DNA मराठी

Ahilyanagar news

farmers

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर…

E Pik Pahani : उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील व ती नंतर भरता येणार नाही. परिणामी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत, पीक विमा तसेच शासकीय अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासन निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावर ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावर २५ मे ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पिकांची नोंद करण्यात येईल. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू स्थितीत पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत मोबाईलद्वारे पीक नोंदणी पूर्ण करावी, असे‌ आवाहनही आशिया यांनी केले आहे.

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर… Read More »

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा

VBA on Gas Cylinder : वंचित बहुजन आघाडी, जामखेड तालुका यांच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?” गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई काळाबाजार सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लुटमार या मुद्द्यावर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चुल पेटवून आंदोलन करण्यात आले यावेळी वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव म्हणाले की सध्या देशभरात गॅस सिलिंडरची भीषण व कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आलेली आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा ठोस संशय जनतेमध्ये निर्माण झाला आहे. याचाच फायदा घेत काळाबाजार करणारे दलाल व काही संबंधित यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे आर्थिक लूट करत आहेत. ९१६ रुपयांना उपलब्ध असणारा गॅस सिलिंडर जाणीवपूर्वक बाजारातून गायब करण्यात आला असून, तोच सिलिंडर ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत काळ्या बाजारात विकला जात आहे. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून, यामागे कोणाचे संरक्षण आहे, असा थेट प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. महिला, गृहिणी, गरीब, श्रमिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने त्यांच्या घरातील चुली अक्षरशः विझल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत अमानुष व असह्य बनली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना, दुसरीकडे काळाबाजार करणारे लोक हजारो रुपये कमवत आहेत. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी हे तीव्र आंदोलन उभारण्यात आले आहे असे म्हणाले तातडीच्या मागण्या 1. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ दूर करून पुरवठा सुरळीत करण्यात यावा. 2. काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 3. जादा दराने गॅस विक्री करणाऱ्या एजन्सींवर छापे टाकून त्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. 4. गॅस वितरण व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 5. सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात व नियमित गॅस पुरवठा हमीने उपलब्ध करून देण्यात यावा. जर वरील मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही, तर जनतेचा तीव्र रोष उफाळून येईल आणि हे आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व सरकारची राहील, याची नोंद घ्यावी असा ईशारा अरुण जाधव यांनी देऊन जामखेड तहसीलदार धनंजय बांगर यांना निवेदन दिले.

VBA on Gas Cylinder: गॅसचा काळाबाजार! तर आमदार खासदारांच्या दारासमोर चूल पेटवून आंदोलन करणार…वंचितने दिला इशारा Read More »

cockfighting

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (वय-२७, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), आशरफ बाहुला खान (वय-५०,रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर), मोहम्मद उस्मान अली शेख (वय-४०, रा. महिम उन्नती सोसायटी मुंबई), अमजद युसुफ मगदुम वय-४३, रा. नागपुरचा येरवडा पुणे), सय्यद अझर अक्तर वय-४०, रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर), रोहीत श्रीचंद गोहिर (वय-३३, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (वय-३२, रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (वय-४६ रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक), तौफिक सिकंदर शेख (वय-२८, रा. नेवसा खुर्द ता.नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (वय-३४, रा.. मुकुंदनगर अहिल्यानगर), योगेश मनोहर छजलांनी (वय-४०, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संतोष गणेश गोयल (वय- ३९, रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर वय-४६ रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (वय- ४०, रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (वय-४२, रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी वय-२९ रा. मगळवारपेठ पुणे), समीर फिरोज शेख (वय-२२ रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (वय-७० रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (वय-६३, रा. मंगळवारपेठ पुणे), सोहेल कबीर सय्यद वय-३८ रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), उत्तम एकनाथ साळवे ( वय-४०, रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उज्जनी रस्त्यावर एका मोकळ्या जागेत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे काही व्यक्ती कोंबड्यांची झुंज लावत असून उपस्थित नागरिक त्यावर पैशांची पैज लावत असल्याचे आढळले. पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल Read More »

img 20260330 wa0005

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता, एक व्यक्ती घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून १० गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटार मशीन तसेच पाच लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत आरोपी हा साद अन्वर खान (रा. मुकुंदनगर, सध्या फरार) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणताही परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांची धोकादायक पद्धतीने साठवणूक करून स्वतःचे व नागरिकांचे जीवित धोक्यात घालून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत Read More »

acid attack

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या अनुषंगाने “पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२” अंतर्गत पीडितेला ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीडितेच्या आईच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी समितीची पुढील बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिवीक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या गृह चौकशी अहवालाचे परीक्षण करून पीडितेच्या आईच्या खात्यात अतिरिक्त २ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणात पीडितेला एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले.

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर Read More »

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी तीन निरीक्षक दाखल

Rahuri By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २०२६ करिता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले जनरल, खर्च व पोलीस निरीक्षक १८ मार्च रोजी जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी निवडणूक कामकाजाला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या माहितीसाठी या निरीक्षकांचा तपशील प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृहात जनरल निरीक्षक देवानंद रियांग व खर्च निरीक्षक व्ही.ए.टी.व्ही. कुमार दाखल झाले आहेत. नागरिकांना जनरल निरीक्षकांशी ९२०९५१६९९४ व खर्च निरीक्षकांशी ९२०९६०१८३९ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच पोलीस निरीक्षक रितुराज रवी हे अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले असून त्यांनी कायदा व सुव्यवस्था विषयक कामकाज सुरू केले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९२०९६०३३८६ असा आहे. या निरीक्षकांसाठी प्रशासनामार्फत संपर्क अधिकारी, लघुलेखक, लिपिक, पोलीस गार्ड, वाहन व शिपाई आदी व्यवस्था करण्यात आली आहे. नियुक्त संपर्क अधिकारी निरीक्षकांच्या सातत्याने संपर्कात असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे.

Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीसाठी तीन निरीक्षक दाखल Read More »

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली. सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल Read More »

hpv vaccine

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात

HPV Vaccination : जिल्ह्यात ९ मार्च २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. या मोहिमेत एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येईल. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल. लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चालेल व सर्व पात्र लाभार्थ्यांची तसेच दिलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर केली जाणार आहे. लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशी पोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी. लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाईल. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला तीस मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही. ज्या मुलींना मागील लसीकरणामुळे ॲलर्जी आली असेल किंवा यीस्टची ॲलर्जी असेल त्यांना ही लस दिली जाणार नाही. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना व ज्यांनी यापूर्वी कोणतीही एचपीव्ही लस घेतली असेल त्यांना या मोहिमेत लस मिळणार नाही. या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच गाव पातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नगरगोजे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी केले आहे.

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात Read More »

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Crime: शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4000 किलो मांगुर मासा जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा असे आदेश सोमनाथ घार्गे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेश दिले होते. या आदेशावरून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. 03 मार्च 2026 रोजी ट्रक नंबर WB25M5023ú केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी स्वपन नियम डे , मकबुल रौफ सरदार कुतुब आयुब मंडल आणि मृत्युंजय मुकुल विश्वासला अटक केली आहे. चारही आरोपी पश्चिम बंगाल येथे राहणारे असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000 रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई Read More »