DNA मराठी

Ahilyanagar news

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »

Water

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर

Ahilyanagar News : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अहिल्यानगर ल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ गावे आणि तब्बल ५०० वाड्या-वस्त्यांवर सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे. या गावे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश असून, याद्वारे यातील सुमारे १ लाख ४१२२ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. तसेच नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत असलं तरी तो गावाला पूर्णपणे पाणी देऊ शकत नाही त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो तर काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.दरम्यान, जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात ९०० कोटींवर खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.

Ahilyanagar News: पाणी टंचाईच सकट गडद! जिल्ह्यातील 1 लाख लोकांची तहान भागतेयं टँकरच्या पाण्यावर Read More »

img 20260519 wa0072

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि चार वर्षांपासून गोठलेले राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ही केवळ एक निवडणूक नाही तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय शक्तिसंतुलनाची पहिली मोठी चाचणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा आता भाजपच्या वाढलेल्या संख्याबळामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हा खरा कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने आणि अनेक संस्था अस्तित्वात नसल्याने ही जागा तब्बल चार वर्षे रिक्त राहिली. तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, यामागे राजकीय अंकगणित स्पष्ट दिसते. ५५९ पैकी ९६ जागा रिक्त असल्या, तरी उर्वरित मतदाररचना भाजपसाठी अनुकूल असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने मागील काही वर्षांत निर्माण केलेले वर्चस्व आता विधान परिषद निवडणुकीत कसोटीवर लागणार आहे. नगर जिल्ह्याच्या या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रंगतदार राहिला आहे. एका मताने दिग्गजांचा पराभव, मिठाईच्या बॉक्समधून उमेदवारीची चाहूल, मतदारांच्या ‘भावा’भोवती फिरणारे राजकारण या साऱ्यांनी या निवडणुकीला नेहमीच वेगळे स्थान मिळवून दिले. मर्यादित मतदारसंख्या असल्यामुळे येथे राजकीय गणिताइतकेच वैयक्तिक संबंध आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच ही निवडणूक पक्षनिष्ठेपेक्षा सत्तासमीकरणांची अधिक असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडे जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ आहे. त्यामुळे “ही जागा भाजपलाच मिळावी” असा सूर पक्षातील निष्ठावंतांकडून उमटू लागला आहे. महायुतीतील जागावाटपात भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. तर राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचे नावही चर्चेत आहे. तनपुरे यांनी घेतलेली ‘मवाळ’ भूमिका आणि त्याबदल्यात मिळालेल्या आश्वासनांच्या चर्चा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतील. ते भाजपकडे झुकतात की अजित पवार गटाकडे, यावर अनेक समीकरणे बदलू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक आव्हानात्मक आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने विजयासाठी त्यांना केवळ राजकीय चातुर्य आणि मतविभाजनावर अवलंबून राहावे लागेल. अशा वेळी ‘क्रॉस वोटिंग’ आणि अंतर्गत नाराजी हे घटक निर्णायक ठरू शकतात. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक केवळ एक जागा भरणारी प्रक्रिया नाही; तर आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. भाजपला आपले वर्चस्व अधिक मजबूत करायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत नगरचे राजकारण अधिक चुरशीचे, अधिक वैयक्तिक आणि अधिक अनपेक्षित वळणे घेणार, हे निश्चित.

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Read More »

petrol

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका

Petrol Price Today: अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मुबलक इंधन उपलब्ध जिल्हा प्रशासनाने IOCL, BPCL व HPCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली असून, मागील सात दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक इंधन पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींवर तत्काळ कार्यवाही काही पेट्रोल पंपांवर बिलिंग किंवा क्रेडिटच्या तांत्रिक कारणांमुळे किरकोळ विलंब झाल्यास, प्रशासनाकडून अवघ्या ४ ते ५ तासांत इंधन उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यात येत आहे. प्रशासनाचा प्रभावी समन्वय शासनाचे संबंधित विभाग, गॅस एजन्सीज व पेट्रोल पंप चालक यांच्यात योग्य समन्वय राखण्यात आला असून, सर्व प्रकारचे इंधन सुरळीत उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून करण्यात आले आहे.

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका Read More »

oplus 131072

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल

Nilesh Lanke: नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भोंदूबाबा नानासाहेब विरकर आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या पाच एकर जागेत एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते.दरम्यान, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊलीसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके दिसत आहे. राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आला आहे. तसेच एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचे दिसत आहे. खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये सात-आठ वर्षे राहून त्याने “काळी विद्या” शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचे सांगत असल्याचाही दावा केला जात आहे.राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे तो सांगत असल्याने, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोलिस तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल Read More »

img 20260508 wa0011

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने?

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहराच्या बाह्य वळण महामार्गावर सध्या वाहतुकीपेक्षा दहशतीचीच अधिक चर्चा आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना ‘बायपासनेच जा’ असा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी चालकांना अडवून मारहाण, दमदाटी आणि पैशांची उकळपट्टी होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. सार्वजनिक रस्ता हा प्रवासासाठी असतो, दहशतीसाठी नव्हे पण नगर बायपासवर सध्या जणू काही लुटारूंचेच राज्य सुरू असल्याचे चित्र दिसते. महानगरपालिकेजवळील काही भागांमध्ये विशेषतः ट्रक चालक, मालवाहतूक करणारे वाहनचालक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांवर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. “शहरात जायचे असेल तरही बायपासनेच जा” अशी सक्ती केली जाते, अन्यथा शिवीगाळ, मारहाण किंवा वाहन अडवण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ गुंडगिरी नाही, तर कायद्याला थेट आव्हान आहे. प्रश्न असा की, हा हट्ट नेमका कोणाचा? बायपासवरूनच वाहतूक वळवण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? टोल, वसुली, स्थानिक दबावगट की इतर कोणती अदृश्य साखळी? प्रशासनाकडे या प्रश्नांची उत्तरे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण कारवाई मात्र अपुरीच राहिली. काही वेळा तात्पुरती मोहीम राबवली जाते, काही जणांवर कारवाई होते, आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. म्हणजेच समस्या केवळ व्यक्तींची नसून व्यवस्थेतील शिथिलतेची आहे. बायपास हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी असतो, भीती निर्माण करण्यासाठी नाही. जर वाहनचालकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मार्ग निवडताना भीती वाटत असेल, तर तो केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरचा प्रश्न ठरतो. नगर बायपासवरील लूट आणि मारहाणीच्या तक्रारींकडे केवळ “घटना” म्हणून पाहून चालणार नाही. या मागे असलेली साखळी उघड करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि वाहनचालकांना सुरक्षिततेची हमी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, रस्ते विकासाचे प्रतीक न राहता भीतीचे प्रतीक बनतील आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.

Ahilyanagar News: नगर बायपास : रस्त्यावरचा दहशतीचा कारभार कोणाच्या आशीर्वादाने? Read More »

aamras

Ahilyanagar News: जावई धोंडा अन् आमरसाची मेजवानी; भैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या वतीने अधिकमासानिमित्त जावयांसाठी धोंडा जेवण उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता महाआरतीनंतर उपक्रमास सुरुवात होईल, असे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. अधिक मासानिमित्त अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. जावयाला धोंडा जेवण देण्याची परंपरा आहे. देवस्थानाच्या वतीने अनेक वर्षांपासून असा उपक्रम राबविण्यात येतो. आगडगाव व पंचक्रोशीतील रतडगाव, देवगाव, खांडके, कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, कोल्हार, डमाळवाडी अशा गावांबरोबरच नगर शहर व राज्यभरातून भाविक या अन्नदानासाठी नावनोंदणी करतात. नोंदणी झाल्यानंतर लगेचच संबंधित लेक व जावयाला पाचीपोषाख दिला जातो. त्यामध्ये पैठणी, तांब्याचे ताट, निरंजन, अनारसे, बत्ताशे, जावयाला कुर्ता-पायजमा, टोपी, पंचा आदींचा समावेश आहे. देवस्थानाजवळ येऊन नाव नोंदणी करून लगेचच पाचीपोषाख ताब्यात दिला जातो. या उपक्रमानिमित्त भाविकांना नगरहून येण्यासाठी एसटीच्या जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच देवस्थानची बसही सेवेत असेल. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावलीची व्यवस्था, स्वच्छ पाणी, प्रशस्त पार्किंग असे नियोजन करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. साडेतीन हजार किलो आंबे धोंडा, रस या उपक्रमासाठी साडेतीन हजार किलो आंबे खरेदी करण्यात येणार आहेत. पुरण-पोळी, धोंडा यासाठी एक हजार किलो डाळीचे नियोजन आहे. शंभर अन्नदात्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. प्रथम नावनोंदणी करणारास प्राधान्य दिले जाणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी राबविलेल्या या उपक्रमात सुमारे २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. या वर्षीही मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

Ahilyanagar News: जावई धोंडा अन् आमरसाची मेजवानी; भैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम Read More »

Accident Photo

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार

Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली. ‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ahilyanagar Accident: मुरबाडमध्ये बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात; अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघे ठार Read More »

child marriages

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

Ahilyanagar News : महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात एकूण ९ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. ३ मे २०२६ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत नगर शहरात ३, अकोल्यात १, राहुरीत १, श्रीगोंद्यात १, पाथर्डीत १, नेवाशात १ आणि नगर तालुक्यात १ असे एकूण ९ बालविवाह थांबविण्यात आले.या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News: एकाच दिवसात 9 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश Read More »

water issue

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा

Ahilyanagar News: जिल्ह्यात वाढते तापमान व संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत असून, कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. दि. २९ एप्रिल २०२६ रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ३४ गावे व १६२ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे ६४ हजार ५८६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी एकूण ३० टँकर (४ शासकीय व २६ खासगी) कार्यरत असून संगमनेर, पारनेर व नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अनुक्रमे १०, १३ व ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या खेपांबाबतही समाधानकारक प्रगती नोंदविण्यात आली आहे. मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण करण्यात आल्या असून हे प्रमाण सुमारे ९६.७९ टक्के आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी वेळेत पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील १२ विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी ३ जलस्त्रोत थेट गावांसाठी तर ९ टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्यात आला असून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना गळती किंवा पाण्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ahilyanagar News: नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा Read More »