DNA मराठी

Ahilyanagar news

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Crime: शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4000 किलो मांगुर मासा जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा असे आदेश सोमनाथ घार्गे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेश दिले होते. या आदेशावरून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. 03 मार्च 2026 रोजी ट्रक नंबर WB25M5023ú केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी स्वपन नियम डे , मकबुल रौफ सरदार कुतुब आयुब मंडल आणि मृत्युंजय मुकुल विश्वासला अटक केली आहे. चारही आरोपी पश्चिम बंगाल येथे राहणारे असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000 रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून  

Ahilyanagar Crime :  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संवत्सरजवळील रामवाडी येथे दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.   खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून   Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया

Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा. खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत. दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे. जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही. आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा. तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया Read More »

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

pathardi

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी

Pathardi Crime : शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी झडप घालत पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिर हबिब शेख (वय ३४, रा. माणिकदौंडी चौक) हे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपली यमाहा लिबोरो (क्र. एमएच-१६ डब्ल्यू ३३१९) घरासमोर उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. शेख यांनी विचारणा केली असता तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे आढळले. विरोध करताच दोघांनी त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने कमरेतील गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसले असता त्यांच्या खिशातील ६५० रुपये हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दुचाकी पळवून नेली, तर दोन जण पल्सरवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड, संदीप बडे,संदीप नागरगोजे ,भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत अनिकेत शामवेल शिंदे वय २२ रा. शितलानगर देहूरोड पुणे याचे सह आणखी दोघा अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वापरलेली पल्सरही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार?

Sujay Vikhe Patil: अहिल्यानगरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. पराभव हा राजकीय कारकिर्दीचा शेवट नसतो, तर अनेकदा तो नव्या उभारणीचा प्रारंभ ठरतो. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात हीच प्रक्रिया सध्या दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी घेतलेली राजकीय पुनर्बांधणीची दिशा आणि आता राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चा, या केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा भाग नाहीत; त्या महाराष्ट्राच्या बदलत्या सत्तासमीकरणांचेही प्रतीक आहेत. पराभवानंतरची पुनर्बांधणी : पराभव की संधी? लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक नेते राजकीय अंधारात जातात. परंतु सुजय विखे पाटील यांनी हा पराभव आत्मपरीक्षणाची संधी मानून संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील नेतृत्व स्वीकारून त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सहकार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जातो. या क्षेत्रात नेतृत्व मिळवणे म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय प्रभावही निर्माण करणे होय. याच काळात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि स्थानिक राजकारणात त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका, विशेषतः संगमनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल, यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. स्थानिक आमदारांच्या निवडणुकीत आणि महानगरपालिका सत्तास्थापनेत त्यांनी निभावलेली भूमिका, ही त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक मानली जाते. राज्यसभा : पराभूत नेत्यांसाठी पुनरागमनाचा मार्ग? भारतीय संसदीय व्यवस्थेत राज्यसभा ही केवळ “वरिष्ठ सभागृह” नसून अनेकदा ती राजकीय पुनरागमनाचे व्यासपीठ ठरते. लोकसभेत पराभव झालेल्या किंवा थेट निवडणूक लढवणे कठीण झालेल्या नेत्यांना राज्यसभेद्वारे संसदेत स्थान दिले जाते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीकडे केवळ वैयक्तिक प्रगती म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ही एक व्यापक राजकीय रणनीती असू शकते. भाजपसाठी अहिल्यानगर आणि आसपासचा भाग हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या भागात पक्षाची ताकद वाढवण्यात विखे पाटील कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला अशा प्रभावशाली कुटुंबातील नेत्याला राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा विचार आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. वारसा आणि नेतृत्व : कौटुंबिक प्रभावाचा प्रश्न सुजय विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या वडिलांचा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव नाकारता येणार नाही. सहकार, प्रशासन आणि राज्यकारभारातील त्यांचा अनुभव हा सुजय विखे पाटील यांच्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक वारसा ही नवी गोष्ट नाही; शरद पवार, ठाकरे, चव्हाण, मुंडे यांसारख्या अनेक घराण्यांनी ही परंपरा निर्माण केली आहे. मात्र, वारसा हा केवळ प्रवेशद्वार असतो; टिकून राहण्यासाठी वैयक्तिक नेतृत्वगुण आवश्यक असतात. सुजय विखे पाटील यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा दाखला मानला जाऊ शकतो. राज्यसभा उमेदवारी : पक्षनिष्ठेचे पारितोषिक की रणनीतिक गरज? राज्यसभेची उमेदवारी ही अनेकदा पक्षनिष्ठा, संघटनात्मक योगदान आणि भविष्यातील राजकीय संभाव्यता या तिन्ही गोष्टींचा संगम असते. भाजपसारख्या पक्षासाठी महाराष्ट्रात मजबूत स्थानिक नेतृत्व निर्माण करणे ही दीर्घकालीन गरज आहे. सुजय विखे पाटील यांची संभाव्य निवड ही या व्यापक रणनीतीचा भाग असू शकते. तथापि, राज्यसभेत जाणे म्हणजे केवळ प्रतिष्ठा नव्हे, तर जबाबदारीही आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणनिर्मितीत सहभाग, राज्याच्या प्रश्नांना संसदेत मांडणे आणि मतदारसंघाच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणे, ही राज्यसभा सदस्याची मूलभूत कर्तव्ये आहेत. पुनरागमन की नव्या पर्वाची सुरुवात? सुजय विखे पाटील यांच्या राज्यसभा संभाव्य उमेदवारीच्या चर्चा या केवळ राजकीय अफवा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत आहेत. पराभवानंतरही राजकीय सक्रियता कायम ठेवून संघटनात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न, हा त्यांच्या नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. राजकारणात वारसा महत्त्वाचा असतो, पण अंतिम कसोटी ही जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची परिणामकारकता यांचीच असते. राज्यसभेचा मार्ग खुला झाला, तर तो सुजय विखे पाटील यांच्यासाठी केवळ पुनरागमन नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकतो.

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार? Read More »

crime

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Ahilyanagar Crime : एका 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारिरिक संबंध ठेवुन तिला गर्भवती केल्या प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखे पोउपनि/दिपक मेढे पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सुनिल मालणकर, योगेशे कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीस शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते. पथकाने गुन्ह्यातील आरोपीला आण्णाभाऊ साठे चौक, लाल टाकी येथून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक Read More »

crime

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका…

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल पाच दिवस जंगलात तिला ठेवत तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरीत घडली आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्या आक्रमक झाले असून गाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. यामुळे राहुरीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. कॉलेजला जात असल्याचे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती मात्र ती परतलीच नाही. या मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्थानकात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित मुलीच्या मोबाईलचे लोकेशन व तांत्रिक साह्याने पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवली. पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती अशी की घटनेतील आरोपीने नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला जवळील परिसरात मुलीला अपहरण करून घेऊन गेला होता. यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली आणि तीन जणांना अटक केली आहे.

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका… Read More »

img 20260219 wa0008

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक

Ahilyanagar Police : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत गांजाची वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 132 किलो गांजा असा एकूण 25 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत गणेश अंकुश कराड (वय 32), सुखदेव शिवनाथ कदम (वय -30, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), यांच्या विरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले. सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम. एच. 14 जी. एच.2330 ही मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी कबाडी यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघाले. मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना बातमीतील नमुद स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसली तेव्हा बातमीतील हकिगतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पीओ गाडी थांबवुन गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम बसलेले दिसुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश अंकुश कराड वय – 32 वर्षे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर, 2) सुखदेव शिवनाथ कदम वय -30 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि/ विजय झंजाड यांनी बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये 04 गोण्या मिळुन आले. नमुद इसमांना गोण्या बाबत विचारपुस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपीतांचे ताब्यातुन 18,18,000/-रु कि.चा 132.84 किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, 25,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 7,00,000/-रु कि.चा एक स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असा एकुण 25,43,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/800 भाऊसाहेब राजु काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र. नं. 60/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20(ब)ii(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक Read More »

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा

Ahilyanagar Police: अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी थेट अ‍ॅक्शन मोडवर जात खंडणीखोर आरोपीची भररस्त्यात वरात काढली आहे. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत बेड्या ठोकून फिरवण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर शहरात. अखिल भारतीय कामगार सेनेचा नेता भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याची भररस्त्यात वरात काढत पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला. काही दिवसांपूर्वी निंबळक एमआयडीसीतील सुयश मेटल प्रोसेसिंग या कंपनीत सदानंद सोनवणे, राजेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर प्रवेश करत दहशत माजवली होती. कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना काम बंद पाडण्याची धमकी देत, काम सुरू ठेवायचं असेल तर दरमहा एक लाख रुपये द्या, अन्यथा मालकाला जीवे मारू, अशी थेट धमकी देण्यात आली होती. याचवेळी 20 हजार रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर संतप्त उद्योजकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत तक्रार दिली. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी सदानंद सोनवणे याला अटक केली. यानंतर सायंकाळी पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत आरोपीची बेड्या ठोकून वरात काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे उद्योजकांमध्ये समाधानाचं वातावरण असून गुन्हेगारांमध्ये मात्र भीतीचं सावट पसरलं आहे. उद्योजकांना दिलासा… गुन्हेगारांना स्पष्ट संदेश अहिल्यानगर पोलीस आता थांबणार नाहीत!

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा Read More »