DNA मराठी

Amol Khatal: संगमनेरकरांना दिलासा द्या; वीजखंडिती तात्काळ बंद करा

amol khatal

Amol Khatal: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होत असलेल्या वीजखंडितीच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या लोडशेडिंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने हा प्रकार तातडीने बंद करून ग्रामीण भागाला अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

राज्यात कुठेही लोडशेडिंग होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे आमदार खताळ यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे स्थानिक अधिकारी वरिष्ठ स्तरावरून वीज व्यवस्थापन (ईएलआर) लागू करण्याचे आदेश असल्याचे सांगत रात्री-अपरात्री तसेच सायंकाळच्या महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीजपुरवठा खंडित करत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.

सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांची तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज, लघुउद्योग, व्यावसायिक व्यवहार आणि कृषी क्षेत्रावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील जनतेला नियमित वीजपुरवठा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली सायंकाळची वीजखंडिती तात्काळ थांबविण्यात यावी आणि संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या स्पष्ट सूचना देऊन अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी ठाम मागणी आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *