DNA मराठी

हायलाईट

team india

Ind vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन 4 खेळाडूंचा समावेश

Ind vs SL : भारताचा आगामी श्रीलंका दौरा लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने विशेष तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेतील फिरकीला पोषक खेळपट्ट्यांचा विचार करून मुख्य संघासोबत चार युवा फिरकी गोलंदाजांना नेट बॉलर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये विप्राज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन आणि शिवांग कुमार यांचा समावेश आहे. सरावादरम्यान भारतीय फलंदाजांना विविध प्रकारच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करता यावा आणि सामन्यांपूर्वी त्यांची तयारी अधिक भक्कम व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. गेल्या काही मालिकांमध्ये फिरकीविरुद्ध भारतीय फलंदाजांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी संघ व्यवस्थापनाने सरावावर विशेष भर दिला आहे. विशेषतः युवा लेगस्पिनर विप्राज निगमसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. वरिष्ठ भारतीय खेळाडूंना गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच हर्ष दुबे, तनुष कोटियन आणि शिवांग कुमार यांनाही राष्ट्रीय संघाच्या वातावरणात काम करण्याची आणि प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ फिरकीविरुद्ध अधिक सक्षम कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार असून, नेट बॉलर्सची ही निवड त्याच तयारीचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे.

Ind vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन 4 खेळाडूंचा समावेश Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले

Chhagan Bhujbal : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील विविध भागांत होर्डिंग्ज लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या होर्डिंग्जमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त करा,” असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, नाशिकला सध्या पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. अनुभवी आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यास खड्ड्यांसह शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांचा मुद्दा आता राजकीय रंग घेत असून, येत्या काळात यावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले Read More »

brij bhushan sharan singh

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण : बृजभूषण शरण सिंह यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील सहआरोपी आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सचिव विनोद तोमर यांनाही न्यायालयाने दिलासा दिला. हे प्रकरण 2023 मध्ये देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहा महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. न्यायालयाने 2 जुलै 2026 रोजी निकाल राखून ठेवला होता आणि आज अंतिम निकाल देत सर्व आरोपांतून त्यांची मुक्तता केली. निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी ही न्यायालयीन प्रक्रिया सत्याचा विजय असल्याचे सांगत, “माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला असता तर कोणतीही शिक्षा स्वीकारली असती. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामुळे 2023 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे देशभरात मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली होती.

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण : बृजभूषण शरण सिंह यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता Read More »

sanjay raut

Sanjay Raut: संजय राऊत यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका

Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी मिळून “हरवले आहेत” या आशयाची जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे. “देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह हरवले आहेत. संसदेत या दोघांचे खासदारांनाही दर्शन झाले नाही. संसद चालवायची नसेल तर ती इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरच चालवा. २० हजार कोटी रुपये खर्च करून संसद भवन उभारण्याची गरज काय होती?” असा सवाल त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “जे गृहमंत्री ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देतात, त्यांनी त्या पदावर राहावे का, याचा विचार त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी करायला हवा. आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहोत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत ते म्हणाले, “पुण्यात रात्रीच्या अंधारात गेले, पण जनतेसमोर का येत नाहीत? दहशतीच्या मार्गाने निवडणूक जिंकली तर तीच दहशत नंतर छळते.” संघाच्या विचारधारेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “संघाची विचारधारा भारतीय संविधानाला मानत नाही. ५२ वर्षे संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला गेला नव्हता. त्यांना संविधान संपवायचे आहे. मात्र आंदोलन संविधानानुसार नव्हते, असे म्हणणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.” यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आवाहन करत, “जंतर-मंतरवरील आंदोलन संविधानानुसार होते की नाही, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. तसेच अतुल लिमये यांच्या वक्तव्याशी ते सहमत आहेत का, हेही सांगावे,” अशी मागणी केली. राऊत यांनी दावा केला की, “संघातून वेगळा आवाज निघत असेल, तर मोदींनी संघात आपली माणसे पेरली आहेत.” तसेच, “आमच्या पराभवासाठी ८० हजार बैठका घेण्यात आल्या,” असाही आरोप त्यांनी केला. राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “राम मंदिरासाठी सर्वांनी बलिदान दिले आहे, केवळ संघाने नाही.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “फडणवीसांनी आधी केंद्रात येऊन शिक्षणमंत्री म्हणून काम करावे आणि त्यानंतर पंतप्रधानपदाचा विचार करावा. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या मोदींच्या नजरेत फडणवीस असल्याचे दिसते.” स्वतःविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले, “माझ्यावर नेमका कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला, हे मला माहिती नाही. आमच्यावर किती गुन्हे दाखल करणार? आमचे आयुष्यच गुन्ह्यांशी लढण्यात गेले आहे.” जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “जयकुमार गोरे यांनी ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य कोणत्या आचारसंहितेत बसते? ते शिवसेना प्रमुख आहेत. आम्ही त्याला उत्तर दिले तर त्याला हुकूमशाही म्हटले जाते.” शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले, “त्यांनी माझ्या आसपासही फिरू नये. मला ओळखायचा प्रयत्न केला तर ते स्वतः अडचणीत येतील.”

Sanjay Raut: संजय राऊत यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान, गृहमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका Read More »

Money

Rules Change: देशात आजपासूनआर्थिक नियमांमध्ये बदल; आयकर, तत्काळ तिकीट, बँकिंग सेवांवर होणार परिणाम

Rules Change: आजपासून (1 ऑगस्ट 2026) सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेतील बदल, बँकांच्या सेवा शुल्कातील सुधारणा आणि क्रेडिट कार्ड नियमांमुळे नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आयकर रिटर्नची अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. मुदतीत रिटर्न न भरल्यास लागू नियमांनुसार दंड भरावा लागू शकतो. तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये बदल रेल्वेच्या तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रियेत काही ठिकाणी टोकन-आधारित व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास आणि तिकीट वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बँक आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल काही बँकांनी क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स, सेवा शुल्क, विलंब शुल्क तसेच एसएमएस अलर्ट शुल्कामध्ये बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अद्ययावत अटी व शुल्काची माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एलपीजी दर आणि अन्य बदल दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणे एलपीजी सिलिंडरच्या दरांचा आढावाही घेण्यात आला आहे. तसेच काही आर्थिक आणि बँकिंग प्रक्रियांमध्येही बदल लागू झाले असून त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. या बदलांमुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार, कर भरणा आणि बँकिंग सेवा वापरताना नव्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक खबरदारी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Rules Change: देशात आजपासूनआर्थिक नियमांमध्ये बदल; आयकर, तत्काळ तिकीट, बँकिंग सेवांवर होणार परिणाम Read More »

dhanjay mumde

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना मंत्रिपदावर भाष्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. धनंजय मुंडे म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो नागरिकांना मोठा आधार दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने संकटाचा सामना केला, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नाईक कुटुंबावर जगदंबेचा आशीर्वाद असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांच्या राजकीय वाटचालीचाही गौरव केला. स्वतःच्या राजकीय आयुष्याचा उल्लेख करताना धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्दांत खंत व्यक्त केली. “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही. आम्हा दोघांपैकी एकाला मात्र घरी बसावं लागलं,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि स्वतःचे समाजाशी असलेले नाते अतूट असल्याचे सांगितले. “मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता है, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत Read More »

amol khatal

Amol Khatal : काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा

Amol Khatal : निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी आमदार अमोल खताळे यांच्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याचिका दाखल केली आहे दरम्यान खताळ यांची याची का न्यायालयाने फेटाळले आहे. आपल्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून विजय आपलाच होईल तसेच काहींना पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले अशा शब्दात आमदार खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना आमदार म्हणाले मला न्यायपालिकेवरती विश्वास आहे. संगमनेरच्या जनतेचा व माझा विजय होईल याबाबत मला खात्री आहे. न्यायालयाने केवळ याचिका सुनावण्यासाठी स्वीकारली मात्र काही जणांना स्वप्न पडायला लागले की आपण मुख्यमंत्री होऊ आम्ही आमदार होऊ असे शब्दात खताळ यांनी काँग्रेसचे नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वरती जोरदार निशाणा साधला तसेच पुढे बोलताना खताळ म्हणाले 40 वर्षे तुम्हाला सत्ता मिळाली मात्र तुमचा पराभव अवघ्या 42 वर्षाच्या तरुणाने केला. संगमनेर चा तसे मतदारसंघाचा विकास हा माझ्या माध्यमातून केला जाईल असा आश्वासन यावेळी खताळ यांनी उपस्थितांना दिले नेमक प्रकरण काय? संगमनेर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणूक लढताना, प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार खताळ यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. नीलकमल नावाची भागीदारी संस्था असून, त्याचा 54 हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता. ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आल्याची तक्रार आहे. यावर यांनी या फर्मचे आपण भागीदार नसून, ती विसर्जित झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, थोरात यांच्या वकिलांनी जीएसटी संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी सादर करत ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणी खताळ यांनी थोरात यांची याचिका सुरुवातीलाच रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तिथेही त्यांना दिलासा न मिळता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

Amol Khatal : काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा Read More »

rishikesh shete

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर

Ram Shinde : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्ह्यातील नेतेमंडळींची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. नुकतेच त्यांनी माजी खासदार यशववंतराव गडाख यांची भेट घेतली मात्र त्यांच्या याच कृतीमुळे भाजपमधील काही निष्ठावंत नाराज झालेले आहे. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका अशा शब्दात भाजपचे युवानेते ऋषिकेश शेटे यांनी शिंदे यांच्या भेटीचा खरपूस शब्दात समाचार घेतला. माननीय राम शिंदे साहेब सप्रेम नमस्कार माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका. शंकर यशवंतराव गडाख या माणसाने नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याना उबाठा काळात मंत्री असताना भयानक त्रास दिला , गोळीबार केले, भाजप ला सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेत तळे फोडले, पाण्याच्या पाइपलाइन फोडल्या, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे साधन असलेले ऊस पेटून दिले , ऊसाच्या खोडक्या केल्या, खोट्या एट्रोसिटी दाखल केल्या,कलम ३०७ दाखल करून शेतकरी जेल मध्ये पाठवले व त्यांचे प्रपंच संपवले. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी ज्याने भाजप चे असंख्य कार्यकर्त्याला त्रास दिला, तुमची अशी गळाभेट घेणे कार्यकर्त्यांना आवडलेले नाही त्यांची तुमच्यावर प्रचंड नाराजी आहे. शिंगणापूर देवस्थान मध्ये हजारो कोटी भ्रष्टाचार कुणामुळे झाला खरे कारणीभूत तुम्ही आणि बाळासाहेब मुरकुटे आहात तुम्ही पालकमंत्री असताना शिंगणापूर देवस्थान गडाखांना सेटलमेंट करून दिल ते कसे दिले हे जनतेला सांगायला लाऊ नका त्याचे सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत आणि तुम्ही कितीही यांना भेटले तरी हे मतदान तुम्हाला करणार नाही हे लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला मतदान करण्याच्या बोलीवर तुमच्या कडून काहीतरी पाप धुण्याची बोली करणार . शंकर गडाख ह्या व्यक्तीस भाजप मधे घेण्याचा प्रयत्न करू नये .एक लक्षात ठेवा तुम्ही विधानसभेला पराभूत होणे सोपे नव्हते परंतु तुम्ही शनी देवस्थान 2017 – 18 ल सेटलमेंट करून विकले म्हणून तुम्हाला शनी ने उत्तर दिले. गडाखांच्या आयुष्यात सर्व संकट येते त्याला कारण देखील शनिवार आणि शनि देवाचा कोप आहे हा तुम्ही तुमच्यावर घेऊ नका आणि हे सगळं बोलून मला त्रास होणार असेल तर संघर्ष आमच्या रक्तात आहे कारण मी खानदानी भाजपा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षासाठी आणि आमचे रक्त सांडले आहे. मात्र तुमच्या अशा सेटलमेंट वृत्तीमुळे, तुमच्या विरोधात भाजप कार्यकर्ते एकवटतील हे लक्षात घ्या अशा शब्दात ऋषिकेश शेटे यांनी आपला राग व्यक्त केला.

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये

Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती. मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे. अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये Read More »

ajinkya rahane

Ajinkya Rahane : मोठी बातमी! अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Ajinkya Rahane : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावनिक संदेश आणि व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. रहाणेच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका यशस्वी आणि संयमी फलंदाजाच्या प्रवासाचा शेवट झाला आहे. रहाणे यांनी भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिनिधित्व केले. विशेषतः परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिले. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. ही कामगिरी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षणांपैकी एक मानली जाते. शांत स्वभाव, संयमी फलंदाजी आणि संकटसमयी संघाची जबाबदारी उचलण्याची क्षमता यामुळे रहाणे यांना भारतीय क्रिकेटमध्ये विशेष स्थान मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शतके आणि अर्धशतके झळकावत मधल्या फळीत भारताचा भक्कम आधारस्तंभ म्हणून भूमिका बजावली. निवृत्ती जाहीर करताना रहाणे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रहाणे यांनी देशांतर्गत क्रिकेट किंवा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे आगामी हंगामात ते देशांतर्गत क्रिकेट आणि IPL मध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कायम आहे. रहाणे यांच्या निवृत्तीनंतर क्रिकेटविश्वातील अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंनी त्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये शांत, शिस्तबद्ध आणि संघहिताला प्राधान्य देणारा खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणे यांची कायम आठवण राहील.

Ajinkya Rahane : मोठी बातमी! अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती Read More »