DNA मराठी

Tukaram Munde

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित

Tukaram Munde: अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ.अ. भोईटे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला. संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार या दूध संकलन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही भोईटे यांनी केले आहे.

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित Read More »

tukaram munde

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून जोरदार कारवाया सुरू केल्या आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यातच नगर शहरात देखील मुंढे हे एक्शन मॉडमध्ये दिसून आले आहे. शहरातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हॉटेलवर कारवाई करत थेट हॉटेलच्या परवाना निलंबित करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने अस्वच्छतेचा ठपका ठेवत नगर पुणे रस्त्यावरील प्रसिद्ध ‘हॉटेल संगम’ आणि ‘हॉटेल सत्कार’ या हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. शहरात सध्या अन्न सुरक्षा मोहिमेअंर्तगत विविध आस्थापनांची तपासणी सुरू असून, या हॉटेल्समध्ये अत्यंत अस्वच्छता आढळल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने ही कायदेशीर कारवाई केली आहे. आयुक्त मुंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून राज्यभरात अवैध गुटखा, दूध भेसळ आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेवर कारवाईचा धडाका लावला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील इतर हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १ ते ३ जुलैदरम्यान ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल ३६० बावधन, पुणे यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित Read More »

img 20260630 wa0003

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला. आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

tukaram munde

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Shevgao Police: पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, यादव बेकरी समोर (वरवट बकाल रोड) रात्रीच्या सुमारास तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळ पर्यंत हि कारवाई सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री २२:१० वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किंता वसावे (अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक (क्र. MH-40-GT-2965) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला. यामध्ये बाजीराव गोल्ड पानमसाला: ५० पोते, मस्तानी तंबाखू ११ पोते, नजर १००० पानमसाला व N-05 प्रीमियम तंबाखू: एकूण ५० पोते, प्रीमियम नजर पोते, अशोक लेलँड ट्रूक असा एकूण जप्त मुद्देमाल: ७०,१३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सुरुर अहम्मद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) या ट्रक चालकला अटक करण्यात आली.तर M/S Shree Siddheshwar Tobacco Prod. PVT. LTD. (पांढुर्णा, छिंदवाडा, म.प्र.) चे मालक/भागीदार संचालक.या दोघांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त Read More »

img 20260605 wa0011

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला

Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला Read More »

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »