Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच ‘ब्रेक’ लावण्याचे नियोजन सुरू आहे का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे ‘कंजेश्चन टॅक्स’ (गर्दी शुल्क) आकारण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या ‘टॅक्स बॉम्ब’वर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे.
आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या प्रस्तावाचा समाचार घेताना विचारले की, मुंबईकडून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा जातो, मग बदल्यात मुंबईकरांना नवीन करांचा बोजा का? “एकीकडे मुंबईतील उद्योग आणि रोजगार राज्याबाहेर घालवायचे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य जनतेला नवीन करांच्या जाळ्यात ओढायचे, हा भाजपचा दुहेरी डाव आहे,” असे ठाकरे म्हणाले.
याआधीही रस्ते आणि सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करून मुंबईची तिजोरी रिकामी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
मकरंद नार्वेकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव म्हणजे भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा खडा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. “रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणारी भाजप जनतेला ‘टॅक्स रिफंड’ देणार का? खराब हवामानामुळे आरोग्याचे नुकसान होणाऱ्या मुंबईकरांना भरपाई मिळणार का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपला कोंडीत पकडले.
‘बेस्ट’ बसची संख्या कमी करून खाजगी कंपन्यांचे खिसे भरले जात असताना आता सामान्य वाहनधारकांना लक्ष्य केले जात असल्याने मुंबईत आगामी काळात मोठा राजकीय रणसंग्राम होण्याची शक्यता आहे.






