DNA मराठी

ahmednagar news

एसटी कर्मचाऱ्यांच्या पी. एफ. गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८७००० कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली १२४०कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी. एफ.ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे १०० कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे १२४० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे ११०५ कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २३४५ कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारी २४ पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पी. एफ. ची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते.व ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते.व त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सदरची रक्कम ८.२५ टक्के इतक्या दराने परत करण्यात येते. पण गेले अनेक महिने एसटीने सदरची रक्कम गुंतवणूक केली नसल्याचे त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले असून त्याचा फटका साहजिकच कर्मचाऱ्यांना बसणार आहे. संपा नंतर शासनाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकार कडून एसटीला देण्यात येईल असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. पण त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. परिणामी पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडली असून इ.पी. एफ. ओ. ऑफिसने काही नियम, अटी व शर्ती घालून सदर ट्रस्टला मान्यता दिली असून त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. इ. पी. एफ. ओ.ने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी शंकाही बरगे यांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे पी. एफ. व ग्राजुटी ह्या दोन्ही ट्रस्ट अत्यंत चागल्या प्रकारे चालल्या असून इ .पी. एफ. ओ .ऑफिस सुद्धा एसटीची ट्रस्ट ही सर्वात चांगली ट्रस्ट असल्याचे सांगत आहे. पण शासनाच्या उदासीनतेमुळे ह्या दोन्ही ट्रस्ट अडचणीत आलेल्या आहेत. सुदैवाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे एसटीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. आता यापुढे तेच एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रमुख झाले असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदरची रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंतीही बरगे यांनी त्यांना केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पी. एफ. गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत Read More »

आरोपींना अटक करा अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन, सरकारला इशारा देते प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित

Prajakt Tanpure : गेल्या महिन्यात राहुरीत महापुरुष पुतळा विटंबनाची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं अन्नत्याग उपोषण सुरू होते. या उपोषणाला आता स्थगिती देण्यात आली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. आता आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. 26 मार्च रोजी राहुरी शहरात दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पुतळा विटंबन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधलाय. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर दोन्ही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कशा पद्धतीने बोलले. हे सर्व सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राहुरीची घटना याचाच भाग असावी अशीच वाटतेय. फोटो बघितल्यानंतर राहुरीत पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही, तर जाणीवपूर्व केल्याचे दिसत आहे. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आरोपींना अटक करा अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन, सरकारला इशारा देते प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख

Maharashtra Government: राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल. भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोठडीत मृत्यू झाला तर कैद्याच्या वारसांना मिळणार पाच लाख Read More »

“बदनाम होतो… पण मंत्रालय मिळालं!” – बच्चू कडू यांची भावनिक कहाणी

Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या खेळी अनेक वेळा पटलावर बिनधास्तपणे रंगविल्या जातात. पक्षफोड, बंड, कुरघोडी, युती, फुटी या शब्दांनी आपल्या राजकारणाची पोत अखेरची काही वर्षं पूर्णपणे व्यापून टाकली आहेत. परंतु या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एखादा नेता असा असतो, जो सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी बदनाम व्हायला तयार असतो. त्याचं नाव आहे बच्चू कडू. “मी बदनाम झालो, पण मंत्रालय मिळालं,” हे शब्द केवळ एका राजकीय खेळीचं समर्थन नाही, तर एका मनस्वी नेत्याच्या अंतर्मनातल्या भावनांचं प्रतिबिंब आहे. बच्चू कडू हे नाव आज केवळ एका राजकीय नेत्याचं नाही, तर शेकडो-हजारो दिव्यांगांच्या आशेचं केंद्र बनलं आहे. शिंदे गटाच्या बंडामध्ये सहभागी होणं ही त्यांची एक ‘राजकीय चूक’ होती, असं ते स्वतः मानतात. परंतु या चुकीच्या निर्णयातून एक मोठा लढा यशस्वी झाला दिव्यांग मंत्रालय मिळालं. हे मंत्रालय केवळ एका कुर्चीचं नाव नाही, तर अनेक अपंग, दिव्यांग बांधवांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा ठरला. आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून हजारो गोरगरिबांच्या जीवनात प्रकाश टाकणं हेच बच्चूभाऊंचं अंतिम ध्येय होतं. “सत्तेसाठी नव्हे, आशीर्वादासाठी बंड” – ही ओळच त्यांच्या राजकीय भूमिकेची ओळख आहे. आज बच्चू कडू आमदार नाहीत. कदाचित मतदारांनी नाकारलं असेल किंवा ईव्हीएमने… पण दिव्यांगांसाठी आज जे निर्णय घेतले जात आहेत, जे धोरणं बनत आहेत, ती त्यांच्यामुळे. त्यामुळे ते आजही जनतेच्या मनात घर करून आहेत. आजच्या राजकारणात जेव्हा बहुतेकजण पदासाठी, ताकदीसाठी राजकीय बाजू बदलतात, तेव्हा बच्चूभाऊ कडू यांनी समाजासाठी आपली प्रतिमा खराब होऊ दिली – हे त्यांचं वेगळेपण अधोरेखित करतं. बच्चू कडू हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी राजकारण करणारे नेते आहेत. त्यांची चूक त्यांनी मान्य केली, पण त्याच चुकांमधून काही लोकांच्या आयुष्यात बदल घडला – हीच त्यांची खरी ‘राजकीय विजय’ आहे. “बदनाम होणं चालेल, पण त्यातून जर गोरगरिबांच्या आयुष्यात उजेड पडत असेल, तर तो त्याग पत्करावा लागतो,” असं म्हणणारे बच्चू कडू आजच्या मतलबी राजकारणाला एक प्रश्न विचारतात – “तुम्ही किती लोकांसाठी बदनाम व्हायला तयार आहात?”

“बदनाम होतो… पण मंत्रालय मिळालं!” – बच्चू कडू यांची भावनिक कहाणी Read More »

धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी : पूर्वीचे साधू-संत- महंत आणि आजचे गुंड

Maharashtra News: धर्म हा आपल्या समाजाचा, संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. भारतीय परंपरेत धर्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे, तर एक नीतीमूल्यांची, सहिष्णुतेची आणि मानवतेची जीवनपद्धती मानली गेली आहे. या धर्माचे रक्षण करणे ही एक अत्यंत पवित्र आणि जबाबदारीची गोष्ट आहे. पूर्वीची स्थिती : साधू-संतांची भूमिकापूर्वीच्या काळात धर्माच्या रक्षणाची जबाबदारी साधू-संत, महंत, विचारवंत, व्रती, तपस्वी यांच्यावर होती. त्यांनी समाजाला धर्माचे खरे स्वरूप शिकवले – सहिष्णुता, क्षमा, सेवा, प्रेम, सत्य आणि अहिंसा. संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास, समर्थ रामदास, गुरुनानक, कबीर यांसारख्या संतांनी धर्माचे रक्षण केवळ शास्त्रानेच नव्हे, तर आचरणानेही केले. ते समाजातील दुराव्याला थांबवणारे, अंधश्रद्धेला विरोध करणारे आणि नीतीचा प्रचार करणारे होते. आजची स्थिती : गुंडांचे ‘धर्मरक्षण’पण आज चित्र पूर्णपणे वेगळे आहे. धर्माच्या नावाने हिंसा, द्वेष, दहशत आणि असहिष्णुतेचा प्रसार होत आहे. धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी जणू काही गल्ली गल्लीतील गुंडांनी, राजकीय फायद्यासाठी काम करणाऱ्या मंडळींनी घेतली आहे. या लोकांना ना धर्माचा खरा अर्थ माहीत आहे, ना अध्यात्माची जाण. त्यांच्यासाठी धर्म हा केवळ गटबाजी, प्रतिष्ठा आणि दहशतीचं साधन बनला आहे. या प्रवृत्तीमागील कारणे समाजाची भूमिका आणि उत्तरदायित्वधर्म रक्षण हे फक्त ढोल बडवून किंवा घोषणांनी होत नाही, तर सत्य, करूणा, आणि सेवाभावाने होते. आपल्याला या नवीन ‘धर्मरक्षकां’पासून सावध राहायला हवे. समाजाने सुजाण व्हावे, शिक्षण घेऊन विचारांची खोल जाणीव करावी लागेल. धर्म हा माणसाला माणूस बनवतो, त्याचा बुरखा पांघरून माणसाला पशू बनवणाऱ्यांना आपण धर्माचे रक्षक मानू शकत नाही. आज गरज आहे खऱ्या अर्थाने धर्म समजून घेण्याची, आणि त्याच्याशी संबंधित जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींवर सोपवण्याची. साधू-संतांची जागा कोणीही घेऊ शकत नाही – विशेषतः गुन्हेगारी वृत्तीचे लोक तर मुळीच नाही. धर्माचे खरे रक्षण तेव्हाच होईल, जेव्हा समाज विवेकाने, नीतीने आणि सत्याने चालेल.

धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी : पूर्वीचे साधू-संत- महंत आणि आजचे गुंड Read More »

गरीबांचं काय? – न्याय, देव आणि भेदभावाचं वास्तव; भिक्षेकरी मृत्यू प्रकरणात चौकशी करा

Maharashtra News: “न्याय आणि देव श्रीमंतांना लवकर भेटतो, गरिबाला नाही” – ही म्हण आजही आपल्या समाजाच्या वास्तवाला अगदी नेमकं व्यक्त करते. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात नुकतीच घडलेली हृदयद्रावक घटना हेच दाखवून देते. विसापूर येथील भिक्षेकरू गृहातून उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकरूंचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पिण्यासाठी पुरेसं स्वच्छ पाणीही मिळालं नाही, असं सांगितलं जात आहे. हा मृत्यू नुसता आजारपणामुळे झाला की व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे, हा खरा प्रश्न आहे. या घटनेनं अनेकांचे काळीज हलवले. गरिबांना वेळेवर उपचार, साधी सुविधा – अगदी पिण्याचं पाणीही मिळू नये? ही दुर्दैवी स्थिती काही नवीन नाही. याच शासकीय रुग्णालयात 2021 मध्ये 18 जणांनी जीव गमावला होता. त्यांच्याही मृत्यूमागचं कारण ‘व्यवस्थेचं अपयश’चं होतं, असं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं होतं. पण त्यांनाही न्याय मिळाला नाही. ना कुणावर कारवाई झाली, ना व्यवस्थेत सुधारणा. आजही गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयांच्या ओस पडलेल्या खाटा, तुटक्या सांडपाण्याच्या नळ्या आणि दुर्लक्षित वैद्यकीय यंत्रणांमध्ये अडकलेले दिसतात. दुसरीकडे, श्रीमंतांसाठी खासगी रुग्णालयं, एअर कंडिशन सुविधा, वेळेत टेस्ट्स आणि डॉक्टरांचं विशेष लक्ष हे सगळं सहज उपलब्ध असतं. मग खरंच विचारावंसं वाटतं – न्याय काय फक्त श्रीमंतांसाठीच राखून ठेवलेला आहे का? लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला समान हक्क असतो – हे आपण शाळेत शिकतो. पण वास्तवात हा हक्क फक्त कागदावरच असतो. जेव्हा गरीब माणसाचा जीव जातो, तेव्हा त्याच्या मागे न्यायासाठी लढणारा कोणीही नसतो. ना वकिलांची फौज, ना मीडिया कवरेज, ना जनतेचा आक्रोश. पण तेच जर एखादा श्रीमंत मरण पावला, तर संपूर्ण यंत्रणा हलते. आज गरिबांना न्याय मिळावा, इतकीच माफक अपेक्षा आहे. अहिल्यानगरमधील या मृत्यूंची सखोल चौकशी झाली पाहिजे. जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं – अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याची हमी सरकारने घ्यावी. अन्यथा ही ‘शासकीय’ व्यवस्था केवळ कागदोपत्री न्यायाची भाषा करणारी आणि प्रत्यक्षात गरीबांचा आवाज दाबणारी यंत्रणा ठरेल. गरीबांचं काय? – हा प्रश्न फक्त प्रश्न म्हणूनच न राहता, उत्तरांसह सन्मानाने मांडला गेला पाहिजे. कारण न्याय सगळ्यांसाठी असतो, निवडकांसाठी नाही.

गरीबांचं काय? – न्याय, देव आणि भेदभावाचं वास्तव; भिक्षेकरी मृत्यू प्रकरणात चौकशी करा Read More »

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप

Maharashtra News: अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मृत भिक्षेकांना ना वेळेवर औषधं मिळाली, ना पिण्यासाठी पाणी, असे गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहे. 7 एप्रिल रोजी पोलिसांनी 49 भिक्षेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना श्रीमंत तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आले होते. त्यापैकी दहा जणांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असली तरी यापूर्वीच्या घटनांमुळे या चौकशीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूर्वीही घडली होती गंभीर चूकप्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा पुनरावृत्तीस्मरणात ठेवावी अशी घटना म्हणजे, 2021 साली याच जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, मात्र शासनाने या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी चार्जशीट दाखल करण्याची परवानगी नाकारली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बेधडकपणा वाढल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते गिरीश जाधव यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “दोन वर्षांपूर्वी 18 रुग्णांचे बळी गेले, तेव्हाही दोषींवर कारवाई झाली नाही. आता पुन्हा चार जणांचा मृत्यू. शासकीय रुग्णालयात प्रशासनाला कुणाची भीती राहिलीच नाही. सरकार दोषींना वाचवतं आहे. “पोस्टमार्टम अहवाल प्रतीक्षेत, चौकशी समितीकडून अपेक्षा अल्पसध्या मृत भिक्षेकांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु याआधी अशा चौकशी समित्यांतून ठोस निष्कर्ष किंवा कार्यवाही झाली नसल्याने या प्रकरणातही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पिण्यासाठी पाणी नाही, चार भिक्षेक मृत्यू प्रकरणात नातेवाईकांचा गंभीर आरोप Read More »

Arun Jagtap : मोठी बातमी! माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

Arun Jagtap : माजी विधान विधानपरिषदेचे सदस्य अरुणकाका जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे.   

Arun Jagtap : मोठी बातमी! माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन Read More »

नगर शहरात पुन्हा वाद, ‘त्या’ प्रकरणात कारवाई करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

Ahilyanagar News: नगर शहरात 6 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि शांततेत रामनवमी निमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती मात्र यावेळी काही समाजकंटकांकडून मुस्लीम समाजाचे धार्मिक स्थळाची विटंबना करणारे काही फ्लेक्स झळकवण्यात आल्याने आता पुन्हा एकदा शहरात नवीन वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात समस्त मुस्लीम समाज अहमदनगरच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आरोपींवर आणि यामागील मास्टरमाईंडवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अहमदनगर मध्ये मिरवणुक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटक यांनी महाराष्ट्राचे वातावरण दुषित होवुन दंगल व्हावी या उददेशाने मुस्लीम समाजाचे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का-मदिना शरिफ याचे फलक झळकवुन जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का व मदिना यांची विटंबना केली. त्या फलकावर हिंदू देवतांचे फोटो सोबत मक्का-मदिना शरिफ येथील फोटो लावुन मुस्लीम समजाला हिनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं या निवेदनात म्हटले आहे. तसेच काही समाजकंटकानी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटोही झळकवले त्यावर लांडो का सिर कटेगा, कुत्तों में बटेगा आ जा किसमे है दम हिंदु है हम असा मजकुर होता त्याबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे फोटोसोबत संसदेत पारित झालेला वक्फ कायदा संबधी अरे मुल्लो बसा आता गप्प देशात वक्फचं प्रकरण झालं थप्प असा मजकुर लिहीण्यात आलेला होता. तसेच मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी मुस्लीम समाजाला उचकवण्यासाठी दंगल घडविण्याचे हेतुने घोषणा बाजी केली हे प्रकरण संपत नाही तर मॅक्स-प्रथम-491 इन्स्टा आयडी वरुन प्रथम भाऊ पवार याने त्याचे ईन्स्टा अंकाऊट स्टोरी लावुन समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असं या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

नगर शहरात पुन्हा वाद, ‘त्या’ प्रकरणात कारवाई करण्याची मुस्लिम समाजाची मागणी Read More »

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा

Evangeline Booth Hospital: इव्हॅनजलीन बूथ हॉस्पीटल, येथे नर्सिंग स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा थाटात संपन्न झाला. फेब्रुवारी 1943 साली बूथ हॉस्पीटल मध्ये नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. दर्जेदार प्रशिक्षणाची परंपरा असलेले या संस्थेतून जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले, आणि महाराष्ट्रात, भारतात, आणि जगातील विविध भागात सेवा देत आहेत. आजही येथिल विद्यार्थ्यांची देशात आणि परदेशात अधिक मागणी आहे. काहीं कार्यरत आहेत तर काही निवृत्त झाले आहेत. रूग्ण सेवेचा वारसा असलेल्या बूथ हॉस्पीटल चे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या स्नेहसंमेलना साठी देशाच्या विविध भागातील आणि परदेशात वास्तव्यास असणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते. जवळपास 40 वर्षानंतर ते सर्व अशाप्रकारे एकत्र आले होते. एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, भेटल्यानंतर ओळखता येईल का? असा प्रश्न घेउन आलेले सर्व एकमेकांना पाहून भावूक झाले. त्यांची ती गळाभेट, डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून पाहणाऱ्यांच्या पापण्याच्या कडा ओल्या झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात जरी भावनिक वातावरनात झाली तरी पुढे जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं. गाणं , नृत्य जुन्या आठवणींना बूथ हॉस्पीटल ची शाळा 40 वर्षानंतर पुन्हा भरली. प्रीती भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी माजी परिचारिका विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग दिला, त्यात काही स्थानिक विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच नर्सिंग स्कूल च्या प्राध्यापक मल्लिका साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि मेजर ज्योती कळकुंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सेवा निवृत्त कमिशनर लहासे आणि त्यांच्या पत्नी कमिशनर कुसुम लहासे, कॅप्टन डेनिसन परमार, कॅप्टन निलम परमार, कॅप्टन सुहास वाघमारे आणि कॅप्टन प्रिया वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा Read More »