DNA मराठी

Shivsena

amol khatal

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच

Amol Khatal : संगमनेर मध्ये प्रस्थापित बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून जॉईन केलं ठरलेले अमोल खताळ व थोरात यांचे भाचे असलेले आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये विकास कामावरून रस्सीखेच नेहमीच पाहायला मिळते यातच आता पुन्हा एका कामावरून श्रेयवादाची लढाई दोन्ही आमदारांमध्ये सोशल मीडिया वरती पाहायला मिळते. याला कारण म्हणजे लवकरच संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार हे आहे वादाचे कारण… मात्र या कार्यालयासाठी खरा पुढाकार कोणाचा? जे 40 वर्षे झाले नाही ते दीड वर्षात होणार संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची परिवहन सेवा संदर्भात वर्षानुवर्षेपासून होणारी गैर्यत दूर व्हावी आणि आरटीओचे संबंधित कामे स्थानिक पातळीवरच व्हावी त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व अखेर या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश आले यामुळे लवकरच संगमनेर मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साकारणार आहे अशी माहिती अमोल खताळ यांनी आपल्या सोशल मीडिया वरती दिली. तर याबाबत अमोल खताळ यांनी 23 जानेवारी 2025 पासून मंत्री सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यानंतर 2025 या वर्षात 20 फेब्रुवारी 21 मार्च 24 मार्च 5 जून तसेच 25 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत याबाबत खतांनी पाठपुरावा केला त्यानंतर अखेर एक जुलै 2020 रोजी परिवहन मंत्री सरनाईकांकडून मंजुरी बाबत सूचना देखील देण्यात आल्या अशी माहिती खुद्द खताळ यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर दिली आहे तसेच त्याबाबतचे दस्तावेज देखील त्यांनी सादर केले आहे. पाठपुराव्याला यश आले तांबे यांचा दावा संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे ही माजी अनेक वर्षांपासून ची सातत्यपूर्ण मागणी आहे संगमनेर अकोले आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नव्याने निश्चित झालेल्या शासनाच्या निकषानुसार संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय स्थापन होणे आवश्यक आहे याबाबत मंत्री सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या मागणीची दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या अशी फेसबुक पोस्ट विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. तांबे यांनी केलेला पाठपुरावा संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळावे यासाठी सत्यजित तांबे यांनी 17 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्यानंतर 24 मार्च 2025 रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत याबाबत मागणी लावून धरली तसेच 12 जुलै 2025 पावसाळी अधिवेशनात देखील याबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला होता अखेर आपण सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी नवीन आरटीओ कार्यालय साठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिले आहे असे देखील तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नाशिक पुणे रेल्वे वरून तांबे खताळ भिडले नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे गेली पाहिजे अशी भूमिका तांबे यांनी लावून धरली तसेच खताळ यांनी देखील आपली हीच भूमिका मांडली मात्र हा रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाकडून घेण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला तर केवळ राजकीय विरोध म्हणून या गोष्टीकडं पाहता विकास कामासाठी एकत्र यावे असे आव्हान खताळ यांनी देखील केले दरम्यान नाशिक पुणे रेल्वे मार्गासंदर्भात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत आमदारांची बैठक झाली तसेच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला मात्र रेल्वे रद्द झाल्या च्या कारणावरून तांबे व खताळ यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सुरूच होते. त्यामुळे टीकाटिपाने असो किंवा विकास कामांचे श्रेय घेणे संगमनेर मध्ये तांबे व खताळ या नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

Amol Khatal : खताळ- तांबेमध्ये वाद; आता विकास कामांच्या श्रेय घेण्यावरून रस्सीखेच Read More »

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार

Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अंतर्गत पातळीवर दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. माहितीनुसार, काही पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे करत आहे तर काही नेते सत्ताधारी एनडीएत सहभागी होण्याच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे आणि निधी मिळवताना अडचणी येत असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याबाबत पक्षात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होत असल्याने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचाही पर्याय विचारात घेतला जावा. त्यामुळे पक्षात दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आमदार पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, भविष्यात पक्षाची राजकीय दिशा काय असेल आणि या मतभेदांवर शरद पवार कोणता निर्णय घेतील, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घडामोडींबाबत विविध सूत्रांच्या आधारे चर्चा सुरू असून संबंधित पक्षाकडून अंतिम अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही.

Maharashtra Politics: शरद पवार गटात दोन ग्रुप? NDA की काँग्रेसमध्ये विलीन होणार Read More »

anna hazare

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही

Anna Hazare: माहिच्या अधिकार कायद्याच्या नियमांतील दुरूस्तीच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आता विविध संघटनांकडून नैतिक जबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मात्र, अधिकृतपणे संपर्क करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आज सरकारला आंदोलनासंबंधी स्मरणपत्र पाठविले आहे. या कायद्याच्या नियमांत सरकारने अलीकडेच बदल केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना माहिती मिळविणे अवघड जाणार आहे, असे सांगत हजारे यांनी या विरोधात 5 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिला आहे. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. मात्र, आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर हजारे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत काहीही तोडगा निघाला नसल्याने हजारे उपोषण करण्यावर ठाम राहिले. त्यानंतर सरकारकडून कोणीही अधिकृतपणे चर्चेसाठी आले नाही. तर दुसऱ्या बाजूला विविध सामाजिक संघटनांनी हजारे यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रश्न सुटल्याशिवाय आता माघार नाही, अशा निर्धार व्यक्त करीत या संघटनांनी आंदोलनासाठी नैतिक दबाव निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर आता हजारे यांनी सरकारला पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, मी 22 जून 2026 रोजी आपणास सविस्तर पत्र देऊन महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायद्यातील अनेक तरतुदी नागरिकांच्या माहितीच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या असल्याचे सविस्तर निदर्शनास आणून दिले होते. त्यामध्ये शासनाने या नियमांचा पुनर्विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे येवून भेट घेतली. त्यावेळेस आमच्यामध्ये अडीच तास माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश, नागरिकांच्या अडचणी आणि नवीन नियमांमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली. त्यांनी कोणताही कायदा अथवा नियमावली करण्याचे अधिकार शासनाकडे असल्याने आपल्या भावना आम्ही शासनास कळवितो, पुढील निर्णय शासन घेईल असे सांगितले होते. त्यामुळे सरकारने 12 जून 2026 रोजी लागू केलेली नियमावली रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुन्हा एकदा हा कायदा वाचविण्यासाठी प्राणपणास लावून उपोषण सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की. महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील नागरिकविरोधी व कायद्याच्या मूळ तत्त्वांना बाधा आणणाऱ्या सर्व तरतुदी तात्काळ स्थगित करून रद्द करण्यात याव्यात. माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, माहिती आयुक्त, वकील, पत्रकार आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करून नव्याने नियम तयार करण्यात यावेत. माहितीचा अधिकार अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा राहील याची शासनाने हमी द्यावी, अन्य़था ठरल्याप्रमाणे आंदोलन केले जाईल.

Anna Hazare: आंदोलनासाठी अण्णा हजारेंवर संघटनांचा दबाव तर सरकारकडून प्रतिसाद नाही Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर

Nilesh Lanke: अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे आम्ही निश्चित स्वागत करू असे स्पष्ट केले. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही राजकारणात संपर्क आणि संवाद कायम सुरू असतो, असे सांगताना भोर म्हणाले की, सर्वच पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असतात. काही जण शेवटपर्यंत ठाम भूमिका घेतात, तर काहींच्या राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू असतात. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाईल याबाबत आधीच निश्चितपणे सांगता येत नाही. आजच्या राजकारणात कोणताही नेता आयुष्यभर एकाच पक्षात राहील असे चित्र उरलेले नाही. हीच सध्याची राजकीय वास्तवता आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितले खासदार निलेश लंके हे मूळचे शिवसैनिक पक्षात आले तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वागत करू खासदार निलेश लंके यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, लंके हे पूर्वीपासून शिवसेनेशी जोडलेले असून त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी जुने संबंध आहेत. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संपर्क कधीच तुटत नसतात.शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना भोर म्हणाले, शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक इच्छुकाचे आम्ही शंभर टक्के स्वागत करू. मग ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतून असोत, काँग्रेसमधून असोत किंवा इतर कोणत्याही पक्षातून असोत. आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत, कारण ते सर्व आमचीच माणसे आहेत.संजीव भोर यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, आगामी काळात खासदार निलेश लंके यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nilesh Lanke: निलेश लंके शिवसेनेत आल्यास स्वागतच, आमची दारे कायम खुली ; शिवसेना प्रवक्ता संजीव भोर Read More »

img 20260625 wa0011

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी

Sanjay Raut : उबाठा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावला आहे. चिथावणीखोर भाषणाने राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. खासदार राऊतांवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी महिला सेनेच्या नेत्यांनी दिला. शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली. राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला. राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Sanjay Raut: शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय राऊतांवर कारवाई करा; शिवसेना महिला सेनेची मागणी Read More »

amol khatal

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा

Amol Khatal: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होत असलेल्या वीजखंडितीच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या लोडशेडिंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने हा प्रकार तातडीने बंद करून ग्रामीण भागाला अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे स्थानिक अधिकारी वरिष्ठ स्तरावरून वीज व्यवस्थापन (ईएलआर) लागू करण्याचे आदेश असल्याचे सांगत रात्री-अपरात्री तसेच सायंकाळच्या महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीजपुरवठा खंडित करत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांची तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज, लघुउद्योग, व्यावसायिक व्यवहार आणि कृषी क्षेत्रावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेला नियमित वीजपुरवठा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली सायंकाळची वीजखंडिती तात्काळ थांबविण्यात यावी आणि संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या स्पष्ट सूचना देऊन अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी ठाम मागणी आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा Read More »

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »

omraje nimbalkar

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा

Omraje Nimbalkar : एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर च्या चर्चा सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीला आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता अंबादास दानवे यांनीही नेमके कारण माहित नसल्याचे सांगितले. “काही काम असेल म्हणून ते आले नसतील. बैठक तर त्यांच्या कार्यालयातच होत आहे,” असे म्हणत दानवे यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान ही अनुपस्थिती घडल्याने राजकीय वर्तुळात तिची अधिक चर्चा रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ठाकरे गटाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांची दांडी अन् ऑपरेशन टायगरची चर्चा Read More »

img 20260605 wa0017

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय?

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षितच होता. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. निकालात धक्का नव्हता परंतु त्या निकालापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली. सामान्यतः बिनविरोध निवडणूक म्हणजे राजकीय सहमती, विकासाच्या मुद्यांवरील एकमत किंवा अनावश्यक संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असे मानले जाते. मात्र अहिल्यानगरात घडलेला घटनाक्रम वेगळेच वास्तव समोर आणतो. येथे बिनविरोध निवडीपेक्षा ती घडवून आणण्यासाठी वापरले गेलेले राजकीय व्यवस्थापन, स्थानिक नेतृत्वाची धडपड, राज्यस्तरीय हस्तक्षेपाची चर्चा आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली उत्सुकता अधिक चर्चेचा विषय ठरली. या निवडणुकीकडे केवळ एका विधान परिषद जागेच्या चौकटीत पाहून चालणार नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांत बदललेले जिल्ह्याचे राजकीय चित्र आहे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विचारसरणीशी जोडले गेलेले नेतृत्व. राहुरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांची झालेली निवड ही केवळ व्यक्तीची राजकीय प्रगती नाही ती राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांची अभिव्यक्ती आहे. महायुतीसाठी तनपुरे यांना विधान परिषदेत पाठवणे ही राजकीय विश्वासार्हतेची बाब बनली होती. दिलेला शब्द पाळण्याचा संदेश त्यातून जाणार होता. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यापेक्षा बिनविरोध जिंकणे अधिक महत्त्वाचे मानले जात होते. कारण बिनविरोध निवड म्हणजे संघटनात्मक ताकद, विरोधकांवरील प्रभाव आणि राजकीय व्यवस्थापनाचे प्रदर्शन. म्हणूनच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक स्तरांवर हालचाली सुरू होत्या. प्रारंभी सर्व काही नियोजनाप्रमाणे घडत असल्याचे चित्र होते. अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध होणार, याबद्दल कोणालाही शंका उरली नव्हती मात्र दत्तात्रय पानसरे यांनी संपूर्ण समीकरण बदलले. राजकारणात अनेकदा एखाद्या व्यक्तीचे राजकीय वजन तिच्या पदावरून नव्हे, तर योग्य वेळी निर्माण केलेल्या अडचणीवरून मोजले जाते. पानसरे यांच्या भूमिकेने हेच दाखवून दिले. त्यांच्या वतीने माघारीचा अर्ज दाखल झाला पण काही वेळातच त्यांनी त्या अर्जालाच आव्हान दिले. प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. आत्मदहनाचा इशाराही दिला. यानंतर केवळ निवडणूक प्रक्रियाच नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले. या घटनेतून पहिला धडा मिळतो तो स्थानिक नेतृत्वाच्या मर्यादांचा. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते, मंत्री, आमदार आणि संघटनात्मक ताकद असूनही दुपारनंतरचा पेच तात्काळ सोडवता आला नाही. अनेक चर्चांनंतरही पानसरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. स्थानिक पातळीवरील सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विषय राज्यस्तरावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख झाला. या चर्चांची अधिकृत पुष्टी नसली तरी त्यातून एक वास्तव अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण वाढत चालले आहे. पूर्वी जिल्ह्यातील प्रश्न जिल्ह्यात सुटत असत. आज मात्र अनेक प्रश्नांची अंतिम उत्तरं मुंबईत किंवा राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे शोधली जातात. हा बदल केवळ राजकीय नाही; तो संघटनात्मक संस्कृतीत झालेल्या परिवर्तनाचाही भाग आहे. या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाची भूमिका. निवडणूक प्रक्रियेला विशिष्ट नियम, वेळापत्रक आणि कायदेशीर चौकट असते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतरही रात्री साडेआठ वाजेपर्यंत घडामोडी सुरू राहिल्या. यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. उमेदवाराच्या हरकतीवर निर्णय घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली? प्राधिकृत पत्रावरील स्वाक्षरीबाबत नेमकी पडताळणी कशी करण्यात आली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी इतका कालावधी का लागला? लोकशाही व्यवस्थेत निवडणूक अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास हा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आधारित असतो. त्यामुळे अशा प्रसंगी केवळ निर्णय नव्हे, तर निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्गही तितकाच महत्त्वाचा असतो. या घटनेतील आणखी एक पैलू दुर्लक्षित करता येणार नाही. दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्जाचे अनुमोदक एमआयएमचे नगरसेवक शहाबाज सय्यद होते. त्यांच्या माध्यमातून माघारीचा अर्ज दाखल झाला. त्यानंतर प्राधिकृत पत्राच्या वैधतेवर वाद निर्माण झाला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता स्थानिक राजकारणातील विविध स्तरांवरील समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचे दर्शन घडते. अर्थात, या सर्व नाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी हा राजकीय विजय महत्त्वाचा आहे. विधान परिषदेत त्यांचा प्रवेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील नवा टप्पा ठरेल. महायुतीने दिलेला शब्द पाळल्याचा संदेश यातून गेला. जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परंतु या विजयाचा राजकीय अर्थ केवळ एवढाच नाही. हा विजय राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा, नव्या समीकरणांची निर्मिती आणि सत्ताधारी पक्षाच्या विस्तारवादी राजकारणाचाही भाग आहे. मात्र या विजयाच्या उत्सवात काही प्रश्न हरवू नयेत. लोकशाहीमध्ये बिनविरोध निवड हा आदर्श मानला जातो, पण ती बिनविरोधता कशी साध्य झाली, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. जर ती सहमतीतून आली असेल तर ती लोकशाहीची ताकद आहे. पण जर त्यामागे दबाव, समजुती, राजकीय गणिते आणि शेवटच्या क्षणापर्यंत चाललेले तणाव असतील, तर त्याचे वेगळे अर्थ निघतात. अहिल्यानगरच्या या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या राजकारणात विजय हा केवळ मतपेटीतून मिळत नाही; तो व्यवस्थापनातून, संपर्कातून, प्रभावातून आणि सत्तेच्या विविध स्तरांवरील समन्वयातूनही मिळतो. प्राजक्त तनपुरे यांचा विजय हा त्या व्यवस्थापनाचा यशस्वी शेवट ठरला. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी निर्माण केलेल्या पेचामुळे त्या व्यवस्थापनाच्या मर्यादाही उघड झाल्या. अखेरीस निकाल लागला, निवडणूक संपली आणि विजेत्याची घोषणा झाली. पण लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला, पण तो मार्ग नेमका कसा तयार झाला? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय या निवडणुकीचा संपूर्ण अर्थ समजणे कठीण आहे. कारण अनेकदा निवडणुकीचा खरा इतिहास निकालात नसतो; तो निकालाच्या आधी घडलेल्या घटनांमध्ये दडलेला असतो.

Ahilyanagar Politics: बिनविरोध ते मागचे राजकारण; पडद्यामागे नेमकं घडलं काय? Read More »

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »