DNA मराठी

ऑटोमोबाईल

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पैसे वाढणार? खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे

Ladki Bahin Yojana : राज्यातील लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत सध्या मिळणारे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. राज्यातील लाखो महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. आता ही मदत २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेल्या अहवालात महागाई आणि वाढता खर्च लक्षात घेऊन अशा योजनांमधील आर्थिक मदतीचा वेळोवेळी आढावा घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थींना मिळणारी रक्कम वाढवण्याचाही विचार करण्यात यावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचेही सांगण्यात आले आहे. महिलांच्या बँक खात्यातील बचत वाढली असून, घरखर्च, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा मोठा उपयोग होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. मात्र, १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सध्या ही केवळ शिफारस असून, सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच याबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पैसे वाढणार? खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १ ते ३ जुलैदरम्यान ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल ३६० बावधन, पुणे यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित Read More »

railway

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्‍यासाठी राज्‍यसरकार सकारात्‍मक असून, यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळास दिली. पुणे-नाशिक हायस्‍पीड रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्‍हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने अहिल्‍यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्‍ह्यातील लोकप्रतिनिधींच्‍या शिष्‍टमंडळाने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या मार्गाबाबत सविस्‍तर चर्चा केली. माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील, आ.डॉ.किरण लहामटे, आ.सरोज अहिरे, आ.अमोल खताळ, आ.शरद सोनवणे, आ.बाबाजी काळे या प्रसंगी उपस्थित होते. शिष्‍टमंडळाने पुणे-नाशिक रेल्‍वे मार्ग पहिल्‍या प्रस्‍तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा अशी आग्रही मागणी करताना हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्‍यानगर या जिल्‍ह्यांच्‍या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्‍यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आराखड्यात केलेले बदल प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता करण्‍यात आल्‍याची बाब चर्चेदरम्‍यान मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली. या रेल्‍वे मार्गाबाबत राज्‍य सरकार सकारात्‍मक असून, यासाठी निधीचीही तरतुद केलेली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्‍याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्‍पाची तांत्रिक अचुकता व कालबध्‍द अंमलबजावणी सुनिश्चित करण्‍यासाठी तज्‍ज्ञांची उच्‍च्‍स्‍तरीय समिती स्‍थापन करुन, याबाबतचा अहवाल मागविण्‍यात येईल. समितीकडून येणा-या अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्‍तावित रेल्‍वे मार्गाबाबत आपण स्‍वत: पाठपुरावा करु अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्‍टमंडळाला दिली. राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्ग जात असलेले क्षेत्र संपुर्ण बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याची बाब निदर्शनास आणून देत प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्‍दारे करण्यात आली. यावेळी आ.प्राजक्त तनपुरे, आ.विठ्ठलराव लंघे पाटील व आ. अक्षय कर्डिले हे उपस्थित होते.

Pune-Nashik High-Speed Railway : पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, CM फडणवीसांची ग्वाही Read More »

Gold

Gold Price Today: सोनं आणखी स्वस्त, चांदी मात्र महागली; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारात देखील दिसून येत आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मोठी घसरण झाल्यानंतर शुक्रवारीही सोन्याचे दर कमी झाले. मात्र, याउलट चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. बाजारातील माहितीनुसार, 10 ग्रॅम सोन्याच्या दरात सुमारे 1,368 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा सरासरी भाव आता सुमारे 1.46 लाख रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात प्रति किलो सुमारे 3 हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली असून तिचा भाव 2.32 लाख रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नसराईचा हंगाम संपल्याने सोन्याची मागणी कमी झाली आहे. तसेच अनेकजण जुने सोने विकत असल्याने बाजारात पुरवठा वाढला असून त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. त्यामुळे सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

Gold Price Today: सोनं आणखी स्वस्त, चांदी मात्र महागली; जाणून घ्या नवीन दर Read More »

student

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

MHT-CET : एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.ई., बी.टेक. तसेच पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अधिकृत सुरुवात केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ३ जुलै ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची ऑनलाइन पुष्टी (Confirmation) करण्याची संधी असेल. विद्यार्थी ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करू शकतात. प्रवेश प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. १५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै दरम्यान हरकती नोंदवता येतील. सर्व हरकतींची छाननी झाल्यानंतर २० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पर्याय नोंदणी (Option Form) आणि सीट वाटपाच्या पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर होईल. यंदा प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कागदपत्र पडताळणीची सुविधा शनिवार आणि रविवारही सुरू ठेवण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विद्यार्थी स्क्रुटिनी केंद्रात जाऊन किंवा निवडलेल्या पद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. दरम्यान, यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले गुण सुधारण्याची संधी मिळवली. आता प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि पडताळणीची प्रक्रिया शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

MHT-CET : CET Cell कडून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 12 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी Read More »

img 20260630 wa0003

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला. आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

anna hajare

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम

Anna Hajare : माहितीचा अधिकार कायद्यातील दुरूस्तीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हजारे उपोषणावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर आयोगाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आणि हजारे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या कायद्याच्या नियमावलीत सरकारने काही बदल केले आहेत. ते बदल अन्यायकारक असल्याचे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य आयुक्त पांडे, पुणे विभागाचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, छत्रपती संभाजीनगर विभागीय माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर आज बुधवारी राळेगणसिद्धीमध्ये आले होते. त्यांनी हजारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी हजारे यांचे कायदेशीर सल्लागार अॅड. श्याम आसावा, दादा पटारे, दत्ता आवारी उपस्थित होते. आयुक्त पांडे यांच्याकडे हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांना न विचारता परस्पर दुरूस्ती करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यासंबंधी समिती नियुक्त करावी, समितीच्या सूचना घेऊन त्यानुसार बदल करावेत, तोपर्यंत या तरतुदी स्थगित ठेवाव्यात अशी मागणी केली. यावर या भावना सरकारला कऴविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे आंदोलनावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. आता सरकार पुढे काय भूमिका घेणार, पुढील चर्चा करण्यासाठी कोण येणार, याकडे लक्ष लागले आहे.

Anna Hajare : मुख्य माहिती आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; अण्णा हजारे आंदोलनावर ठाम Read More »

Bavankule

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये संरक्षण साहित्य निर्मिती उद्योगास शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील शेती महामंडळाची ४ हजार २०० एकर जागा दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प या तीन महत्वपूर्ण उद्योगांसाठी मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी डीआरडीओला ( संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) १५०० एकर, सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १२०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टीरीज लिमिटेडला १५०० एकर अशी ४२०० एकर जागा देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 49 वर्षांच्या करारावर देणार जमीन या संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरारावर (लीजवर) देण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले असून, तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण या संस्थांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २,३०० एकर आणि अन्य १,६०० एकर अशी एकूण ३,९०० एकर अकारी पड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे उपसमितीने स्पष्ट केले.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये संरक्षण साहित्य निर्मिती उद्योगास शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन Read More »

img 20260622 wa0041

Vikhe Patil: सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार

Vikhe Patil: महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातर्गत विविध प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. कार्यक्रमाच्या टप्पा दोन अंतर्गत होणाऱ्या या कामातून कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पातील कामांसाठी गती मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी आमदार सत्यजित पाटील , आमदार अमोल जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक जयंत गवळी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्यातील पूर्ण झालेल्या १५५ जलसिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी ५ हजार ३६ कोटी रुपये तरतुदीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नाबार्ड च्या माध्यमातून निधी उपलब्धतेच्याया दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कामास गती दिली जाईल. अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणेसाठी या टप्प्यातील ७५०० कोटीपैकी गोदावरी व कृष्णा खो-यात निधी उपलब्ध होणार असून सदयस्थिती झालेला खर्चबाबतचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षमता यामधील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत २१ प्रकल्पांना व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर एकूण ३१ प्रकल्पांच्या बाबत चर्चा करण्यात आली. गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा २ मधून टप्पा १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती व भोजापूर मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचा प्रथम टप्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Vikhe Patil: सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा

Nilesh Lanke: पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा १७ जून पासून सुरू होत आहे. या रेल्वे सेवेचा शुभारंभ पुणे येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचवेळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी याबाबत खासदार नीलेश लंके यांना पत्राद्वारे माहिती दिली असून, मध्य रेल्वेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. पुणे–साईनगर शिर्डी या थेट रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शैक्षणिक कारणांसाठी ये-जा करणारे विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे संपर्क अधिक सक्षम झाल्याने या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवे परिमाण प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पुण्याशी अधिक प्रभावी रेल्वे संपर्क उपलब्ध व्हावा तसेच धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार व्हावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी या मार्गावरील रेल्वे सेवेची आवश्यकता अधोरेखित केली होती. याशिवाय संसदेतील चर्चांपासून ते रेल्वे समित्यांच्या बैठका, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चासत्रे आणि रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनांमधून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन रेल्वे सेवा, प्रवासी सुविधांमध्ये वाढ आणि तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी सातत्याने मांडली होती. या सर्व प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रवाशांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या रेल्वे सेवेचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा Read More »