Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






