DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

election

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल

Pathardi News : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ संचालक पदांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस अगोदरपर्यंत २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संचालक मंडळात नव्याने प्रवेश करण्यासाठी प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे. आहे. १९ व्यक्तींनी २५ अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (२ जून) अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस अखेर आलेले अर्ज व त्यानंतर अंतिम छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २७ जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आज (मंगळवारी) असल्याने उमेदवारी अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल Read More »

election

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस

Nevasa Election : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी सोमवारी (ता. १) ७७ उमेदवारांचे ८१ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली. २९ मे अखेर एकूण २२ अर्ज दाखल झाले होते. काल अखेर एकूण दाखल उमेदवारी अर्जाची संख्या १०३ झाली आहे. गटनिहाय दाखल अर्ज शेवगाव गट – राम आसराजी लांडे, सिद्धार्थ शिवाजीराव दसपुते, मच्छिंद्र विठ्ठल कुटे, राजेंद्र रावसाहेब ढमढेरे, लक्ष्मण गंगाराम टाकळकर, धनंजय आबासाहेब देशमुख, संतोष शंकरराव पावसे, पंडित रामभाऊ भोसले. शहरटाकळी गट – नरेंद्र मारुतराव घुले (२ अर्ज), कुकाणा गट- गोरक्षनाथ सुखदेव नवले, उध्दव श्रीपती नवले, दत्तात्रय त्रिंबक काळे, बाबासाहेब कुंडलिक गव्हाणे, अशोक जगन्नाथ मंडलिक, सुमनबाई दत्तात्रय काळे, जगन्नाथ रामकृष्ण साबळे, चंदू लक्ष्मण फुलारी, विठ्ठल पांडुरंग अभंग, अमोल विठ्ठल अभंग, भारतराव रामकृष्ण साबळे. अर्जुन बाजीराव नवले (२ अर्ज), विजय ज्ञानदेव भागवत, दादासाहेब नानासाहेब वाबळे, संदीप काकासाहेब देशमुख. नेवासा गट – विक्रम साहेबराव चौधरी, जगदीश बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब सखाराम साळुंके, अरुण बबनराव देशमुख, दादासाहेब गोरक्षनाथ गंडाळ. वडाळा बहिरोबा गट – भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, अशोक कारभारी काळे, जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे, कोंडीराम मारुती कोलते, झुंबर अंबादास शेळके (२ अर्ज), कारभारी मोहन चेडे, कचरदास धनराज गुंदेचा, अभिषेक जनार्दन पटारे, शिवाजी राजधर कोलते. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, भानुदास नारायण काळे, सदाशिव आबाजी आरगडे, निवृत्ती चिमाजी दातीर, देविदास आसाराम पाटेकर, मंगलाबाई देविदास पाटेकर, रेवणनाथ जगन्नाथ काळे. उत्पादक/बिगर उत्पादक सहकारी संस्था मतदारसंघ – गणेश भानुदास चावरे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ – भास्कर उत्तम शिंदे, मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, शंकर संभाजी भारस्कर. महिला राखीव – विजया कल्याणराव म्हस्के, सुमनबाई दत्तात्रय काळे, इंदूबाई बलभीम गव्हाणे, मंगलाबाई देविदास पाटेकर. इतर मागासवर्ग प्रतिनिधी – विजया कल्याणराव म्हस्के, जनार्धन राधाकिसन भागवत, दत्तात्रय त्रिंबक काळे, सिध्दार्थ शिवाजीराव दसपुते, अशोक जगन्नाथ मंडलिक, चंदू लक्ष्मण फुलारी, अमोल विठ्ठल अभंग, विठ्ठल पांडुरंग अभंग, अरुण अशोक गरड, अरुण बबन देशमुख, प्रसाद जनार्धन पटारे, कुसुम दत्तात्रय काळे, अर्जुन बाजीराव नवले, अर्जुन बाजीराव नवले, विजय ज्ञानदेव भागवत, अभिषेक जनार्धन पटारे. विमुक्त जाती – भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघ – रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, किसन बाबुराव यादव, तुकाराम विनायक मिसाळ, सदाशिव आबाजी आरगडे.

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस Read More »

img 20260602 wa0015

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

Live Movie: काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्यांनी ‘लाईव्ह’बाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. ‘लाईव्ह’ या शीर्षकावरून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना येत नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ चित्रपटाची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. वास्तवाला मनोरंजनाची जोड देत ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीतप्रधान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ‘लाईव्ह’ चित्रपटाची संपूर्ण टिम खूप मेहनत घेत असल्याचेही राय यांनी सांगितले. दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार महालिंग कंठाळे यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख कला दिग्दर्शकाची बाजू सांभाळत आहेत.

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू… Read More »

rani lanke

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार?

Rani Lanke: महाराष्ट्र विधान परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तथा तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके ह्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणी लंके या आता विधान परिषदेत आपलं नशीब आजमावत आहे. विधान परिषद निवडणुकीचे बिगल वाजले असून अनेक इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी देखील सुरू आहे यातच राष्ट्रवादीच्या असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला असून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातच आता महाविकास आघाडी देखील आपले उमेदवार घेऊन या निवडणुकीत सज्ज झाली आहे. ससाने दीप चव्हाणसह लंके विधान परिषदेच्या मैदानात श्रीरामपूर मधून करण ससाने यांच्यासह नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नगर शहर अध्यक्ष दीप चव्हाण यांना देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या राणी लंके यादेखील उद्या म्हणजे सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी दिली. आमदार जगताप यांचे बंधू देखील इच्छुक महायुतीकडून विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी मधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना दिले जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती आहे मात्र राष्ट्रवादीच्या या जागेवरती आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे देखील जागा लढवण्यास इच्छुक आहे तसेच त्यांनी अर्ज देखील घेऊन गेले आहेत यामुळे महायुतीमध्ये देखील उमेदवारीवरून धसपूस पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तुल्यबळ हे मतदार स्वरूपात जास्त आहे यातच तनपुरे यांच्या बाजीप्रवेशाने तनपुरे यांचा जनसेवा पॅनलचे मत देखील भाजपला मिळणार असून आता आमदार सत्यजित कदम यांच्या संगमनेर सेवा समिती चे नगरसेवक काय भूमिका घेणार तसेच तांबे काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rani Lanke: विधान परिषदेचे बिगुल! राणी लंके विधानपरिषद लढवणार; अर्ज दाखल करणार? Read More »

rain alert

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’

Ahilyanagar Weather Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जून पर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे. मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा व कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वादळी वारा, पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या वा नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यात, नदीच्या वा कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये व धोकादायक ठिकाणी स्वतःचे छायाचित्र काढू नये. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ Read More »

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र

Rais Shaikh : राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा आदी १२ मागण्या समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी १९७८ क्रमांकांच्या लक्षवेधी सूचनेच्या कार्यवाहीबाबत सोमवारी मुस्लीम आमदारांची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुस्लीम आमदारांची बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, या विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील ३६ आणि जिल्हा कार्यालयातील ८५ नवी पदे अद्याप भरलेली नाहीत. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे कामकाज अद्याप सुरळीत झालेले नाही. भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र काम प्रत्यक्ष सुरु नाही. तसेच लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरु करण्याची गरज आहे. आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. उर्दू साहित्य अकादमीच्या अधिक्षक व कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिलेले नसून या कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब प्रलंबित आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक -आर्थिक सर्वेक्षण करण्याच्या दिलेल्या कामाचा चार वर्षे कार्यारंभ दिलेला नाही. या सर्व प्रलंबित बाबी मुस्लीम समाजाच्या विकासासाशी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले. १ जून रोजी आमदार शेख यांचा वाढदिवस असल्याने पूर्वनियोजित कार्याक्रमामुळे आपण या बैठकीस हजर राहू शकत नाही. दिवगंत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला. त्यांची अपुरी राहिलेली या विभागाची कामे आपण मार्गी लावावीत, अशी विनंती आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र Read More »

farmers

IMD Rain Alert: आजपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

IMD Rain Alert: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये ⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.

IMD Rain Alert: आजपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये Read More »

img 20260530 wa0004

Rajesh Tope :  टोपेंची संभाव्य एक्झिट : राष्ट्रवादीसमोरील नवा प्रश्न?

Rajesh Tope : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. पक्षांतराचे वारे इतके वेगाने वाहत आहेत की कालपर्यंत एखाद्या पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे नेते आज दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगताना दिसतात. अशाच चर्चांचा केंद्रबिंदू सध्या माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ठरले आहेत. ते भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रत्यक्षात ते पक्षांतर करणार की नाही, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र केवळ या चर्चेनेही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. राजेश टोपे हे केवळ जालना जिल्ह्यापुरते मर्यादित नेते नाहीत. राज्याच्या राजकारणात त्यांनी संयमी, अभ्यासू आणि सर्वपक्षीय संबंध जपणारा नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची संभाव्य एक्झिट ही केवळ एका नेत्याचे पक्षांतर नसून राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोरील संघटनात्मक आव्हान म्हणून पाहावी लागेल. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीही अनेक मोठे धक्के पचवले आहेत. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर पक्षाची साथ सोडली. तरीही शरद पवार यांनी नव्याने संघटना उभी केली, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवले आणि लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवून पक्षाचे अस्तित्व केवळ टिकवलेच नाही, तर त्याला नवी ऊर्जा दिली. त्यामुळे एका नेत्याच्या जाण्याने पक्ष संपुष्टात येईल, असे चित्र निश्चितच नाही. तरीही टोपेंच्या बाबतीत प्रश्न वेगळा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाच्या कामकाजात पूर्वीइतका सक्रिय सहभाग घेतला नाही, अशी चर्चा अनेकदा झाली. त्यांच्या नाराजीची कारणे नेमकी काय आहेत, याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. राजकारणात अफवा आणि वास्तव यामधील अंतर अनेकदा मोठे असते. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील फूट पडण्यापूर्वी आणि नंतरच्या अनेक संवेदनशील घडामोडींमध्ये टोपे यांनी तुलनेने संयमी भूमिका घेतली. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद मिटावेत, दोन्ही बाजू पुन्हा एकत्र याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामुळे ते पक्षाच्या मुख्य संघर्षांपासून काहीसे दूर राहिले, अशी प्रतिमा निर्माण झाली. जर भविष्यात राजेश टोपे यांनी खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर तो शरद पवार गटासाठी नक्कीच मोठा धक्का ठरेल. कारण त्यामागे केवळ एका नेत्याचे जाणे नसून मध्यममार्गी आणि स्वीकारार्ह नेतृत्वाची उणीव निर्माण होण्याचा धोका असेल. दुसरीकडे, अशा प्रसंगी शरद पवार यांचे नेतृत्व पुन्हा एकदा कसोटीवर लागेल. गेल्या काही दशकांतील राजकीय अनुभव पाहता संकटातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता अनेकदा सिद्ध झाली आहे. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे. राजेश टोपे यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षासमोरील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. टोपे जातील की राहतील, याचे उत्तर काळ देईल; परंतु त्यांच्यासारख्या स्वीकारार्ह आणि अनुभवी नेत्याला गमावणे हे शरद पवारांच्या पक्षाला सहज परवडणारे नाही, हे तितकेच खरे.

Rajesh Tope :  टोपेंची संभाव्य एक्झिट : राष्ट्रवादीसमोरील नवा प्रश्न? Read More »