईल.

Cheque Book : 31 डिसेंबरपूर्वी चेकबुक बदला; नव्या वर्षापासून मिळणार अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली चेकबुक Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालय परिसरातील एसएसपीएमएसच्या मैदानावर दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी पोलिसांकडून काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शुक्रवारी रात्री सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्काच्या मुद्द्यावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर घोषणाबाजी आणि गोंधळात झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक अथवा चित्रे लावू नयेत, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मैदानाच्या परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संघटनांमधील ताजा वाद आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला अपेक्षित असलेली मोठी गर्दी पाहता, पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने Read More »