Maharashtra Government : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा मध्यवर्ती आणि व्यापारी बँकांमधील एकूण ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या यादीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील ४१ हजार, तर व्यापारी बँकांमधील ३ लाख १४ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित लाभार्थी याद्या बँक शाखा तसेच ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जबाकी तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच जवळच्या ‘आपले सरकार’ सुविधा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ‘हेअरकट’ धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेली पात्र रक्कमच कर्जमाफीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनीही काळजी करण्याची गरज नाही. पुढील ८ ते १० दिवसांत आणखी एक लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






