DNA मराठी

ताज्या बातम्या

acb action

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामा व इतर 15 नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता. तपासात मदत करण्यासाठी त्यांनी तडजोडीअंती 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 18 मे 2026 रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : तनपुरे यांच्या पदरात त्यागाचे फळ… भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी ?

Prajakt Tanpure : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण माजी राज्यमंत्री राहिलेले व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहिलेले प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी तनपुरे यांनी माघार घेतली होती व फडणवीस यांच्या शब्दाला मान दिला होता अखेर भाजपकडून तनपुरे यांच्या त्यागाच्या बदल्यात विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल अशी खात्रीशीर माहिती समजते आहे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाली यावेळी कडीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तर प्राजक्त तनपुरे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत तनपुरे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना फोन केला व तनपुरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत निवडणुकीतून माघार घेतली व अक्षय कर्डिले आमदार झाले दरम्यान निवडणुकीतून माघार घेतलेले तनपुरे यांची आगामी काळातील भूमिका काय असणार तसेच ते भाजप प्रवेश करणार का मुख्यमंत्री फडणवीस हे तनपुरे यांचे राजकीय पुनर्वसन करणार का असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले दरम्यान नुकतीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली व भाजपकडून अहिल्यानगर च्या जागेवरती दावा करण्यात आला तर भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात येणार यावरती चर्चा रंगलेल्या असतानाच आता थेट तनपुरे यांचे नाव समोर येत आहे यामुळे पोटनिवडणुकीतील त्यागाच्या बदल्यात विधान परिषदेची उमेदवारी देत भाजपकडून तनपुरे यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे नुकतेच तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या डीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा मामा असलेले जयंत पाटील यांचा फोटो ठेवल्याने एकच चर्चा सुरू झाली होती. तनपुरे सध्या मुंबईत असून नेमकं त्यांनी भाजपात प्रवेश घेणार का व याबाबतची तारीख अद्याप निश्चित झाली नाही तसेच तनपुरे यांच्या समर्थकांकडून देखील याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेले नाही यामुळे तनपुरे यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

Prajakt Tanpure : तनपुरे यांच्या पदरात त्यागाचे फळ… भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी ? Read More »

Ram Shinde on Sujay Vikhe: सुजय विखे विधान परिषदेसाठी इच्छुक पण…, उमेदवारीबाबत राम शिंदे स्पष्टच म्हणाले

Ram Shinde on Sujay Vikhe: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहिल्यानगर विधानपरिषद जागा कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना भाजप नेते राम शिंदे यांनी जिल्ह्यातून एका जागेसाठी माजी खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक जण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे. राम शिंदे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेतेच याबाबत निर्णय घेणार निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहे. यामध्ये सत्यजित कदम, भानुदास बेरड यांच्यासह माजी खासदार सुजय विखे हे देखील इच्छुक आहे ते राज्यसभेला देखील इच्छुक होते व विधान परिषदेसाठी देखील इच्छुक आहे. आपण मागच्या दाराने जाणार नाही असं ते म्हणाले त्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची देखील कमी नाही. याबाबत या निवडणुकीसाठी पक्ष पातळीवरती निर्णय होईल तसेच काही वेगळा देखील निर्णय होऊ शकतो असे सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी केले. तर विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे यावर शिंदे म्हणाले, त्यांचा कुठलाही अर्ज आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यांचा व भारतीय जनता पार्टीचा सद्या तरी कोणताही संबंध नाही. याबाबत त्यांनी देखील खुद्द स्पष्टीकरण दिलेला आहे, मात्र राहुरी पोटनिवडणुकीत त्यांनी माघार घेतली हे देखील विसरता येणार नाही असं देखील यावेळी शिंदे म्हणाले तसेच अद्याप तनपुरे यांनी भाजपकडे याबाबत कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. तनपुरे व देवेंद्र फडणवीस मध्ये काय चर्चा झाली याबाबत योग्य वेळी समजेल असे शिंदे म्हणाले.

Ram Shinde on Sujay Vikhe: सुजय विखे विधान परिषदेसाठी इच्छुक पण…, उमेदवारीबाबत राम शिंदे स्पष्टच म्हणाले Read More »

img 20260526 wa0024

Devendra Fadnavis: पुण्याची जागा भाजपनेच लढवावी; आमदारांची CM फडणवीसांकडे मागणी

Devendra Fadnavis : पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष व स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून (दि. २५) सुरुवात झाली असून, पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुण्याची जागा भाजपकडे घेण्याची भूमिका मांडली. यावेळी आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य तसेच इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ आहे. तसेच काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा वाढत आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर हे देखील विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान बिडकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadnavis: पुण्याची जागा भाजपनेच लढवावी; आमदारांची CM फडणवीसांकडे मागणी Read More »

img 20260526 wa0007

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार

Pratap Sarnaik :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी “ इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती ” ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज किमान १००० लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. “लहान बचतीतून मोठी आर्थिक नशिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना तातडीने आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. प्रत्येक आगाराने आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आदेशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येईल तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे. “एसटीचा चालक हा केवळ वाहन चालक नसून तो संस्थेच्या अर्थकारणाचा शिल्पकार आहे. जबाबदारीने आणि कौशल्याने वाहन चालवणारा चालक एसटीचे लाखो रुपये वाचवू शकतो,” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. याशिवाय ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत केली असेल, त्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे के.पी.एल. (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी येत असेल, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंधन बचतीसाठी वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल.तसेच बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. टायर प्रेशर, इंजिन ट्युनिंग, ऑईल गळती, ब्रेक प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींमधील त्रुटीमुळेही इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच खर्च नियंत्रण हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. इंधन बचत ही केवळ आर्थिक बाब नसून ती राष्ट्रीय संपत्तीच्या जतनाशी संबंधित जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि चालकाने ही मोहीम स्वतःची समजून राबवावी,” असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार Read More »

img 20260527 wa0004

Pathardi Murder Case : पाथर्डीत पोलिसी दादागिरीचा कळस; मृत्यूला जबाबदार कोण?

Pathardi Murder Case: पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथे घडलेली घटना ही केवळ अपघातानंतरचा वाद नाही, तर पोलिसी व्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या दादागिरीचे भयावह रूप आहे. एका सामान्य नागरिकाचा संशयास्पद मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ एका मृत्यूचा राहिलेला नाही, तर “पोलीस संरक्षण देतात की जीव घेतात?” हा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. मोटारसायकल अपघातानंतर संबंधित प्रकरणात पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बोलावून घेतल्याचे आरोप होत आहेत. नुकसानभरपाईच्या नावाखाली संबंधित व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच थांबले नाही, तर गंभीर जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक म्हणजे एवढ्या गंभीर घटनेत केवळ साधी एनसी दाखल करण्यात आली. हा प्रकार पाहता संपूर्ण प्रकरण “अपघात” म्हणून दाखवून विमा रक्कम उकळण्याचा किंवा सत्य दडपण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. जर पोलिसांच्या छत्रछायेखाली गुंड नागरिकांना मारहाण करत असतील आणि त्यातून एखाद्याचा मृत्यू होत असेल, तर ही घटना कायद्याचा नव्हे तर जंगलराजाचा पुरावा मानावा लागेल. कायद्याचे रक्षण करण्यासाठी नेमलेले काही अधिकारीच जर गुंडांसोबत हातमिळवणी करून सर्वसामान्यांना वेठीस धरत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना गणवेश घालण्याचा अधिकार तरी आहे का? या प्रकरणात आणखी गंभीर आरोप म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न. संबंधित पोलिस आणि त्यांच्या संपर्कातील गुंडांनी मृताच्या घरी जाऊन धमकावल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जर न्याय मागणाऱ्यांनाच गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत घातक संकेत आहेत. पाथर्डी तालुक्यात “प्रकरणे दडपण्यात पटाईत” अशी ओळख निर्माण झालेल्या संबंधित पोलीस निरीक्षकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. केवळ बदली नव्हे, तर संबंधित अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थ करत आहेत. आज जर या घटनेवर पांघरूण घातले गेले, तर उद्या प्रत्येक सामान्य नागरिक पोलिस ठाण्याच्या दारात उभा राहताना घाबरेल. कारण गुन्हेगारांपेक्षा पोलीसच अधिक धोकादायक वाटू लागले, तर ती कोणत्याही समाजासाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरेल. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर पोलिस दलावरील उरलेला जनतेचा विश्वास टिकवण्याची अखेरची संधी आहे. अन्यथा “रक्षकच भक्षक झाले” ही भावना जनमानसात कायमची घर करून बसेल.

Pathardi Murder Case : पाथर्डीत पोलिसी दादागिरीचा कळस; मृत्यूला जबाबदार कोण? Read More »

maharashtra government

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तर दुसरीकडे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ निर्णय ▶सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार. (परिवहन विभाग) ▶शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) ▶डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता. (उद्योग विभाग) ▶नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता. (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ Read More »

anil rathod

Anil Rathod : मोठी बातमी! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत नेते अनिल राठोडसह सर्व निर्दोष

Anil Rathod : नगरच्या केडगावमध्ये २०१८ मध्ये दोघा शिवसैनिकांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता मोठा निकाल आला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. नेमकं प्रकरण काय? एप्रिल २०१८ मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०८ लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली, त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते. या कारवाईनंतर अनिल राठोड यांनी म्हटले होते केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती. शिवसेनेचा या दगडफेकीशी थेट संबंध नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पुढे २०२० मध्ये करोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले. न्यायालयात खटला सुरु होता. त्याचा निकाल आता आला असून सर्वांची सुटका झाली आहे.

Anil Rathod : मोठी बातमी! केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून दिवंगत नेते अनिल राठोडसह सर्व निर्दोष Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान मोदी महागाई नियंत्रण करता येत नसेल तर खूर्ची सोडा

Harshwardhan Sapkal: सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा करणारे मागील १२ वर्षापासून सत्तेत असताना पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगमाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवलेल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारने तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. इंधन दरवाढीवर भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. गेल्या १२ वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती ३८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यावेळी तर इराण इस्त्राईलचे युद्ध नव्हते. पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार ठरतात हे सर्वांनाच माहित आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. पण मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल १०० च्या आसपास विकले जात होते. आतातर नरेंद्र मोदी सरकार इथेनॉलमिश्रित निकृष्ट दर्जाचे पेट्रोल ११० रुपये प्रति लिटर दराने विकत आहे. गेल्या १२ वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील चार पाच दिवसात केलेल्या चार रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून १२,४०० कोटींची कमाई केली. ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकून केलेली आहे. काँग्रेस सरकारच्या वेळी १-२ रुपयांनी पेट्रोल दरवाढ झाली की भाजपाचे नेते रस्त्यावर उतरत बोंबा मारत होते, मग आता महागाईवर गप्प का, असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक आहे असा दावा भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. साठा असेल तर राज्यातील विविध भागात पेट्रोल पंपावर रांगा का लागल्या आहेत?, यावरील भाजपा नेत्यांचे उत्तरही अत्यंत हास्यास्पद आहे. पेट्रोल डिझेलचा साठा केल्याने टंचाई निर्माण होत आहे, असे अत्यंत बेजबाबदार व अत्यंत निर्लज्जपणाचे विधान भाजपाचे नेते करत आहेत. हे विधान जबाबदारीपासून पळ काढणारे व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारे आहे. जनता मुर्ख नाही, हे भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आंदोलन करणार.. नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जनतेत तीव्र संताप आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी व जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस पक्ष विविध विभाग, सेल व संघटनांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे.

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान मोदी महागाई नियंत्रण करता येत नसेल तर खूर्ची सोडा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत. या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Devendra Fadnavis: जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »