Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे.
निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून अनेक ठिकाणी गटबाजी, नाराजी आणि स्थानिक आघाड्यांची चाचपणी सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये राज्यस्तरावरील चर्चेचा निष्कर्ष अद्याप निघालेला नसल्याने, अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हाऐवजी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार असून २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी आणि २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
यंदा उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदांपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी, ११ पदे अनुसूचित जमातींसाठी, ६७ पदे मागास प्रवर्गासाठी, तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
पुणे जिल्ह्यात ६.३४ लाख मतदार, १७ स्थानिक संस्था रणांगणात
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६,३४,९४० मतदार आहेत.
बारामती ही ‘अ’ वर्गातील नगरपरिषद असून, लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि फुरसुंगी-उरळी देवाची या नगरपरिषदा ‘ब’ वर्गात येतात. सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर या ‘क’ वर्गातील नगरपरिषदा आहेत.
मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींसाठीही आचारसंहिता लागू झाली असून या नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.
विशेष म्हणजे, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषदेत प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार असून एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी थेट मतदान होणार असल्याने या नगरपरिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ढवळून निघणार आहेत. कोण जिंकणार स्थानिक सत्तेची लढाई, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.






