Vijay Wadettiwar on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून राजकीय वर्तुळात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. विमान अपघातात अजित पवारांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे.
विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.
पहाटेपासून कामात व्यग्र असणारे, प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते “दादा” होते.
एकदा शब्द दिला की ते काम पूर्ण करणारे, प्रामाणिक आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले होते.
महाराष्ट्रासाठी अजून मोठे कार्य त्यांच्या हातून व्हायचे असताना नियतीने हा घात केला. अजित दादा यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे धैर्य लाभो. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!






