DNA मराठी

Devendra Fadnavis

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर वसुली आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुचके यांनी एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवकाला विश्रामगृहात बोलावून अपमानास्पद व धमकीची भाषा वापरल्याचे या ऑडिओत ऐकू येत आहे. यामुळे त्या लोकप्रतिनिधी आहेत की दबाव टाकणाऱ्या टोळीप्रमाणे वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारदार रोशन बिरमल यांनी आरोप केला आहे की, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे आशा बुचके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ Read More »

crime

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने भर दिवसा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा गवांडे असे मृत महिलेचे नाव आहे. ती पंपावर काम करत असताना सत्यम गवांडे याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला. माहितीनुसार, पूजाचे यापूर्वी एक लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर दोघेही एकत्र राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र, पूजाने यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांनी दिली.

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून Read More »

eknath shinde

Eknath Shinde: काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

Eknath Shinde: निवडणुका संपल्यात आता पक्ष वाढीचा हंगाम सुरु झालाय. राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेनं काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान देण्याचे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली. नुकताच शिवसेनेकडून संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची महत्त्वपूर्ण ऑनलाईन आढावा व मार्गदर्शन बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांना पद विसरुन कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्याचे निर्देश दिले. मतदार संघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क प्रमुखांना कामाचा रोडमॅप दिला. लोकसभा संपर्कप्रमुखांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेऊन त्या बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज मला पाठवावा तो मी स्वतः बघणार, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या ‘एसआयआर’ मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या? याची विचारणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्कप्रमुखांना केली. कामाचा अहवाल नसेल, जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार, असा सज्जड दम शिंदेंनी या बैठकीत दिला. मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए’सोबत रोज बैठक घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. संपर्क प्रमुखांना केलेल्या सूचना – मतदार संघाचा दौरा करणे, बैठका घेणे – मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करा – ‘एसआयआर’साठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत – ‘बीएलए’सोबत दररोज बैठक घेणे – लोकसभा संपर्कप्रमुखांनी प्रत्येक विधानसभेची स्वतंत्र बैठक घेणे – बैठकीचे फोटो आणि तपशील दररोज पाठवणे नुकताच केली होती संपर्क प्रमुखांची घोषणा शिवसेनेने विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुखांची, लोकसभा संपर्क प्रमुखांची नुकताच घोषणा केली होती. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत आमदार निलेश राणे, आमदार दिलीप लांडे, आमदार तुकाराम काते, आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Eknath Shinde: काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम Read More »

samarjit ghatge

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश

Samarjit Ghatge : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्यातील कागलचे प्रभावी नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या बुधवारी (8 एप्रिल) मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडेल. या संदर्भात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालया बाहेर घाटगे समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहे. समरजित घाटगे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला होता. मात्र, आता पुन्हा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार आहे. घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश Read More »

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार

Radhakrishnan Vikhe Patil: श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली मिळाली असून, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या 32 गावांतील 10 हजार हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून पूर्ण होत असल्याचे समाधान जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. वेळोवेळी बैठका घेऊन विविध आवश्यक परवानग्या व मान्यता प्राप्त करुन घेतल्यामुळे साकळाई योजनेचे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहीलेले स्वप्न पुढील 4 वर्षात पुर्ण करण्याचा निर्धार महायुती सरकारचा आहे.साकळाई उपसा सिंचन योजने अंतर्गत म्हसेगांव येथून 4 टप्प्यांमध्ये पाणी उचलून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यांतील एकूण 32 गावांमध्ये विकेंद्रीतजलसाठ्यांद्वारे अस्तित्वातील ल.पा. तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे व गाव तलावां मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या योजनेत सिंचनासाठी 1.60 TMC व पिण्यासाठी 0.20 TMC असा एकूण 1.80 TMC इतका पाणी वापर नियोजित असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली. साकळाई योजनेमध्ये घोड धरणाच्या जलाशयातून मौजे म्हसे येथे पंपगृह क्रमांक 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. पंपगृह क्रमांक 1 ते 4 व वितरण कुंड 1,2 व 3 द्वारे एकूण 4 टप्प्यांमध्ये सुमारे 208.34 मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदामध्ये सोडण्यात येणार आहे. वितरण हौद क्रमांक 2 व 3 मधून गुरुत्वीय बंदीस्त नलिका प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील 32 गावांतील 196 तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर योजनेच्या सर्वेक्षणापासून ते योजनेच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्याच्या सर्व निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे स्पष्ट करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुकीत योजनेच्या संदर्भात जाणीपुर्वक राजकारण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. परंतू अंतिमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देण्याचा शब्द पूर्ण केला आणि आदरणीय खासदार साहेबांनी पाहीलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती सरकाने सहकार्य केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. साकळाई योजनेचे काम पूर्णत्वास जावे म्हणून डॉ सुजय विखे पाटील यांची मोठी धडपड होती.प्रशासकीय स्तरावर त्यांचाही पाठपुरावा सात्तत्याने सुरू होता.मंत्री मंडळाने साकळाई योजनेला दिलेल्या मान्यतेबद्दल डॉ सुजय विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून,महायुती सरकारच्या सहकार्याने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला न्याय मिळत असल्याचे समाधान डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Radhakrishnan Vikhe Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार Read More »

img 20260402 wa0003

Sakalai Lift Irrigation Scheme : साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा, हिवरे झरे परिसरात जल्लोष

Sakalai Lift Irrigation Scheme : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल हजार कोटींहून अधिक निधीच्या या योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. स्थानिक कृती समितीने अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करून, आंदोलने, बैठका व निवेदने देत हा विषय जिवंत ठेवला होता. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने कृती समिती व ग्रामस्थांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर हिवरे झरे येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. “साकळाई योजना मंजूर झालीच पाहिजे” अशी अनेक वर्षे लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या योजनेमुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, सुरेश काटे, बबनराव वाळके, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, आकाश लंके, विनोद सोनवणे, गणेश झेंडे, प्रमोद पवार, पांडुरंग झेंडे, नवनाथ आनंदकर, रामभाऊ वाळके, भाऊसाहेब चोबे, अक्षय खेंगट, भाऊसाहेब निमसे, रामदास सर झेंडे, चिखलीचे सरपंच भैय्या कदम, मा. श्री बापूसाहेब गाडेकर, माळ सरपंच राजेंद्र झेंडे, कोरेगावचे सरपंच बाबासाहेब विधाटे, राजाराम घुटे, सोन्याबापू वाणी, प्रतापराव नलगे तसेच पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भैय्या लगड आदी मान्यवर उपस्थित होते. साकळाई उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

Sakalai Lift Irrigation Scheme : साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा, हिवरे झरे परिसरात जल्लोष Read More »

img 20260402 wa0009

Sujay Vikhe : बोले तैसा चाले…… साकळाई उपसा सिंचन योजनेबद्दल मोठा निर्णय !

Sujay Vikhe: श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली. 1 एप्रिलला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात वर्षांपूर्वी दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला बुधवारी यश मिळाले. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळीही डाँ. विखे पाटील यांनी साकळाईबाबत शब्द दिला होता. तोच शब्द, आता पूर्ण झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका व श्रीगोंदा तालुक्यातील 32 दुष्काळी गावांसाठीच्या साकळाई योजनेची चर्चा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरु होती. या योजनेतून या दोन्ही तालुक्यातील 9,600 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते. या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणूका लढविल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 एप्रिल 2019 ला वाळकी येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेला मंजूरी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर सध्या पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या योजनेसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. जलसंपदा मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाचा विशेष पाठपुरावा केला. याच योजनेला 1 एप्रिलला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अंतीम मंजुरी मिळाली. आता ही योजना 1,234. 13 कोटी रुपये खर्चून पुढील चार वर्षांत पूर्ण केली जाणार आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसगाव येथून 4 टप्प्यांत पाणी उचलून ते श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 32 गावांना दिले जाणार आहे. त्यातून लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळे भरुन घेतली जाणार आहेत. या योजनेसाठी 1.60 टिएमसी पाणी सिंचनासाठी व 0.20 टीएमसी पाणी हे पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे. खरीप हंगामात 15 जुलै ते 15 ऑक्टोंबर या काळात पाणी उपसा करुन जलसाठ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे. यासाठी म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह बांधण्यात येणार आहे. त्यानंतर इतर तीन पंपगृहही बांधले जाणार आहेत. चार पंपगृह व तीन वितरींकाद्वारे एकूण चार टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. हे पाणी तब्बल 208.34 मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण 39.71 हेक्टर क्षेत्र आवश्यक असून त्यापैकी 30.22 हेक्टर खाजगी क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक भाषणांमध्ये सांगितले होते की, “ही योजना पूर्ण करणार असू, तर आम्हीच ती पूर्ण करू.” आज अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्वर्गीय शिवाजीराव कार्डिले ,माजी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला आज मान्यता मिळाल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्रकल्पाची सर्व कामे 4 वर्षाच्या कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुढील चार वर्षांत ही सगळी कामे पूर्ण होतील, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी सांगितले तसेच साकळाई उपसा सिंचन योजनेस मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

Sujay Vikhe : बोले तैसा चाले…… साकळाई उपसा सिंचन योजनेबद्दल मोठा निर्णय ! Read More »

img 20260401 wa0002

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा?

Devendra Fadnavis: राज्यकारभारात नेतृत्वाची खरी कसोटी ही केवळ विकासकामांत किंवा राजकीय यशात नसते ती कायदा-सुव्यवस्थेच्या काटेकोर अंमलबजावणीत आणि समाजातील न्यायभावनेच्या जपणुकीत असते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दुहेरी भूमिकेत काम करताना प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे अनेकदा सिद्ध केले आहे. काही बाबतींत त्यांच्या कार्यशैलीची तुलना शरद पवार यांच्या प्रभावी प्रशासकीय वारशाशी केली जाते. मात्र, अलीकडच्या काळात राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा चिंतेचा विषय बनत आहे. कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची भूमिका निष्पक्ष आणि कठोर असणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना राजकीय पाठबळ मिळाल्याची भावना जनमानसात निर्माण होते, तेव्हा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो. गुन्हेगारीचा प्रश्न केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहत नाही; तो सामाजिक आणि नैतिक संरचनेलाही बाधा पोहोचवतो. विशेषतः जात आणि धर्म यांच्या नावाखाली जेव्हा गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन केले जाते, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनते. समाजातील काही घटकांकडून धार्मिकतेचा आडोसा घेत नेतृत्व करण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी गुन्हेगारीकडे दुर्लक्ष किंवा समर्थन दिसून येणे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांची प्रशासनातील कडक प्रतिमा आणि निर्णयक्षमता यामुळेच जनतेने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला ती कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक छत्राखाली असो, निर्भीडपणे आळा घालणे अत्यावश्यक ठरते. प्रतिमा ही केवळ प्रचारातून घडत नाही; ती कृतीतून दृढ होते. आज राज्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कठोर, पारदर्शक आणि पक्षनिरपेक्ष कारवाई हीच प्रशासनाची खरी ओळख ठरू शकते. अन्यथा, सक्षम नेतृत्वाची ओळख असलेली प्रतिमाही काळाच्या ओघात धूसर होण्याचा धोका नाकारता येणार नाही. म्हणूनच, सत्तेची ताकद आणि जबाबदारी यांचा समतोल राखत कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे, हीच आजच्या नेतृत्वापुढील खरी परीक्षा आहे.

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा? Read More »

tukaram mundhe

Tukaram Mundhe : ‘बदली’ हीच ओळख? तुकाराम मुंढे प्रकरणातून प्रशासनाला पडलेला आरसा

Tukaram Mundhe : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत काही नावे त्यांच्या कामामुळे ओळखली जातात, तर काही नावे त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत राहतात. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नाव या दोन्ही कारणांनी सातत्याने चर्चेत राहिले आहे. मात्र गेल्या दोन दशकांत त्यांच्या बाबतीत निर्माण झालेली सर्वात ठळक ओळख म्हणजे सतत बदली होणारे अधिकारी. 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली होणे ही केवळ वैयक्तिक बाब नसून राज्याच्या प्रशासकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे. अलीकडेच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असताना मुंढे यांची पुन्हा बदली झाली. वर्षभराच्या आत झालेली ही बदल्या प्रशासनातील स्थैर्याच्या अभावाचे प्रतीक मानावी लागेल. विशेष म्हणजे त्यांनी सुरू केलेली बोगस दिव्यांग शोध मोहीम गती घेत असतानाच त्यांची बदली झाली. एखाद्या अधिकाऱ्याने कठोर निर्णय घेतले की त्याच्या बदलीची चर्चा सुरू होते, हा योगायोग मानायचा की व्यवस्थेचा अलिखित नियम – हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. कडक अधिकारी की व्यवस्थेला अस्वस्थ करणारी शैली? मुंढे यांची प्रतिमा कडक शिस्तीचे आणि ‘धडाकेबाज’ अधिकारी अशी आहे. नवी मुंबई, नाशिक, नागपूर किंवा पुणे – जिथे जिथे त्यांनी काम केले तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी आणि प्रशासनातील शिस्तीवर त्यांनी भर दिला. परंतु भारतीय प्रशासन व्यवस्थेत नियमांची अंमलबजावणी अनेकदा राजकीय आणि स्थानिक हितसंबंधांना धडकते. तेव्हा संघर्ष अपरिहार्य ठरतो. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या बदल्यांकडे पाहिले तर एक समान धागा दिसतो कोणत्याही पक्षाचे सरकार असो, त्यांच्या बदल्यांचा वेग कमी झालेला नाही. म्हणजेच हा प्रश्न केवळ राजकीय पक्षांचा नसून प्रशासन आणि राजकारण यांच्यातील सत्तासंतुलनाचा आहे. बदली — शिक्षा की प्रशासकीय साधन? भारतीय नोकरशाहीत बदली ही प्रशासनिक गरज म्हणून मान्य असली, तरी तिचा वापर अनेकदा ‘नियंत्रणाचे साधन’ म्हणून होत असल्याची टीका जुनी आहे. एखादा अधिकारी अपेक्षित पद्धतीने वागत नसल्यास त्याची बदली हा सर्वात सोपा पर्याय ठरतो. परिणामी दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी विस्कळीत होते. मुंढे यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर हे अधिक स्पष्ट होते. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले पण बहुतांश ठिकाणी त्यांना दीर्घकालीन काम करण्याची संधी मिळाली नाही. प्रशासनात सातत्य नसल्यास सुधारणा टिकून राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बदललेला समाजाचा प्रतिसाद एकेकाळी मुंढे यांच्या बदलीनंतर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असत. नाशिक आणि नागपूरमध्ये त्याची उदाहरणे पाहायला मिळाली. मात्र आता अशी आंदोलने होताना दिसत नाहीत. यामागे दोन शक्यता आहेत. एक म्हणजे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे; किंवा दुसरे म्हणजे ‘बदली’ हीच व्यवस्था आहे, असा स्वीकार समाजाने केला आहे. दोन्ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. व्यक्तीपेक्षा प्रणाली महत्त्वाची तुकाराम मुंढे यांची कथा ही एका अधिकाऱ्याची वैयक्तिक कहाणी नाही; ती महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. एखादा अधिकारी कितीही सक्षम असला तरी संस्थात्मक स्थैर्य नसल्यास परिणाम मर्यादित राहतात. प्रशासनात पारदर्शक बदली धोरण, निश्चित कार्यकाल आणि राजकीय हस्तक्षेपावर मर्यादा या मूलभूत सुधारणा केल्याशिवाय अशी उदाहरणे पुन्हा पुन्हा घडत राहतील. शेवटचा प्रश्न मुंढे यांची 25 वी बदली ही बातमी म्हणून महत्त्वाची असली, तरी खरी चिंता वेगळी आहे. महाराष्ट्रात कठोरपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे भविष्य नेहमीच अस्थिर राहणार का? जर उत्तर ‘होय’ असेल, तर नुकसान केवळ एका अधिकाऱ्याचे नाही ते प्रशासनाच्या विश्वासार्हतेचे आहे. कारण अखेरीस प्रश्न एका व्यक्तीचा नसतो.प्रश्न असतो व्यवस्थेने प्रामाणिकपणाला किती काळ टिकू दिले? तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत झालेल्या बदल्या (पोस्टिंग) खालीलप्रमाणे: 1. ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी, सोलापूर 2. सप्टेंबर 2007 – उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग 3. जानेवारी 2008 – CEO, जिल्हा परिषद, नागपूर 4. मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विकास विभाग 5. जुलै 2009 – CEO, जिल्हा परिषद, वाशिम 6. जून 2010 – CEO, जिल्हा परिषद, कल्याण 7. जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना 8. सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त, मुंबई 9. नोव्हेंबर 2014 – जिल्हाधिकारी, सोलापूर 10. मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका 11. मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, PMRDA, पुणे 12. फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका 13. नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन विभाग 14. डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई 15. जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका 16. ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई 17. जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत 18. सप्टेंबर 2022 – संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान 19. एप्रिल 2023 – सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास 20. जून 2023 – सचिव, मराठी भाषा विभाग 21. जुलै 2023 – सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभाग 22. जून 2024 – आयुक्त, असंघटित कामगार विभाग 23. ऑगस्ट 2025 – दिव्यांग कल्याण मंत्रालय

Tukaram Mundhe : ‘बदली’ हीच ओळख? तुकाराम मुंढे प्रकरणातून प्रशासनाला पडलेला आरसा Read More »