DNA मराठी

Maharashtra Update

rbi

Bank Locker मध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्या तर बँक किती पैसे देणार? RBIचा नियम समजून घ्या

Bank Locker : बँकेच्या लॉकरमध्ये दागिने, महत्त्वाची कागदपत्रे किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवणे सुरक्षित मानले जाते. मात्र, लॉकरमधील वस्तू चोरीला गेल्या, लॉकरमध्ये आग लागली किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले तर बँक संपूर्ण नुकसानभरपाई देतेच असे नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा प्रकरणांसाठी नुकसानभरपाईची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. RBIचा 100 पट वार्षिक भाड्याचा नियम काय? RBIच्या सुधारित लॉकर नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाल्यास बँकेची जबाबदारी लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रकमेपर्यंत मर्यादित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या लॉकरचे वार्षिक भाडे ₹3,000 असेल, तर नुकसानभरपाईची कमाल रक्कम ₹3 लाख असेल. वार्षिक भाडे ₹5,000 असल्यास कमाल भरपाई ₹5 लाख आणि ₹10,000 असल्यास ₹10 लाखांपर्यंत असू शकते. याचा अर्थ लॉकरमध्ये ₹20 लाखांचे दागिने ठेवले असतील आणि ते चोरीला गेले, तरी केवळ लॉकरमध्ये ती रक्कम ठेवली होती म्हणून बँक ₹20 लाखांची भरपाई देईलच असे नाही. कोणत्या परिस्थितीत बँकेची जबाबदारी येते? लॉकरच्या सुरक्षिततेबाबत बँकेवर काही जबाबदाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, चोरी, दरोडा, आग, इमारत कोसळणे किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीमुळे लॉकरमधील वस्तूंचे नुकसान झाल्यास बँकेची जबाबदारी निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत RBIच्या नियमांनुसार भरपाईची मर्यादा वार्षिक भाड्याच्या 100 पट आहे. मात्र, प्रत्येक प्रकारच्या नुकसानीसाठी बँक आपोआप जबाबदार ठरत नाही. लॉकरमधील वस्तूंची माहिती बँकेकडे नसते आणि लॉकरमध्ये नेमके काय ठेवले आहे याची बँक तपासणी करत नाही. त्यामुळे लॉकरमधील वस्तूंच्या पूर्ण बाजारमूल्याची हमी बँक देत नाही. मग लॉकरमध्ये किती मौल्यवान वस्तू ठेवाव्यात? याच कारणामुळे ग्राहकांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची किंमत आणि बँकेकडून मिळू शकणारी संभाव्य भरपाई यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. समजा, एखाद्याने ₹50 लाखांचे दागिने लॉकरमध्ये ठेवले आणि वार्षिक लॉकर भाडे ₹4,000 आहे. 100 पट नियमामुळे बँकेची कमाल जबाबदारी ₹4 लाखांपर्यंत असू शकते. त्यामुळे ₹50 लाखांचे नुकसान झाले तरी संपूर्ण ₹50 लाख मिळतील असे गृहीत धरता येणार नाही. अलीकडील घटनेमुळे पुन्हा चर्चा कानपूरमधील एका SBI शाखेत महिलेने आपल्या लॉकरमधील सुमारे ₹50 लाखांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू गायब झाल्याचा आरोप केल्याची घटना समोर आली आहे. जवळपास चार महिन्यांनंतर लॉकर उघडल्यावर वस्तू गायब असल्याचे तिच्या लक्षात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे बँक लॉकर कितपत सुरक्षित आहेत आणि वस्तू चोरीला गेल्यास ग्राहकाला किती नुकसानभरपाई मिळू शकते, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बँक लॉकर म्हणजे वस्तूंचा विमा नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकर सुविधा आणि लॉकरमधील वस्तूंचा विमा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बँक ग्राहकाला लॉकरची सुविधा देते परंतु लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांचे किंवा रोख रकमेचे संपूर्ण मूल्य बँक विमा करून घेत नाही. त्यामुळे मोठ्या किमतीच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र विमा संरक्षणाचा विचार करणे ग्राहकासाठी महत्त्वाचे ठरू शकते. ग्राहकांनी काय काळजी घ्यावी? लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फायदेशीर आहे लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची बिले, फोटो आणि इतर मालकीचे पुरावे सुरक्षित ठेवा. मौल्यवान वस्तूंचे स्वतंत्र विमा संरक्षण घेण्याचा विचार करा. लॉकरचे भाडे आणि बँकेच्या करारातील अटी काळजीपूर्वक वाचा. लॉकरचा वापर केल्यानंतर तो व्यवस्थित लॉक झाला आहे याची खात्री करा. लॉकरमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळा. कोणतीही वस्तू गायब झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने बँकेला लेखी तक्रार द्या आणि आवश्यक असल्यास पोलिसांत तक्रार दाखल करा. लॉकर दीर्घकाळ वापरला नाही तर? RBIच्या नियमांनुसार, लॉकर दीर्घकाळ वापरला जात नसेल तर बँकेला काही परिस्थितीत पुढील प्रक्रिया करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ग्राहकांनी लॉकर नियमितपणे वापरणे आणि बँकेकडून येणाऱ्या सूचना/नोटिसकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे.

Bank Locker मध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्या तर बँक किती पैसे देणार? RBIचा नियम समजून घ्या Read More »

raj thackeray

Raj Thackeray: राज ठाकरे–देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Raj Thackeray: मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना मोठे उधाण आले. मात्र, या भेटीचा राजकारणाशी थेट संबंध नसल्याचे राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केले. मुंबईतील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, शहराचे नियोजन आणि वाढत्या पुनर्विकासामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील वाहतूक कोंडीचा मुद्दा केंद्रस्थानी राज ठाकरे यांच्या मते, मुंबईत मुसळधार पावसानंतर वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर झाली आहे. रस्त्यांची रुंदी मर्यादित असताना वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात रस्त्यांच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग, वाहतुकीतील शिस्तीचा अभाव आणि शहराचे अपुरे नियोजन यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर, संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. ज्या ठिकाणी पूर्वी मोजकी लोकसंख्या राहत होती, तिथे आता अनेक पटींनी अधिक लोक राहत आहेत. परिणामी घरांची संख्या वाढली, वाहनांची संख्या वाढली आणि त्याचा थेट परिणाम रस्त्यांवरील वाहतुकीवर होत असल्याचे राज ठाकरे यांनी मांडले. छोट्या मैदानांखाली पार्किंग उभारण्याची सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पार्किंगची एक कल्पना मांडली. शहरातील काही लहान मैदानांच्या जमिनीखाली पार्किंग व्यवस्था उभारता येऊ शकते, असे त्यांनी सुचवले. अशा पद्धतीने एका ठिकाणी सुमारे 500 ते 1,000 वाहने पार्क करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. त्याच वेळी मैदानाचा वरचा भाग मुलांच्या खेळासाठी कायम ठेवता येईल, असा त्यांचा प्रस्ताव आहे. त्यामुळे एकीकडे पार्किंगची समस्या कमी होईल आणि दुसरीकडे मैदानेही वाचतील, असा या कल्पनेमागचा उद्देश आहे. ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी कडक करण्याची मागणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केवळ दंड वाढवून उपयोग होणार नाही, तर नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ‘नो पार्किंग’ आणि पार्किंगची ठिकाणे नागरिकांना सहज लक्षात यावीत यासाठी रस्त्यांच्या कडांना वेगवेगळ्या रंगांनी चिन्हांकित करण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिकांना कुठे वाहन उभे करायचे आणि कुठे करू नये, हे स्पष्ट दिसले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. पोलीस अधिकाऱ्यांसमोरही चर्चा या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पार्किंग आणि वाहतूक नियोजनाच्या कल्पनांचे नमुने अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय भेटीची चर्चा का रंगली? या भेटीला राजकीय महत्त्व मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळचे महाराष्ट्रातील बदलते राजकीय समीकरण. राज ठाकरे यांच्या मनसेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर फडणवीस–राज ठाकरे भेट झाली. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले. मात्र राज ठाकरे यांनी या चर्चांना फारसा वाव न देता, “ही भेट राजकीय नव्हती; शहर नियोजन आणि वाहतुकीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,” असा स्पष्ट संदेश दिला.

Raj Thackeray: राज ठाकरे–देवेंद्र फडणवीस भेटीने राजकीय चर्चांना उधाण Read More »

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा विचार यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजामध्ये पुन्हा मुंबईला जाण्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच समाजातील अनेकजण मुंबईतच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबाहेरूनही आंदोलक येणार? जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राबाहेरील भागांतूनही मराठा समाजाचे लोक मुंबईकडे येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरत, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा तसेच गोव्याच्या समुद्रमार्गातूनही काही लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. नेमकी मागणी काय? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. विशेषतः मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, हा त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा राहिला आहे. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी अलीकडे सरकारला इशारा दिला आहे. कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुंबईकडे जाण्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

dheerajsingh pardeshi death

Dheerajsingh Pardeshi Death: मोठी बातमी! अहिल्यानगर शहरात जीवघेण्या हल्ल्यात धीरजसिंग परदेशीचा मृत्यू

Dheerajsingh Pardeshi Death: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेच्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून काही संयशित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर महापालिकेने परिसरातील सर्व सार्वजनिक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून धीरजसिंग परदेशी यांना मारहाण करण्यात आली होती. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले निंदनीय असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Dheerajsingh Pardeshi Death: मोठी बातमी! अहिल्यानगर शहरात जीवघेण्या हल्ल्यात धीरजसिंग परदेशीचा मृत्यू Read More »

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

Sangram Jagtap: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना काही जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत परदेशी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले निंदनीय असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी Read More »

vijay choudhary

Vijay Choudhary: कथित ध्वनीफित प्रकरण, भाजप नेते विजय चौधरी अटकेत..

Vijay Choudhary:  उत्तर महाराष्ट्रासह नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील राजकारणात कथित ध्वनीफितींमुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करून चौधरी यांना ताब्यात घेतले आणि नंदुरबार शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये तीन गुन्हे दाखल सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने प्रसारित झालेल्या कथित ध्वनीफितीत भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह व जातीवाचक विधाने केल्याचा ठपका चौधरी यांच्यावर आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह ॲट्रॉसिटी इतर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही विजय चौधरी यांच्याविरोधात अशाच स्वरूपाची स्वतंत्र तक्रार दाखल केली. सध्या डॉ. हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मालती वळवी आणि आमदार आमश्या पाडवी यांच्याशी संबंधित वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर दाखल गुन्ह्यांनुसार ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विजय चौधरी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्यावर आतापर्यंत सुमारे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या तपासादरम्यान प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनीफिती चोरून, त्यांची परस्पर विक्री करून त्या सोशल मीडियावर पसरवल्याचा आरोप झाला. यासंदर्भात चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पीएला ताब्यात घेतले होते, मात्र चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल,आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी आणि अमरीश पटेल यांच्यासह इतर अनेक प्रमुख राजकीय नेत्यांशी झालेले संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राजकीय नेत्यांची बदनामी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, संबंधित राजकीय नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या ध्वनीफितींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून आवाज आणि संभाषणात छेडछाड आणि फेरफार करण्यात आल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये दररोज नव्या कथित ध्वनीफिती बाहेर येत असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विजय चौधरी यांच्या अटकेनंतर आता पोलीस तपासात काय नवे सत्य समोर येते आणि या प्रकरणाचे धागेधोरे कुठेपर्यंत पोहोचतात, याकडे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Vijay Choudhary: कथित ध्वनीफित प्रकरण, भाजप नेते विजय चौधरी अटकेत.. Read More »

abhijit deepke

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार

Abhijit Deepke : सीजेपी (CJP) च्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या सीजेपी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून लोकांच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करणारा प्रभावी दबावगट म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. देशातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या सत्तेची नव्हे, तर मजबूत लोकचळवळीची गरज असल्याचे दीपके यांनी नमूद केले. त्यामुळे संघटना आपले आंदोलन आणि जनजागृतीचे काम अधिक व्यापक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर सविस्तर चर्चा झाली. विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. सध्या राजकीय पक्ष स्थापन करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि सरकारला जबाबदार धरणे, यावरच संघटना लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यातील राजकीय पर्याय पूर्णपणे बंद नसल्याचे संकेत देत, योग्य वेळ आल्यास संघटना पुढील निर्णय घेईल, असेही दीपके यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या सीजेपीची प्राथमिकता ही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे आणि जनआंदोलन अधिक मजबूत करणे हीच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार Read More »

img 20260805 wa0000

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष

Vaishali Nagwade : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या पदमुक्तीनंतर हे पद रिक्त होते. आज मुंबई येथे पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वैशाली नागवडे या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख आहे. यापूर्वी अजित पवार यांनी त्यांच्यावर महानंदा दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान, पक्षातील विविध घडामोडींमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविरोधात अनेकदा भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या चर्चेतही राहिल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्यावरील एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख “गुंगी गुडिया” असा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महिला नेत्यांबाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विरोधकांकडून याच शब्दांत हिणवले जात होते, याची आठवण करून देत आज काँग्रेसकडून अशाच प्रकारची भाषा वापरली जाणे विरोधाभासी असल्याचे त्यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांवर टीका करताना सभ्य भाषेचा वापर करावा, अशी अपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले

Chhagan Bhujbal : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील विविध भागांत होर्डिंग्ज लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या होर्डिंग्जमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, “भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त करा,” असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, नाशिकला सध्या पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. अनुभवी आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यास खड्ड्यांसह शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांचा मुद्दा आता राजकीय रंग घेत असून, येत्या काळात यावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chhagan Bhujbal : ‘भुजबळांना पालकमंत्री करा’ ; खड्ड्यांवरून नाशिकचे राजकारण तापले Read More »