DNA मराठी

Rain Alert

oplus 16908288

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही काही भागात वातावरणात आर्द्रता आणि ढगाळपणा राहील त्यामुळे अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात 18 ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच उघड्यावर ठेवलेले धान, भुसा किंवा जनावरांचे खाद्य झाकून ठेवावे आणि हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता Read More »

rain alert

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert : तीन – चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. तर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका   पुणे, नाशिक,अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.   सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,०३८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६,३१० क्युसेक, जायकवाडी धरणातून २८,२९६ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १,३५६ क्यूसेक,ओझर बंधारा २,७५७ क्युसेक, मुळा धरणातून ३,००० क्युसेक, घोड धरणातून ४,००० क्युसेक, सीना धरणातून ३,३९३ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ५०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,२२० क्युसेक, खैरी धरण येथून ५१९ क्सुसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या  केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

rain

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर

Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भाग आधीच पूरसदृश परिस्थितीने त्रस्त आहेत, ज्यामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मदत आणि बचाव कार्य तीव्र केले जात आहे, तर स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मृत्यू राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, नाशिक जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू घर कोसळून झाला आहे. धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत, महाराष्ट्रात 11,800 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मराठवाड्याला सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले, ज्यामुळे पैठण परिसरातील सुमारे 7000 लोकांना बाहेर काढण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर हर्सूल सर्कलमध्ये विक्रमी 196 मिमी पावसाची नोंद झाली, तर बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी गावातील एका मंदिरात अडकलेल्या 12 जणांना वाचवले. नांदेडमधून सुमारे 970 लोकांना बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरात सोळा एनडीआरएफ पथके आधीच तैनात आहेत, तर पुण्यात दोन अतिरिक्त पथके सज्ज आहेत. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने, मुख्य लक्ष संवेदनशील भागातील लोकसंख्येला बाहेर काढण्यावर असले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मुसळधार पाऊस किती काळ सुरू राहील? आयएमडीने मंगळवारपर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानंतर, संपूर्ण आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रवाशांना पाणी साचलेले रस्ते टाळण्याचा, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा आणि गर्दीच्या वेळी ट्रेन अपडेट्स तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर Read More »

om raje nimbalkar

Om Raje Nimbalkar : खासदार ओम राजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या दहा जणांची केली सुटका

Om Raje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता रात्रीच्या अंधारात घरावर अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हणण्याची पाळी आली आहे. त्यांच्या या धाडस आणि तत्परतेमुळे 10 जणांचा जीव वाचला आहे. वडणेर ता. परांडा येथील पाण्यात अडकलेल्यांच्या बचाव कार्याचा रात्रीच्या अंधारातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात वाहत्या खोल पाण्यात सर्वात पुढे जाऊन, पाईप झाडात अडकवताना, दोर ओढताना धाराशिवचे खासदार निंबाळकर दिसत आहेत. 22 सप्टेंबर ची ही संध्याकाळ, रेस्क्यू केलेले 4 नागरिक आणि बचाव पथकातील 6 जणांसाठी काळरात्र ठरली असती. पण खासदार ओम राजेंनी गावातील तरुणांनासोबत घेऊन केलेलं धाडस आणि समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. सोमवार 22 सप्टेंबर संध्याकाळच्या 7 ते 8 च्या दरम्यानची ही घटना आहे. वडणेर (ता परांडा) येथील पाण्यात अडकलेल्या 4 जणांना घेऊन बचाव पथकाची बोट वापस निघाली होती. पण बोटीचे इंजिन प्रवाहात अचानक बंद पडले. त्यामुळे रेस्क्यू केलेले 4 जण आणि बचाव पथकातील 6 जणांना घेऊन निघालेली ही बोट पुराच्या प्रवाहात, पाण्याच्या वेगामुळे वाहत चालली. त्यावेळी तिथं एकच गोंधळ उडाला. पण त्याचवेळी तिथे बचाव कार्यात सहभागी असलेले खासदार ओम राजे निंबाळकर आणि स्थानिक युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहत्या पाण्यात उड्या मारल्या आणि दुसरा दोरखंड बोटीच्या दिशेने फेकून, वाहत जाणारी बोट एका झाडांला दोरखंडाने अडकवण्यात यश मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दोरखंडाने बोट ओढून काढत मागील 24 तासापासून पाण्यात अडकलेल्या 4 जणांना आणि बचाव पथकातील 6 जणांना सुखरूप पणे बाहेर काढले. त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली.

Om Raje Nimbalkar : खासदार ओम राजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या दहा जणांची केली सुटका Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता

Devendra Fadnavis: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात, तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरित केले जाते. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे जीआर काढण्यात येत आहेत. मदतकार्य कुठेही थांबलेले नाही . मृत्यू, जनावरांचे नुकसान, घरांचे नुकसान यांसारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली असून, निधीची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. धुळे, जळगाव, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत मदतकार्य धाराशिव, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याची व्यवस्था सरकारने केली आहे. पूरामुळे जमिनी खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल. केंद्राकडे प्रस्ताव, पण राज्य मागे हटणार नाही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. पण राज्याने तातडीने मदत देणे प्रारंभ केले आहे. केंद्राची मदत मिळेलच, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे. सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सज्ज हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री करणार अतिवृष्टीचा भागाचा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरस्थितीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता Read More »

rain

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका

Rain Alert: जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. बचावकार्याची ठळक माहिती अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले. मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका Read More »

rain

Ahilyanagar Rain Alert: नगर जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

Ahilyanagar Rain Alert: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २३ आणि २४ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १०,१९८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा ४,२९९ क्युसेक, मुळा धरणातून ५,००० क्युसेक, घोड धरणातून ३,००० क्युसेक, सीना धरणातून ११,५६० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ३०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,६०० क्युसेक, खैरी धरण येथून ९,६१३ इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: नगर जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

oplus 16908288

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस

Maharashtra Rain Alert: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे. ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Alert: शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत धो धो पाऊस Read More »

rain

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert: नगर जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांना याचा फटका देखील बसला आहे. शेतकऱ्यांना लाखोंचा नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी साचले आहे. यातच आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावे. मेघगर्जना होताना झाडाखाली/टॉवरजवळ थांबू नये. पर्यटनासाठी धरणे व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याची सूचना देखील हवामान विभागाने नागरिकांना दिली आहे. याच बरोबर आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष टोल-फ्री 1077 0241-2323844 / 2356940 या नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

img 20250915 wa0022

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश

Karanji Flood : अहिल्यानगर जिल्ह्यात रविवार रात्रीपासून पुन्हा एकदा मुसरधार पाऊस सुरू झाला आहे. यातच 15 सप्टेंबर पहाटे पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्यापही चार ते पाच लोक पुरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या करंजी मध्ये सतर्क आहे. पावसाचा कहर अहिल्यानगर जिल्ह्यात रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी, घाटशिरस, मढी या गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. घरात पाणी, गोठ्यातील जनावरे वाहून गेली, शेतीचे प्रचंड नुकसान असे संकट शेतकऱ्यांवर कोसळलं आहे. तलाव फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथके गावांत दाखल झाली असून बचाव कार्य सुरू झाले आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 15 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश Read More »