Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने त्यांना पुन्हा एकदा घरी पाठवण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील काही लोक देखील या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना स्पेशल विमानाने सरकारने पुन्हा एकदा घरी पाठवल आहे.
तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एक संतापाची लाट पसरली असून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. आज नगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, तृतीयपंथ समुदायाच्या वतीने आम्ही जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या दहशत वादी कृत्याने देशाच्या शांततेला व एकात्मतेला आव्हान दिले आहे. अशा हिंसक घटनांचा कोणत्याही प्रकारे पाठिंबा देता येणार नाही.
भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे आण सर्व नागरिकांना सुरक्षितेचा मुलभूत अधिकार आहे. आम्ही तृतीयपंथी समुदायाच्या वतीने या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. तसेच या घटनेतील पीडित कुटूंबीयांप्रती आमची सहवेदना व्यक्त करतो. आपण या निषेध निवेदनाच्या योग्य ती दखल घेऊन शासनस्तरावर आमची संदेश पोहोचवावा अशी विनंती निवेदनामार्फत सरकारला करण्यात आली आहे.
तसेच देशातील विविध एअरलाइन्सने हल्ल्यानंतर भाडेवाढ केल्याने अनेक नागरिकांचे हाल झाल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील काजल गुरु, अध्यक्ष तृतीयपंथी समाज, अहिल्यानगर यांनी केली आहे.