DNA मराठी

Shivsena

omraje nimbalkar

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा

Omraje Nimbalkar : एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर च्या चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनीही नेमके कारण माहित नसल्याचे सांगितले. “काही काम असेल म्हणून ते आले नसतील. बैठक तर त्यांच्या कार्यालयातच होत आहे,” असे म्हणत दानवे यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान ही अनुपस्थिती घडल्याने राजकीय वर्तुळात तिची अधिक चर्चा रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

mva

Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या जागांवर मविआ एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार

Vidhanparishad Election: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रामणावर सुरु आहे. विरोधकांचे नगरसेवक पळवले जात आहेत, ५-५ लाख रुपये ऍडव्हान्स दिले आहेत. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ चा खेळ सुरु आहे. सत्ताधारी मित्रपक्षांमध्येही पळवापळवी सुरु आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजपा महायुतीने घोडेबाजार बनवला आहे. भाजपा महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. विषारी दारुच्या बळीप्रकरणी पोलिसांना निलंबित करा पुण्यात विषारी दारूने १३ जणांचे बळी घेतले आहेत, घटना झाल्यानंतर कारवाईचे आदेश दिले असले तरी ज्या विभागात ही घटना घडली त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस उपायुक्त यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले. विधान परिषद निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती.. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघासाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणेसाठी विधान परिषदेतील गटनते सतेज ऊर्फ बंटी पाटील, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी माजी मंत्री के. सी. पाडवी, मराठवाड्यातील नांदेडसाठी खासदार रविंद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, परभणी हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, विदर्भातील यवतमाळसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, कोकण विभागातील ठाणे मतदार संघासाठी माजी मंत्री नसिम खान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या जागांवर मविआ एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार Read More »

maharashtra government

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तर दुसरीकडे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ निर्णय ▶सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार. (परिवहन विभाग) ▶शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) ▶डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता. (उद्योग विभाग) ▶नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता. (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय

Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात यशस्वी संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही संघटन बांधणीसाठी दौरे केले होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींवर भर देत त्यांनी कार्यकर्त्यांकडून सूचना, मते आणि स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत निवडणूक रणनीती आखली होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी अशा संवाद दौऱ्यांना महत्त्वपूर्ण मानले जाते. याच पद्धतीने आता पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दौरा असा असेल – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

uday samant

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय

Uday Samant : अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे थंडावलेले काम पाहता सामंत यांनी हे बदल केले असून येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी पावले उचलले जातील असं सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंत हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बनवतात मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची सुरू असलेली शिथिल वाटचाल यावर मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारणी बरखास्त करून केवळ जिल्हाप्रमुख नितीन अवताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील असे स्पष्ट आदेश दिले आहे. नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत अवतडे हेच काम पाहतील दरम्यान आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे राजकीय बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय Read More »

vaibhav naik

Vaibhav Naik on Nitesh Rane: नितेश राणे आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? वैभव नाईक भडकले

Vaibhav Naik on Nitesh Rane: मुख्यमंत्री पदावरुन राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे स्वतःहून झाले नाहीत, तर त्यांना त्यावेळी ‘महाविकास आघाडी’च्या लोकांनी आग्रह केला होता आणि भारतीय जनता पार्टीने जो ‘मातोश्री’मध्ये शब्द दिला होता तो शब्द फिरवला म्हणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागले. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी उद्धवजींची तेव्हा पण इच्छा होती. ​आज आपण बघितलं असेल की, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धवजींनी स्वतःहून विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली असती, त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता. परंतु, उद्धवजींनी नेहमीच पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं आणि म्हणूनच आज अनेक लोक मोठ्या-मोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. ​ नितेश राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? आपण काँग्रेसमधून जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं, तेव्हा काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं, पहिल्यांदा आमदार केलं आणि त्यानंतर त्या काँग्रेसला सोडून तुम्ही स्वतःचा पक्ष विसर्जित करून भाजपच्या पदराखाली गेलात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने निवडणुका जिंकतोय, त्यामुळे तुम्ही भाजपच्या नावावर निवडणूक जिंकलात तर ते काही मोठं नाहीये. ​पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते आजही एका शक्तीविरुद्ध लढत आहेत आणि ते कुठेही लाचारी करत नाहीत. जर लाचारी करायची असती तर उद्धवजींना अनेक पदं मिळाली असती आणि आज पण आपण बघितलं असेल की जो तुम्ही मोर्चा काढताय, जे काही सरकारच्या विरोधात, आपल्याच सरकारच्या विरोधात आहे. कारण तुम्ही कुठेतरी कमी पडला आहात आणि त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे करताय. ​परंतु आता मात्र तुमच्या राजकारणामध्ये, पुढच्या काळामध्ये तुमच्या राजकारणात ट्विस्ट येईल आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला किंमत नाहीये हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून वारंवार तुम्ही त्यांच्याविरुद्ध बोलताय. ​नारायण राणेंना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केल्यानंतर, पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सत्ता गेली आणि त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर बसले नाहीत. त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. पण तरीपण सत्ता आली नाही, त्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः आपण बघितलं असेल की, त्यानंतर सुद्धा आमची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये स्वतः कुठलं पद घेतलं नव्हतं. दुसऱ्या वेळी सत्ता आली तेव्हा सुद्धा ते कुठले सदस्य नव्हते, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचं नाव सगळ्यांनी सुचवलं म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याचबरोबर सदस्यत्वाचा पण राजीनामा ते त्यावेळी देणार होते. परंतु वरिष्ठांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्या शब्दाला मान म्हणून तो दिला नव्हता. ​आज पण उद्धवजींनी स्वतः म्हटलं असतं तर स्वतः पण सदस्य झाले असते. काही लोक आपण बघितलं असेल की ५०-५० वर्ष सदस्य म्हणून काम करतायत, परंतु उद्धवजींनी तसं केलं नाही, सामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिली असं वैभव नाईक म्हणाले. नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे? सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 1995 पासूनच षडयंत्र रचल्याचा आरोप राणे यांनी केला. राणेसाहेब आणि राज ठाकरे यांच्या विरोधातही घाणेरड्या पद्धतीने राजकारण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवून स्वतः मुख्यमंत्री झाल्याचाही आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्ता हातातून निसटत असल्यामुळे अंबादास दानवेंना पुढे केल्याची टीकाही राणे यांनी केली.

Vaibhav Naik on Nitesh Rane: नितेश राणे आपण कोणाची लाचारी करून पद घेतलेलं आहे? वैभव नाईक भडकले Read More »

devendra fadnavis

Marathi language : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचा मोठा निर्णय; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये होणार बदल

Marathi language : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (‘वर्किंग नॉलेज’) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना अर्जदाराच्या चारित्र्य व पार्श्वभूमीबरोबरच मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासण्याचा अधिकार परवाना प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. नवीन तरतुदीनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी (Authorization) देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असेल. यामुळे राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे. हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे. सुसंवादातून सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Marathi language : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचा मोठा निर्णय; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये होणार बदल Read More »

Vijay Wadettiwar: प्रकाशक प्रकाश आंबी यांना सुरक्षा द्या, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Vijay Wadettiwar: सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले थेट आक्रमण आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. आमदार गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रकाश आंबी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, शासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास असताना, एका आमदाराने जाहीरपणे हत्येची धमकी देणे ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची ऑडियो क्लिप व्हायरल होऊनही शासन गप्प का? गृहखात्याने तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Vijay Wadettiwar: प्रकाशक प्रकाश आंबी यांना सुरक्षा द्या, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »