DNA मराठी

Pune

chandrakant patil

Chandrakant Patil : कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा

Chandrakant Patil : महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, सारिका कांबळे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांकडील तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. संबंधित पोस्ट आणि व्हिडिओमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित पोस्ट आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1 वाजून 28 मिनिटांनी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

Chandrakant Patil : कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा Read More »

sunil tingre

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र

Sunil Tingre : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील घटक पक्ष असले, तरी पुणे महापालिकेतील राजकारणात दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विकासनिधी देताना अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समान निधी मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी थेट शून्य करण्यात आल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, भविष्यातही पक्षाच्या इतर नगरसेवकांचा निधी रोखला जाण्याची चर्चा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पुणे महापालिकेतील या वादाची ठिणगी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीसाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडल्यानंतर पडली. या प्रस्तावाला सुहास टिंगरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बालवडकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता राष्ट्रवादीकडून भाजपच्या महापालिकेतील कारभाराबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी महायुतीचा धर्म आणि पुणे शहराच्या विकासाचा विचार करून पक्षाने अनेक ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतल्याचे टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतही राष्ट्रवादीने सहकार्य केले होते. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकासनिधी आणि विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अंदाजपत्रकात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपेक्षित निधी मिळाला नसल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे. तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली की, राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळाले नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून परिस्थितीची माहिती दिल्याचेही टिंगरे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याचेही टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. विमाननगर येथील ‘भारत मंडपम’च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्यसभेत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे स्थानिक राजकीय मतभेदांचा परिणाम सामान्य नागरिकांच्या विकासकामांवर होऊ नये, अशी भूमिका सुनील टिंगरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समान व न्याय्य विकासनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुनील टिंगरे यांच्या या पत्रामुळे पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि दोन्ही मित्रपक्षांमधील हा वाद कसा मिटवतात, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sunil Tingre : भाजप-राष्ट्रवादीचा वाद चिघळला; सुनील टिंगरेंचे फडणवीसांना थेट पत्र Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालय परिसरातील एसएसपीएमएसच्या मैदानावर दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी पोलिसांकडून काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. शुक्रवारी रात्री सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्काच्या मुद्द्यावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर घोषणाबाजी आणि गोंधळात झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक अथवा चित्रे लावू नयेत, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मैदानाच्या परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी संघटनांमधील ताजा वाद आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला अपेक्षित असलेली मोठी गर्दी पाहता, पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने Read More »

crime

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. हडपसरमधील शेवाळेवाडी येथील पी. एस. व्हिला परिसरात राहणाऱ्या धनाजी टोणे यांच्यावर पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भलिंग तपासणी करून पत्नीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, १९ मे २०१९ रोजी जतमध्ये धनाजी टोणे आणि संबंधित महिलेचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. २०२० मध्ये महिला पहिल्यांदा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तिच्या अंगावर बसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी टोणे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे आलेला रागही आणि पत्नीवर काढला. धनाजी यांनी पत्नीचे डोके फरशीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर धनाजी टोणे यांची पुण्यात बदली झाली. मार्च २०२५ मध्ये त्यांची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. मात्र, यावेळीही तिचा छळ सुरू राहिला. १३ मे रोजी धनाजी टोणे आणि त्यांच्या आईने महिलेला एका गावातील शेतातील घरात नेले. तेथे तिची कथितरित्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करण्यात आली. १९ मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवरही यासाठी दबाव टाकण्यात आला. महिलेच्या वडिलांनी गर्भपातास विरोध केल्यानंतर धनाजी टोणे यांनी पोलिस अधिकारी असल्याचा धाक दाखवत धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर २३ मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर ती कशीतरी माहेरी पोहोचली. पतीकडून होणारा छळ थांबत नसल्याने महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तिने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत. दरम्यान, आपल्याविरोधात पोलिस कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर धनाजी टोणे यांनी तातडीने सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं Read More »

img 20260819 wa0001

Junnar Murder Case : नसरापूर घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये आमदाराच्या गावात 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या…

Junnar Murder Case : पुण्यात पुन्हा नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (१८ तारीख) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनतर तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानेच मुलीला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे जीव घेतला आहे. दरम्यान, स्थानिक आमदारांचे गाव असलेल्या पिंपळवंडीत ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. स्थानिक तपास यंत्रणांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले आहे असून या अमानुष घटनेमुळे परिसरात संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करत हे प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Junnar Murder Case : नसरापूर घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये आमदाराच्या गावात 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या… Read More »

swapnil lande

Swapnil Lande : पुण्यातील कथित भोंदूबाबा स्वप्नील लांडेविरोधात गंभीर आरोप; अल्पवयीन मुलीच्या शोषणप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा

Swapnil Lande : दैवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असलेल्या स्वप्नील लांडे याच्याविरोधात पुण्यात गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील लांडे स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणून संबोधत असल्याचे सांगितले जाते. तो दैवी शक्ती आणि आध्यात्मिक उपायांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असल्याचा आरोप आहे. याच माध्यमातून त्याने काही कुटुंबांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासाचा गैरवापर केल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एका अल्पवयीन मुलीसोबत त्याने केलेल्या कथित वर्तनाबाबत तक्रार समोर आली आहे. वृत्तानुसार, संबंधित मुलीला त्याने आपल्या मांडीवर घेतले आणि तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा आरोप आहे. तसेच भविष्यात काही अडचण आल्यास आपल्याकडे येण्यास सांगितल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचे कौन्सिलिंग प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीचे कौन्सिलिंग करण्यात आले आहे. मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार पीडितेची ओळख सार्वजनिक करता येत नाही. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वप्नील लांडेविरोधात POCSO अंतर्गत कारवाई केली असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणामागे आणखी काही पीडित किंवा तक्रारी आहेत का, याचाही तपास केला जात असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर चर्चेला उधाण स्वप्नील लांडे याच्याशी संबंधित काही व्हिडीओ आणि त्याच्यावर करण्यात आलेले आरोप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या व्हिडीओंच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कथित आध्यात्मिक कार्यपद्धतीबाबत आणि भक्तांशी असलेल्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडीओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतील दावे आणि प्रत्यक्ष पोलिस तपासातून समोर येणारे तथ्य यामध्ये फरक असू शकतो. अंधश्रद्धेच्या नावाखाली शोषणाचा प्रश्न या घटनेमुळे अंधश्रद्धा, चमत्कार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेकदा संकटात सापडलेले कुटुंबीय आध्यात्मिक किंवा धार्मिक उपायांच्या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. मात्र त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या बाबतीत पालकांनी कोणत्याही व्यक्तीला अनावश्यक शारीरिक जवळीक साधण्याची परवानगी देऊ नये, तसेच संशयास्पद वर्तन आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. पोलिस तपासाकडे लक्ष स्वप्नील लांडेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यावर करण्यात आलेले आरोप नेमके कितपत सत्य आहेत, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

Swapnil Lande : पुण्यातील कथित भोंदूबाबा स्वप्नील लांडेविरोधात गंभीर आरोप; अल्पवयीन मुलीच्या शोषणप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा Read More »

crime

Pune Crime : प्रवचनाच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न ; पुण्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यात गुन्हा दाखल

Pune Crime : प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात एका ब्रिटिश नागरिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम लागू झाल्यानंतर या कायद्याअंतर्गत पुण्यात दाखल झालेला हा पहिला गुन्हा असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम घेतले जात होते. संबंधित व्यक्ती मागील काही दिवसांपासून पुण्यात वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला. या प्रकरणी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ब्रिटिश नागरिकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या व्यक्तीकडून चर्चमध्ये प्रवचनासोबत भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमही घेतले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, महाराष्ट्रात नव्याने मंजूर झालेल्या धर्म स्वातंत्र्य कायद्याचा उद्देश बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणे हा आहे. विधेयकाच्या चर्चेदरम्यानही अशा प्रकारच्या धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर तरतुदी करण्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, संबंधित ब्रिटिश नागरिकाने प्रत्यक्षात धर्मांतराचा प्रयत्न केला होता की नाही, तसेच प्रवचनामध्ये काय मजकूर किंवा संदेश देण्यात आला होता, याबाबत पोलिस तपासातून अधिक स्पष्टता होणार आहे. खडक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Pune Crime : प्रवचनाच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न ; पुण्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यात गुन्हा दाखल Read More »

siya goyal

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा; त्याच हॉटेलमध्ये चेतनसोबत…

Siya Goyal : पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अशी माहिती लागली आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने केतनच्या मृत्यूनंतरही तिच्या प्रियकर चेतन चौधरीसोबत संपर्क कायम ठेवला होता. एवढेच नव्हे तर केतनसोबत ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये आणि त्याच खोलीत नंतर चेतनसोबतही ती गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलच्या नोंदी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या सर्व हालचाली पूर्वनियोजित कटाचा भाग होत्या का, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक पुरावा एकमेकांशी जोडून आरोपींच्या हालचालींचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यापूर्वीच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान दोघांच्या नातेसंबंधांबाबत, त्यांच्यातील संवाद तसेच कथित नियोजनाबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास पुढे हत्या प्रकरणाकडे वळला. त्यानंतर उघड झालेल्या माहितीमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत.

Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा; त्याच हॉटेलमध्ये चेतनसोबत… Read More »

rain

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू

Pune Rain Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विविध भागांत अडकलेल्या तब्बल 4 हजार 568 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उद्याही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. शाळांना सुट्टी जाहीर परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉईंट ही पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने देहू आणि आळंदी येथून वारकऱ्यांनी प्रवास टाळून थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केले.

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १ ते ३ जुलैदरम्यान ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल ३६० बावधन, पुणे यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित Read More »