DNA मराठी

Maharashtra Politics

img 20260511 wa0035

Nilesh Lanke: खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…, रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी

Nilesh Lanke : विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात असताना आता उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. रविवारी दिवसभर विविध राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी रूबी हॉल क्लिनिक येथे जाऊन खा. लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह नगर जिल्हा आणि राज्यातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या गुरुवारी खा. लंके यांना प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सततचे दौरे, सामाजिक मोहिमा, लग्नसराईतील कार्यक्रम, अपुरी विश्रांती आणि शारीरिक थकवा यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तामीळनाडूतील जिंजी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर ते कोल्हापूर, नाशिक, संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवले. याच धावपळीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे बोलले जात आहे. बी. रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांना विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे स्पष्ट केले होते. अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nilesh Lanke: खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…, रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी Read More »

Dharmveer Anand Dighe : मोठी घोषणा! धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे उभारल्या जाणार 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’

Dharmveer Anand Dighe : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून, बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. “भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे उद्यान या उद्यानामध्ये वृक्षाची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. सबब , वाहतुकीच्या नियमाबरोबरच नागरिकांना पर्यावरणाचे धडे देखील तिथे दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या ई -वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. हे उद्यान त्यामुळे अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Dharmveer Anand Dighe : मोठी घोषणा! धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे उभारल्या जाणार 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय

Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात यशस्वी संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही संघटन बांधणीसाठी दौरे केले होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींवर भर देत त्यांनी कार्यकर्त्यांकडून सूचना, मते आणि स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत निवडणूक रणनीती आखली होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी अशा संवाद दौऱ्यांना महत्त्वपूर्ण मानले जाते. याच पद्धतीने आता पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दौरा असा असेल – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र

Harshwardhan Sapkal: देशात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र Read More »

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

img 20260508 wa0009

Madhya Pradesh Jailer : जन्मठेपेच्या कैद्यावर जेलरलाच प्रेम; तुरुंगात जुळलं नातं, समाजाच्या विरोधात जाऊन केलं लग्न

Madhya Pradesh Jailer : तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी आलेला एक कैदी आणि त्याच्यावर प्रेम करणारी त्याच तुरुंगातील उपजेलर ऐकायला चित्रपटातील कथानक वाटावं, पण ही घटना मध्यप्रदेशातील सतना केंद्रीय कारागृहातील असल्याचं सांगितलं जात आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारी अधिकारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी यांच्यात निर्माण झालेलं नातं अखेर विवाहबंधनात अडकलं. फिरोजा खातून या सतना केंद्रीय कारागृहात उपजेलर म्हणून कार्यरत होत्या. शिस्त, कर्तव्य आणि कायद्याचं काटेकोर पालन ही त्यांची ओळख. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह हा कैदी शिक्षा भोगत होता. 2007 मध्ये नगरपरिषद उपाध्यक्षाच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारागृहातील वॉरंट शाखेची जबाबदारी फिरोजा खातून यांच्याकडे होती. धर्मेंद्र कागदपत्रांच्या कामात मदत करत असल्याने दोघांचा संपर्क वाढला. कामापुरतं सुरू झालेलं बोलणं हळूहळू मैत्रीत बदललं आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 2022 मध्ये धर्मेंद्रच्या वर्तणुकीत सुधारणा झाल्याचं लक्षात घेऊन त्याची वेळेपूर्वी सुटका करण्यात आली. 14 वर्षांचा तुरुंगवास संपल्यानंतर तो बाहेर आला, मात्र फिरोजासोबतचं नातं अधिक दृढ झालं. अखेर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. या लग्नासमोर अनेक अडथळे होते. धर्म वेगळा, सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे समाजाचा विरोध. मुस्लिम महिला अधिकारी आणि हिंदू माजी कैदी यांचा विवाह कुटुंबीयांना मान्य नव्हता. फिरोजा यांच्या घरच्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, दोघांनीही समाजाच्या दबावापेक्षा आपल्या नात्याला प्राधान्य दिलं. 5 मे रोजी छतरपूर येथे हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे, फिरोजा यांच्या कुटुंबीयांनी साथ न दिल्याने बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढे येत कन्यादानाची जबाबदारी स्वीकारल्याची चर्चा आहे. वैदिक मंत्रोच्चारात, अग्नीला साक्षी ठेवून उपजेलर फिरोजा खातून यांनी धर्मेंद्र सिंहसोबत सात फेरे घेतले. कायद्याच्या रक्षकाने जन्मठेपेच्या कैद्याला जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याने ही प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेम खरंच आंधळं असतं का, की माणसातील बदल ओळखण्याची ताकद त्यात असते? एका माजी गुन्हेगाराला समाजाने आणि कायद्याच्या रक्षकाने अशी दुसरी संधी देणं योग्य आहे का, यावर आता विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.

Madhya Pradesh Jailer : जन्मठेपेच्या कैद्यावर जेलरलाच प्रेम; तुरुंगात जुळलं नातं, समाजाच्या विरोधात जाऊन केलं लग्न Read More »

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

uday samant

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय

Uday Samant : अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे थंडावलेले काम पाहता सामंत यांनी हे बदल केले असून येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी पावले उचलले जातील असं सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंत हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बनवतात मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची सुरू असलेली शिथिल वाटचाल यावर मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारणी बरखास्त करून केवळ जिल्हाप्रमुख नितीन अवताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील असे स्पष्ट आदेश दिले आहे. नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत अवतडे हेच काम पाहतील दरम्यान आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे राजकीय बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना

Nilesh Lanke: अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर येत असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांची गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रकृती ही अस्वस्थ होती त्यांच्यावरती नगरमध्येच उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्याकडे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बाबतची माहिती समजतात लंके समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक कार्यकर्ते त्यांची प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पुण्याकडे रवाना होत असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी खासदार निलेश लंके हे तामिळनाडू येथील जिंजी किल्ला येथे गेले होते. आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचे गड किल्ले यांचे संवर्धन करण्याची मोहीम खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी स्वतः लंके हे गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्या प्रकृती खालवली असल्याचा देखील त्यांचे समर्थक सांगतात.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंकेची तब्येत बिघडली; उपचारासाठी पुण्याला रवाना Read More »

raam shinde

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे Read More »