DNA मराठी

latest update

‘आधी धर्माबद्दल विचारा, नंतर वस्तू खरेदी करा’, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य

Nitesh Rane: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यावरून वादग्रस्त वक्तव्य केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सभेला संबोधित करताना हिंदूंनी कोणत्याही दुकानदाराकडून वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याचा धर्म विचारावा असं ते म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एका विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, दहशतवाद्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले. म्हणून, आता हिंदूंनीही खरेदी करण्यापूर्वी दुकानदारांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले पाहिजे. जर कोणी म्हणत असेल की तो हिंदू आहे, तर त्याला हनुमान चालीसा पठण करायला सांगा. जर तो पठण करू शकत नसेल तर त्याच्याकडून काहीही खरेदी करू नका. असं या सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, कधीकधी काही लोक त्यांचा धर्म लपवतात किंवा खोटे बोलतात. त्यामुळे लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. आता हिंदू संघटनांनीही अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलले पाहिजे. पहलगाममध्ये काय घडले? 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. या 27 पैकी 6 जण महाराष्ट्राचे होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.

‘आधी धर्माबद्दल विचारा, नंतर वस्तू खरेदी करा’, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य Read More »

शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय

Eknath Shinde: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार आतापर्यंत 4 विमनामधून 520 पर्यटक मुंबईत परतले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री 1 वाजता स्टार एअरलाईन्स या खाजगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले. यातून 75 पर्यटकाना मुंबईत आणण्यात आले. तर आज दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून 370 पर्यटक मुंबईत परतले. हे विमान आज संध्याकाळी 7 वाजता तर दुसरे विमान अंदाजे 9 वाजता मुंबईत लँड झाले आहे. त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आज रात्री 8 वाजता स्टार एअरलाईन्सचे अजून एक विमान मुंबईकडे झेपावले असून त्यातून अजून 75 प्रवासी रात्री उशीरा मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून 520 प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय Read More »

Harshwardhan Sapkal: “हर घर नल, हर नल जल… पण पाण्यासाठी नाशिकच्या भगिनी अजूनही जीव धोक्यात घालून विहीरीत उतरतात!”

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. ‘हर घर नल, हर नल जल’ ही घोषणा केवळ पोस्टरवरच दिसली, प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये परिस्थिती भयावह आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर केली आहे. 2025 उजाडले. पण आमच्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील माता-भगिनींना अजूनही पाण्यासाठी हंडा घेऊन डोंगर-दऱ्या ओलांडाव्या लागतात. एवढंच नाही, तर अनेक ठिकाणी त्या जीव धोक्यात घालून कोरड्या पडलेल्या विहीरीत उतरतात – केवळ एक हंडा पाण्यासाठी हे सरकारचे फक्त अपयशच नाही तर ही संवेदनशून्यतेचे आणि पोकळ घोषणाबाजीचे भीषण वास्तव आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले. तसेच योजना कागदावरच आहेत, घोषणा सभांमध्ये गाजतात, पण जमिनीवरचं वास्तव आजही पाण्यासाठीची लढाई आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

Harshwardhan Sapkal: “हर घर नल, हर नल जल… पण पाण्यासाठी नाशिकच्या भगिनी अजूनही जीव धोक्यात घालून विहीरीत उतरतात!” Read More »

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? — नव्या राजकीय युतीच्या शक्यता आणि मर्यादा

Raj and Uddhav Thackeray : राज्यात पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. सिने अभिनेता महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण निर्माण होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात सध्या अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी 1990 च्या दशकात दोघंही बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र कार्यरत होते. राज ठाकरे यांना ‘बाळासाहेबांचा वारसदार’ मानलं जायचं, तर उद्धव ठाकरेंना शांत, पण योजनाबद्ध राजकारणाची ओळख होती. 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि त्यांच्या मार्गांनी दोघांची राजकीय वाटचाल वेगळी झाली. गेल्या दोन दशकांत राजकीय भूमिका, भाषा आणि जनाधार यामध्ये मोठा फरक पडला. पण दोघांचं केंद्रस्थानी मात्र मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रहित हीच भूमिका कायम राहिली आहे. सध्याची राजकीय गरज शिवसेनेतील फूट, भाजपचा वाढता प्रभाव, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बदलते समीकरण — यामुळे महाराष्ट्रातील राजकारण एक अस्थिर टप्प्यातून जात आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचा पारंपरिक जनाधार पुन्हा मिळवायचा आहे आणि राज ठाकरे यांना मनसेला निर्णायक बनवायचं आहे. या दोघांमध्ये जर विशिष्ट मुद्द्यांवर समन्वय झाला, तर ही युती केवळ संख्या वाढवणारी ठरणार नाही, तर जनतेच्या मनातली एक विशिष्ट भावना पुन्हा जागृत करू शकते. अडथळे आणि अपेक्षा या युतीच्या वाटेवर अनेक अडथळे आहेत. पहिला अडथळा म्हणजे नेतृत्व कोणाचे? दोन व्यक्तिमत्वं, दोन कार्यशैली आणि दोन स्वतंत्र पक्ष… यांचा समन्वय हेच सर्वात मोठं आव्हान आहे. दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये असणारी वैचारिक ध्रुवीकरण. राज ठाकरे यांची शैली आक्रमक, व्यंगप्रधान आहे; तर उद्धव ठाकरे संयमित आणि धोरणात्मक पद्धतीने वाटचाल करतात. ह्या शैली जनतेला वेगळ्या पद्धतीने भावतात. या दोघांचं एकत्र येणं म्हणजे त्या शैलींचं संतुलन साधणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल. संभाव्य परिणाम जर ही युती झाली, तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरी मतदारसंघांमध्ये याचा थेट प्रभाव पडू शकतो. मराठी मतदारांमध्ये एक नव्या आशेचा किरण निर्माण होईल. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना नव्याने एकत्र येण्याचं बळ मिळेल, आणि मनसेला व्यापक व्यासपीठ. परंतु केवळ भाजपविरोधी एकत्र येणं हा दीर्घकालीन पर्याय ठरू शकत नाही. जनतेला हवं आहे ठोस विकासाचं व्हिजन, प्रामाणिकपणा, आणि स्पष्ट भूमिका.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? — नव्या राजकीय युतीच्या शक्यता आणि मर्यादा Read More »

कोट्यवधी नागरिक रोज पितात विष; लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा संशय, राजकीय आशीर्वादाचीही चर्चा

Maharashtra News: राज्यात दूध भेसळीचा प्रश्न केवळ खाद्य सुरक्षा किंवा ग्राहक फसवणूक इतकाच राहिलेला नाही. ही बाब आता थेट सार्वजनिक आरोग्याशी निगडित झाली आहे. दररोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या दुधात रसायनांची भेसळ केल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः मुलांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. भेसळयुक्त दूध – आरोग्यावर गंभीर परिणाम राज्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आरोग्य खात्याच्या संयुक्त तपासणीत भेसळयुक्त दूधाचे नमुने आढळले आहेत. या दुधात डिटर्जंट, युरिया, स्टार्च, साबण, कृत्रिम रंग तसेच काही वेळा औद्योगिक रसायनांचाही वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे दूध नियमितपणे सेवन केल्यास पचनाच्या समस्या, त्वचेचे विकार, यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम तसेच दीर्घकाळात कर्करोगाचा धोका संभवतो. बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या शहरांतील काही शाळकरी मुलांमध्ये गेल्या काही वर्षांत कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीपत्रकांत नमूद आहे. यामागे दूषित दूध व दूधजन्य पदार्थांमधील भेसळ हे एक कारण असू शकते, असा संशय वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. कारवाई अपुरी, राजकीय आशीर्वादाचा आरोप या गंभीर समस्येमागे स्थानीक स्तरावर राजकीय पाठबळ लाभलेल्या दूध वितरण साखळ्यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. भेसळ करणाऱ्या गटांवर वेळोवेळी छापे टाकले जातात, मात्र गुन्हेगारी स्वरूपाच्या या प्रकारांवर अद्याप ठोस आणि धडाकेबाज कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामान्यांची मागणी – ‘शुद्धतेसाठी कठोर कायदा हवा’ ग्राहक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, दूध भेसळीविरोधात खास कायदा आणण्यात यावा, दोषींवर फक्त दंड नव्हे तर तुरुंगवासाची शिक्षा व्हावी. तसेच, दूधाच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी व अहवाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला जावा, अशीही मागणी आहे. “भेसळीच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या आरोग्यावर होणारा धोका ही सामाजिक आपत्ती मानली पाहिजे,” असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.

कोट्यवधी नागरिक रोज पितात विष; लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा संशय, राजकीय आशीर्वादाचीही चर्चा Read More »

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच

Devendra Fadanvis: राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापुर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर कार्यवाही अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत. त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच Read More »

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव

Ajit Pawar: हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या 17 एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. 17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले. संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’ सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजित पवार नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव Read More »

“बदनाम होतो… पण मंत्रालय मिळालं!” – बच्चू कडू यांची भावनिक कहाणी

Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या खेळी अनेक वेळा पटलावर बिनधास्तपणे रंगविल्या जातात. पक्षफोड, बंड, कुरघोडी, युती, फुटी या शब्दांनी आपल्या राजकारणाची पोत अखेरची काही वर्षं पूर्णपणे व्यापून टाकली आहेत. परंतु या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एखादा नेता असा असतो, जो सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी बदनाम व्हायला तयार असतो. त्याचं नाव आहे बच्चू कडू. “मी बदनाम झालो, पण मंत्रालय मिळालं,” हे शब्द केवळ एका राजकीय खेळीचं समर्थन नाही, तर एका मनस्वी नेत्याच्या अंतर्मनातल्या भावनांचं प्रतिबिंब आहे. बच्चू कडू हे नाव आज केवळ एका राजकीय नेत्याचं नाही, तर शेकडो-हजारो दिव्यांगांच्या आशेचं केंद्र बनलं आहे. शिंदे गटाच्या बंडामध्ये सहभागी होणं ही त्यांची एक ‘राजकीय चूक’ होती, असं ते स्वतः मानतात. परंतु या चुकीच्या निर्णयातून एक मोठा लढा यशस्वी झाला दिव्यांग मंत्रालय मिळालं. हे मंत्रालय केवळ एका कुर्चीचं नाव नाही, तर अनेक अपंग, दिव्यांग बांधवांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा ठरला. आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून हजारो गोरगरिबांच्या जीवनात प्रकाश टाकणं हेच बच्चूभाऊंचं अंतिम ध्येय होतं. “सत्तेसाठी नव्हे, आशीर्वादासाठी बंड” – ही ओळच त्यांच्या राजकीय भूमिकेची ओळख आहे. आज बच्चू कडू आमदार नाहीत. कदाचित मतदारांनी नाकारलं असेल किंवा ईव्हीएमने… पण दिव्यांगांसाठी आज जे निर्णय घेतले जात आहेत, जे धोरणं बनत आहेत, ती त्यांच्यामुळे. त्यामुळे ते आजही जनतेच्या मनात घर करून आहेत. आजच्या राजकारणात जेव्हा बहुतेकजण पदासाठी, ताकदीसाठी राजकीय बाजू बदलतात, तेव्हा बच्चूभाऊ कडू यांनी समाजासाठी आपली प्रतिमा खराब होऊ दिली – हे त्यांचं वेगळेपण अधोरेखित करतं. बच्चू कडू हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी राजकारण करणारे नेते आहेत. त्यांची चूक त्यांनी मान्य केली, पण त्याच चुकांमधून काही लोकांच्या आयुष्यात बदल घडला – हीच त्यांची खरी ‘राजकीय विजय’ आहे. “बदनाम होणं चालेल, पण त्यातून जर गोरगरिबांच्या आयुष्यात उजेड पडत असेल, तर तो त्याग पत्करावा लागतो,” असं म्हणणारे बच्चू कडू आजच्या मतलबी राजकारणाला एक प्रश्न विचारतात – “तुम्ही किती लोकांसाठी बदनाम व्हायला तयार आहात?”

“बदनाम होतो… पण मंत्रालय मिळालं!” – बच्चू कडू यांची भावनिक कहाणी Read More »

धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी : पूर्वीचे साधू-संत- महंत आणि आजचे गुंड

Maharashtra News: धर्म हा आपल्या समाजाचा, संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. भारतीय परंपरेत धर्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे, तर एक नीतीमूल्यांची, सहिष्णुतेची आणि मानवतेची जीवनपद्धती मानली गेली आहे. या धर्माचे रक्षण करणे ही एक अत्यंत पवित्र आणि जबाबदारीची गोष्ट आहे. पूर्वीची स्थिती : साधू-संतांची भूमिकापूर्वीच्या काळात धर्माच्या रक्षणाची जबाबदारी साधू-संत, महंत, विचारवंत, व्रती, तपस्वी यांच्यावर होती. त्यांनी समाजाला धर्माचे खरे स्वरूप शिकवले – सहिष्णुता, क्षमा, सेवा, प्रेम, सत्य आणि अहिंसा. संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास, समर्थ रामदास, गुरुनानक, कबीर यांसारख्या संतांनी धर्माचे रक्षण केवळ शास्त्रानेच नव्हे, तर आचरणानेही केले. ते समाजातील दुराव्याला थांबवणारे, अंधश्रद्धेला विरोध करणारे आणि नीतीचा प्रचार करणारे होते. आजची स्थिती : गुंडांचे ‘धर्मरक्षण’पण आज चित्र पूर्णपणे वेगळे आहे. धर्माच्या नावाने हिंसा, द्वेष, दहशत आणि असहिष्णुतेचा प्रसार होत आहे. धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी जणू काही गल्ली गल्लीतील गुंडांनी, राजकीय फायद्यासाठी काम करणाऱ्या मंडळींनी घेतली आहे. या लोकांना ना धर्माचा खरा अर्थ माहीत आहे, ना अध्यात्माची जाण. त्यांच्यासाठी धर्म हा केवळ गटबाजी, प्रतिष्ठा आणि दहशतीचं साधन बनला आहे. या प्रवृत्तीमागील कारणे समाजाची भूमिका आणि उत्तरदायित्वधर्म रक्षण हे फक्त ढोल बडवून किंवा घोषणांनी होत नाही, तर सत्य, करूणा, आणि सेवाभावाने होते. आपल्याला या नवीन ‘धर्मरक्षकां’पासून सावध राहायला हवे. समाजाने सुजाण व्हावे, शिक्षण घेऊन विचारांची खोल जाणीव करावी लागेल. धर्म हा माणसाला माणूस बनवतो, त्याचा बुरखा पांघरून माणसाला पशू बनवणाऱ्यांना आपण धर्माचे रक्षक मानू शकत नाही. आज गरज आहे खऱ्या अर्थाने धर्म समजून घेण्याची, आणि त्याच्याशी संबंधित जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींवर सोपवण्याची. साधू-संतांची जागा कोणीही घेऊ शकत नाही – विशेषतः गुन्हेगारी वृत्तीचे लोक तर मुळीच नाही. धर्माचे खरे रक्षण तेव्हाच होईल, जेव्हा समाज विवेकाने, नीतीने आणि सत्याने चालेल.

धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी : पूर्वीचे साधू-संत- महंत आणि आजचे गुंड Read More »

गरीबांचं काय? – न्याय, देव आणि भेदभावाचं वास्तव; भिक्षेकरी मृत्यू प्रकरणात चौकशी करा

Maharashtra News: “न्याय आणि देव श्रीमंतांना लवकर भेटतो, गरिबाला नाही” – ही म्हण आजही आपल्या समाजाच्या वास्तवाला अगदी नेमकं व्यक्त करते. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात नुकतीच घडलेली हृदयद्रावक घटना हेच दाखवून देते. विसापूर येथील भिक्षेकरू गृहातून उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकरूंचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पिण्यासाठी पुरेसं स्वच्छ पाणीही मिळालं नाही, असं सांगितलं जात आहे. हा मृत्यू नुसता आजारपणामुळे झाला की व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे, हा खरा प्रश्न आहे. या घटनेनं अनेकांचे काळीज हलवले. गरिबांना वेळेवर उपचार, साधी सुविधा – अगदी पिण्याचं पाणीही मिळू नये? ही दुर्दैवी स्थिती काही नवीन नाही. याच शासकीय रुग्णालयात 2021 मध्ये 18 जणांनी जीव गमावला होता. त्यांच्याही मृत्यूमागचं कारण ‘व्यवस्थेचं अपयश’चं होतं, असं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं होतं. पण त्यांनाही न्याय मिळाला नाही. ना कुणावर कारवाई झाली, ना व्यवस्थेत सुधारणा. आजही गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयांच्या ओस पडलेल्या खाटा, तुटक्या सांडपाण्याच्या नळ्या आणि दुर्लक्षित वैद्यकीय यंत्रणांमध्ये अडकलेले दिसतात. दुसरीकडे, श्रीमंतांसाठी खासगी रुग्णालयं, एअर कंडिशन सुविधा, वेळेत टेस्ट्स आणि डॉक्टरांचं विशेष लक्ष हे सगळं सहज उपलब्ध असतं. मग खरंच विचारावंसं वाटतं – न्याय काय फक्त श्रीमंतांसाठीच राखून ठेवलेला आहे का? लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला समान हक्क असतो – हे आपण शाळेत शिकतो. पण वास्तवात हा हक्क फक्त कागदावरच असतो. जेव्हा गरीब माणसाचा जीव जातो, तेव्हा त्याच्या मागे न्यायासाठी लढणारा कोणीही नसतो. ना वकिलांची फौज, ना मीडिया कवरेज, ना जनतेचा आक्रोश. पण तेच जर एखादा श्रीमंत मरण पावला, तर संपूर्ण यंत्रणा हलते. आज गरिबांना न्याय मिळावा, इतकीच माफक अपेक्षा आहे. अहिल्यानगरमधील या मृत्यूंची सखोल चौकशी झाली पाहिजे. जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं – अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याची हमी सरकारने घ्यावी. अन्यथा ही ‘शासकीय’ व्यवस्था केवळ कागदोपत्री न्यायाची भाषा करणारी आणि प्रत्यक्षात गरीबांचा आवाज दाबणारी यंत्रणा ठरेल. गरीबांचं काय? – हा प्रश्न फक्त प्रश्न म्हणूनच न राहता, उत्तरांसह सन्मानाने मांडला गेला पाहिजे. कारण न्याय सगळ्यांसाठी असतो, निवडकांसाठी नाही.

गरीबांचं काय? – न्याय, देव आणि भेदभावाचं वास्तव; भिक्षेकरी मृत्यू प्रकरणात चौकशी करा Read More »