DNA मराठी

DNA Marathi News

img 20260805 wa0000

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष

Vaishali Nagwade : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या पदमुक्तीनंतर हे पद रिक्त होते. आज मुंबई येथे पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वैशाली नागवडे या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख आहे. यापूर्वी अजित पवार यांनी त्यांच्यावर महानंदा दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान, पक्षातील विविध घडामोडींमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविरोधात अनेकदा भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या चर्चेतही राहिल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्यावरील एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख “गुंगी गुडिया” असा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महिला नेत्यांबाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विरोधकांकडून याच शब्दांत हिणवले जात होते, याची आठवण करून देत आज काँग्रेसकडून अशाच प्रकारची भाषा वापरली जाणे विरोधाभासी असल्याचे त्यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांवर टीका करताना सभ्य भाषेचा वापर करावा, अशी अपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार Read More »

dabur india

Dabur India : FSSAI ची डाबरला नोटीस; ‘100%’ दाव्यांमुळे अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

Dabur India : देशातील अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने डाबर इंडियाला मोठा दणका दिला आहे. कंपनीच्या काही खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर करण्यात आलेले ‘100%’ शुद्ध किंवा ‘100%’ नैसर्गिक असे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईत डाबरचे मध, तूप, खोबरेल तेल, च्यवनप्राशसह काही इतर खाद्यपदार्थांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. FSSAI च्या मते, ‘100%’ हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या पडताळता येणारा नसल्यास किंवा तो ग्राहकांना चुकीचा संदेश देत असेल, तर अशा प्रकारचे लेबलिंग अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन ठरू शकते. अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये पारदर्शकता राखणे आणि ग्राहकांची फसवणूक होऊ न देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे. अन्न कंपन्यांनी उत्पादनांवर अतिशयोक्त किंवा दिशाभूल करणारे दावे टाळावेत, असेही नियामक संस्थेने नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अन्नपदार्थांच्या जाहिराती आणि लेबलिंगबाबतचे नियम अधिक कठोरपणे लागू केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, इतर कंपन्यांनाही त्यांच्या उत्पादनांवरील दाव्यांची फेरतपासणी करावी लागू शकते.

Dabur India : FSSAI ची डाबरला नोटीस; ‘100%’ दाव्यांमुळे अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले

Chhagan Bhujbal : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील विविध भागांत होर्डिंग्ज लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या होर्डिंग्जमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त करा,” असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, नाशिकला सध्या पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. अनुभवी आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यास खड्ड्यांसह शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांचा मुद्दा आता राजकीय रंग घेत असून, येत्या काळात यावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले Read More »

brij bhushan sharan singh

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण : बृजभूषण शरण सिंह यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील सहआरोपी आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सचिव विनोद तोमर यांनाही न्यायालयाने दिलासा दिला. हे प्रकरण 2023 मध्ये देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहा महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी निकाल राखून ठेवला होता आणि आज अंतिम निकाल देत सर्व आरोपांतून त्यांची मुक्तता केली. निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी ही न्यायालयीन प्रक्रिया सत्याचा विजय असल्याचे सांगत, “माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला असता तर कोणतीही शिक्षा स्वीकारली असती. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामुळे 2023 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे देशभरात मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली होती.

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण : बृजभूषण शरण सिंह यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता Read More »

sanjay raut

Sanjay Raut: संजय राऊत यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका

Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी मिळून “हरवले आहेत” या आशयाची जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे. “देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह हरवले आहेत. संसदेत या दोघांचे खासदारांनाही दर्शन झाले नाही. संसद चालवायची नसेल तर ती इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरच चालवा. २० हजार कोटी रुपये खर्च करून संसद भवन उभारण्याची गरज काय होती?” असा सवाल त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “जे गृहमंत्री ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देतात, त्यांनी त्या पदावर राहावे का, याचा विचार त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी करायला हवा. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहोत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत ते म्हणाले, “पुण्यात रात्रीच्या अंधारात गेले, पण जनतेसमोर का येत नाहीत? दहशतीच्या मार्गाने निवडणूक जिंकली तर तीच दहशत नंतर छळते.” संघाच्या विचारधारेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “संघाची विचारधारा भारतीय संविधानाला मानत नाही. ५२ वर्षे संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला गेला नव्हता. त्यांना संविधान संपवायचे आहे. मात्र आंदोलन संविधानानुसार नव्हते, असे म्हणणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.” यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आवाहन करत, “जंतर-मंतरवरील आंदोलन संविधानानुसार होते की नाही, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच अतुल लिमये यांच्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का, हेही सांगावे,” अशी मागणी केली. राऊत यांनी दावा केला की, “संघातून वेगळा आवाज निघत असेल, तर मोदींनी संघात आपली माणसे पेरली आहेत.” तसेच, “आमच्या पराभवासाठी ८० हजार बैठका घेण्यात आल्या,” असाही आरोप त्यांनी केला. राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “राम मंदिरासाठी सर्वांनी बलिदान दिले आहे, केवळ संघाने नाही.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “फडणवीसांनी आधी केंद्रात येऊन शिक्षणमंत्री म्हणून काम करावे आणि त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करावा. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या मोदींच्या नजरेत फडणवीस असल्याचे दिसते.” स्वतःविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले, “माझ्यावर नेमका कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला, हे मला माहिती नाही. आमच्यावर किती गुन्हे दाखल करणार? आमचे आयुष्यच गुन्ह्यांशी लढण्यात गेले आहे.” जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “जयकुमार गोरे यांनी ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य कोणत्या आचारसंहितेत बसते? ते शिवसेना प्रमुख आहेत. आम्ही त्याला उत्तर दिले तर त्याला हुकूमशाही म्हटले जाते.” शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले, “त्यांनी माझ्या आसपासही फिरू नये. मला ओळखायचा प्रयत्न केला तर ते स्वतः अडचणीत येतील.”

Sanjay Raut: संजय राऊत यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका Read More »

Money

Rules Change: देशात आजपासूनआर्थिक नियमांमध्ये बदल; आयकर, तत्काळ तिकीट, बँकिंग सेवांवर होणार परिणाम

Rules Change: आजपासून (1 ऑगस्ट 2026) सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेतील बदल, बँकांच्या सेवा शुल्कातील सुधारणा आणि क्रेडिट कार्ड नियमांमुळे नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आयकर रिटर्नची अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. मुदतीत रिटर्न न भरल्यास लागू नियमांनुसार दंड भरावा लागू शकतो. तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये बदल रेल्वेच्या तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रियेत काही ठिकाणी टोकन-आधारित व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास आणि तिकीट वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बँक आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल काही बँकांनी क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स, सेवा शुल्क, विलंब शुल्क तसेच एसएमएस अलर्ट शुल्कामध्ये बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अद्ययावत अटी व शुल्काची माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एलपीजी दर आणि अन्य बदल दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणे एलपीजी सिलिंडरच्या दरांचा आढावाही घेण्यात आला आहे. तसेच काही आर्थिक आणि बँकिंग प्रक्रियांमध्येही बदल लागू झाले असून त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. या बदलांमुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार, कर भरणा आणि बँकिंग सेवा वापरताना नव्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक खबरदारी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Rules Change: देशात आजपासूनआर्थिक नियमांमध्ये बदल; आयकर, तत्काळ तिकीट, बँकिंग सेवांवर होणार परिणाम Read More »

dhanjay mumde

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना मंत्रिपदावर भाष्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. धनंजय मुंडे म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो नागरिकांना मोठा आधार दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने संकटाचा सामना केला, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नाईक कुटुंबावर जगदंबेचा आशीर्वाद असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांच्या राजकीय वाटचालीचाही गौरव केला. स्वतःच्या राजकीय आयुष्याचा उल्लेख करताना धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्दांत खंत व्यक्त केली. “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही. आम्हा दोघांपैकी एकाला मात्र घरी बसावं लागलं,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि स्वतःचे समाजाशी असलेले नाते अतूट असल्याचे सांगितले. “मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता है, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत Read More »

amol khatal

Amol Khatal : काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा

Amol Khatal : निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी आमदार अमोल खताळे यांच्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याचिका दाखल केली आहे दरम्यान खताळ यांची याची का न्यायालयाने फेटाळले आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून विजय आपलाच होईल तसेच काहींना पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले अशा शब्दात आमदार खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना आमदार म्हणाले मला न्यायपालिकेवरती विश्वास आहे. संगमनेरच्या जनतेचा व माझा विजय होईल याबाबत मला खात्री आहे. न्यायालयाने केवळ याचिका सुनावण्यासाठी स्वीकारली मात्र काही जणांना स्वप्न पडायला लागले की आपण मुख्यमंत्री होऊ आम्ही आमदार होऊ असे शब्दात खताळ यांनी काँग्रेसचे नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला तसेच पुढे बोलताना खताळ म्हणाले 40 वर्षे तुम्हाला सत्ता मिळाली मात्र तुमचा पराभव अवघ्या 42 वर्षाच्या तरुणाने केला. संगमनेर चा तसे मतदारसंघाचा विकास हा माझ्या माध्यमातून केला जाईल असा आश्वासन यावेळी खताळ यांनी उपस्थितांना दिले नेमक प्रकरण काय? संगमनेर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार खताळ यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. नीलकमल नावाची भागीदारी संस्था असून, त्याचा 54 हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता. ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आल्याची तक्रार आहे. यावर यांनी या फर्मचे आपण भागीदार नसून, ती विसर्जित झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, थोरात यांच्या वकिलांनी जीएसटी संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी सादर करत ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणी खताळ यांनी थोरात यांची याचिका सुरुवातीलाच रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथेही त्यांना दिलासा न मिळता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

Amol Khatal : काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये

Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती. मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे. अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये Read More »