DNA मराठी

ताज्या बातम्या

census 2026

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय

Census 2026 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३० दिवसांसाठी नियोजित असलेले जनगणनेचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून महानगरपालिकेने कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. या यशाबाबत आयुक्त डांगे म्हणाले, “नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या मोहिमेच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने स्वतःसाठी वेळेची उद्दिष्टे निश्चित करून शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. त्यामुळे जनगणना मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक गती मिळाली. मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्यात आल्या. तसेच दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील टप्प्यांचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण मोहिमेत सातत्य, वेग आणि अचूकता कायम राखणे शक्य झाले.” अतिरिक्त आयुक्त मुतकेकर यांनी सांगितले की, जनजागृती आणि संवादावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी विविध नावीन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर चित्रफिती, दैनंदिन ग्राफिक संदेश, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स तसेच विविध समाजमाध्यमांद्वारे नागरिक, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला. अचूक माहिती संकलन, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रभावी जनजागृती आणि संघभावनेच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ही कामगिरी भविष्यातील प्रशासकीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून जनगणना कार्यात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक आणि सहायक पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय Read More »

Vikhe Patil

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर

Ashadhi Wari Palkhi : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्ती महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज व श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्याबरोबरच अन्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे पुरवणे तसेच जलरोधक मंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनास सादरही करण्यात आला होता. राज्यातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. “आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर Read More »

navale bridge

Navale Bridge : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू 4 जण गंभीर जखमी…

Navale Bridge : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. सीमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाच्या उतारावरून येत असताना सीमेंट ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण आणि ब्रेक निकामी होण्यामागील तांत्रिक बाबींचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नवले पुलावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Navale Bridge : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू 4 जण गंभीर जखमी… Read More »

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

jcb

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त

Jalgaon News : जळगावमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एमडी ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित ड्रग माफिया रईस हसन देशमुख याच्या अवैध घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. जळगावच्या इतिहासात अमली पदार्थ तस्कराविरोधात झालेली ही पहिलीच बुलडोझर कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात आरोपींकडून कार, दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले होते. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला रईस हसन देशमुख सध्या पोलीस कोठडीत असून, तपासादरम्यान त्याने एमआयडीसी परिसरात नियमांचे उल्लंघन करून अवैध दुकान आणि घर उभारल्याचे निष्पन्न झाले.यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि जिल्हा पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत आरोपीचे अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने आरोपीचे दुकान आणि घर जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर प्रशासकीय आणि आर्थिक कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत असल्याची माहिती पंकज गोसावी, उपायुक्त महानगरपालिका, जळगाव यांनी दिली.

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त Read More »

crime

Shrirampur News : श्रीरामपूर हादरल! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातून थरारक घटना समोर आली आहे. गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने कहाणे यांचा प्राण थोडक्यात बचावला. भररस्त्यात चालत्या वाहनावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे श्रीरामपूर परिसर खळबळ उडाली आहे. तसेच पुन्हा एकदा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यातच श्रीरामपूर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहनाच्या दिशेने थेट गोळीबार केला. प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहे.

Shrirampur News : श्रीरामपूर हादरल! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार! Read More »

img 20260607 wa0006

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई

Salman Dolare : खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल असलेला सलमान डोलारे गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सलमान डोलारे लपून बसल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कल्याण क्राईम ब्रँच युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून तपासणी केली असता, सलमान डोलारे घरातील कपाटात लपलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा सुरू केल्यानंतर परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि इमारतीखाली नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कल्याण परिसरात खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनेक अनधिकृत इमारती उभारल्याचा आरोप आहे. युसुफ हाइट्स, मरियम टॉवरसह अनेक प्रकल्पांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. याशिवाय या इमारतींशी संबंधित फाईल चोरी प्रकरणी महापालिकेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचाही तपास सुरू आहे. सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच तसेच विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून करण्यात येत आहे. तपासादरम्यान केवळ सलमान डोलारेच नव्हे, तर त्याचे काही सहकारी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही अधिकारी देखील चौकशीच्या कक्षेत असल्याची चर्चा असून, सलमान डोलारेच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. आता या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई Read More »

Rain 1

Mansoon Alert : किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Mansoon Alert : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे : • आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये • विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे

Mansoon Alert : किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी Read More »

img 20260607 wa0080

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातून ७ जून रोजी जेरबंद केले. तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन जवळील अरणगाव हद्दीत ही घटना घडली होती. या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजी विठ्ठल मोहिते (वय ५२), राजू रामदास मोहिते (वय ३६, दोघे रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड) अक्षय रामदास मोहिते (वय २७, रा. मालठा ता.हातगाव, जि.नांदेड), छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ) व दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा.दगडवाडी, ता.हातगाव, जि.नांदेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी (ता.किनवट, जि. नांदेड) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ झेंडीगुळा लोणी येथील आरोपींच्या घरी छापा टाकुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे कब्जातून १६ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विप्ट कार, बनवाट सोन्याची नाणी, कोयता असा एकुण २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड Read More »

img 20260606 wa0004

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता?

Maharashtra Politics : “६०० वर्षे मुघलांचे राज्य होते, १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते, ७० वर्षे काँग्रेसचे सरकार होते मग हिंदू समाजाला धोका नेमका गेल्या काही वर्षांतच कसा निर्माण झाला?” हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार फिरताना दिसतो. या प्रश्नाचे उत्तर राजकीय भूमिकेनुसार बदलू शकते परंतु त्यामागील मूलभूत प्रश्न मात्र अधिक गंभीर आहे. तो म्हणजे, धर्म खरोखर धोक्यात आहे की धोक्याची भावना राजकीयदृष्ट्या निर्माण केली जात आहे? भारतातील हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा धार्मिक समुदाय आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, असंख्य श्रद्धास्थाने, विविध तत्त्वज्ञान, भाषा आणि सामाजिक रचना यांचा हा समाज आहे. अशा समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, असे मानण्यासाठी अत्यंत गंभीर आणि व्यापक स्वरूपाचे पुरावे आवश्यक असतात. परंतु सार्वजनिक चर्चेत अनेकदा भावनांचा आवाज तथ्यांपेक्षा मोठा असतो. लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गेल्या काही दशकांत धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय न राहता निवडणुकीतील प्रभावी राजकीय साधन बनला आहे. पूर्वी विकास, रोजगार, शेती, शिक्षण किंवा आरोग्य यांवर केंद्रित असलेले राजकारण आता ओळख, अस्मिता आणि धार्मिक ध्रुवीकरणाभोवती फिरताना दिसते. कारण भीती ही आश्वासनांपेक्षा अधिक प्रभावी राजकीय प्रेरणा ठरते. यामुळेच आज गावोगावी “धर्मरक्षक”, “हिंदुत्ववादी नेता”, “समाजरक्षक” अशा उपाध्या घेऊन अनेक जण पुढे येताना दिसतात. प्रश्न असा आहे की, जर हिंदू समाज खरोखरच इतका शक्तिशाली, व्यापक आणि ऐतिहासिकदृष्ट्या टिकाऊ असेल, तर त्याच्या रक्षणासाठी इतक्या नव्या रक्षकांची अचानक गरज का भासावी? धर्माच्या रक्षणाची चिंता अधिक आहे की धर्माच्या नावावर राजकीय नेतृत्व निर्माण करण्याची? लोकशाहीत मतभेद हे स्वाभाविक असतात. एखाद्या नागरिकाने एखाद्या पक्षाला मतदान केले नाही, एखाद्या नेत्याच्या विचारांशी सहमत झाला नाही किंवा एखाद्या धोरणावर टीका केली, म्हणून तो धर्मविरोधी ठरत नाही. राजकीय असहमती आणि धार्मिक वैर यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक पुसली गेली, तर लोकशाहीची सर्वात मोठी हानी होते. कारण मग प्रत्येक प्रश्न धर्माच्या चष्म्यातून पाहिला जाऊ लागतो. धर्म हा श्रद्धेचा विषय आहे मतदान हा राजकीय अधिकार आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कायमस्वरूपी जोडण्याचा प्रयत्न झाला, तर नागरिकत्वाची संकल्पनाच कमकुवत होते. एखाद्या व्यक्तीचे राजकीय मत वेगळे असू शकते, पण त्यामुळे तो आपल्या धर्माचा शत्रू ठरत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या समुदायाच्या काही व्यक्तींच्या कृतींवरून संपूर्ण समुदायाला दोषी ठरवणे हेही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. भारतीय समाजाने मुघल राजवट, ब्रिटिश सत्ताकाळ, फाळणी, आणीबाणी, दंगली आणि अनेक राजकीय उलथापालथी अनुभवल्या आहेत. तरीही समाज टिकून राहिला, कारण त्याची ताकद केवळ धर्मात नव्हे तर सहअस्तित्वात होती. त्यामुळे आज जर कोणता धोका असेल, तर तो धर्मापेक्षा संवाद हरवण्याचा, प्रश्न विचारण्याची सवय कमी होण्याचा आणि नागरिकांना सतत भीतीच्या मानसिकतेत ठेवण्याचा आहे. धर्म वाचवण्यापेक्षा लोकशाही जपणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण लोकशाही मजबूत असेल, तर प्रत्येक धर्म सुरक्षित राहू शकतो. पण लोकशाहीच कमकुवत झाली, तर कोणताही धर्म, कोणतीही विचारधारा किंवा कोणताही समुदाय स्वतःला पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. म्हणून आजचा खरा प्रश्न “हिंदू धोक्यात आहे का?” हा नाही. खरा प्रश्न असा आहे की, आपण धर्माच्या नावावर भीती विकणाऱ्यांवर अधिक विश्वास ठेवणार आहोत की लोकशाहीच्या मूल्यांवर?

Maharashtra Politics: हिंदू धोक्यात की प्रश्न विचारण्याची क्षमता? Read More »