DNA मराठी

Devendra Fadanvis

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण

Ladki Bahin Yojana : आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 मिळणार आहे. माहितीनुसार, अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. लाडकी बहिण योजनेचे हफ्त्यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे. मात्र आता सरकारकडूनलाडकी बहीण योजनेचे निर्षकाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींच्या संख्येत घट होत आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात हफ्ता जमा करण्यात आला होता तर जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात 2 कोटी 37 लाख महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली होती. निवडणुकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदाराकडे पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न होता. त्यामुळे या योजनेत भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांती रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra News: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा

Maharashtra News: मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, विरोधी नेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसद सदय तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित असणार आहे. मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर झाला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहे. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. प्रौढ वाडमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाडमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. प्रौढ वाडमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही. त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नाही. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नाही. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे. वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.

Maharashtra News: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा Read More »

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (NA) परवानगी आवश्यक असणार नसल्याची घोषणा केली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानीव अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एनए करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे, हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीचा उद्योगासाठी वापर करावयाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही एनए परवानगी घेणे आवश्यक नाही. त्यासाठी या उद्योग घटकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी (Development permission) घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे (तलाठी) जावे. त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दप्तरात करावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. औद्योगिक जमिनीसाठी एनएची आवश्यकता असणार नाही. तसेच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही Read More »

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार

Maharashtra Government: महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला. त्यानुसार राज्य स्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आजच्या सुधारित जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार नाही. तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नव जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार अनेक शासकीय विषयात समावेशअनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार असून, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे. प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे. या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी असावे. प्रमाणपत्र देण्याचा अधिकारशासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असेल. काय म्हणाले बावनकुळे?सुधारित निर्णय सरकारने केला असून, आता सरकारी सेवा व सुविधांसाठी लागणारी कागदपत्रे सुलभपणे मिळतील. जेणेकरून सरकार आपल्या दारी असल्याचे दिसून येईल. विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना महिला वर्गाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच पुरस्कार विजेत्यांनाही या पदावर नेमले जाणार आहे. या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तसेच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केले जाईल.

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार Read More »

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले

GBS Syndrome : सोलापूरमध्ये ‘गिलेन-बॅरे सिंड्रोम’ या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी, जीबीएसचे 19 नवीन संशयित रुग्ण आढळले. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, आतापर्यंत गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे एकूण 101 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 81 रुग्ण पुण्यातील, 14 पिंपरी चिंचवडमधील आणि सहा रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो उपचार करण्यायोग्य आहे. सध्या पुण्यात 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांमध्ये 19 मुले आहेत ज्यांचे वय 9 वर्षांपेक्षा कमी आहे. 50 ते 83 वर्षे वयोगटातील 23 रुग्ण आहेत. जीबीएस ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून परिधीय मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते तेव्हा असे होते. यामुळे मज्जातंतूंमध्ये जळजळ होते ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे किंवा पक्षाघात आणि इतर लक्षणे उद्भवतात. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये मेंदू आणि पाठीचा कणा समाविष्ट असतो. 68 पुरुष आणि 33 महिलारविवारी पुण्यात जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली, असे राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. संक्रमित लोकांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सोलापूरमध्ये संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या जलद प्रतिसाद पथके (RRTs) आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सिंहगड रोडच्या बाधित भागात संसर्ग प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले Read More »

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते. तत्पूर्वी शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन Read More »

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत श्रीगोंदा न्यायालय आणि परीसरातुन चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 जानेवारी रोजी श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील काष्टी गावामध्ये एक इसम संशयीत रित्या विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर फिरत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना माहिती मिळाली. या माहितीवरून किरण शिंदे यांनी पेट्रोलिंग करीता काष्टी गावात एक पथक रवाना केले. पेट्रोलिंग दरम्यान श्रीगोंदा चौक, काष्टी येथे एक इसम श्रीगोंदा चौकात मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी संशयीतरीत्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आला. त्यास पोलिसांनी नाव-गांव विचारले असता महेंद्र बाळु सुपेकर (रा. पुनर्वसन काष्टी ता.श्रीगोंदा) येथे राहत असल्याचे सांगीतले तसेच अधिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान पैशांची आवश्यकता असल्याने मी कोर्टाचे पाकींग, श्रीगोंदा शहर, काष्टी गावात व इतर वेगवेगळया ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांची कारवाई, चोरी होणाऱ्या मोटर सायकलाचा तपास लावला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

Maharashtra News: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांचा घेतला आढावा

Maharashtra News: शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्या. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांना पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झालीया बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत रक्त दान मोहीम, अवयव दान,स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व प्रतिबंधात्मक उपाय योजना,मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करा. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागात ऍलोपॅथी औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी,फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा,अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी,मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,राज्यात कार्यरत अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांशी निगडित सेवा अधिक सुलभ होण्यासाठी भर देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण व उपक्रम राबवा.विभागांतर्गत परीक्षा, नियुक्ता वेळेत देणे, बदल्या, गोपनीय अहवाल, स्थायित्व लाभ, सेवानिवृत्ती प्रकरणाबाबतची कार्यपद्धती सुलभता आणणे,वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि पदोन्नतीचा मानिव दिनांक देणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावी.भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता,ब्लॉकचेन सायबर सुरक्षितता, सांख्यिकीय माहिती गोळा करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना द्या असेही त्यांनी सांगितले. बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनीक, अपर मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे,अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा,प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, आयुक्त राजीव निवतकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

Maharashtra News: मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांचा घेतला आढावा Read More »