DNA मराठी

Ahilyanagar news

police

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर एम.आय.डी.सी मधील उद्योजकाकडुन दर महिन्याला खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी 9.30 च्या सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावून काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती. त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते. तसेच ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या वेळी सूचना दिली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा.एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे. आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.   जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक Read More »

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा

Ahilyanagar News: पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून, चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन-पे अ‍ॅपचा गैरवापर करुन नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा घातला आहे. या घटनेत आरोपीने तब्बल २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन-पे अ‍ॅप सक्रिय होते.५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने फोन-पे अ‍ॅपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीष गावंड, बाळासाहेब सोलास व बिकास बेहेरा आदींच्या खात्यांवर विविध टप्प्यांत मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. एकूण २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा Read More »

leopard

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

Leopard in Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचा मोठा वावर वाढला आहे. आता तर बिबट्या थेट मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे नगर शहराजवळ असलेले भिंगार शहर परिसरात बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनविभागाने अखेर त्याला पकडले आहे. अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार हा आढळून आला. तसेच मनुष्यवस्ती मध्ये येत बिबट्याने अनेकांवर हल्ले केले असून यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता पुन्हा एकदा शहरी वस्ती मध्ये बिबट्या आला असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. भिंगार शहरातील वारूळ वाडी परिसरात बिबट्या हा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी त्याला पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्या हा एका इमारतीकडे पळाला त्यानंतर नागरिकांनी तातडीने वनविभागाला फोन द्वारे संपर्क साधत घटनेची कल्पना दिली बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर गर्दी करू लागले. दरम्यान भेदरलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूम मध्ये जाऊन बसला व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याला अखेर जेरबंद केले.

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद Read More »

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून Read More »

fb img 1770982840504

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी एम. विनोद, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते. पथकासोबत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली. भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली. शेवगाव तहसील कार्यालयात आढावा पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने तहसील कार्यालय, शेवगाव येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. तसेच नुकसानभरपाई व पुनर्बांधणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

fb img 1770982696869

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक !

Nevasa News : जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपशाविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत, नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी शसुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने प्रवरा नदीपात्रात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध साहित्य नष्ट केले. 3 टप्प्यात केलेली कारवाई नेवासा खुर्द (ज्ञानेश्वर मंदिर/लाडमोड टेकडी परिसर): प्रवरा नदीच्या काठावर 36 थर्माकोलचे चप्पू आणि 50 लाकडी बल्ल्या जप्त करून जागीच जाळून नष्ट करण्यात आल्या. दुसरी कारवाई: नदीपात्रातील अन्य एका ठिकाणी 4 थर्माकोलचे चप्पू नष्ट करण्यात आले. कापूर डोह: या भागात 4 चप्पू व 16 लाकडी बल्ल्या जाळून खाक करण्यात आल्या. दिवसभरात एकूण 44 तराफे/चप्पू आणि मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य नष्ट करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कारवाई दरम्यान बोटीमध्ये तांत्रिक बिघाड (पंक्चर) झाल्यामुळे खोल पाण्यातील कारवाई पूर्ण करता आली नाही, तरीही नदीकाठावरील आणि उथळ पाण्यातील अवैध साधनांचा पूर्णपणे बिमोड करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर प्रशासनाचा हा ‘वॉच’ असाच कायम राहणार असून दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरूच राहील.

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक ! Read More »

kotla

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी

Kotla Crime : नगर शहरातील कोठला परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री गोळीबाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज चेंबर समोर बुधवारी (ता. 11) रात्री सव्वाअकरा वाजता गोळीबार झाला. यात अबरार मुख्तार शेख हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यदने, अबरारवर गोळीबार केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोठला परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation: स्वीकृत नगरसेवकांचा फॉर्म्युला ठरला; गटनेते कोणाची शिफारस करणार?

Ahilyanagar Municipal Corporation: महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन 68 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर महापौर व उपमहापौराची निवड झाली. आता पहिल्या सभेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार 6 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी शासन अध्यादेशानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचीच शिफारस संबंधित पक्षांच्या गटनेत्यांना करावी लागणार असून गटनेते कोणाची शिफारस करणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे. राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन, भाजपचे दोन शिवसेनेचा एक सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून निवडला जाणार आहे. नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत सदस्य) म्हणून नियुक्त होण्यासाठी राज्यात नोंदणीकृत असलेला डॉक्टर, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक, सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील, महापालिका किंवा नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी अथवा नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी या घटकांपैकी एका घटकात किमान पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र ठरणार आहे. संबंधित राजकीय पक्षाचा गटनेता आयुक्तांकडे पात्र उमेदवारांची शिफारस करतील. आयुक्तांच्या छाननीनंतर महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाते. स्वीकृत सदस्यांबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती नियमानुसार, महापालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, 1950 खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असलेली असेल, धर्मादाय आयुक्तांनी अधिकृतरीत्या मान्यता दिल्यापासून समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा किमान पाच वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.

Ahilyanagar Municipal Corporation: स्वीकृत नगरसेवकांचा फॉर्म्युला ठरला; गटनेते कोणाची शिफारस करणार? Read More »

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Ahilyanagar News : प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली. या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील १४ तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण २०२१ वाहनांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्या ४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या ६ लाख ४६ हजार रुपये दंडापैकी ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. “जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश

Nilesh Lanke: केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश Read More »