DNA मराठी

Maharashtra

img 20260219 wa0008

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक

Ahilyanagar Police : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत गांजाची वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 132 किलो गांजा असा एकूण 25 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत गणेश अंकुश कराड (वय 32), सुखदेव शिवनाथ कदम (वय -30, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), यांच्या विरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले. सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम. एच. 14 जी. एच.2330 ही मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी कबाडी यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघाले. मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना बातमीतील नमुद स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसली तेव्हा बातमीतील हकिगतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पीओ गाडी थांबवुन गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम बसलेले दिसुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश अंकुश कराड वय – 32 वर्षे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर, 2) सुखदेव शिवनाथ कदम वय -30 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि/ विजय झंजाड यांनी बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये 04 गोण्या मिळुन आले. नमुद इसमांना गोण्या बाबत विचारपुस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपीतांचे ताब्यातुन 18,18,000/-रु कि.चा 132.84 किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, 25,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 7,00,000/-रु कि.चा एक स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असा एकुण 25,43,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/800 भाऊसाहेब राजु काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र. नं. 60/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20(ब)ii(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक Read More »

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा

Ahilyanagar Police: अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी थेट अ‍ॅक्शन मोडवर जात खंडणीखोर आरोपीची भररस्त्यात वरात काढली आहे. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत बेड्या ठोकून फिरवण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर शहरात. अखिल भारतीय कामगार सेनेचा नेता भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याची भररस्त्यात वरात काढत पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला. काही दिवसांपूर्वी निंबळक एमआयडीसीतील सुयश मेटल प्रोसेसिंग या कंपनीत सदानंद सोनवणे, राजेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर प्रवेश करत दहशत माजवली होती. कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना काम बंद पाडण्याची धमकी देत, काम सुरू ठेवायचं असेल तर दरमहा एक लाख रुपये द्या, अन्यथा मालकाला जीवे मारू, अशी थेट धमकी देण्यात आली होती. याचवेळी 20 हजार रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर संतप्त उद्योजकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत तक्रार दिली. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी सदानंद सोनवणे याला अटक केली. यानंतर सायंकाळी पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत आरोपीची बेड्या ठोकून वरात काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे उद्योजकांमध्ये समाधानाचं वातावरण असून गुन्हेगारांमध्ये मात्र भीतीचं सावट पसरलं आहे. उद्योजकांना दिलासा… गुन्हेगारांना स्पष्ट संदेश अहिल्यानगर पोलीस आता थांबणार नाहीत!

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा Read More »

rajya sabha election

Rajya Sabha Election : 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; शरद पवारांना पुन्हा संधी?

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहारमधील रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तामिळनाडूमधील सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्यसभेच्या 37 जागांसाठी अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवार 5 मार्चपर्यंत नामांकन दाखल करू शकतील. 6 मार्च रोजी छाननी सुरू होईल आणि 9 मार्चपर्यंत उमेदवार आपले नामांकन मागे घेऊ शकतील. त्यानंतर 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 आहे. शरद पवारांना पुन्हा संधी? शरद पवार यांचा देखील राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे 46 आमदार असून एका जागेसाठी 41 आमदारांची आवश्यकता आहे. राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे: अधिसूचना: 26 फेब्रुवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख: 5 मार्च नामांकनांची छाननी: 6 मार्च मागे घेण्याची शेवटची तारीख: 9 मार्च मतदान: 16 मार्च 2026, सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. मतमोजणी: 16 मार्च 2026 आसाममधील तीन, बिहारमधील पाच, महाराष्ट्रातील सात, ओडिशातील चार, तामिळनाडूतील सहा आणि पश्चिम बंगालमधील पाच जागांसाठी मतदान होईल.

Rajya Sabha Election : 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; शरद पवारांना पुन्हा संधी? Read More »

congress

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार?

Maharashtra Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत ‘संघटन सृजन अभियान’ या विषयावर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वॅार रूमचे प्रमुख खा. शशिकांत सेंथिल मार्गदर्शन करणार आहेत तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर हे ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशिवाय इतरांना प्रवेश नाही, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार? Read More »

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा

Ahilyanagar News: पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून, चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन-पे अ‍ॅपचा गैरवापर करुन नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा घातला आहे. या घटनेत आरोपीने तब्बल २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन-पे अ‍ॅप सक्रिय होते.५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने फोन-पे अ‍ॅपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीष गावंड, बाळासाहेब सोलास व बिकास बेहेरा आदींच्या खात्यांवर विविध टप्प्यांत मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. एकूण २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा Read More »

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून Read More »

fb img 1770982840504

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी एम. विनोद, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते. पथकासोबत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली. भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली. शेवगाव तहसील कार्यालयात आढावा पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने तहसील कार्यालय, शेवगाव येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. तसेच नुकसानभरपाई व पुनर्बांधणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

fb img 1770982743235

Central Railway: होळी उत्सवासाठी रेल्वेची खास सोय; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

Central Railway : होळी सणादरम्यान वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने काही महत्त्वाच्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. या सर्व गाड्या विद्यमान मार्ग, वेळा, रचना व थांब्यांनुसार धावतील. वाढवलेल्या विशेष गाड्या बिकानेर – साईनगर शिर्डी – बिकानेर (साप्ताहिक) 04715 बिकानेर → साईनगर शिर्डी (शनिवार) : 07 ते 28 मार्च 2026 (4 फेऱ्या) 04716 साईनगर शिर्डी → बिकानेर (रविवार) : 08 ते 29 मार्च 2026 (4 फेऱ्या) हिसार – खडकी – हिसार (साप्ताहिक) 04725 हिसार → खडकी (रविवार) : 01 ते 29 मार्च 2026 (5 फेऱ्या) 04726 खडकी → हिसार (सोमवार) : 02 ते 30 मार्च 2026 (5 फेऱ्या) अजमेर – दौंड – अजमेर (साप्ताहिक) 09625 अजमेर → दौंड (गुरुवार) : 05 ते 26 मार्च 2026 (4 फेऱ्या) 09626 दौंड → अजमेर (शुक्रवार) : 06 ते 27 मार्च 2026 (4 फेऱ्या) अजमेर – सोलापूर – अजमेर (साप्ताहिक) 09627 अजमेर → सोलापूर (बुधवार) : 04 ते 25 मार्च 2026 (4 फेऱ्या) 09628 सोलापूर → अजमेर (गुरुवार) : 05 ते 26 मार्च 2026 (4 फेऱ्या) आरक्षण ट्रेन क्रमांक 04716, 04726, 09626 व 09628 साठी विशेष शुल्कासह बुकिंग 16 फेब्रुवारी 2026 पासून सर्व PRS केंद्रे व IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. प्रवासापूर्वी वेळापत्रक व थांबे तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Central Railway: होळी उत्सवासाठी रेल्वेची खास सोय; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ Read More »

fb img 1770982696869

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक !

Nevasa News : जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपशाविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत, नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी शसुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने प्रवरा नदीपात्रात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध साहित्य नष्ट केले. 3 टप्प्यात केलेली कारवाई नेवासा खुर्द (ज्ञानेश्वर मंदिर/लाडमोड टेकडी परिसर): प्रवरा नदीच्या काठावर 36 थर्माकोलचे चप्पू आणि 50 लाकडी बल्ल्या जप्त करून जागीच जाळून नष्ट करण्यात आल्या. दुसरी कारवाई: नदीपात्रातील अन्य एका ठिकाणी 4 थर्माकोलचे चप्पू नष्ट करण्यात आले. कापूर डोह: या भागात 4 चप्पू व 16 लाकडी बल्ल्या जाळून खाक करण्यात आल्या. दिवसभरात एकूण 44 तराफे/चप्पू आणि मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य नष्ट करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कारवाई दरम्यान बोटीमध्ये तांत्रिक बिघाड (पंक्चर) झाल्यामुळे खोल पाण्यातील कारवाई पूर्ण करता आली नाही, तरीही नदीकाठावरील आणि उथळ पाण्यातील अवैध साधनांचा पूर्णपणे बिमोड करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर प्रशासनाचा हा ‘वॉच’ असाच कायम राहणार असून दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरूच राहील.

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक ! Read More »

bmc election

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब

Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांत हजारो कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचे जे रस्ते चकाचक केले, ते रस्ते आता पुन्हा खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी खोदले जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “8 हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बनवायचे आणि पुन्हा टाटा पॉवरसारख्या कंपन्यांना ते खोदण्याची परवानगी द्यायची, हा कोणता कारभार? मुंबईत ‘बेस्ट’ची वीज असताना टाटा पॉवरला केबल टाकण्याची गरजच काय?” असा खोचक सवाल करत देशपांडे यांनी महापालिकेच्या ‘हितसंबंधांवर’ बोट ठेवले आहे. सदर घोटाळ्याबाबत बोलतांना संदीप देशपांडे म्हणाले की, परवानगी इलेक्ट्रिकल केबलची घेतली जाते, मात्र जमिनीखाली टाटा ऑप्टिकल फायबरचे जाळे विणले जात आहे. एका कामाच्या नावाखाली चार वेगवेगळ्या सेवांचे काम केले जात असूनही महापालिका त्यातून उत्पन्न का मिळवत नाही? जागा पालिकेची, त्रास मुंबईकरांना आणि नफा मात्र खाजगी कंपन्यांना, असे संतापजनक चित्र सध्या मुंबईत दिसत आहे. या गैरप्रकाराकडे लक्ष वेधणारे शाखा सचिव लक्ष्मण पाटील यांचे त्यांनी कौतुक केले असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केवळ रस्ते खोदाईच नव्हे, तर महापालिकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरही देशपांडे यांनी चिंता व्यक्त केली. “पुढच्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पालिकेकडे पैसे उरणार नाहीत, अशी परिस्थिती असताना पाणीपट्टी कमी करण्याच्या लोकप्रिय घोषणा कशाच्या आधारावर केल्या जात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, ॲमेझॉन आणि ब्लिंकिट सारख्या कमर्शियल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून कर वसुली करावी, अशी मागणीही मनसेने लावून धरली आहे. आयुक्तांच्या नवीन नियमावलीवर टीका करताना, “लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आयुक्तांनी करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भगतसिंग कोशारी यांच्यावर कडाडून टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. “भगतसिंग असते तर त्यांना चौपाल असता, ड वर्गाचा माणूस… भगतसिंग यांचं नाव या माणसाला देणं म्हणजे अपमान आहे,” असा घणाघाती आरोप देशपांडे यांनी केला. इतकंच नाही तर, “त्यामुळे भगतसिंग कोशारी यांनी आपलं नाव बदलावं, ही आमची मागणी आहे,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी वादाला नवं वळण दिलं आहे. देशपांडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी काळात यावरून नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटू शकते.

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब Read More »