DNA मराठी

Maharashtra Politics

img 20260605 wa0010

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला

Burudgaon Garbage Depot : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोवरील सौरऊर्जा प्रकल्पाला बसला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सुमारे ५०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महापौर ज्योती गाडे यांनी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेत तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.या पाहणीवेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर, इंजिनिअर गणेश गाडळकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांनी कचरा डेपो परिसरातील सोलर प्रकल्पाची पाहणी करताना नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापौर गाडे म्हणाल्या की, वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अशा प्रकल्पांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारण्यात याव्यात आणि त्या शेडवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा विचार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात प्रकल्पांचे नुकसान कमी होईल आणि वीज निर्मिती अखंडित सुरू राहील. त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सौरऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून अशा प्रकल्पांचे संरक्षण आणि देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. नुकसानग्रस्त सोलर प्लांटची तातडीने दुरुस्ती करून वीज निर्मिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सोलर प्रकल्पाच्या पाहणीनंतर महापौरांनी कचरा डेपो परिसरातील विविध प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. यामध्ये खत निर्मिती प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प, लिचेट प्रक्रिया प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांची माहिती घेण्यात आली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला Read More »

img 20260605 wa0011

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला

Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला Read More »

img 20260605 wa0009

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास

Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील खांबे गावात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ४) सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात “तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत अपेक्षित विकास झाला नाही. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत तालुक्यात विविध विकासकामांना गती देण्यात आली असून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. खांबे गावाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, विठ्ठल दातीर, बाबासाहेब दातीर, रामेश्वर शिंदे, दिगंबर दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, प्रेमराज बुधे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते… पुंजा जोशी, सुखदेव भतांबरे, रावसाहेब भांड, बाबूराव कापडी, बारकू पेकारी, बाबा एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, सुभाष केदार, राजू शेंडगे, बाळासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, ठकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्वर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विकासाच्या जोरावर शिवसेनेची ताकद वाढणार केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना वेग मिळत आहे. खांबे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा साकूर पठार भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणारा ठरेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत या भागात शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल,” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. चाळीस वर्षांत न झालेला विकास दीड वर्षांत… खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नव्हता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षांत साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच या विकासकामांचे लोकार्पण आणि गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास Read More »

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

election

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस

Nevasa Election : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी सोमवारी (ता. १) ७७ उमेदवारांचे ८१ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली. २९ मे अखेर एकूण २२ अर्ज दाखल झाले होते. काल अखेर एकूण दाखल उमेदवारी अर्जाची संख्या १०३ झाली आहे. गटनिहाय दाखल अर्ज शेवगाव गट – राम आसराजी लांडे, सिद्धार्थ शिवाजीराव दसपुते, मच्छिंद्र विठ्ठल कुटे, राजेंद्र रावसाहेब ढमढेरे, लक्ष्मण गंगाराम टाकळकर, धनंजय आबासाहेब देशमुख, संतोष शंकरराव पावसे, पंडित रामभाऊ भोसले. शहरटाकळी गट – नरेंद्र मारुतराव घुले (२ अर्ज), कुकाणा गट- गोरक्षनाथ सुखदेव नवले, उध्दव श्रीपती नवले, दत्तात्रय त्रिंबक काळे, बाबासाहेब कुंडलिक गव्हाणे, अशोक जगन्नाथ मंडलिक, सुमनबाई दत्तात्रय काळे, जगन्नाथ रामकृष्ण साबळे, चंदू लक्ष्मण फुलारी, विठ्ठल पांडुरंग अभंग, अमोल विठ्ठल अभंग, भारतराव रामकृष्ण साबळे. अर्जुन बाजीराव नवले (२ अर्ज), विजय ज्ञानदेव भागवत, दादासाहेब नानासाहेब वाबळे, संदीप काकासाहेब देशमुख. नेवासा गट – विक्रम साहेबराव चौधरी, जगदीश बाळासाहेब चौधरी, बाळासाहेब सखाराम साळुंके, अरुण बबनराव देशमुख, दादासाहेब गोरक्षनाथ गंडाळ. वडाळा बहिरोबा गट – भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, अशोक कारभारी काळे, जनार्दन रामभाऊ कदम, प्रसाद जनार्दन पटारे, कोंडीराम मारुती कोलते, झुंबर अंबादास शेळके (२ अर्ज), कारभारी मोहन चेडे, कचरदास धनराज गुंदेचा, अभिषेक जनार्दन पटारे, शिवाजी राजधर कोलते. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, भानुदास नारायण काळे, सदाशिव आबाजी आरगडे, निवृत्ती चिमाजी दातीर, देविदास आसाराम पाटेकर, मंगलाबाई देविदास पाटेकर, रेवणनाथ जगन्नाथ काळे. उत्पादक/बिगर उत्पादक सहकारी संस्था मतदारसंघ – गणेश भानुदास चावरे. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ – भास्कर उत्तम शिंदे, मच्छिंद्र विठ्ठल शिंदे, शंकर संभाजी भारस्कर. महिला राखीव – विजया कल्याणराव म्हस्के, सुमनबाई दत्तात्रय काळे, इंदूबाई बलभीम गव्हाणे, मंगलाबाई देविदास पाटेकर. इतर मागासवर्ग प्रतिनिधी – विजया कल्याणराव म्हस्के, जनार्धन राधाकिसन भागवत, दत्तात्रय त्रिंबक काळे, सिध्दार्थ शिवाजीराव दसपुते, अशोक जगन्नाथ मंडलिक, चंदू लक्ष्मण फुलारी, अमोल विठ्ठल अभंग, विठ्ठल पांडुरंग अभंग, अरुण अशोक गरड, अरुण बबन देशमुख, प्रसाद जनार्धन पटारे, कुसुम दत्तात्रय काळे, अर्जुन बाजीराव नवले, अर्जुन बाजीराव नवले, विजय ज्ञानदेव भागवत, अभिषेक जनार्धन पटारे. विमुक्त जाती – भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघ – रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, किसन बाबुराव यादव, तुकाराम विनायक मिसाळ, सदाशिव आबाजी आरगडे.

Nevasa Election : ‘ज्ञानेश्वर’च्या निवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्ज दाखल; आज शेवटचा दिवस Read More »

pune toxic liquor

Pune Toxic Liquor : विषारी दारूकांडानंतर हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित

Pune Toxic Liquor : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणात कर्तव्यातील कथित हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटींच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. २१ मे २०२६ रोजी हडपसर परिसरात विषारी किंवा गावठी दारूच्या सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित भागात अवैध दारू उत्पादन आणि विक्रीबाबत माहिती उपलब्ध असतानाही आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत देखरेखीतील त्रुटी, कर्तव्यपालनातील निष्काळजीपणा आणि आवश्यक नियंत्रण राखण्यात अपयश आढळल्याचे समोर आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये: * वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले * हडपसर चौकी प्रमुख हसीना शिकलगार * पोलीस उपनिरीक्षक हसम मुलाणी (गुन्हे शोध पथक) यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई असेल. विषारी दारूकांडात अनेकांचे जीव गेल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. अवैध दारूविक्रीविरोधात वेळेत आणि प्रभावी कारवाई झाली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Pune Toxic Liquor : विषारी दारूकांडानंतर हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित Read More »

mva

Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या जागांवर मविआ एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार

Vidhanparishad Election: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रामणावर सुरु आहे. विरोधकांचे नगरसेवक पळवले जात आहेत, ५-५ लाख रुपये ऍडव्हान्स दिले आहेत. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ चा खेळ सुरु आहे. सत्ताधारी मित्रपक्षांमध्येही पळवापळवी सुरु आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजपा महायुतीने घोडेबाजार बनवला आहे. भाजपा महायुतीच्या दंडेलशाहीविरोधात महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. विषारी दारुच्या बळीप्रकरणी पोलिसांना निलंबित करा पुण्यात विषारी दारूने १३ जणांचे बळी घेतले आहेत, घटना झाल्यानंतर कारवाईचे आदेश दिले असले तरी ज्या विभागात ही घटना घडली त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस उपायुक्त यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले. विधान परिषद निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती.. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने वरिष्ठ नेत्यांच्या निरीक्षक म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघासाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, पुणेसाठी विधान परिषदेतील गटनते सतेज ऊर्फ बंटी पाटील, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी माजी मंत्री के. सी. पाडवी, मराठवाड्यातील नांदेडसाठी खासदार रविंद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, परभणी हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, विदर्भातील यवतमाळसाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, कोकण विभागातील ठाणे मतदार संघासाठी माजी मंत्री नसिम खान, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या जागांवर मविआ एकमत, काँग्रेस 8, शिवसेना 4 तर एनसीपी 3 जागांवर लढणार Read More »

parth pawar

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही

Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्या वाद झालं असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही केवळ चर्चा असून बैठकीत दोघांमध्ये कुठलाही वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील दिली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या सुत्रांच्या हवाले येत आहेत. एकतर्फी आणि नकारात्मक बातम्या पार्थ पवार किंवा पक्षाबद्दल दिल्या जात आहेत. मात्र दुसरी बाजू माध्यमांनी समजून घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर दिल्ली येथे मांडली. गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसताना बातमी आली आहे असेही उमेश पाटील म्हणाले. प्रत्येक बातमी तुमची सुत्रांकडून येत आहे. कोणतीही पुराव्याची बातमी लावलेली नाही. त्यामुळे सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. पार्थ पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या नवीन आहेत. सुत्रांच्या हवाले बातम्या येणे योग्य नाही. आम्हाला कोण टार्गेट करतंय असं आम्हाला वाटत नाही. मात्र खात्री किंवा पुरावा असल्याशिवाय बातम्या लावणं चुकीचं आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही Read More »

Harshwardhan Sapkal: पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे. इंधन दरवाढ व टंचाई हे नरेंद्र मोदी यांचेच पाप आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, २०१४ साली सत्तेत आल्यापासूनच मोदी सरकारने इंधनाचे भाव सातत्याने वाढवले आहेत. यातून सरकारी तेल कंपन्या व रिलायन्स तसेच नायरा या खाजगी तेल कंपन्यांनी भरमसाठ नफा कमावला आहे. मोदी सरकारने तेलासाठी रिझर्व्ह फंड तयार केला असता तर ही वेळ आली नसती पण कंपन्यांचे हित लक्षात घेतले, हा मोठा भ्रष्टाचारच आहे. इंधन व गॅस चंटाईचा मोठा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, छोटे उद्योगधंदे व घरातील स्वयंपाकालाही बसला आहे. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळेच अर्थव्यवस्था कोलमडली आहे, असेही सपकाळ म्हणाले. 3000 रुपयानेच शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी करा.. कांद्याप्रश्नी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ भेटले पण महाराष्ट्राला त्यांनी वाटाण्याच्या अक्षताच दिल्या. सरकार १५०० रुपयाने कांदा खरेदी करण्याचे सांगत आहे पण ३००० रुपये प्रति क्विंटल भाव व नाफेडमार्फत कांदा खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी केला पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदी २०१४ साली नाशिकला आले होते, मी कांदा खाल्ला आहे, तुमच्याशी बेईमानी करणार नाही, सत्तेत आलो की २४०० रुपये भाव देणार असे आश्वासन दिले होते, तीच री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओढली होती पण आता मात्र ते फक्त १५०० रुपये भाव देण्याची भाषा करत आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

Harshwardhan Sapkal: पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप Read More »