DNA मराठी

DNA Marathi News

shrirampur crime

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण?

Shrirampur Crime : समाजात एखादी व्यक्ती धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून लोकप्रिय होत असते. परंतु त्याच व्यक्तीचे नाव वारंवार गंभीर गुन्ह्यांच्या तपासात, आरोपपत्रात किंवा पोलीस कारवाईत समोर येऊ लागले, की समाजाने आणि यंत्रणांनी स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची वेळ येते. प्रश्न एका व्यक्तीचा नसतो; प्रश्न असतो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास, कायद्याची अंमलबजावणी आणि समाजाच्या नैतिक भूमिकेचा. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये धर्म, जात किंवा संघटनांच्या नावाने काही व्यक्तींना ‘रक्षक’ म्हणून उभे केले जाते. सोशल मीडियावरील प्रचार, मिरवणुका, वाढदिवसाचे बॅनर आणि समर्थकांच्या घोषणांमधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते. परंतु जर अशाच व्यक्तींचे नाव वारंवार खून, खंडणी, मारहाण, दरोडे, मोक्का किंवा इतर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत समोर येत असेल, तर समाजाने त्या प्रतिमेकडे चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो, जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही. ही लोकशाहीची मूलभूत अट आहे. पण याचा अर्थ असा नाही की गंभीर आरोपांकडे समाजाने डोळेझाक करावी. एखाद्या व्यक्तीवर सातत्याने गुन्हे दाखल होत असतील, ती वारंवार अटक होत असेल किंवा संघटित गुन्हेगारीशी तिचे नाव जोडले जात असेल, तर त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाची कार्यक्षमता तपासणे आवश्यक ठरते. अशा घटनांमध्ये आणखी एक धोकादायक प्रवृत्ती दिसते. गुन्हेगारीला धार्मिक किंवा सामाजिक ओळखीचे कवच मिळू लागते. समर्थकांचा एक वर्ग व्यक्तीच्या कथित सामाजिक कामांचा उल्लेख करून गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, चर्चा व्यक्तीच्या कृत्यांवर न होता धर्म किंवा विचारसरणीच्या समर्थन-विरोधात वळते. हीच समाजासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. गुन्हेगाराला धर्म नसतो त्याचा धर्म फक्त गुन्हा असतो. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी व्यक्तीच्या धर्म, जात, राजकीय संबंध किंवा लोकप्रियतेकडे न पाहता समान निकषांवर झाली पाहिजे. अन्यथा कायद्यावरील विश्वास कमी होतो आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. आज गरज आहे ती व्यक्तिपूजेपेक्षा संस्थांवर विश्वास ठेवण्याची. पोलीस तपास निष्पक्ष असावा, सरकारी पक्षाने खटले प्रभावीपणे चालवावेत, साक्षीदारांचे संरक्षण व्हावे आणि न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी. तितकेच महत्त्वाचे म्हणजे समाजानेही कोणत्याही व्यक्तीचे समर्थन करताना तिच्या सार्वजनिक प्रतिमेबरोबर तिच्या सार्वजनिक उत्तरदायित्वाचाही विचार केला पाहिजे. प्रत्येक मोठ्या गुन्ह्यानंतर आरोपींची नावे चर्चेत येतात; परंतु त्याहून मोठा प्रश्न कायम राहतो गुन्हेगारी इतकी वाढूच कशी दिली जाते? प्रतिबंधात्मक पोलिसिंग, प्रभावी तपास, जलद न्याय आणि सामाजिक जबाबदारी या चारही गोष्टी एकत्र आल्या तरच अशा घटनांवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येईल. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला कायद्यापेक्षा मोठे स्थान नसते. धर्म, समाजकार्य किंवा लोकप्रियता ही न्यायप्रक्रियेची पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही. शेवटी टिकतो तो केवळ कायद्याचा अधिकार आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास.

Shrirampur Crime: धर्माच्या नावावर गुन्हेगारीचे संरक्षण? Read More »

rain

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात १८ व १९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत ३,४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास किंवा धरणांमधून पाणी सोडल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे वा नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. धरण व नदी परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढू नयेत. मेघगर्जना होताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली, मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजाचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण वा विद्युत रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर राहावे. विजा चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. तसेच ट्रॅक्टर, शेतीची अवजारे व दुचाकींपासून दूर राहावे. जाहिरात फलक कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी फलकांच्या आजूबाजूला थांबू नये. विजा चमकत असताना उघड्यावर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे, जेणेकरून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे. तसेच घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. जुनाट वा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज व पाऊस यांपासून स्वतःचे तसेच जनावरांचे रक्षण करावे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी, तहसील कार्यालयाशी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ Read More »

siya goyal

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा; त्याच हॉटेलमध्ये चेतनसोबत…

Siya Goyal : पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अशी माहिती लागली आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने केतनच्या मृत्यूनंतरही तिच्या प्रियकर चेतन चौधरीसोबत संपर्क कायम ठेवला होता. एवढेच नव्हे तर केतनसोबत ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये आणि त्याच खोलीत नंतर चेतनसोबतही ती गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलच्या नोंदी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व हालचाली पूर्वनियोजित कटाचा भाग होत्या का, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक पुरावा एकमेकांशी जोडून आरोपींच्या हालचालींचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यापूर्वीच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान दोघांच्या नातेसंबंधांबाबत, त्यांच्यातील संवाद तसेच कथित नियोजनाबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास पुढे हत्या प्रकरणाकडे वळला. त्यानंतर उघड झालेल्या माहितीमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा; त्याच हॉटेलमध्ये चेतनसोबत… Read More »

devendra fadnavis

Sharad Pawar : शरद पवार महायुतीच्या वाटेवर? मंत्रिपदाचा फॉर्मुलाही ठरला

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, त्यांचा पक्ष महायुतीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्यास मंत्रिमंडळात त्यांच्या गटाला प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यासाठी संभाव्य मंत्रिपदांच्या वाटपावरही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांची नावे संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात असले, तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किंवा महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या सर्व घडामोडी केवळ राजकीय चर्चेच्या पातळीवर असल्याचे मानले जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य पक्षप्रवेश आणि नव्या राजकीय आघाड्यांबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar : शरद पवार महायुतीच्या वाटेवर? मंत्रिपदाचा फॉर्मुलाही ठरला Read More »

eknath shinde

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मोफत साडी योजना बंद

Eknath Shinde : राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना वर्षातून एकदा मोफत साडी देण्यात येत होती. मात्र आता सरकारने ही योजना पुढे न राबवण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थी महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी हा निर्णय महिलांविरोधी असल्याची टीका केली असून, गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना बंद करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे, सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांचे पुनर्मूल्यांकन करून आर्थिक शिस्त राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याआधीही सरकारने विविध योजनांमध्ये फेरबदल केले असून, लाभार्थ्यांची पडताळणी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला आहे. मोफत साडी योजनेच्या बंदीनंतर संबंधित लाभार्थी महिलांना आता या योजनेतून कोणताही लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचे परिणाम आगामी काळात राजकीय आणि सामाजिक स्तरावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मोफत साडी योजना बंद Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब

Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, याबाबत सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत जाब विचारल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना या बैठकीची पूर्वकल्पना नसल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी थेट तटकरे यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हा केवळ गैरसमज असून बैठकीबाबत कोणताही गुप्त अजेंडा नव्हता. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना ‘देवगिरी’ येथे बोलावले होते आणि त्यानंतर पुढील घडामोडी झाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडील काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरूनही पक्षात मतभेद समोर आले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिकरीत्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला असला, तरी या नव्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संवाद आणि समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब Read More »

raj thackeray

Raj Thackeray: आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा भाजपला माज; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असून, मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज ठाकरे यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा 19 वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना 2018 साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.

Raj Thackeray: आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा भाजपला माज; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा Read More »

vilas ghule case

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

Vilas Ghule : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ज्याला वाचवण्यासाठी विलास घुले यांनी धाव घेतली होती, त्या उमेश मानेविरुद्ध आता अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिचे ब्लॅकमेलिंग करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावून परावृत्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार घराजवळ येऊन धमक्या देत होते. अखेर संबंधितांना समजावून सांगण्यासाठी दोन्ही बाजूंची भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या हाणामारीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबाने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून, पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा

Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमुळे शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील काही महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू असतानाच ही बैठक पार पडल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र या भेटीचा पक्षांतर्गत वादाशी संबंध नसल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले असून, कोणताही राजकीय निर्णय किंवा पक्षांतराचा विषय चर्चेत नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा Read More »

Donald Trump

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी मोहिमेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सप्टेंबरअखेरपर्यंत अमेरिकेचे उर्वरित सर्व सैनिक इराकमधून माघारी बोलावले जाणार आहेत. 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या राजवटीविरोधात सुरू झालेल्या लष्करी कारवाईनंतर तब्बल 23 वर्षांनी अमेरिकेची इराकमधील सैन्य उपस्थिती संपुष्टात येणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. “इराकमध्ये आता अमेरिकन सैन्याची गरज उरलेली नाही. दोन्ही देशांतील संबंध आता आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर आधारित असतील,” असे ट्रम्प यांनी सांगितले. इराकचे पंतप्रधानांनीही 30 सप्टेंबरपर्यंत सर्व अमेरिकन सैनिक देशाबाहेर जातील, मात्र अमेरिकन कंपन्या इराकमध्ये कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले. अमेरिकेने 2003 मध्ये इराकवर आक्रमण करून सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवाया, इस्लामिक स्टेट (ISIS) विरोधातील मोहिमा आणि इराकी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकन सैन्य दीर्घकाळ तैनात होते. 2024 मध्ये झालेल्या अमेरिका-इराक करारानुसार सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार सुरू झाली होती आणि आता ती पूर्ण होणार आहे. सध्या उर्वरित अमेरिकन सैनिक मुख्यत्वे सल्लागार आणि प्रशिक्षणाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी धोरणात मोठा बदल होणार असून, अमेरिका आणि इराक यांच्यातील संबंध आता प्रामुख्याने आर्थिक, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रांवर केंद्रित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा Read More »