Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : “भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा शेवगाव” या संस्थेमार्फत ठेवीदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पीडित गुंतवणूकदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
संस्थेकडून ११ ते १८ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांकडून मुदत ठेव स्वरूपात लाखो रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना ना मूळ रक्कम परत मिळाली, ना व्याज अदा करण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
तक्रारदारांनी सांगितले की, घरबांधणी, शेती, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कौटुंबिक गरजांसाठी साठवलेली आयुष्यभराची पुंजी या संस्थेत गुंतवली होती. मात्र पैसे परत मागितल्यावर संस्थेकडून केवळ टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे आणि मानसिक त्रास दिला जात आहे.
या प्रकरणात संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक यांनी विश्वास संपादन करून जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेवीदारांनी एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी करत शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
विशेष म्हणजे, आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर कार्यालयातून शेवगाव पोलिस स्टेशनला लेखी पत्र पाठवून सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
तरीही स्थानिक पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. “आर्थिक गुन्हे शाखेचे आदेश असूनही पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत, मग सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल पीडित गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे.
वेळेत कारवाई झाली नाही, तर आणखी अनेक ठेवीदार पुढे येतील आणि मोठे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






