DNA मराठी

BJP

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री? Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

farmers

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे समर्थन करताना, “कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र, शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांवरील ५० हजार रुपयांची अट हटवण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून परिस्थितीची गरज म्हणून ती करावी लागते. “आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सावकारांकडे जाण्याची वेळ येऊ नये, हे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार ते पूर्ण केले आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, तरीही सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सरकारच्या वीज सवलतीचाही उल्लेख केला. “कर्जमाफीव्यतिरिक्त सरकार दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपयांची वीजमाफी देते. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बँकांची बैठक घेऊन आणि संपूर्ण माहितीचा अभ्यास करूनच ही योजना आखण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबत ३६ लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “ही योजना ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे,” असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीतील आमदारांनी कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ही अट काढल्यास सरकारवर ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी माहिती देण्यात आली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा एक लाख रुपये केल्यास सुमारे दोन लाख शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “व्यापक हिताचा विचार करून सरकारने अखेर ५० हजार रुपयांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, २०२६-२७ संदर्भातील अटही वगळण्यात येणार आहे,” असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली Read More »

ajit pawar

Ajit Pawar Death Case : अजित पवार अपघात प्रकरणाचा तपास कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Ajit Pawar Death Case : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा सध्या सीआयडी (CID) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) अशा दोन स्वतंत्र यंत्रणांकडून समांतर तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, AAIB चा अंतिम अहवाल येण्यापूर्वी सीबीआयला या तपासात हस्तक्षेप करता येत नाही, अशी भूमिका केंद्रीय यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात विविध बाबींची पडताळणी करण्यात आली आहे. विशेषतः पायलट सुमित कपूर यांच्या बँक खात्यांची, आर्थिक व्यवहारांची आणि गुंतवणुकीची तपासणी करण्यात आली. तसेच उपलब्ध सीसीटीव्ही आणि इतर फुटेजचेही विश्लेषण करण्यात आले. मात्र, या तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे AAIBचा तपास. अपघातग्रस्त विमानातील उपकरणांमधून आवश्यक तांत्रिक माहिती (डेटा) यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आली असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. या अहवालातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. अंतिम अहवालाच्या वेळापत्रकाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. त्यानुसार जानेवारीपूर्वी AAIBचा अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. “रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या तपासाला तीन ते चार वर्षे लागू शकतात, असे म्हटले होते. ते काही प्रमाणात खरे असले, तरी या प्रकरणात अमेरिकेतील तज्ज्ञ संस्थेचीही मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीपूर्वी अंतिम अहवाल येईल, अशी अपेक्षा आहे. सरकारचे या संपूर्ण प्रकरणावर सातत्याने लक्ष आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

Ajit Pawar Death Case : अजित पवार अपघात प्रकरणाचा तपास कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… Read More »

amol khatal

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच

Amol Khatal : संगमनेर मध्ये प्रस्थापित बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून जॉईन केलं ठरलेले अमोल खताळ व थोरात यांचे भाचे असलेले आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये विकास कामावरून रस्सीखेच नेहमीच पाहायला मिळते यातच आता पुन्हा एका कामावरून श्रेयवादाची लढाई दोन्ही आमदारांमध्ये सोशल मीडिया वरती पाहायला मिळते. याला कारण म्हणजे लवकरच संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार हे आहे वादाचे कारण… मात्र या कार्यालयासाठी खरा पुढाकार कोणाचा? जे 40 वर्षे झाले नाही ते दीड वर्षात होणार संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची परिवहन सेवा संदर्भात वर्षानुवर्षेपासून होणारी गैर्यत दूर व्हावी आणि आरटीओचे संबंधित कामे स्थानिक पातळीवरच व्हावी त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व अखेर या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश आले यामुळे लवकरच संगमनेर मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साकारणार आहे अशी माहिती अमोल खताळ यांनी आपल्या सोशल मीडिया वरती दिली. तर याबाबत अमोल खताळ यांनी 23 जानेवारी 2025 पासून मंत्री सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानंतर 2025 या वर्षात 20 फेब्रुवारी 21 मार्च 24 मार्च 5 जून तसेच 25 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत याबाबत खतांनी पाठपुरावा केला त्यानंतर अखेर एक जुलै 2020 रोजी परिवहन मंत्री सरनाईकांकडून मंजुरी बाबत सूचना देखील देण्यात आल्या अशी माहिती खुद्द खताळ यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर दिली आहे तसेच त्याबाबतचे दस्तावेज देखील त्यांनी सादर केले आहे. पाठपुराव्याला यश आले तांबे यांचा दावा संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे ही माजी अनेक वर्षांपासून ची सातत्यपूर्ण मागणी आहे संगमनेर अकोले आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नव्याने निश्चित झालेल्या शासनाच्या निकषानुसार संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय स्थापन होणे आवश्यक आहे याबाबत मंत्री सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या मागणीची दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या अशी फेसबुक पोस्ट विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे यांनी केलेला पाठपुरावा संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळावे यासाठी सत्यजित तांबे यांनी 17 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्यानंतर 24 मार्च 2025 रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत याबाबत मागणी लावून धरली तसेच 12 जुलै 2025 पावसाळी अधिवेशनात देखील याबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला होता अखेर आपण सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन आरटीओ कार्यालय साठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिले आहे असे देखील तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाशिक पुणे रेल्वे वरून तांबे खताळ भिडले नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे गेली पाहिजे अशी भूमिका तांबे यांनी लावून धरली तसेच खताळ यांनी देखील आपली हीच भूमिका मांडली मात्र हा रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाकडून घेण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला तर केवळ राजकीय विरोध म्हणून या गोष्टीकडं पाहता विकास कामासाठी एकत्र यावे असे आव्हान खताळ यांनी देखील केले दरम्यान नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आमदारांची बैठक झाली तसेच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला मात्र रेल्वे रद्द झाल्या च्या कारणावरून तांबे व खताळ यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सुरूच होते. त्यामुळे टीकाटिपाने असो किंवा विकास कामांचे श्रेय घेणे संगमनेर मध्ये तांबे व खताळ या नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच Read More »

Nilesh Lanke

Nilesh Lanke : NDA सोबत जाणार का? निलेश लंके स्पष्ट म्हणाले

Nilesh Lanke : महावितरणच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी आज अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात आले. दरम्यान चाणक्य चौकातून पदयात्रा काढत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत हा मोर्चा महावितरण कार्यालयात धडकला. यावेळी अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड येथील आनंदनगर परिसरात एका साडेतीन वर्ष चिमुरडीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मतदारसंघातील अनेक भागांत सुरू असलेले अघोषित व अनियमित लोडशेडिंग, जळालेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) वेळेत न बदलणे, स्मार्ट मीटरमुळे वाढीव व चुकीची वीजबिले, अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या वीज यंत्रणेची रखडलेली दुरुस्ती, सौरऊर्जा व नेट मीटरिंग प्रकरणांतील विलंब, तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश, कृषी वीजजोडणीतील विलंब आणि देखभालीच्या अभावामुळे निर्माण होणारे वारंवार तांत्रिक बिघाड या प्रमुख प्रश्नांकडे त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले आहे. NDA सोबत जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही गुप्त बैठका झाल्या नाही तसेच जयंत पाटील व विनोद तावडे यांची भेट ही कामनिमित्त झाली असेल आमच्या देखील भेटीगाठी होत असतात. यामुळे त्या राजकोट चर्चा झाल्या असे नसते. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो यामुळे वरिष्ठांना निर्णय काय असतो यावर आम्ही विश्वास ठेवतो . यामुळे या चर्चांवर भाष्य करणे लंके यांनी टाळले. विरोधकांना निधी मध्ये डावलले जात असल्याचे याबाबत खुद्द लंके यांनी देखील खंत व्यक्त केली. विरोधकांना निधी कसा मिळणार नाही याकडे सत्ताधाऱ्यांकडून डावपेच आखले जातात. मात्र सत्ताधाऱ्यांनी राज्याचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते . सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे समान निधी मिळला पाहिजे अशी मागणी देखील खासदार निलेश लंके यांनी केली.

Nilesh Lanke : NDA सोबत जाणार का? निलेश लंके स्पष्ट म्हणाले Read More »

sangli district central cooperative bank

Sangli District Central Cooperative Bank : आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली DDC बँकेतील भरतीवरील स्थगिती उठवली

Sangli District Central Cooperative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीप्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भरतीवरील शासनाची स्थगिती उठवत न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून, सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य सरकारने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही स्थगिती कायम राहिल्याने बँक प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने भरतीवरील स्थगिती उठवली. सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असली, तरी तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ४४४ पदांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आक्षेप घेतला होता. बँकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने भरतीला स्थगिती दिली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने २४ जूनपासून आयबीपीएसमार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया आता पुन्हा वेगाने पुढे जाणार आहे.

Sangli District Central Cooperative Bank : आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली DDC बँकेतील भरतीवरील स्थगिती उठवली Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे, पर्यटनस्थळे किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने संभाव्य पूर आणि दरडग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

railway

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्‍यासाठी राज्‍यसरकार सकारात्‍मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली. पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्‍हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या मार्गाबाबत सविस्‍तर चर्चा केली. माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील, आ.डॉ.किरण लहामटे, आ.सरोज अहिरे, आ.अमोल खताळ, आ.शरद सोनवणे, आ.बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते. शिष्‍टमंडळाने पुणे-नाशिक रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्‍यानगर या जिल्‍ह्यांच्‍या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्‍यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता करण्‍यात आल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली. या रेल्‍वे मार्गाबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असून, यासाठी निधीचीही तरतुद केलेली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्‍याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्‍पाची तांत्रिक अचुकता व कालबध्‍द अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍यासाठी तज्‍ज्ञांची उच्‍च्‍स्‍तरीय समिती स्‍थापन करुन, याबाबतचा अहवाल मागविण्‍यात येईल. समितीकडून येणा-या अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत आपण स्‍वत: पाठपुरावा करु अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्‍टमंडळाला दिली. राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपुर्ण बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्‍दारे करण्यात आली. यावेळी आ.प्राजक्त तनपुरे, आ.विठ्ठलराव लंघे पाटील व आ. अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही Read More »

marathi actresshigh profile sex racket case

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Marathi Actress: गिरगावातील हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेट प्रकरणात आता नवीन खुलासा झाल्याने एकच खळबळ उडाली आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गिरगावातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. तर या प्रकरणातील प्रमुख संशयित मेकअप आर्टिस्टला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. व्यवहार निश्चित झाल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी मेकअप आर्टिस्टने मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करून महिलांना या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून, दुसरी अभिनेत्री हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, रॅकेटचे इतर सदस्य, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका याचाही तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »