Nitesh Rane: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी या हल्ल्यावरून वादग्रस्त वक्तव्य केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सभेला संबोधित करताना हिंदूंनी कोणत्याही दुकानदाराकडून वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याचा धर्म विचारावा असं ते म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एका विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
या सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, दहशतवाद्यांनी लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या धर्माबद्दल विचारले. म्हणून, आता हिंदूंनीही खरेदी करण्यापूर्वी दुकानदारांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले पाहिजे.
जर कोणी म्हणत असेल की तो हिंदू आहे, तर त्याला हनुमान चालीसा पठण करायला सांगा. जर तो पठण करू शकत नसेल तर त्याच्याकडून काहीही खरेदी करू नका. असं या सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, कधीकधी काही लोक त्यांचा धर्म लपवतात किंवा खोटे बोलतात. त्यामुळे लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. आता हिंदू संघटनांनीही अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलले पाहिजे.
पहलगाममध्ये काय घडले?
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. या 27 पैकी 6 जण महाराष्ट्राचे होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.